Monday, April 30, 2012

द लास्ट हार्वेस्ट


गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकूर महाकवी, श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक, संगीतकार; साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त होणारे पहिले आशियाई आणि एकमेव भारतीय साहित्यिक. नानाविध कलांनी समृद्ध असे त्यांचे आयुष्य होते. रविन्द्रनाथांच्या समृद्ध कलाआयुष्यात चित्रकलेचा बहर सर्वात शेवटी आला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दोन दशकांमधे (१९२८ सालापासून), वयाची साठी उलटून गेल्यावर त्यांनी पेंटींग्ज करायला सुरुवात केली.
हे वर्ष त्यांच्या दीडशेव्या जन्मशाताब्दीचं.
त्यांची चित्रे म्हणजे रेषांमधे लिहिलेल्या कविता होत्या; त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होणा-या कवितांपेक्षा खूपच निराळ्या. ताल तोच होता मात्र स्वर वेगळे होते.
रविन्द्रनाथांचे पुतणे अवनिन्द्रनाथ आणि गगेन्द्रनाथ उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांचे मोठे बंधू ज्योतिन्द्रनाथही सुंदर चित्रे काढत. रविन्द्रनाथ पेंटींगकडे वळले एका उपजत प्रेरणेतून. पौर्वात्य कला, आदिवासी कला आणि पाश्चिमात्य कला यांची सखोल ओळख त्यांना होती मात्र त्यांनी कोणतेही औपचारिक कलाशिक्षण घेतले नव्हते. कलाविष्कारांना आवश्यक असणारा उपजत ताल त्यांच्या अंतरात्म्यातच होता; अत्यंत देखणे सुलेखन ते करत असत. आपल्या हस्तलिखितामधे लिहित असताना झालेल्या चुका, गिरवलेले शब्द, मधल्या रिकाम्या जागा भरुन काढताना जन्मजात कलाकार असणारे रविन्द्रनाथ रेघोट्यांनी सुंदर, मनमोहक रेखाचित्रं बनवत. कधी त्या रेघोट्यांची फ़ुलपाखरं बनत, कधी आकाशात विहरायला उत्सुक पक्षी, कधी झाडं, झाडांआडून डोकावणारा चंद्र.. त्यामुळेच त्यांचे पेंटींगकडे वळणे ही सर्वात शेवटी घडलेली आणि सर्वात सहज अशी आत्मप्रेरणा होती. पाश्चात्य कला-अभ्यासक आणि समीक्षक स्टेला क्रॅमिरिश, ज्या रविन्द्रनाथांच्या फ़ार मोठ्या चाहत्याही होत्या, त्यांच्या पेंटींगसंदर्भात म्हणाल्या होत्या- त्यांचे हात प्रशिक्षित नाहीत; अंतरात्म्यातून उपजलेले लाभलेले वळण घेऊन ते कागदावर फ़िरतात. रविन्द्रनाथांची चित्रे आपल्या रेषा आणि आकार स्वत: शोधत जातात.
डूडल्स चितारण्यातून सुरु झालेली आपली चित्रकला त्यांनी जोपासली मात्र खूप निष्ठेने. पुढच्या पंधरा वर्षांच्या काळात त्यांनी जवळपास २५०० पेंटींग्ज चितारली. १९३७ सालात एकदा ते खूप आजारी पडले होते, अगदी कोमात जाण्याइतके. त्यांची चित्रकलेवरची निष्ठा इतकी की शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा एका आगळ्या निसर्गदृश्याचे पेंटींग त्यांनी चितारले. रविन्द्रनाथ आयुष्यभर विविध कलांमधून स्वत:ला व्यक्त करत गेले आणि तरीही सर्वात उशिरा भेटलेल्या चित्रकलेबद्दल त्यांच्या मनात एक वेगळीच आत्मियता होती, आत्माविष्कारातले चित्रकलेचे वेगळे महत्व उलगडून सांगताना ते म्हणतात-
मनुष्याला स्वत:च्या मनातल्या खूप गोष्टी शब्दांच्या माध्यमातून संपूर्णपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करणे जमत नाही. त्यामुळे तो वेगळ्या माध्यमाच्या शोधात असतो, वेगळी भाषा तो शिकू पहतो; कधी ती स्वरांची असते, कधी रेषा आणि रंगांची. कोणत्याही युगात, कोणत्याही वातावरणातील मनुष्य या भाषेच्या साहाय्याने स्वत:ला संपूर्णपणे व्यक्त करु शकतो, ही त्या माध्यमांची ताकद. ही केवळ बौद्धीकतेला आव्हान देणारी, विचारवंतांची मिरासदारी असणारी भाषा नाही, ही व्यक्तिमत्वाची भाषा आहे. सामान्यातल्या सामान्यलाही उमजू शकेल अशी ही कलेची लिपी असलेली भाषा आहे. प्रत्येक मनुष्याने अशी ती आत्मसात करायला हवी, निदान काही प्रमाणात तरी.

सुरुवातीच्या काही वर्षांमधे आपली चित्रकला प्रदर्शित करण्याबाबतीत हा महाकवी खूप संकोचत होता. मात्र आपल्या चित्रांमधून आपण भाषेची बंधनं पार करुन सर्वांपर्यंत पोचू शकतो याची जाणीव झाल्यावर वयाची पर्वा न करता त्यांनी जगभराचा दौरा केला. १९३० सालातल्या मे महिन्यात प्रथम पॅरिसमधे आणि नंतर पुढल्या सहा महिन्यांमधे लंडन, बर्मिंगहॅम, बर्लिन, ड्रेस्डेन, म्युनिक, कोपनहेगन, मॉस्को, बोस्टन, न्यूयॉर्क, फ़िलाडेल्फ़िया या ठिकाणी रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जची प्रदर्शने भरली. आपल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचा असा वादळी दौरा करणारे त्या काळातले ते पहिले भारतीय चित्रकार.
पुढील काळातील सर्व भारतीय आधुनिक चित्रकारांना, ज्यांना आपल्या कलेला परदेशापर्यंत पोचवण्याची इच्छा होती, त्यांच्याकरता रविन्द्रनाथ प्रेरणादायी ठरले.

रविन्द्रनाथ म्हणत माझ्या संगीत आणि साहित्याची नाळ त्यातल्या प्रादेशिकतेच्या, भाषेच्या संदर्भामुळे बंगालशी, भारताशी घट्टपणे जोडलेली आहे, मात्र माझी चित्रकला अशा भाषिक मर्यादांमधे बद्ध नाही, ती सगळ्या जगाशी नात जोडू शकतात. त्यांच्या पेंटींग्जमधून वैश्विक मानवता फ़ार सहजतेनं आणि परिपक्वतेनं डोकावली. इतर माध्यमांमधील कलाविष्कारांपेक्षा त्यांची पेंटींग्ज जागतिक कलेशी सर्वात जास्त जोडली गेली होती. कदाचित त्यामुळेच रविन्द्रनाथांची पेंटींग्ज जेव्हा पहिल्यांदा पाश्चात्य जगात प्रदर्शित झाली तेव्हा त्यांना ती जवळची वाटली.
ज्या शहरांमधे ते गेले तिथे बोलली जाणारी प्रत्येकच भाषा काही त्यांना येत नव्हती, अनेकदा दुभाष्याची गरज भासे, पण आपली चित्रकला मात्र कोणत्याही दुभाष्याच्या मदतीवाचूनही या शहरांमधल्या लोकांपर्यंत पोचू शकते याचा त्यांना मनापासून आनंद होत असे. अर्थात याचा अर्थ असा नाही की या अनोळखी मुलुखांमधे त्यांच्या पेंटींग्जबद्दल कुणाला काही प्रश्नच पडले नाहीत. अनेकांना वाटे की या पेंटींग्जमधे काही ’गूढ’ अर्थ भरलेला आहे; आणि म्हणून ते ती उलगडू पहात. पण रविद्रनाथांना असे काही अर्थ कोणी आपल्या चित्रांमधून शोधू नये असं मनापासून वाटे, त्यांनी स्वत:ही असा कोणता विशिष्ट अर्थ मनात धरुन ही पेंटींग्ज केलेली नव्हती. मनुष्यप्राणी सोडले तर बाकी सृष्टीत नीरव मौन भरलेलं आहे, ते मौन मनुष्याकडून भंग केलं जाऊ नये, आकाशातले ग्रहतारे, हिरवंगार गवत, रंगीत फ़ुलं कोणताही आवाज करत नाहीत, मग त्यांचं सौंदर्य व्यक्त करताना मनुष्यानेही त्यांच्या शांततेचा मान ठेवून कोणताही अर्थहीन कोलाहल करता कामा नये. सृष्टीत जो अर्थ भरलेला आहे, तो आणि तितकाच माझ्या चित्रांमधेही आहे, जर निसर्ग पहाताना कोणी प्रश्न विचारत नाहीत, निसर्ग कशाचंही स्पष्टीकरण करत नाही, तर ते मी तरी का करावं असं ते म्हणत.
मात्र काहीवेळा शब्द आणि रंग-रेषा एकत्रितच त्यांच्या मनात उमटत, अशावेळी आपल्या पेंटींग्जना साजेशी कविता ते करत. ’व्हेल्ड वुमन’ या आपल्या पेंटींगमधल्या स्त्रीच्या सखोल, गडद चेह-याबद्दल ते लिहितात-
वेदना आता शमली आहे
तरी दु:ख कायम आहे
वादळी पावसाचा दिवस उलटून गेल्यावर
येणारी संथ संध्याकाळ..
रविन्द्रनाथांची पेंटींग्ज त्यांच्या बाकी सर्व कलाविष्कारांपेक्षा खूप वेगळी होती, त्यांच्या चित्रभाषेची लिपी वेगळी होती.
निसर्ग, मानवी आकृत्या रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जमधून व्यक्त झाले त्या रुपात जे त्यांच्या अंतरात्म्याने अवलोकित केले. अद्न्यातात भ्रमण करणारे कमल-पक्षी, सर्पाकृती शरिरे, तीव्र कोनांच्या भौमितिक आकृत्या.. या सगळ्यातून अंतर्मनातली वेदना, अस्वस्थपणाचे प्रकटीकरण होतं.
त्यांच्या पेंटींग्जमधे अनेकदा मुखवट्यांसारखे चेहरे असणा-या आकृत्या, अमानवी आकार दिसत; ही माझ्या स्वप्नांमधली भुते आहेत, शब्दांमधून ती प्रकटायला घाबरतात, मात्र रेषांमधे आपणहून येतात असं जे विधान त्यांनी केलं होतं ते चित्रकाराच्या आत्मप्रेरणांबद्दल काहीतरी खूप विचारात पाडणारं होतं.
जपानी चित्रांचा एक मोहक ठसा त्यांच्या पेंटींग्जवर आढळतो. गडद, चमकदार काळा रंग, सिलोनी फ़ुलपाखरांसारखा गर्द निळा, जावामधल्या प्राचीन बाटीक चित्रांमधला नाजूक तपकिरी रंग, वृद्ध वृक्षांच्या खोडांनी आत्मीयतेनं जोपासलेल्या शैवालांसारखा हिरवा, उत्तरेकडच्या भक्कम डोंगर उतारांवरच्या लायकेनसारखा हलका राखाडी, अश्विनातल्या पक्व, सोनेरी भातशेतीचा प्रसन्न, चमकदार पिवळा रंग रविन्द्रनाथांचा आवडता होता. मात्र गर्द तपकिरी आणि गडद काळाही त्यांच्या चित्रांमधे अनेकदा दिसे. भारताच्या मातीचा आणि त्यातल्या माणसांचा हा रंग होता; त्यांच्या चित्रांमधे येणे हे साहजिकच होते. पौर्वात्य कलेचे अभ्यासक आनंद कुमारस्वामी रविन्द्रनाथांच्या चित्रांना आधुनिक आदीम भारतीय कलेचा आविष्कार म्हणत असत.
माझ्या हातून घडलेल्या चुकांना मी लाजेने मान खाली घालून बसू देत नाही, मी त्यांना नृत्य करायला लावतो, नव्या आविष्काराचे रुप त्यांना देतो, चुकांमधूनच नवे सृजन घडते.
रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जमधला भारतीय निसर्ग, वातावरण परदेशी नजरांना रिझवण्याकरता चितारलेले नव्हते. अवनिन्द्रनाथांच्या चित्रांमधे दिसणारा भारत नजरेला सुखवणारा, अभिमान वाटावा असा होता; असा भारत होताच पण यापेक्षाही खोलवरचा भारत होता जो रविन्द्रनाथांच्या चित्रांमधून दिसला, त्यात विचारात पाडणारी वेदना होती, मनाला स्पर्शणारे कारुण्य होते, भारतीय मातीत जन्मलेल्यांना फ़ार सहजतेनं त्या चित्रांशी नातं जोडता येत होतं.
राष्ट्रीयत्वाची भावना रविन्द्रनाथांमधे प्रखर स्वरुपाची होती, ब्रिटिश वसाहतवादी वृत्तीला त्यांचा तीव्र विरोध होता मात्र हा विरोध व्यक्त करण्याचा त्यांचा मार्ग वेगळा होता आणि माध्यमही वेगळे होते. सांस्कृतिक पोलादी पडद्याआड आपली कला दडवून ठेवणेही त्यांना मान्य नव्हते, जागतिक कलाविष्काराला त्यांची कला आत्मविश्वासाने आणि म्हणूनच बरोबरीने भिडत होती. रविन्द्रनाथांची कला, त्यांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतनसारख्या कलासंस्थांचा आधुनिक भारताला जगाच्या जवळ नेण्यात फ़ार मोठा वाटा आहे.
मात्र नंतरच्या काळात त्यांच्या कविता, कथा जगभरात अनुवादित होऊन पोचल्या आणि त्यांची चित्रे मात्र फ़ार कमी लोकांपर्यंत पोचली ही एक आयरनी.

Monday, April 16, 2012

हमारी अमृता


उन्हाळा लखलखायला लागला की मला अमृता शेरगिलची चित्रं आठवतात.
एका एप्रिलमधे दिल्लीच्या एनजीएमएमधे मी तिची चित्रे पाहिली होती. त्यामुळेही असेल कदाचित.
वसंत ऋतूत फ़ुलणार्‍या अमलताश आणि पलाशांचे उष्ण उन्हाळी रंग मिरवणारे अमृता शेरगिलचे कॅनव्हास.
उबदार ज्वालाफ़ुलांच्या लाल-केशरी, हळद पिवळ्या आणि अम्लान हिरव्या छटांमधे लपेटलेल्या स्त्रियांच्या समुहानी भरलेले ते कॅनव्हास.


कधी त्यात तीन मुली, कधी दोन. झुल्यावर बसणार्‍या, सहेलीच्या लग्नात तिचा साजशृंगार करणार्‍या, काही लाल व्हरांड्यात फ़ुलकारीची चादर अंथरुन गप्पा करणार्‍या, कधी एकटी- बाजल्यावर विश्रांती घेत पहुडलेली, केशरी पडद्याआड संकोचाने नहाणारी, काही नोकराण्या, एखादी नवी नवरी, किंवा चारपाईवर पसरलेली एखादी नखशिखांत जर्द गुलाबी.. पांढर्‍या मशिदीच्या भिंतीपल्याडच्या अंगणात प्राचीन कहाण्या सांगणार्‍या फ़किराभोवती कोंडाळं केलेल्या.. बायका मुली. म्लान आणि अबोल.
पॅरिसमधे चित्रकलेचं शिक्षण संपवून भारतात परतलेली अमृता चित्रं काढण्याकरता जिथे राहिली त्या सिमला आणि सरायामधल्या, किंवा आजूबाजूच्या पहाडी गावांमधल्या, खास भारतीय काळ्यासावळ्या वर्णाच्या, अंगावरच्या कपड्यांमधील झळाळत्या रंगछटांच्या आड आपल्या चेहर्‍यावरची उदासी, अस्वस्थ मौन दडवू पहाणार्‍या स्त्रिया आणि मुली. दबलेली लैंगिकता आणि एक अनामिक घुसमट त्या गडद रंगसंगतीच्या थरांआड कुठेतरी. समवयस्कांसोबत असतानाही आपापल्या वाट्याचं दु:ख एकेकट्यानी, मुकाट भोगणार्‍या
स्त्रिया. कोणीही हसत नाहीत, एकही उत्फ़ुल्ल नाही. चेहर्‍यावरचे भाव चित्रविषयांना आणि रंगसंगतीला विपरीत.
अमृताच्या चित्रांमधला हा विरोधाभास तिच्या व्यक्तिमत्वातूनच आला होता का? संपूर्ण पाश्चात्य, अत्याधुनिक व्यक्तिमत्वाच्या अमृताच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वहात होते, पॅरिसला चित्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमृताने चित्र काढली भारतातल्या लोकांची, गोगॅं आणि सेझांच्या चित्रशैलीचा प्रभाव असणार्‍या अमृताला मोहात पाडले अजिंठा-वेरुळच्या शिल्पांनी आणि भित्तीचित्रांनी.
युरोप सेझां आणि मातिझचा असेल, पण भारत माझ्या एकटीचा आहे असं उन्मत्त वाटू शकणारं, ठाशीव आत्मविश्वासू विधान करणारी अमृता शेरगिल. आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासातले पहिले प्रकरण स्वत:च्या नावाचे करुन तिने आपले हे उदगार सार्थही केले.
अमृताला सामान्य भारतीय स्त्रियांची दैवाधीन विवशतेची आंतरिक सहसंवेदना जाणवली होती. ही जाण चित्रांमधून दाखवणारी, सर्वार्थाने आधुनिक, वैविध्यपूर्ण, प्रयोगशील चित्रकार.
शिमला आर्ट ऍकेडमीने उत्कृष्ट स्त्री-चित्रकार म्हणून केलेला गौरव मी चित्रकार आहे त्याचा गौरव करा. स्त्री म्हणून नको. असं सांगून नाकारणारी अमृता.
अल्पायुषी, वयाची तीन दशकंही न ओलांडू शकलेले, पण आत्यंतिक जिनियस असे काही कलाकार मनाच्या एक उदास कोप-यात कायमच अस्वस्थ हुरहूर जागवत ठाण मांडून बसून राहीलेले आहेत. त्यात मधुबाला, स्मिता पाटील, मेरिलिन मन्रो असते आणि व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ सोबत अमृता शेरगिल असते. अवघं अठ्ठावीस वर्ष आयुष्य लाभलेली अमृता जीवन जगली ते मात्र भरभरून, पॅशनेट, सर्व रंगांना आसुसलेपणाने स्वत:त शोषून घेत, निर्भिड, स्वच्छंदी.. म्हणूनच वादळी आणि वादग्रस्तही. गोगॅंच्या नुसत्या चित्रशैलीचाच नाही, त्याच्या बेदरकारपणे आयुष्य जगण्याच्या वृत्तीचाही तिला मोह होता बहुधा.
कसली अनामिक वेदना, उदास दु:ख तिच्या अंतर्यामी होतं, तिच्या वरवरच्या बेछूट, बेदरकार स्वभावामागे कोणता एकाकीपणा दडलेला होता जो तिच्या चित्रांमधल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांमधून उमटला? तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधले रंग हळवे आहेत, तरुण कोवळ्या वयातली उदास दु:ख त्यात प्रतिबिंबीत होतात. झुकलेले चेहरे, गहिर्‍या अनामिक दु:खाने भरलेले डोळे.
थ्री गर्ल्समधील गोलसर, तारुण्याचा गोडवा असलेले चेहरे, अंगावरच्या गडद रंगाच्या पोशाखांचा घोळदारपणा, त्यातून जाणवणारे मोहक सौष्ठव आणि भविष्यातील अनिश्चितता, वैवाहिक आयुष्य सुरु करण्याच्या आधीची हुंड्याची, न बघीतलेल्या नवर्‍याची, अनोळखी सासरची चिंता चेहर्‍यावर स्पष्ट उमटलेली.
झुल्यावर बसलेल्या तरुण मुलीच्या पायाचा तळवा अलगद जमिनीवर टेकलेला, दोन्ही हातांनी झुल्याच्या दोर्‍या हातात पकडलेल्या, पोशाखांचे आनंदी, सेन्शुअस रंग, चेहर्‍याचा नाजूकपणा, आता झुला हवेत उंच जाणार अशी अपेक्षा वातावरणात भरुन राहिली आहे, पण एरवी अशा चित्रांमधे मुलींच्या चेहर्‍यावर उतू जाणारा उत्फ़ुल्ल आनंद असतो, खट्याळ हास्य असतं ते मात्र कुठेही नाही. वयानुरुप उत्सुक, अधिर्‍या हालचालींना कोणते दडपण थोपवून धरत आहे?
झुल्यावर झुलण्याच्या आनंदापेक्षाही तीव्र आहे बांधलेपणाचे सूचन.. बाजूलाच पडलेल्या, घरात वापरायच्या लाकडी खडावांमधून व्यक्त होते.
टेकवलेल्या पायाच्या तळव्याची काव्यात्मकता, उच्च भावनीक तीव्रतेचं सूचन त्यानंतर असंच व्यक्त झाल रेंच्या चारुलतामधून.
नवधूचा शृंगार करणार्‍या मैत्रीणींचे समुह चित्र मोहक रंगसंगतीचे. चित्ररचनेमधे आनंद भरुन आहे. स्त्रियांच्या चेहर्‍यावर अनामिक गहिरे भाव आहेत, त्यातल्या गौरवर्णीय नववधूच्या शृंगारसोहळ्यातील सारे रंग, गंध उमलून येत आहेत असं वाटतं. वधूच्या समोर बसलेल्या गडद, रंगीबेरंगी चोळी घातलेल्या युवतीच्या स्निग्ध चेहर्‍यावर परिपक्व, विचारमग्न भाव.
चित्राची पिवळसर हिरवी पार्श्वभूमी, बैंगणी, गुलाबी, हिरव्या अशा शुभ रंगांचा सुखद सोहळा, त्यातून उठून दिसणारा शुभ्र वर्ण, आजूबाजूच्या अविवाहित सख्या, त्यांचे सावळे वर्ण विरोधाभासाकरता, कदाचित जात-आर्थिक उच्चनीचतेचा भेदही असेल, पण या सर्वांमधून एक स्नेहमय प्रवाह वाहतो आहे.
अमृता शेरगिलची सगळीच चित्रं म्हणजे काही अद्वितीय मास्टरपीसेस नाहीत, तिच्या चित्रांना लाभलेलं यश हे तिच्या स्वत:च्या दृष्टीने अनेकदा अपयशही होतं. पण ती सातत्याने नवे प्रयोग करु पहात होती, पाश्चात्य प्रभावातून मुक्त होत स्वत:ची शैली शोधू पहात होती, स्वत:ला त्या चित्रांमधून शोधत होती, कधी अपयशाने खंतावत होती, कठोरपणे आत्मपरिक्षण करत होती.
भारतात आल्यावर तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधे न्यूड्स, पोर्ट्रेट्स, निसर्गचित्रे, स्टील लाइफ़ वगैरे विषय आहेत. या चित्रांमधली रचना अचूक आहे, पाश्चात्य कलाशिक्षणातून ती अर्थातच तिला साध्य झाली आहे, पण तिची चित्रं पुन्हा पुन्हा बघाविशी वाटतात कारण त्यांच्यातली इमोशनल इन्टेन्सिटी.
आपल्या थोडक्या आयुष्यातही लिजन्ड बनलेल्या अमृताच्या रसरसत्या जीवनेच्छेचे उन्मादी रंग कॅनव्हासवर पसरलेले आपल्याला दिसतात. तिच्या चित्रांवर नजर मंतरल्यासारखी खिळून रहाते.
जिनियस जन्मत नाही, तो घडतो. व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि कष्टाने जिनियस बनते. अमृता जिनियस होती. आणि त्यामागे तिची मेहनत, अभ्यास, चिकाटी होती. मात्र अमृताच्या खाजगी आयुष्याची, तिच्या मुक्त, बेफ़िकिर लैंगिक आयुष्याची, गर्भपातांची चवीने चर्चा करुन, तिच्या फटकळ, उर्मट स्वभावाच्या वर्णनांनी आपल्या पुस्तकाची पानच्या पानं खर्च करुन तिच्या तथाकथीत मित्रांनी, समीक्षकांनी आणि नातलगांनीही तिच्या या मेहनतीची, परिश्रमांची दखल घेतली नाही. चित्रकला, चित्रकार, कलेमागच्या प्रेरणा, मानवी जीवन, तत्त्वज्ञान यावर सखोल चिंतन करणारी तिची पत्रे वाचली गेली ती केवळ तिच्या आयुष्यात येऊन गेलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी तिला खाजगी पत्रांतून काय लिहिले हे जाणून घेण्याकरता.
मनस्वी अमृताच्या खाजगी आयुष्याची चर्चा तिच्या चित्रांपेक्षा जास्त केली गेली हे दुर्दैव. तिचे आणि चित्ररसिकांचेही.
अमृता शेर-गिलच्या चित्रांमधल्या झळाळत्या रंगांमधे लपेटलेल्या, समुहात राहूनही एकाकी असलेल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांवरचे अबोध भाव कधी कधी फार स्पष्टपणे उलगडतात.