Wednesday, October 24, 2007

तरीही शब्दातच..

सगळेच अनुभव शब्दांत व्यक्त करता आलेच पाहिजेत असा हट्ट कां असतो आपला? एकतर बोलून तरी दाखवायचं किंवा लिहून तरी! आपण सारे सतत हेच करत असतो. दुसर्‍यांपर्यंत अनुभव पोचलेच पाहिजेत आपले असा तरी अट्टाहास कां असावा आपला? अनुभव घ्यावा. आत आत खोलवर झिरपू द्यावा. आपल्यातच. पण नाही.
आपण सगळेच किती शब्दांच्या व्यापात हरवून जायला आसुललेले असतो!

कधी कधी शब्द म्हणजे नुसता गोंगाट असतो. प्रत्यक्ष अनुभवापासून ते विचलित करतात. जसं एखादा फोटोग्राफर आठवणी साठवून ठेवण्याच्या अतिउत्साहापायी वर्तमानात जगण्याचे हरवून बसतो.

त्या संदर्भात एक झेन कथा वाचली होती ती आठवली...


एके दिवशी एक तरुण भिक्षू आणि त्याचे गुरु फुजियामा पर्यंत लांब फेरफटका मारायला जात होते. त्या भिक्षूने तो बर्फाळ डोंगर बर्‍याच वेळा पाहिला होता. तरी त्याला प्रथमच तो खर्‍या अर्थाने जाणवला. जाता जाता तो रानफ़ुलांचे रंग, त्यातली एकतानता, पक्ष्यांच्या भरार्‍या, पहाटेचं तेज आणि हिरवा ताजेपणा, पवित्र पांढर्‍या पाईन वृक्षांचे अंकुर याबद्दल उत्साहाने सांगत होता:" कसं सगळं घडवलय! हा दगड कित्ती दगडी आहे! किती सुंदर आहे ना सगळं? बुलबुलचा आवाज किती गोड... ऐकतो आहेस न? किती अद्वितीय आहे!"

काही तरी पुटपुटत, लंगडत वृद्ध गुरु पुढं जात राहिले. सरते शेवटी शिष्याच्या लक्षात गुरुंच दीर्घ मौन आलं. आणि तो तळमळीनं थोड्या मोठ्यांदाच म्हणाला," हे असं नाही कां? हे पर्वत, ह्या नद्या आणि ही भव्य पृथ्वी, हे सर्व अलौकिक नाही कां? हे सुंदर नाही कां?"

गुरु त्याच्याकडे वळून ठामपणे म्हणाले," हो रे!! पण हे असं सारखं म्हणत राहाण्यात काय हाशिल आहे?"

...............



टी.एस.इलियट काय वेगळं म्हणाला होता?

शब्द... ताणतात
तडकतात ओझ्याखाली
आणि कधीतरी तुटतात.
तणावाखाली निसटतात,
घसरतात, नष्ट होतात.
अचूकते अभावी कुजतात
एका जागी टिकत नाहीत.
स्थिर राहत नाहीत.

शब्द जर इतकेच पोकळ आणि उथळ असतील तर कशाला हा अट्टहास आपला तरी की सगळे अनुभव शब्दांत मांडताच आले पाहिजेत?

Sunday, October 21, 2007

पुन्हा एक ब्लॉगारंभ.

सर्वप्रथम क्षिप्रा चे आणि नंदन चे आभार.

आभार दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे ह्या खेळात सहभागी केल्याबद्दल. दुसरं म्हणजे त्यानिमित्ताने माझाही एक ब्लॉग आहे ह्याची आठवण करुन दिल्याबद्दल.
खरंतर लिहिण्यासारखे इतके विषय असताना आणि लिहिण्याची इच्छा ही असताना न लिहिणे हा एक फार मोठा अपराध मानायला हवा. वेळ नसणे वगैरे सबबींना काही अर्थ नसतो कारण दिवसचे दिवस आपण असंख्य निरुपयोगी गोष्टींमधे बिनदिक्कत वेळ वाया घालवत असतो.
आता दसर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एक ब्लॉगारंभ.
लिहिण्याची गोष्ट मनात आल्यावर वाचण्याची येणार नाही असं होणार नाही. तेव्हा 'जे जे उत्तम' उपक्रमात द्यायचा परिच्छेद ह्या वाचनाच्याच संदर्भात द्यायचं मनात आलं.
अरुण टिकेकरांच एक छोटेखानी पण अत्यंत वाचनीय पुस्तक अक्षरनिष्ठांची मांदियाळी नुकतच मॅजेस्टिकमधे गवसलं. टिकेकर उत्तम व्यासंगी. त्यांनी लोकमुद्रा ह्या पुरवणीत त्यांच्या ग्रंथ-संग्रह आणि इतर वाचन-सफ़रीबद्दल लिहिलेले मनोज्ञ लेखन आपल्या कुणाच्याच स्मरणातून जाणारे नाही. त्या लेखांचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक.


------------------------------------------------------------------------------------------------


काव्य, कथा, कादंबर्‍या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पयर्‍या आहेत, असं मला वाटतं. यौवनात काव्याची मोहिनी पडावी यात काही नवल नाही. जीवनानुभवाचे चटके जेव्हा बसू लागतात तेव्हा कथा-कादंबर्‍या आपल्याला जवळच्या वाटू लागतात. आणि त्या चटक्यांनी जेव्हा आपल्याला समाधान मिळत नसेल, तेव्हा अमुक अमुक मोठी व्यक्ती अमुक क्षणी कशी वागली असेल यासंबंधी आपल्याला उत्सुकता वाटायला लागते. तेव्हा प्रत्येक वाचक चरित्र-आत्मचरित्र या वाड्ग्मयप्रकापर्यन्त येतो. चरित्र-आत्मचरित्राची गोडी लागली की आपण प्रगत वाचनाची एक तरी पायरी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. आज मराठीमधे जे थोडेफार वाचक आहेत, त्यातल्या बहुतेकांची अवस्था इथपर्यंत आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मराठीमधे चरित्र-आत्मचरित्रं आज बर्‍यापैकी खपतात. यापुढची पायरी म्हणजे तत्वचर्चेची आणि ती वाचनाची प्रगतावस्था म्हणायला पाहिजे. ही प्रगतावस्था किती लोकांनी गाठलेली आहे हे आपणच ठरवावं. फारशा लोकांनी ती गाठली असेल असं वाटत नाही. कारण तसं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. इतिहास हा जर माझा विषय असेल तर वाचक म्हणून मला कधीतरी असे प्रश्न पडलेच पाहिजेत की, इतिहास कशासाठी लिहायचा? कसा लिहायचा? जे राष्ट्र पुरुष आहेत त्यांच स्तुतीपठण करणारं लेखन करणं किंवा सनावळ्या देणं ही इथल्या इतिहास लेखनाची संकल्पना आहे. पण तळागाळातल्या लोकांना त्या काळी समजात काय स्थान होतं याचा कोणी इतिहासात उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज या गडावरुन त्या गडावर चढाई करत होते, तेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी काय पेरत होता, कुठली पिकं घेत होता, त्यावेळी कामगार वर्ग होता की नाही, उत्पादनं कोणती होती, त्यावेळचं खाद्यजीवन कशा प्रकारचं होतं. संतसाहित्य जर मी वाचत असेन तर जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून मला मिळतं की नाही? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, असं मला वाटतं. माझं वाचन धडपडत झालं. आपल्यापैकी बहुतेकांचही तसंच झालं असेल. आपल्या सर्वांना बर्‍यापैकी मर्गदर्शन मिळत गेले तर आपला बराचसा वेळ वाचेल आणि तो जर वाचला तर आपल्या सर्वांच्या दष्टिकोनातून ते बरं होईल असं मला वाटतं.

----------------------------- ------------------------------------------------------------------


मी कुणाला टॅग करत नाही कारण मी बर्‍याच उशिरा उतारा लिहिला आहे. त्यामुळे कल्पना नाही कोणाकोणचे आधीच खेळून झालेले आहे.

सर्वांना दसर्‍याच्या निमित्ताने 'मनोल्लंघनाच्या' शुभेच्छा.

परत भेटूच.