Wednesday, June 14, 2006

भुतान पासून नंदुरबार पर्यंत

एप्रिल अखेरीस माझं जे भटकणं सुरु झालं ते जून च्या चार तारखेला शेवटी संपल. ह्या काळात मी सिक्किम, दार्जिलिंग, भुतान असा एक पंधरा दिवसांचा, नंदुरबार चा तीन दिवसांचा आणि पुणे, कोल्हापुर चा सहा दिवसांचा असा प्रवासदौरा केला. भुतान सिक्किम चा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता. ह्या प्रवासाची डायरी मला खरेतर लगेचच इथे टाकायची होती पण आल्या आल्या लगेचच पुणे कोल्हापुर झालं. मग मुलीची शाळा खरेदी, आवराआवरी, प्रवासाचा शीण त्यातच असाईनमेंट्स च्या डेडलाईन्स ह्यात सिक्किम भुतान बरच लांब राहिलं खरं.

नंदुरबार ला ऐन उन्हाळ्यात जाणं म्हणजे स्वत:हून आगीच्या भट्टीत उडी टाकण्यासारखेच. आम्हा मुंबईकरांना ही खानदेशातली रसरसती उन्हाची काहिली सहन होत नाही हेच खरं. अपेक्षेप्रमाणेच तिकडे गेल्यावर उन्हाचा प्रचंड त्रास झाला खरा पण ज्या कारणासाठी रादर जे पहायला आम्ही तिकडे गेलो होतो ते पाहिल्यावर उन्हाचा त्रास विसरायलाच झाला. डॉ. उर्जिता जैन आणि त्यांचे पती डॉ. चेतनकुमार जैन या दोघांनी मिळून नंदुरबार, धुळे दरम्यानच्या रखरखीत उजाड पट्ट्यात नक्षत्रवनाच अक्षरश: नंदनवन फुलवलय. वनौषधींच्या क्षेत्रातल उर्जिता जैनांचं चं कर्तृत्व वादातीतच आहे. आता त्यांनी तिथेच Herbal Science and Techology' च कॉलेज सुरु केलय. ते पहायला जैन दांपत्यानी आग्रहानी निमंत्रीत केलं होत. मी नक्षत्रवना बद्दल बरेच दिवस ऐकून होते. पहायची उत्सुकता तर होतीच. आता कॉलेजच निमित्त होत तर जावच म्हणून अगदी ऐन मे मधे जायच होत तरी पाय मागे घेतला नाही. आणि खरच गेल्याच चीज झाल. तिथला तो दहाहजार sq. ft. इतक्या प्रशस्त जागेतला वनौषधी महाविद्यालयाचा पसारा, अत्याधुनीक प्रयोगशाळा, A.C. क्लास रुम्स, चैतन्य वनातली झाडे, रक्तचंदनाचे ओळीने लावलेले वृक्ष, जैन पतीपत्नींचा पाहुणचार सारचं मन प्रसन्न करणारं होत. नक्षत्रवनातल्या रुद्राक्षाच्या झाडाखाली पडलेला रुद्राक्षाच्या सडा आणि भुर्ज वृक्षा च्या सावलीतला थंडावा ह्या दोन गोष्टी तर मी मला नाही वाटत कधी विसरेन.

भुतान सिक्किम ट्रेक तर अफलातून होता. त्याचं वर्णन असं जाता जाता करणं केवळ अन्यायकारक ठरेल.

दरम्यान वाचन बरच झालय पण विस्कळीतपणे. सलग जे वाचून झालय त्याबद्दल बुकशेल्फ़ मधे टाकतेच एकदोन दिवसांत.

नंदन ने पुस्तकनिष्ठांची मांदियाळी सुरु केलीय ती ज्या कौतुकास्पदरीत्या मराठी ब्लॉगर्स पुढे चालवत नेत आहेत ते पाहून इतका आनंद झाला! कोणं म्हणतं नवी पिढी पुस्तके वाचत नाही म्हणून?? सर्वांचेच वाचन, साहित्याची जाण प्रगल्भ आहे. अभिमान वाटण्यासरखीच आहे. आणि ह्यासाठी पहिले अभिनंदन नंदनचे करायला हवे!!

2 comments:

A said...

Waiting for your Bhutan-Sikkim trip. If possible, upload some pics as well along with that post.

Akira said...

you hv been tagged...for details visit..http://dhyaas.blogspot.com/2006/08/blog-post.html