Friday, February 20, 2009

फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन? माय फ़ूट!!

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

Friday, February 13, 2009

रस्किन, गुलझार आणि मी (:P)

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच! मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य (म्हणजे त्यात पैसा मिळतो आणि यात नाही हा सोडून) आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन सारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहिता यावं.
नाही जमत :(
असाईन्मेन्ट्सचं टेन्शन आणि उलटून गेलेल्या डेडलाईन्स नजरेसमोर दिसत असताना साध्या खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरम कडे नाही लक्ष जात भलेही त्यावर सोनेरी बुंदक्यांसारख्या फ़ुलांच्या राशी जमा झालेल्या असोत.
तर ते जाऊचदेत.
जिनियस क्रिएटिव्ह आणि आपल्यासारखे कुडमुडे क्रिएटिव्ह ह्यांत इतपत फरक तर असणारच. नाही कां?