Tuesday, May 22, 2012

द स्क्रीम

एडवर्ड मंच या नॉर्वेजियन इम्प्रेशनिस्ट चित्रकाराने १८९३ मधे पेंट केलेल्या द स्क्रीम चे पडसाद गेल्या आठवड्यात जगभरातल्या कलाक्षेत्रात जोरदार उमटले. न्यूयॉर्क येथे सदबीच्या जागतिक लिलावात हे चित्र कोणा अनामिक ग्राहकाने तब्बल सहाशे कोटींना विकत घेतले. सहाशे कोटी- आख्ख्या भारतीय कलाबाजाराची आजची अंदाजे किंमत साडेसातशे कोटींच्या आसपास आहे हे लक्षात घेतलं तर या एका पेंटींगच्या किंमतीचा प्रचंडपणा लक्षात येईल. पेंटींगला लिलावामधे मिळालेली ही आजवरची सर्वाधिक जागतिक किंमत.

द स्क्रीम चित्र नीट पाहिले तर लक्षात येईल की या चित्रातील इमेज आपण असंख्य वेळेला अनेक ठिकाणी पाहिलेली आहे.
खळबळलेल्या लाल, पिवळ्या पार्श्वभूमीवरचा भयग्रस्त चेहरा.
एका मानवसदृश आकृतीने कानांवर दोन हात घट्ट दाबून धरत भितीने फ़ोडलेली किंचाळी मंचने कॅनव्हासवर दृश्यरुपात चित्रित केली. आणि विसाव्या शतकात आधुनिक जगातील मानसिक तणावांचे, दडपणांचे, ऍन्क्झायटीचे प्रतिक म्हणून ती स्वीकारली गेली. १९६१ साली टाईम मासिकाने पहिल्यांदा आधुनिक जगातील मानसिक ताण-तणावांवर कव्हरस्टोरी केली तेव्हा मुखपृष्ठावर द स्क्रीम छापले. मग व्यावसायिक माध्यमांमधून, जाहीरातींमधून, कधी कार्टून, कधी डूडल म्हणून, टीशर्टवर, कॉफ़ी मग्जवर ही इमेज दिसली, हॉलिवूडच्या होम अलोन मधल्या मुलाने घरात शिरलेल्या दरोडेखोरांना घाबरवायला तिचा मुखवटा घातला, स्क्रीम या भयपट मालिकेत या चित्राला मध्यवर्ती पात्राइतकी महत्वाची भूमिका आहे. पॉप आर्टिस्ट ऍन्डी वॉरहॉलने केलेल्या पॉप्युलर कल्चरच्या घाऊक प्रतिमा चित्रणात मॅरलिन मन्रोसोबत द स्क्रीम आहे.
जगाच्या दृश्यस्मृतीत हे चित्र चांगलच ठसलेलं आहे.
मोनालिसाच्या चित्रानंतर सर्वाधिक सर्वपरिचित असलेली ही इमेज.
तिच्या हास्याप्रमाणेच या किंचाळीचे अर्थ लावले गेले, मानसिक, शास्त्रीय, सामाजिक विश्लेषणे केली गेली.
या गूढ चित्रामागची कथा त्यानेच सांगीतली आहे त्यामुळे खरं तर फ़ार काही रहस्य त्यात शिल्लक असायला नको. पण तसं झालं नाही.  
एडवर्ड मंचच्या मते हा निसर्गातून उमटलेला आक्रोश त्याला ऐकू आला आणि त्याने तो कॅनव्हासवर चित्रबद्ध केला. चित्राचे मूळ नाव द स्क्रीम ऑफ़ नेचर.
मंच ऍक्झायटी या मानसिक तणावातून उद्भवणा-या आजाराने ग्रस्त होता. मृत्यूच्या काळ्या सावलीत बालपण झाकोळून गेले. अगदी लहान वयात आईचा मृत्यू, लाडकी बहीण क्षयरोगामुळे गेली, एक बहिण मानसिक आजारी. वडलांना स्मृतीभ्रंश. किशोरवयात त्याला औदासिन्याने ग्रासले. त्यात भर पडली नॉर्वेतल्या मलूल सूर्यप्रकाशाच्या उदास नॉर्डिक वातावरणाची.
तारुण्यात प्रवेश करतानाच मंच नैराश्य, नकारात्मकता, अल्कोहोलिझमने ग्रस्त झाला.
आपल्या डायरीमधे तो लिहीतो, "आजार, वेडेपणा, मृत्यूच्या काळ्याकुट्ट खांबांनी माझ्या पाळण्याला आधार दिला."
एका संध्याकाळी ओस्लो नदीवरच्या पुलावरुन तो जात होता. मागे टेकडी, एका बाजूला शहराची गजबज, दुस-या बाजूला नदीचे पात्र, वर अथांग आकाश. एडवर्डची मानसिक, शारिरीक स्थिती त्यावेळी फ़ारशी काही बरी नव्हती. आजारी होता त्यामुळे चालताना थकल्यासारखं वाटत होतं. एका ठिकाणी तो थांबला. त्याची नजर आकाशाकडे गेली.
आकाश केशरी ज्वाळांनी वेढल्यासारखं. क्षितिजाचं पोट चिरत सूर्य मावळत होता, बघता बघता आकाश रक्ताळले. मंचला आजूबाजूच्या निसर्गातून एक भीषण किंचाळी उमटते आहे असा भास झाला. तो लिहितो -"मी भितीने कापत तिथे उभा होतो, निसर्गातून एक कर्णकटू, अमर्याद किंचाळी उमटते आहे असं माझ्या मनाला स्पष्ट जाणवलं."
घरी आल्यावर त्याने हे चित्र रंगवले. तो म्हणतो- आकाशातले ढग मी ख-याखु-या रक्तासारखे रंगवले, रंगवताना रंगांमधूनही किंचाळ्या ऐकू येत होत्या.
काहीच्या मते हे चित्र रंगवण्याच्या वेळी त्या टेकडिच्या पायथ्याशीच असलेल्या असायलममधे मंचची डीप्रेशनमधे असलेली बहिण उपचार घेत होती.
काहींच्या मते हे चित्र रंगवण्याच्या १० वर्षं आधी, १८८३ मधे युरोपात क्राकोटोच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे अनेक दिवस मंचने वर्णन केल्याप्रमाणे आकाशात वाजवीपेक्षा जास्त झळझळीत, ज्वालाग्राही रंग सूर्यास्ताच्या वेळी दिसत असत.
मंचने आपल्या एकाकी, उदास आयुष्याच्या सा-या खूणा, दु:खी बालपणाच्या सगळ्या स्मृती या चित्रात ओतल्या आहेत.
हताशा, संताप, असहायता, तणाव, भिती अशा नकारात्मक भावना, भडक रंगांची कोंडलेली खळबळ असलेले हे चित्र जगाची नयनरम्यता नाही, तर त्याचा अंत सूचित करतं असं अनेकांचं मत.

१८९३ ते १९१० या काळात मंचने या इमेजची २ ऑइल पेंटींग्ज आणि २ पेस्टल्स रंगवली. लिलावात सर्वोच्च जागतिक बोली लागलेलं पेंटींग खाजगी संग्रहातले आहे. पेंटींगच्या फ़्रेमवर मंचने चित्र रंगवताना आपली जी मनोवस्था होती तिचे वर्णन करणारे काव्य रंगवले आहे.
बाकीच्या तीन आवृत्त्या नॉर्वेजियन म्युझियममधे आहेत.
पुढील ११९ वर्षांच्या काळात एडवर्डने दृश्यरुपात अजरामर करुन ठेवलेल्या किंचाळीचे पडसाद म्युझियम्सच्या, कलापुस्तकांच्या बाहेर उमटले.
आपली अस्थिर मानसिक अवस्था ढासळून आपण पूर्णपणे वेडे बनू की काय अशी दहशत मंचच्या मनावर होती हे खरं पण पुढील म्हणजे विसाव्या शतकाला साजेसा एक शहाणपणाही त्याच्याकडे होता. आपल्या मानसिक असमतोलाला त्याने सर्जकतेकडे नुसते वळवलेच नाही तर आयुष्यातल्या वेदनेला एका शक्तिशाली कला-प्रतिकाच्या रुपात मिरवले. नैराश्यातही तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने आपल्यातल्या असमतोलाला कॅनव्हासवर रंगांच्या माध्यमातून ओतले.
याचा एक दूरगामी परिणाम झाला. मॉडर्न कल्चरमधे मानसिक असमतोल कलावंताच्या मनाचा एक पैलू म्हणून स्वीकारला जायला लागला. ज्याला एलेमेन्ट ऑफ़ मॅडनेस म्हणतात तो कलेतून डोकावणे सर्वमान्य झाले. इतके की ज्यांच्यात कसलाच असमतोल नव्हता तेही चित्रकार, कलावंत एलएसडी सारख्या ड्र्ग्जचा वापर करुन असंतुलित, भ्रमिष्ट मानसिक जग असते तरी कसे याचा अनुभव घेऊ लागले. सायकॉटीक कविता, साहित्य निर्माण व्हायला लागण्याचा हाच काळ.

ऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एडवर्ड मंचचे आयुष्य खरोखरच उध्वस्त होते.
मात्र त्याची चित्र काढण्याची उर्मी थक्क करणारी होती. हजारांहून जास्त ऑइल पेंटींग्ज त्याने केली, तितकीच वॉटर कलर्स. लिथोचा वापर करुन चित्रांच्या असंख्य प्रिन्ट्स त्याने बाजारात आणल्या.
एकेकाळी, असं वेडविद्र ध्यान रंगवून जगासमोर आणलं त्यामुळे देशाची बदनामी झाली असं म्हणणा-या नॉर्वे सरकारने त्याला राष्ट्रीय हिरोचा दर्जा दिला. २००१ पासून एडवर्ड मंचचा चेहरा एक हजार क्रोनरच्या नोटेवर झळकला. पॅरिसच्या लुव्रमधे मोनालिसाचं जे स्थान, ते ओस्लोच्या नॉर्वेजियन नॅशनल गॅलरीत द स्क्रीम पेंटींगचं.  

अभिजात चित्रांच्या अनेक प्रतिमा कलेच्या इतिहासातून, शतकांचा प्रवास पार करुन आधुनिक जगात सर्वपरिचित झाल्या आहेत. मोनालिसा, सूर्यफ़ुले, वॉटरलिलीज.. नजरेला सुखावणा-या या चित्रप्रतिमा. मात्र आधुनिक युगाची प्रतिमा हे स्थान द स्क्रीम ने पटकावले हे आश्चर्याचे पण तितकेच बोलके
या किंचाळीचे कायमच एक अनाम आकर्षण जगभरातल्या लोकांना वाटत राहीले. असंख्य वेळा पॅरडी होऊनही तिच्यातील ताकद जशीच्या तशी राहिली. आधुनिक जगाचा कोलाहल वाढला, असमतोल वाढला तशी ती वाढतच गेली, तीव्र, कर्कश बनत गेली.
ही किंचाळी म्हणजे आधुनिक जगातील नकारांचे विशुद्ध, प्रामाणिक चित्रण.
चित्रं काही वेळा व्यावसायिकरित्या अतीपरिचित झाली की मुळात ते एक अभिजात चित्र आहे, मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप खोलवरचा काही अर्थ त्या चित्रातून अभिप्रेत आहे हेही विसरलं जातं.
आता तर सर्वोच्च किंमतीचा टॅग 'द स्क्रीम'वर लागला आहे.
कलेपेक्षा किमतीचे महत्व जास्त असणार्‍या जगात मंचची किंचाळी कलाजगतात यापुढेही पडसाद उमटवत राहील ती किमतीचीच. 

Friday, May 11, 2012

वक्त- ’साठ’वण सिनेमांची


पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्‍यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
साठचं दशक आल्हाददायक होतं. मुगल-ए-आझम, संगम सारखे भव्य आणि नेत्रदीपक, हम दोनो, तेरे घर के सामने सारखे अवखळ आणि रोमॅन्टिक, ज्युवेल थीफ़, तिसरी मंझिल सारखे रहस्यमय आणि रोमांचक, बीस साल बाद, गुमनाम सारखे गूढ आणि संगीतरम्य, बंदिनी, गाईडसारखे संवेदनशील, पाकिझा, साहिब बिबी और गुलामसारखे काव्यमय सिनेमे साठच्या दशकाला झगमगते चांद लावून गेले, ज्यांची रोशनी अजूनही त्याच तेजाने झळाळते आहे.
यातला प्रत्येक सिनेमा पुन्हा पुन्हा पहावा आणि प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नव्याने सापडावे. यातल्या प्रत्येक सिनेमावर, त्यातल्या अभिनेता अभिनेत्रींवर, कथानकावर, दिग्दर्शनावर, संगीतावर आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे आणि तरीही अजून खूप काही सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे राहून गेले आहे असे पुन्हा पुन्हा वाटावे.
असं असूनही साठच्या दशकातल्या सिनेमांवर लिहीताना मला पहिल्यांदा आठवला तो ’वक्त’च. काय जादू होती या सिनेमाची?
सिनेमांना पर्सनॅलिटी आहे असं मानलं तर ’वक्त’ ला निर्विवादपणे स्टाईलिश, ग्लॅमरस, फ़ॅशनेबल आणि ट्रेन्डसेटर पर्सनॅलिटी बहाल होईल.
’वक्त’ पहिल्यांदा पूर्णपणे पाहीला अर्थातच टीव्हीवर. साठच्या दशकातले सिनेमे प्रत्यक्ष पडद्यावर झळकताना बघण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले नाही. सगळे भव्य, नेत्रदीपक इत्यादी सिनेमे टीव्हीच्या सोळा-अठरा इंची पडद्यावरच पहाता आले. कधीतरी मॅटीनीला लागणारे सिनेमे आणि हल्ली मुगल-ए-आझम, हम दोनो, नया दौर रंगीत होऊन पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकवले गेले ते अपवाद सोडून. मात्र त्याच्या कितीतरी आधीपासूनच छायागितात ’वक्त’ची गाणी अनेकदा पाहिली होती. विशेषत: ’आगे भी जाने ना तु..", ’कौन आया के निगाहोंमे चमक जाग उठी..’ आणि ’ऐ मेरी जोहराजबी..’ ही गाणी.
’आगे भी..’ गाण्यातली दुनिया अद्भूत होती. पुढे काय होणार माहीत नाही, मागे काय झालय आठवत नाही, आत्ताचा हा क्षणच तेव्हढा खरा.. साहीरने हे गाणं टीव्हीच्या पडद्यावर नजर चिकटवून बसलेल्या माझ्यासाठीच लिहिलं असावं इतकी मी या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात, प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दांत गुंतून गेलेली आठवतेय. म्हणजे आशाचा आवाजबिवाज किंवा रवीचं संगीत वगैरेमधे नाही. ते थोरच. पण ते सगळं नंतर. त्यावेळी मोहात पाडायचा तो त्या गाण्यातला माहोल.
आगे भी जाने ना तु.. गाण्याचं चित्रिकरण अत्यंत ’हॅपनिंग’ आहे. गाण्यातून ’कथा’ पुढे जाणं, गाण्यातल्या प्रत्येक ओळीत काही ना काही चित्तथरारक घडणं हे एक आणि दुसरं त्यातला देखणेपणा (खरं तर हा देखणेपणा ’वक्त’च्या सगळ्याच गाण्यांचं, आख्ख्या सिनेमाचंच प्रमुख वैशिष्ट्य. पण ते नंतर) अनुभवणं.
एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलातली आलिशान बॉलरुम शोभावी अशा हॉलमधे हे गाणं सुरु असतं. तो चिनॉयसेठचा रहाता बंगला असतो. पार्टीत हातात माईक घेऊन गाणारी ऍन्ग्लो इंडियन क्रूनर, गाण्याच्या तालावर नृत्य करणारे सोफ़िस्टीकेटेड, उच्चभ्रू स्त्री-पुरुष असा एकंदरीत माहोल. जस जसं गाणं पुढे सरकत जातं तसा हा माहोल असा काही खुलत जातो की बास.
पार्टीत राजकुमार कोण्या राजघराण्यातल्या शशिकलाला मिठीत घेऊन नृत्य करत आहे. अर्थात नृत्य हा एक बहाणा आहे, खरं तर तो तिच्या गळ्यातला रत्नजडीत (पचास लाखसे भी कई ज्यादा) हिर्‍याचा हार चोरण्याची संधी साधू पहातोय. या प्रसंगाच्या किनार्‍या किनार्‍याने इतरही काही घटना पार्टीत घडत जातात.
ड्रायव्हर असलेल्या शशी कपूरवर प्रेम करणारी श्रीमंत घरातली शर्मिला टागोर त्याच्याशी बोलायची संधी शोधू पहात असते, तो बाहेर कारपार्किंगमधे मालक चिनॉयसेठची गाडी राखत उभा असतो. साधना आणि सुनील दत्त एकमेकांच्या संगतीत बाकी सगळ्या दुनियेला विसरुन जाऊन, कारंजाचे तुषार झेलत गप्पांमधे मग्न झालेले असतात.
अकस्मात शशी कपूरची आजारी आई आजारी असते ती ’सिरियस’ होते. एक जण धावत धावत शशी कपूरला ती बातमी सांगायला येतो, शशी कपूर कावराबावरा होत आत जाऊन चिनॉयसेठची घरी जाण्याची आणि सोबत गाडी घेऊन जाण्याची परवानगी घेऊन घाईघाईने घरी पोचतो. घरी डॉक्टर आलेले असतात. आईची ट्रीटमेन्ट चालू होते. इकडे चिनॉयसेठने पाळलेला गुंड पार्टीत आधीच दारु पिऊन झोकांड्या खात घुसतो, साधनाला छेडायला लागतो. सुनील दत्त ते पाहून भडकतो. मग त्या दोघांची हातापाई. गुंड चाकू काढतो. राजकुमार मधे पडतो. मग त्यांची मारामारी. राजकुमार गुंडाला मै तुम्हे जानसे मार डालूंगा अशी धमकी देतो ती पार्टीतले सारे लोक ऐकतात (जनाब पॉइन्ट नोट किया जाये. नंतरच्या घटनांशी याचा जवळचा संबंध आहे). पार्टी फ़िसकटते. चिनॉयसेठ भडकतो. वगैरे वगैरे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ऍन्ग्लो इंडियन क्रूनर आपली हातात माईक घेऊन संथपणे झुलत गातच असते.. ये पल गवाना ना, ये पलही तेरा है..
गाणं इतक्यांदा पाहीलं की आता कोणत्या ओळीवर यातला काय प्रसंग घडणार हे तोंडपाठ.
नायक नायिकांच्या वेशभुषेमुळे सिनेमा इतका देखणा बनू शकतो हे पहिल्यांदा लख्खपणे उमगलं ’वक्त मधूनच. ही किमया चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनरची म्हणजेच भानू अथैयांची. भानूजींनी ’वक्त’मधे कमाल केली होती. साठच्या दशकाचा ट्रेडमार्क झालेले, नंतर जवळपास प्रत्येकच चित्रपटांमधून आपल्याला दिसलेले पंजाबी तंग चुडीदार, त्यांवरचं कशिदाकाम, मोत्यांचं भरतकाम, अनोख्या पद्धतीत नेसलेली साडी, साड्यांचे पेस्टल कलर्स, बुफ़ॉं हेअरस्टाईल, खड्यांचे नाजूक, चमचमते दागिने या सर्वांची सुरुवात ’वक्त’ पासून झाली.
वक्तने सिनेमांच्या वेशभुषेचा संपूर्ण चेहरामोहोराच बदलला आणि त्याचा ठसा या पुढच्या सर्व दशकांवर ठळकपणे पडला.
१९६५ साली आलेल्या ’वक्त’ने पुढच्या काळातल्या चित्रपटांमधे त्यानंतर वारंवार आढळून येणार्‍या ज्या अनेक गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करुन दिली त्यातली स्टायलिश, फ़ॅशनेबल लूक ही केवळ एक गोष्ट.
साठच्या दशकात दोन हिरो-एक हिरॉइन (संगम) किंवा एक हिरो-दोन हिरॉइन्स (हम दोनो) असणं कॉमन होतं पण एकाच सिनेमात त्या काळात टॉपला असलेले स्टार्स इतक्या मोठ्या संख्येने चमकवण्याची म्हणजेच ‘मल्टीस्टारर फ़िल्म्स’ची सुरुवात वक्तपासून झाली. यात एकाचवेळी सहा स्टार्स होते. बलराज सहानी, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर. यापैकी शर्मिला टागोरचा हा जेमतेम दुसराच सिनेमा. आदल्याच वर्षी झळकलेल्या ’काश्मिर की कली’ ने तिला स्टार बनवलं होतं.
’लॉस्ट ऍन्ड फ़ाउंड’ हा नंतरच्या काळात घासून घासून अतीगुळगुळीत बनलेल्या फ़ॉर्म्युला पहिल्यांदा वक्तमधेच वापरला.
पळणार्‍या लहान मुलाच्या पायांवर कॅमेरा रोखून नंतर तो मोठा झालेला, नायकाच्या रुपात दाखवणे ही स्टाइलही यश चोप्रांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमात ’वक्त’द्वारे दाखवली.
थरारक कोर्टरुम क्लायमॅक्स हाही या सिनेमातून रुजवलेला पायंडा.
तसं पाहीलं तर बी.आर.चोप्रा नवं काहीतरी करणारे म्हणून कायमच प्रसिद्ध होते. साठच्या दशकातच त्यांनी एकही गाणं नसलेले दोन सिनेमे प्रसिद्ध करण्याचं धाडस दाखवलं होतं (कानून आणि इत्तेफ़ाक).
चोप्रांना सामाजिक आशयाच्या, समस्याप्रधान कथानकाला मनोरंजनाच्या अवगुंठनामधून पेश करण्याची हातोटी अचूक जमलेली होती. पटकथा, अभिनय, संगीत, दिग्दर्शन हे चारही खांब भक्कम असले की सिनेमाचा डोलारा यशस्वीपणे पेलला जातोच हे त्यांनी या आधीच्या गुमराह, नया दौर, साधना, धूल का फ़ूल मधून सप्रमाण सिद्ध करुन दाखवले होते.
वक्तमधे बी.आर.च्या सामाजीकतेला साथ मिळाली या फ़िल्मद्वारे पहिल्यांदा स्वतंत्र दिग्दर्शन करणा-या यश चोप्रांच्या आधुनिक, नव्या विचारांची आणि ताज्यातवान्या टवटवीत सौंदर्यदृष्टीची.
यश चोप्रांच्या या पहिल्याच दिग्दर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वक्त त्या काळातला ह्यूज ब्लॉकबस्टर ठरला.
यश चोप्रांच्या पुढच्या सर्व यशस्वी फ़िल्म्समधल्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांची- आगळं कथानक, थरारक क्लायमॅक्स, उत्कृष्ट गाणी, काव्यमय संवाद, नयनरम्य लोकेशनवर शूटींग, लेटेस्ट, अभिरुचीसंपन्न फ़ॅशन्सनी नटलेले देखणे, अभिनयसंपन्न, त्या त्या काळातले टॉप मल्टी स्टार्स, यांची रुजुवात ’वक्त’ने करुन दिली.
यश चोप्रांनी ’वक्त’ मधून प्रेक्षकांना ज्या ऐश्वर्यसंपन्न जीवनशैलीची झलक प्रत्येक दृष्यांमधून दाखवली ती त्या काळातल्या प्रेक्षकांकरता स्वप्नवत होती. आधी कधीही ही दुनिया हिंदी सिनेमाच्या, तेही रंगीत पडद्यावरुन, प्रेक्षकांना दिसली नव्हती. वॉल टू वॉल उंची, मऊशार, लालभडक रुजाम्यांनी सजलेले बंगले, ज्यांच्या आवारात स्विमिंग पूल आणि आवारालगत बोटींग करता येतील असे रम्य तलाव आहेत. रेड-यलो स्पोर्ट्सकार उडवत रेसिंग करणारी, डॅशिंग तरुण मुलं, सकाळी शॉर्ट्स घालून बंगल्यातल्या हिरवळीवर नाजूकपणे बॅडमिंटन खेळणार्‍या, गार्डन चेअरवर बसून, बोनचायनाच्या टीसेटमधून चहा पिणार्‍या, शिफ़ॉनच्या तलम साड्या नेसून किंवा फ़ॅशनेबल चुडीदार घालून, लाल रुजाम्यांवर पहुडून दुपारी कादंबर्‍या वाचणार्‍या, गुलाबांच्या परड्या नीट लावून ठेवण्याचे, रेशमी, सळसळते पडदे बाजूला ओढण्याचे ’काम’ करणार्‍या, मनोरंजनासाठी पियानो छेडणार्‍या, बर्थडे पार्ट्यांमधून नाजूक हसत प्रेझेन्ट्स स्विकारणार्‍या आणि मेणबत्त्या विझवून केक कापणार्‍या, स्वीमसूट घालून पोहायला जाणार्‍या, पिकनिक्सना जाणार्‍या तरुण, देखण्या मुली- हे सगळं ’वक्त’ मधून चोप्रांनी सहजतेनं दाखवलं.
waqt_decor.jpg
मात्र ’वक्त’मधे हा दिखावा, भपकाच केवळ नव्हता. ’वक्त’चं संगीत, दिग्दर्शन, कथानक, स्क्रीप्ट, अभिनयाची बाजू तितकीच तगडी होती. ब्रिटिश फ़िल्म इन्स्टीट्यूटमधे जी दहा टॉप हिंदी फ़िल्म्सची स्क्रीप्ट्स ठेवलेली आहेत त्यातलं एक ’वक्त’चं आहे. ओरिजिनॅल्टी हा कथेचा स्ट्रॉन्ग पॉइन्ट होता.
अख्तर मिर्झांची कथा काळाचा अगाध महिमा दर्शवणारी, एका मोठ्या कालखंडातून प्रवास करणारी आहे. मिर्झांचं फ़ाळणीपूर्व आयुष्य पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात गेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात केदारनाथ ऍन्ड सन्स नावाची त्यांची कार्पेट बनवण्याची मोठी फ़र्म होती. क्वेट्टाच्या भूकंपाच्या तडाख्यात त्यांच्याही कुटूंबाची वाताहत झाली. पुढे अनेक वर्षांनी योगायोगाने त्या कुटूंबातील सदस्य पुन्हा एकत्र आले. याच आठवणींवरुन मिर्झांनी ’वक्त’ची कथा लिहिली. बी.आर.चोप्रांचं बालपणही लाहोरला गेलं असल्याने त्यांना या कथेविषयी आत्मभाव वाटला. या कथानकावर भव्यदिव्य, रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं. पटकथा-संवाद लिहिण्याचं काम त्यांनी अख्तर उल इमान यांच्याकडे सोपवलं (हे अमजदखानचे सासरे).
इमान यांनी कथानकाला कोर्टरुम ड्रामा, खूनाचं रहस्य, दैववादाची जोड दिली.
स्टोरी सुरु होते लाला केदारनाथांच्या नव्या दुकानाच्या, नव्या हवेलीच्या उद्घाटन प्रसंगाने.
waqt_store.jpg
त्याच दिवशी त्याच्या तिनही मुलांचा वाढदिवसही असतो. लाला केदारनाथ आपल्या स्वकतृत्वाने मिळवलेल्या यशाने संतुष्ट, अभिमानाने ओतप्रोत आहे. आनंदाने काठोकाठ भरलेला आहे. उत्सवी वातावरण आहे, तो आणि त्याची पत्नी लक्ष्मी नातेवाईक, शेजार्‍यापाजार्‍यांच्या स्वागतात मग्न आहेत. जल्लोश चालू आहे. गाणी बजावणी सुरु आहेत. लालाजींच्या रोमॅन्टीक ’ऐ मेरी जोहरजबी..’मुळे लक्ष्मी लाजून लालेलाल होते आहे.
कोणीतरी काळाचा महिमा वर्तवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लाला त्याला धुत्कारतो. जणू काळ ते ऐकतो आणि लाला केदारनाथला आपल्या सामर्थ्याची किंचितशी चुणूक दाखवायचं ठरवतो. त्याच रात्री भूकंप होतो. लालाची हवेली पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. मुलं, पत्नी हरवतात. लाला वणवण करत त्यांना शोधायला भटकत रहातो.
लक्ष्मीच्या कुशीतला धाकटा मुलगा तिच्यासोबतच रहातो. ते निर्वासितांच्या छावणीत रहायला लागतात, त्यांना दूर कुठेतरी हलवण्यात येते.
मोठा मुलगा अनाथालयात आहे असं समजतं म्हणून लाला तिथे पोचतो पण नेमका त्याच दिवशी तो मुलगा तिथल्या छळाला कंटाळून पळून जातो, पुढे चोरीमारी करुन पोट भरतो, चिनॉयसेठ त्याला आपल्या पंखाखाली घेतो.
इकडे लाला त्या अनाथालयातल्या लोभी मॅनेजरचा आपल्या मुलाचा छळ केला म्हणून चिडून खून करतो आणि तुरुंगात जातो.
काळाची पावलं वेगात पडत असतात. वीस वर्षं उलटतात.
मधल्या रवीला एक प्रेमळ, श्रीमंत जोडपं दत्तक घेतं. तो वकिल बनतो. श्रीमंत कुटुंबातली साधना त्याची मैत्रिण आहे, दोन्ही कुटुंबांचे स्नेहसंबंध आहेत.
सोफ़िस्टिकेटेड चोर बनलेला स्टायलिश राजा जज्जाच्या मुलीच्या म्हणजे साधनाच्या गळ्यातला नेकलेस चोरतो, तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर (अर्थातच जगदीश राज) त्याला सल्ला देतो की परत कर तो नेकलेस जर चोरला असशील तर. कारण जज्ज आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवसाला भेट म्हणून घेतलेला नेकलेस चोरीला गेला हे गप्प बसून सहन करणार नाहीत.
राजा वाढदिवसाच्या पार्टीत जाऊन नेकलेस आपल्याला मिळाला असं सांगत परत करतो. आणि साधनाच्या प्रेमात पडतो. तिच्या आधीपासूनच प्रेमात असलेला रवी त्याला आपला प्रतिस्पर्धी वाटतो.
राजा-रवी-साधना यांच्यातला प्रेमाचा त्रिकोण, काही प्रसंग नंतर यश चोप्राने जसेच्या तसे त्रिशुलमधे वापरलेत. अमिताभ-शशी-हेमा त्रिकोणात. त्यातही अमितभ आणि शशी एकमेकांचे भाऊ असतात हे दोघांना माहीत नसतं. अमिताभला जेव्हा ते कळतं तेव्हा तो स्पर्धेमधून बॅक आऊट होतो. इथे राजालाही कळतं रवी आपलाच भाऊ आहे, जेव्हा तो त्याचा खून करायला बेडरुममधे रात्री शिरतो आणि टेबलावर रवीचा बालपणातला फोटो बघतो तेव्हा. पण तो ते रवीला सांगत नाही. अबोलपणे त्याच्या सोबत रहातो.
पुढे राजावर चिनॉयसेठ स्वत: केलेल्या खूनाचा खोटा आळ घालतो तेव्हा रवीच त्याची बाजू लढवून त्याला खूनाच्या केसमधून सोडवतो. शेवटचा हा कोर्टड्रामा अफ़लातून आहे.
इथेच लाला केदारनाथ आणि त्याच्या तिनही मुलांची, पत्नीची पुनर्भेट होते.
खरं तर हा अविश्वसनीय प्रकार पण स्क्रीप्टमधे सगळे सुटे धागे इतक्या कौशल्याने या शेवटच्या प्रसंगात खूबीने जोडले आहेत की हा प्रसंग बघताना जराही अतार्किक वाटत नाही.
ढोबळ कथानक या मार्गाने जात असलं तरी खरे रंग भरतात यातले बारीकसारीक प्रसंग. राजा-चिनॉयसेठमधले, रेणू-रवीमधले, रवी-राजा-मीना, राजा-रवीमधले. या प्रत्येक प्रसंगातले संवाद, अभिनय लाजवाब.
वक्त मधे लाला केदारनाथ आणि त्याची तीन मुलं यांच्या भूमिकांकरता चोप्रांच्या मनात पृथ्वीराज कपूर आणि त्याची तीन मुले-राज, शम्मी आणि शशी कपूर यांना घेण्याचं पक्क होतं. दरम्यान त्यांनी ही कथा बिमल रॉयना वाचून दाखवली आणि त्यांचं मत विचारलं. बिमलदांनाही कथेतला ड्रामा, दैववाद हे सगळं आवडलं. फ़क्त त्यांनी स्टारकास्टबद्दल मुलभूत शंका व्यक्त केली. कपूर बापबेटे किंवा भाईभाई एकमेकांसमोर आल्यावर, परस्परांना चेह-यामोह-याने ओळखू शकणार नाहीत यावर प्रेक्षकांचा कदापी विश्वास बसणार नाही असं त्यांचं मत त्यांनी चोप्रांकडे व्यक्त केलं. त्यांनाही ते पटलं. त्यांनी ’वक्त’चं नव्याने कास्टींग केलं. आणि त्यानंतर ते इतकं अचूक ठरलं की आज ’वक्त’ त्याकरता प्रसिद्ध आहे. आदर्श कास्टींग.
बलराज सहानी लाहोरच्या सरकारी कॉलेजात चोप्रांचे सहाध्यायी होते. बलराजजी चांगल्या रोलच्या प्रतिक्षेत आहेत हे चोप्रांना ठाऊक होते. त्यांनी ’वक्त’ मधल्या मध्यवर्ती लाला केदारनाथ यांच्या भूमिकेकरता बलराज सहानींची निवड केली ती किती अचूक ठरली हे पुढच्या काळात सिद्धच झाले. प्रेक्षकांनी चोप्रांना त्याकरता मनोमन धन्यवाद द्यावेत अशा ताकदीने बलराज सहानींनी ही भूमिका वठवली. काळाने श्रीमुखात भडकाविलेल्या सामान्य माणसाचं रुप बलराज सहानींच्या लाला केदारनाथमधून अक्षरश: जिवंत झालं.
एका दृश्यात लाला चौपाटीवर बसून चुपचाप चणे खात असतो. एकेकाळचा गडगंज, आलिशान हवेलीचा मालक, तीन सुपुत्र, गुणी बायको असलेला लाला आता सर्वस्व गमावून, काळाच्या एका थपडीत कोलमडून जाऊन असा चौपाटीवर चणे खात पोट भरतोय, हे दाखवताना त्याच्या चेहर्‍यावर जी सुन्न उदासी आणि हताश परिस्थिती शरणता आहे ती बघून अंगावर काटा येतो. काळजातल्या सगळ्या जखमा चेहर्‍यावर वागवत लाला तिथे बसलेला असतो.
शेजारीच त्याचा मुलगाही असाच सुन्न, उदास होऊन बसलेला असतो. त्यालाही नुकतंच आपण आपल्या आईबापांच्या पोटचा सख्खा नाही तर दत्तक मुलगा आहोत हे सत्य उमगलय, आपला सख्खा बाप शेजारी बसलाय हे त्याला आणि ज्या आपल्या मुलांना शोधायला आयुष्यभर वणवण केली, तुरुंगातही जाउन आलो, तो असा शेजारी, हाताच्या अंतरावर बसला आहे हे लालाजींनाही माहीत नाही.
यश चोप्रांनी एकही संवाद नसलेला हा सीन विलक्षण परिणामकारकरित्या जमवलाय!
अजून एका प्रसंगात जेव्हा लाला केदारनाथ तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आणि खुल्या आकाशाकडे बघत मोकळा श्वास घेताना गलबलतो आणि शिपायाला सांगतो की तुरुंगात असताना बायको मुलांना दैवाच्या हवाली करुन टाकलं होतं मी, आता पुन्हा या विशाल दुनियेत आलोय, कुठे आणि कसा शोधणार मी त्यांना..
बलराज सहानींच्या अभिनयातली, त्यांच्या संवाद उच्चारणातली सहजता, नैसर्गिकता या प्रसंगात बघावी फ़क्त.
राजकुमार पूर्वी पोलिस ऑफ़िसर असल्यापासून चोप्रांना परिचीत होता. त्याच्या हट्टी, हेकेखोर स्वभावाचाही त्यांना चांगलाच परिचय होता. ’धूल का फ़ूल’ मधे त्यांनी आधी राजकुमारलाच घेतले होते, मात्र त्याच्या आडमुठ्या स्वभावाला वैतागून त्यांनी ती भूमिका रजेन्द्र कुमारला दिली. ’वक्त’मधला ’राजा’चा रोल तरीही राजकुमारनेच करावा अशी चोप्रांची इच्छा होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला ही भूमिका साजेशी आहे असं त्यांना प्रामणिकपणे वाटत होतं खरं तर धर्मेन्द्रही ही भूमिका करायला उत्सुक होता. पण चोप्रांनी राजकुमारकडेच ’राजा’ची भूमिका सोपवली आणि राजकुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं.
इमान यांनी लिहिलेल्या संवादांना त्याने आपल्या खर्जातल्या आवाजाने आणि ऍटीट्यूडने बहार आणली. ’ये चाकू है बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है," किंवा "चिनॉयसेठ, जिनके अपने घर शीशोंके होते है, वो दुसरोंपर पत्थर नही फ़ेका करते," या संवांदांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
राजकुमार पुढील काळात खर्‍या अर्थाने ’राजा’च्या भूमिकेबाहेर येऊच शकला नाही, इतका त्याच्यावर या भूमिकेचा शिक्का बसला.
चि्नॉयसेठच्या भूमिकेत रेहमानसारख्या बुजूर्ग अभिनेत्याने मस्त रंग भरलेत. त्याचा उजवा हात राजा आणि डावा हात मदनपुरीने रंगवलेला एक मवाली गुंड.
बाकी सुनील दत्तने उमदा, बडबडा, जवां दिल, वकिल रवी, जो राजाला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला खूनाच्या केसमधून सोडवतो तो मस्त रंगवला. त्याचे सारखे ’चष्मे बद्दूर, गुले गुलजार..’ म्हणणे जरा डोक्यात जाते, पण ठीक आहे.
साधना तर माझी आवडती हिरॉइन. ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधली तिच्या देखण्या चेहर्‍याची जादू रंगीत पडद्यावरही तितकिच खुलली. जुन्या हिरॉइन्सचा प्लस पॉईन्ट असलेली व्यक्तिमत्वातली ग्रेस साधनात पुरेपूर होती. श्रीमंत, देखण्या मीनाच्या भूमिकेत साधना अप्रतिम शोभली. वाढदिवसाच्या दिवशी तिचे प्रेझेन्ट स्वीकारताना कपाळावरच्या बटा सावरत नाजूकपणे ’थॅन्क यू’ म्हणणे थेट रोमन हॉलिडेतल्या ऑड्रे हेपबर्नच्या स्टाईलवरुन उचलले आहे. पण तिला शोभते. तिचे स्वीमसूटमधले दृश्य सेन्सॉरने कापले होते पण रिरिलिजच्या वेळी चोप्रांनी पुन्हा ते घुसडलेच.
waqt_anticipation.jpg
तीनही भावांमधला सर्वात धाकटा भाऊ विजय आईकडे म्हणजे अचला सचदेवकडेच असतो. हुषार विजय (बीए फ़र्स्ट क्लास फ़र्स्ट अर्थात) आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव असलेला, आजारी, खचलेल्या आईला सांभाळणारा. त्याचा बिचारेपणा, बापुडवाणेपण, परिस्थितीची समजूत शशी कपूरने यथार्थ दाखवली. दत्तक सुनील दत्तची धाकटी बहिण रेणू म्हणजे शर्मिला टागोर गरीब विजयच्या प्रेमात पडते, त्याच्या अभावग्रस्त परिस्थितीला समजावून घेत असते, पण शशी कपूर तिला न्यूनगंडातून सतत नाकारत रहातो. रेणू विजयला हट्टाने कार ड्रायव्हिंग शिकवते आणि नंतर आपल्या आजारी आईला उपचाराकरता मुंबईला आणावे लागल्यावर पोट भरण्याकरता विजयला हे ड्रायव्हिंगच उपयोगी पडते, त्याला चिनॉयसेठकडे ड्रायव्हरची नोकरी मिळते.
एकदा त्याच्या कारमधे मागे नेमकी रेणूच बसते, त्या सिनमधे शशी कपूरने बिचारेपणा वैतागवाणा होण्याइतका खरा रंगवलाय.
शर्मिला टागोरची रेणू मस्त. तिचा नंतर अती झालेला लाडीकपणा यात जरा सुसह्य आहे. भानू अथैयाने शर्मिला टागोरचे ड्रेसेसही सुंदर केलेत. बोटीवरच्या पिकनिकच्या वेळचा तिचा गुलाबी-पांढरा फ़्रील्सचा चुडीदार, काळे कशिदाकाम केलेला पांढरा चुडीदार एलेगन्ट दिसतो. तिच्या नाजूक शरिरयष्टीला सगळे ड्रेसेस शोभतातही.
साहीर लुधियानवी आणि रवी ही जादुई जोडी चोप्रांकडे होतीच. त्यामुळे वक्तच्या संगीतयशाबद्दल आधीपासूनच कधी संदेह नव्हता. ’चलो इक बार फ़िरसे अजनबी बन जाये हम दोनो..’ सारखी जादू साहीर-रवीने ’वक्त’मधून पुन्हा एकदा दाखवली. वक्तचं टायटल सॉंग ’आदमी को चाहिए वक्त.’ तर खास साहीरचा ठसा असलेलं गाणं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच काळाची महती प्रेक्षकांना अचूक समजली. बाकी ’ऐ मेरी जोहराजबीं..’ गाण्याने घडवलेला इतिहास तर सर्वपरिचित आहेच. "हम जब सीमटके आपके..", "कौन आया के निगाहोंमे चमक..", "जब तुम मुझे अपना कहते हो, अपनेपे गरुर आ जाता है..", "दिन है बहार के.." ही गाणी खार रवीच्या शैलीतली हळुवार रोमॅन्टिक.
’वक्त’ला फ़िल्मफ़ेअरचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यश चोप्रा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साधना, सहाय्यक अभिनेता राजकुमार, सर्वोत्कृष्ट कथा एफ़.ए.मिर्झा, संवाद अख्तर-उल-इमान असे मानाचे पुरस्कार मिळाले. पहिल्याच रंगीत सिनेमाकरता धरम चोप्रांनाही पदार्पणातच उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ीचा पुरस्कार मिळाला.
मला ’वक्त’ आवडतो त्याच्या स्टाईलिश, ग्लॅमरस रुपामुळे. दिग्दर्शक यश चोप्रांच्या पुढच्या सर्व सिनेमांमधे हा लुक त्यांचा युएसपी राहिलेला आहे, आणि त्याची सुरुवात झाली ’वक्त’ पासून. मात्र वक्तच्या स्टाईल आणि ग्लॅमर कोशंटचं निम्म क्रेडीट नि:संशयपणे घेऊन जाते सिनेमाची कॉस्च्युम डिझाईनर भानू अथैया.
साठच्या दशकातल्या सिनेमांची जादू, तसे सिनेमे पुन्हा आजतागायत निर्माण होऊ शकले नाहीत. पुन्हा निर्माण होतील याची जराही शक्यता नाही. सत्तरच्या दशकातल्या अनेक सिनेमांचे रिमेक झाले पण या सिनेमांना कोणी अजूनही हात लावू धजलेला नाही. साहजिकच आहे, कथानक जसंच्या तसं उचलू शकाल, पण बिमल रॉय, विजय आनंद, चोप्रांसारखे दिग्दर्शक, आसिफ़, अमरोहीसारखे निर्माते, नौशाद, एस.डी., शंकर जयकिशन, रवी, आर.डी. यांसारख्या संगितकारांना, ज्यांचा जादुई स्पर्श सिनेमा निर्मितीला लाभलेला होता ते कुठून आणणार? देव आनंद, शम्मी कपूर, राज कपूर, नूतन, मधुबाला, वैजयंती माला, मीना कुमारी, वहिदा, साधना सारख्या देखण्या, अभिनयसमृद्ध अदाकारी कोण करणार? या दिग्गज कलावंतांच्या, दिग्दर्शक, संगितज्ञांच्या कारकिर्दीतला हायेस्ट पीक परफ़ॉर्मन्स साठच्या दशकाने पाहीला होता.
=========================================================================
संदर्भ- विनोद मेहता (इंडियन सिनेमा)
भावना सोमैया ( दी गोल्डन एरा)
अरुणा अंतरकर
इंटरनेट डेटा बेस- विकिपिडिया, आयएमडिबी आणि इतर

Sunday, May 06, 2012

पाकिझा- साहेबजानचा प्रवास.


पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
पाकिझा म्हणजे युंही कोई मिल गया था.. सरे राह चलते चलते.. असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या साहेबजानच्या नजरेत उमटलेली, रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी, न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी ट्रेनची शिट्टी.. त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्टमधे, ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकतीची सारी दास्तान उमटलेली असते.
आपली नाजूक गोरी पावले लालजर्द पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान.. त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला. न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीत तसं बजावलेलं असतं. आपके पांव बहोत हसीन है.. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा..
पाकिझा म्हणजे हा काव्यात्म मूड.

पाकिझा कथा आहे तवायफ़ परंपरेतल्या दोन पिढ्यांची. नरगिस आणि तिची मुलगी साहेबजान या दोघींच्या नशिबात कोठ्यावरची बदनाम जिंदगी लिहिलेली असते पण दोघींनाही त्यांच्या प्रियकरांच्या रुपात आयुष्य एक संधी बहाल करतं प्रतिष्ठीत समाजात जगण्याची. दोघीही ही संधी स्विकारतात खर्‍या पण नरगिसला समाज नाकारतो आपल्यात सामावून घ्यायचे, शहाबुद्दीनचे, नरगिसच्या प्रियकराचे कुटूंब तिला आपल्या खानदानाची बहू होण्याचा सन्मान नाकारते, घराबाहेर काढते आणि अपमानीत, विद्ध नरगिस आश्रय घेते कबरस्तानाचा. पोटातल्या साहेबजानला वाढवत आपल्या आयुष्याचे उर्वरित काही महिने ती तिथेच काढते आणि मुलीला जन्म देऊन मरुन जाते. मात्र मरण्याच्या आधी शहाबुद्दीनच्या नावाने एक पत्र लिहून ठेवते, निदान आपल्या मुलीला तरी सांभाळ अशी विनवणी त्यात करते. पण त्याआधीच तिची बहिण येऊन त्या तान्ह्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाते आणि तिचा प्रतिपाळ करते.
साहेबजान त्याच कोठीत, गुलाबी महलमधे वाढते, तरुण होते. इन्ही लोगोंने ले लिना दुपट्टा मेरा.. गात आपल्या कलावंत कारकिर्दीचा आरंभही करते. आपले प्राक्तन काही वेगळे असू शकेल याची सुतराम कल्पनाही तिच्या मनात नसते. पण ते वेगळे असते आणि त्याची चुणूकही मिळते.
शहाबुद्दीनला वीस वर्षांनंतर नरगिसने लिहिलेले ते पत्र अकस्मात मिळते. मिळते तेही मोठ्या अजब रितीने. नरगिस जिथे मेली त्या कब्रस्तानातले तिचे बेवारस सामान भंगारात विकले जाते आणि त्यात तिची वही असते, ज्यात तिच्या आयुष्याची दर्दभरी, उदास दास्तान सांगणारी शायरी असते आणि ते पत्र असतं. ज्याच्या हातात ते पडतं तो ते वाचल्यावर हलून जातो. आटापिटा करत शहाबुद्दीनचा शोध घेऊन ते पत्र त्याच्या हवाली करतो. शहाबुद्दीन पत्र वाचल्यावर उलट्या पावली नरगिसच्या आणि त्याच्या मुलीचा शोध घेत गुलाबी महलमधे पोचतो खरा, पण त्याआधीच नरगिसची बहिण पुन्हा एकदा साहेबजानला घेउन पसार होते.
शहाबुद्दीनच्या कुटूंबात जिथे नरगिसला स्थान नव्हते तिथे या नाजायज मुलीला कोण स्विकारणार हा तिचा सवाल तर्कशुद्ध असतो खरा. मात्र त्यातूनच नियती साहेबजानला त्या संधीची चाहूल देतो, जी पुढे तिचं आयुष्य बदलून टाकू शकणार असते.
कोठ्यावरचा सारा लवाजमा आटपून ट्रेनमधून दुसर्‍या ठिकाणी सारेजण जात असतात. मिट्ट काळोख्या, घनदाट पावसाच्या वादळी रात्री त्याच ट्रेनमधे मध्यरात्रीच्या सुमारास सलीम चढतो. समोरच्या बर्थवर झोपलेल्या साहेबजानचं पडदानशीन लावण्य, तिच्या नाजूक शारिरीक सौंदर्याची ग्वाही देणारं गोरंपान, हसीन पाऊल त्याचं मन घायाळ करतं. आपल्या कवीहृदयाची साक्ष पटवणारी रोमॅन्टीक चिठ्ठी तिच्या पैंजणांमधे अडकवून तो मधल्याच कोणत्यातरी स्टेशनावर उतरूनही जातो.
साहेबजान जागी झाल्यावर ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या शायराना, हळव्या मनाला तो अनामिक आशिक भुरळ घालतो.
पुढे अनेक अकल्पित प्रसंगांच्या मालिका घडून येतात, सलिम आणि साहेबजान पुन्हा पुन्हा भेटतात, दुरावतात. साहेबजाऩचा कमकुवतपणा, तिचा गमावलेला आत्मविश्वास, आपण तवायफ़ असण्याचा न्यूनगंड तिला सलिमच्या प्रेमाचा स्वीकार करु देत नाही आणि त्याच्यापासून तिला दामन सोडवूनही घेता येत नाही.
वास्तवापासून पळण्याचा एक मार्ग म्हणून ती सलिमसमोर आपला स्मृतीभ्रंश झाल्याचेही नाटक करते. सलिम तिला स्वत:च्या घरी घेऊन जातो. कसाबसा धीर गोळा करुन साहेबजान नियतीच्या खेळाचं पुढचं दान स्वीकारते.
योगायोग म्हणजे सलिम शहाबुद्दीनचा पुतण्या असतो. साहेबजान आणि शहाबुद्दीन दोघांनाही परस्परांची ओळख नसतेच.
पिढी बदललेली असली तरी घराचा कर्मठपणा तितकाच कडवा असतो. साहेबजान तवायफ़ घराण्यातली आहे हे कळल्यावर तिला त्यांनी स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही, पण यावेळी सलिम ठाम असतो. साहेबजानचा हात घट्ट पकडून तोही घराबाहेर पडतो. पण सलिमच्या प्रेमावरच्या विश्वासापेक्षा मनातली असुरक्षितता, भिती साहेबजानला ग्रासून टाकते आणि ती त्याचा हात सोडून पळून जाते.
तिच्या आईचं आणि तिचं प्राक्तन त्या दुर्दैवी कडीमधे असं नकळत गुंफ़लं जातंच.
भरकटलेल्या अवस्थेतल्या सैरभैर साहेबजानला पुन्हा एकदा गुलाबी महलात आणलं जातं, तिची अशी करुण अवस्था पाहून मावशीच्या मनाला यातना होतात, पण त्यावर तिच्याकडे काही उपायही नसतो. आपले प्राक्तन स्वीकार, मुजरा हेच आयुष्य म्हणून मान्य कर इतकाच सल्ला ती देऊ शकते.
इकडे आपल्या प्रेमाचा अव्हेर साहेबजान पुन्हा पुन्हा का करतेय हे न कळू शकलेला दुखावलेला सलिम नाईलाजाने शादीला मान्यता देतो, आणि स्वत:च्या लग्नाच्या रात्री मुजरा करायला साहेबजानच्या कोठ्यावर आमंत्रण धाडतो. ती ते स्विकारते. ही परिक्षा आहे स्वत:ची आणि स्वत:च्या प्रेमाची असं समजत ती शादीच्या शुभ्र तक्तपोशीवर नृत्य करते, घायाळ होते पण तरीही नाचतच रहाते.
असह्य होऊन तिची मावशी शहाबुद्दीनला पुकारते, त्याच्या तथाकथीत शरिफ़ कुटुंबाचे वाभाडे काढते आणि सांगते की बघ हे तुझ्या पोटच्या पोरीचं, तुझ्या दारात, तुझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठीत अंगणात सांडलेलं रक्त.
हादरलेला शहाबुद्दीन आपल्या मुलीला कवटाळायला पुढे होतो आणि बापाच्या गोळीला बळी पडतो. साहेबजानची बारात आणि दुर्दैवी शहाबुद्दीनचा जनाजा गुलाबी महालातून एकाचवेळी उठतो. साहेबजानला तिचा मृत बाप बिदा करतो आणि अखेर एक तवायफ़ कोठ्यावरुन स्वत:च्या घरी जाते.
साहेबजानचा हा मुक्ती, प्रेम, सन्मानाच्या आयुष्याकडे चाललेला हा प्रवास गुलाबी महाल कोठ्यातली एक लहान मुलगी बघत असते, साहेबजान तर चालली स्वत:च्या पतीच्या घरी, आपल्या घरी.. पण ती मुलगी अजूनही त्याच जगात अडकून पडलेली आहे, आपल्यासाठीही कधीतरी अशी बारात घेऊन एखादा सलीम येईल, आपल्याकरताही एखादा शहाबुद्दीन स्वत;चे प्राण पणाला लावेल अशी आस त्या लहान मुलीच्या नजरेत उमटलेली आहे.
कमाल अमरोहीची पाकिझा आहे ही मुलगी.
अमरोहीचा हा खास टच ज्यामुळे पाकिझाला अजून एक तवायफ़च्या आयुष्यावरील सिनेमा अशा बिरुदामधे न अडकवता तो एका वेगळ्याच उंचीचा सिनेमा बनतो.
पाकिझाची कथा, पटकथा कमाल अमरोहीचीच होती. अमरोही स्वत: शायर होता आणि त्याच्या तरल, कल्पनारम्य, रोमॅन्टिक कवीमनाची झलक पाकिझाच्या पटकथेत, त्यानेच केलेल्या दिग्दर्शनात ठायी ठायी दिसली. एखाद्या गूढ परिकथेसारखी पाकिझाची कथा उलगडत जाते. अगदी सुरुवातीलाच सोनेरी केसांची नरगिस शहाबुद्दीनच्या वडिलांच्या हवेलीतून अपमानीत होऊन बाहेर पडते आणि कबरस्तानाचा रस्ता गाठते तेव्हापासूनच गूढ, अकल्पनीय प्रसंगांचा वेढा जणू आपल्या मनावर पडायला लागतो. नरगिसला वाटेत भेटणारे भोई तिला काही न विचारता अचूक कब्रस्तानात पोचवतात.
कबरस्तान हे प्रतिक आहे नरगिसच्या मेलेल्या भावनांचं, समाजाने टोचून, घायाळ करुन मारुन टाकलेल्या तिच्या हळव्या मनाचं. तिच्या भग्न आयुष्याचं.
कमाल अमरोहीने प्रतिकांचा वापर पाकिझा सिनेमात अनेकदा केला.
गुलाबीमहाल कोठीत सापाचे घुसणे साहेबजानच्या आयुष्यातले धोके सूचित करतात, तिचं झिरझिरीत पडद्यांमधे गुरफ़टून जाणं, कोलमडून पडण्यातून तिचा स्वत:शी चाललेला अयशस्वी झगडा, तिचा गोंधळ दिसतो. साहेबजान कोठ्यावर परतते तेव्हा समोर फ़ाटका, दोर तुटलेला पतंग लटकलेला तिला दिसणं अशा अनेक प्रतिकांमधून अमरोही कधी तरलपणे, कधी ढोबळपणे पाकिझाची कथा सांगत जातो.
पाकिझा सिनेमाचा मूड व्याकूळ अभिनयातून, सुरेल गाण्यांमधून, पार्श्वसंगीतामधून, उर्दू, नजाकतदार संवादांमधून, देखण्या पोषाखांमधून, भव्य, नेत्रदीपक, आलिशान सेट्समधून ज्या प्रकारे तयार होत जातो ते बघताना कौतुक वाटते ते कमाल अमरोहीचे आणि आश्चर्यही.
१९५८ मधे त्याने बनवायला घेतलेला पाकिझा अखेर १९७२ मधे रजतपडद्यावर झळकला आणि या दरम्यानच्या काळात अमरोहीला सिनेक्षेत्रातल्या अनेकांची कुचेष्टा सहन करायला लागली. मीना कुमारी आजारी पडून अंथरुणाला टेकली, संगीत दिग्दर्शक गुलाम महंमद आणि सिनेमॅटोग्राफ़र जोसेफ हिरशिंग तर जग सोडून गेले. तरी अमरोहीचा पाकिझा बनतोच आहे अशी हेटाळणी सहन करायला लागली.
लोकांचं सगळंच चूक होतं असंही नाही. खरोखरच कमाल अमरोही नादीष्टासारखा वागत होता. कृष्णधवल जमान्यात त्याने पाकिझा बनवायला घेतला, मीना कुमारीसारखी अभिनयसम्राज्ञी घरातच होती, सोबतीला त्याच्या आधीच्या गाजलेल्या महल सिनेमातला अशोक कुमार होता; अमरोहीला असा सिनेमा बनवायचा होता जो पाहून लोकं चकित होतील, असं काव्यमय सौंदर्य पडद्यावर आधी कधीही झळकलं नव्हतं असे उद्गार काढतील.
सिनेमाचं शूटींग जोरात सुरु झालं. इन्ही लोगोंने.. गाण्याकरता भव्य, खर्चिक सेट उभारला होता, वातावरणनिर्मितीकरता हजारो मेणबत्त्या लावल्या होत्या, कृष्णधवल पडद्यावर इतक्या नजाकतीने कोणतं गाणं सादर झालं नसेल अशी अमरोहीच्या मनात खात्री होती.
पाकिझाचे पुढचेही काही सीन्स घेतले गेले.
दरम्यानच्या काळात लोकांना रंगीत सिनेमा लोकप्रिय व्हायला लागला होता, ’जंगली’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लोकांना इस्टमन कलर्सची जणू भुरळ पडली. पाकिझा रंगीतच बनवायचा असं अमरोहीने ठरवलं आणि आत्तापर्यंतची शूट केलेली सगळी रिळं फ़ेकून देत त्याने रंगीत सिनेमाला साजेसा माहोल सेटवर तयार करवून घेतला आणि शूटींगला पुन्हा नव्याने सुरुवात केली.
त्यानंतर सिनेमास्कोपचं नवं तंत्रज्ञान आलं, कमाल अमरोहीने पाकिझाही आडव्या, सिनेमास्कोप तंत्रातच जास्त खुलून दिसेल असं ठरवलं, आणि मग पुन्हा आधीच शूटींग रद्द करून नव्याने शूटींग.
असा खेळ अनेकदा चालू राहीला. मीना कुमारी आधी भांडली, मग थकली, अल्कोहोलिझमने तिचा कब्जा घेतला, ती आजारी पडली, हिरो अशोककुमारचं पोक्त झाला, त्याच्या जागी राजकुमार आला. कमाल अमरोहीने नायकाची व्यक्तिरेखा राजकुमारच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेल अशी नव्याने लिहिली. पाकिझाचा हिरो बिझिनेसमन होता, आता फ़ॉरेस्ट रेन्जर झाला.
पाकिझा संपूर्णपणे नायिकाप्रधान असूनही, त्यात मीनाकुमारीसारख्या समर्थ अभिनेत्रीची डबलरोलची सशक्त, ऑथरबॅक्ड व्यक्तिरेखा असूनही त्यातला नायक नामधारी किंवा मिळमिळीत वाटत नाही. हे श्रेय संपूर्णपणे कमाल अमरोहीचे.
पाकिझा मधली काही वर्षं अक्षरश: डब्यात गेला. मीनाकुमारी आणि कमाल अमरोहीमधे वैयक्तिक ताण-तणाव होतेच. व्यावसायिकदृष्ट्याही त्यांचे संबंध आता दुरावले. पण सुनील दत्त-नरगिस या जोडप्याने पाकिझाची काही रिळं पाहिली होती, हा किती अप्रतिम सिनेमा बनू शकतो हे त्यांना माहित होते. अखेर त्यांनी मनावर घेतले, मीनाकुमारीला राजी केले, अमरोही तयार होताच, आणि पाकिझा पुन्हा सेटवर गेला.
या सगळ्यात मीनाकुमारीचं पाकिझा पहिल्यांदा सुरु होतानाचं उत्फ़ुल्ल, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे टवटवीत सौंदर्य मात्र उताराला लागलं होतं. कमाल अमरोहीने हेही आव्हान स्विकारलं. जमेल तसे लॉन्ग शॉट्स घेत, काही ठिकाणी, विशेषत: नृत्याच्या प्रसंगात पद्मा खन्नाच्या डमीचा वापर करत त्याने शूटींग पुढे रेटलं. आपली कल्पनाशक्ती पणाला लावत गाण्यांचे शूटींग केले.
उदा. चलो दिलदार चलो.. या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी मीनाकुमारीला उभं रहाणंही मुश्किल होतं. चेहर्‍यावर सूज आली होती, क्लोज-अप्स तर अशक्यच होते. अमरोहीने तिचा चेहरा दिसणारच नाही अशा तर्‍हेने डमी वापरत, व्यक्तिरेखांवर कमीतकमी भर देत, समुद्राचं पाणी, आकाशातला चंद्र, चांदण्या आणि शीडाच्या बोटींचा वापर करत गाण्याचे शूटींग केलं आणि गाण्यातला रोमॅन्टिक मुड कायम ठेवत उलट त्याला एक वेगळीच फ़िलॉसॉफ़िकल डूब मिळाली.
कमाल अमरोहिच्या दिग्दर्शनाचे, मीनाकुमारीच्या अभिनयाचे काही मास्टरपीसेस पाकिझामधून दिसतात ते केवळ अप्रतिम आहेत. मीनाकुमारीच्या आजारपणामुळे असेल, किंवा व्यक्तिरेखाच तशी लिहिली गेल्यानेही असेल, पण तिच्या दोन्ही व्यक्तिरेखांवर एक कमालीच्या औदासिन्याची झाक आहे. दु:ख, उदासी ती गरज नसताना स्वत:वर ओढवून घेते आहे, मनातला गोंधळ अनेकदा स्वत:च्या निर्णय न घेऊ शकण्याच्या कमकुवतपणामुळे मुद्दाम निर्माण करत आहे असं वारंवार जाणवतं.
काहीवेळा तर आपल्याला कळतच नाही ही नक्की अशी का वागते आहे, चीडही येते इतकं तिचं कॅरेक्टर कधी कधी कन्फ़्युजिंग वागतं. तिची व्यक्तिरेखा स्वप्नाळू आहे मात्र आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकदच तिच्यात नाही असं वाटतं. मीनाकुमारीला आनंदी व्हायचंच नाहीये का असा प्रश्न पडतो.
मात्र एका प्रसंगात मीनाकुमारीच्या अभिनयाला, तिच्या संवाद उच्चारण्याच्या एरवी सदोष वाटणार्‍या धाटणीलाही सलाम करावासा वाटतो. माझ्या मते सिनेमाचा हा हायलाईट सीन.
मीनाकुमारी म्हणजेच साहेबजान, राजकुमारपासून म्हणजेच सलीमपासून पळून पुन्हा कोठ्यावर परतलेली असते, सैरभैर, उदास अवस्थेत वावरत असते. तिची कोठ्यावरची सखी त्याबद्दल तिला वारंवार छेडते, तिचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करते. अशाच एका प्रसंगी साहेबजान म्हणते- "हर तवायफ़ एक लाश हैं, मैं एक लाश हूं, तुम एक लाश हो, आपले हे गुलाबी कोठे म्हणजे कब्रस्तान."
मीनाकुमारीने आपल्या व्यक्तिमत्वाला सारा दर्द या संवादामधे ज्या पद्धतीने ओतला आहे, तो ऐकताना अंगावर काटा येतो. आपल्याला ट्रॅजेडीक्वीन हा किताब उगाच नाही मिळाला याची जणू साक्ष या प्रसंगातून ती देते. साहेबजानच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण औदासिन्याचा मूडच या प्रसंगातून व्यक्त होतो. ती आतून खरंच मरुन गेलीय, काही स्ट्रगल करावा, झगडावं परिस्थितीशी असं आतूनच तिला वाटत नाहीये, फ़क्त दु:ख आणि दु:खच आपल्या पदरी येणार अशी तिची जणू खात्री झाली आहे.
इतकं खोलवर डीप्रेस्ड कॅरेक्टर आजवर हिंदी सिनेमांमधे कधीही इतक्या समर्थपणे रंगवलं गेलं नाहीय. नायिकेच्या प्रमुख भूमिकेतून तर नाहीच नाही.
साहेबजान जेव्हा नरगिसच्या पोटात वाढत असते तेव्हा नरगिसने कब्रस्तानात आसरा घेतलेला असतो, समाजाच्या धिक्कारण्यामुळे ती त्यावेळी संपूर्णपणे कोलमडून पडलेली असते. जिवंतपणीच कफ़न पांघरुन बसलेली, जिंदा लाश नरगिस. नऊ महिने तिच्या पोटात वाढलेल्या साहेबजानवर सगळे संस्कार झाले असणार ते अशा नकारात्मक, उदास प्रवृत्तिचेच.
व्यक्तिरेखेचा असा सखोलपणा ही पाकिझामधली अचानक गवसलेली, व्यावसायिक सिनेमांमधे मला तरी अद्वितीय वाटलेली गोष्ट.
पाकिझाच्या कथेला एक विशिष्ट काळ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ आहे. सरंजामशाही अजून पुरती लयाला गेलेली नाही. इंग्रजी अंमल ऐन भरात आहे. अमरोहीने हा काळ दिसेल असे वातावरण सेटवर निर्माण करण्याचा असोशीने प्रयत्न केलेला दिसतो.
नरगिस आणि शहाबुद्दीन लग्नानंतर चौकच्या बाजारातून ज्या बग्गीत बसून जातात तिच्यावरचा चांदीचा पत्रा आणि त्यावरचा बकिंगहॅम पॅलेसचा ठसा कोरलेला स्पष्ट दिसतो. शहाबुद्दीनच्या घरातले कर्मठ मुस्लिम वातावरण दाखवणे हा तर कमाल अमरोहीच्या डाव्या हाताचा मळ. एकंदरीतच मुस्लिम कौटुंबिक समाजातली ट्रेडमार्क असणारी आदब, तेहजिब, चालिरिती पाकिझामधून वैशिष्ट्यपूर्ण रितीने दिसले.
मुस्लिम सोशल सिनेमांचा अस्त हळू हळू होतच होता, पाकिझा हा त्यातला शेवटचा महत्वाचा सिनेमा ठरला.
पाकिझा हे कमाल अमरोहीचे जिवंतपणी पाहिलेले स्वप्न होते आणि ते साकार करण्याकरता त्याने आपली सारी पुंजी, सारी प्रतिभा पणाला लावली.
सुंदर, आत्म्याला स्पर्श करणारे संगीत पाकिझाचा प्राण होता आणि अत्यंत उच्च दर्जाची सौंदर्यपूर्ण दृष्यात्मकता हा पाकिझाचा कणा होता.
गुलाबी महालातली झुंबरं, रुजामे, शमादाने, कारंजी, नक्षीदार कमानी, खांब.. सिनेमास्कोप पडद्यावरची प्रत्येक फ़्रेम नेत्रदीपक आणि तरीही कुठेही भडक, अभिरुचीहीन दिसली नाही. याचे श्रेय सेटडिझायनर एन.बी.कुलकर्णींना अर्थातच जाते.
कारंज्याच्या पाण्यात आपले केस बुडवून पहुडलेली मीनाकुमारी भन्नाट होती, अनेक दशकांनी संजय लिला भन्साळीने जेव्हा देवदासमधून तवायफ़ साकारली तेव्हा चंद्रमुखीच्या प्रत्येक अदेमधून साहेबजान डोकावली. अगदी कारंज्याच्या पाण्यात केस बुडवून बसलेल्या माधुरीच्या सीनसकट.
समृद्ध रंगांचा वापर, विशेषत: लाल रंगाच्या विविध छटा, त्याही कुठेही भडकपणा येऊ न देता वापरणं हे पाकिझाचे वैशिष्ट्य.
पाकिझाचा काव्यात्म मूड अगदी सिनेमाच्या टायटल म्युझिकपासून दिसतो. त्यातला वाद्यांचा एकत्रित वापर, लताच्या आवाजातला आलाप सिनेमाचा क्लासिक म्युझिकल मूड सेट करतो.
गुलाम महंमद पाकिझाच्या निर्मितीकाळातच खुदाला प्यारे झाल्यावर पार्श्वसंगिताची जबाबदारी नौशाद यांनी उचलली आणि मास्टर्स स्ट्रोक काय असतो त्याची चुणूक या बुजूर्ग संगीतकाराने अगदी सहजपणे रसिकांना दिली. पक्षांच्या किलबिलाटाचा, आगगाडीच्या शिटीचा, धडधडत येणार्‍या ट्रेनचा, बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज ज्यांनी पाकिझामधे ठायी ठायी महत्वाच्या व्यक्तिरेखेसारखी भूमिका बजावली तो जिनियस टच मात्र कमाल अमरोहींचा स्वत:चा.
कोठ्यावर मुजरा नृत्य चालू असताना, आजूबाजूच्या कोठ्यांवरुन उमटणारे स्वरांचे नाद, ज्यात ठुमरीची तान आहे, गझलांचे सूर आहेत, तबल्याचे बोल आहेत, मधुनच शास्त्रोक्त चीजांचा वापर.. हे सारं तवायफ़ कोठ्यांच्या आसपासचा माहोल अचूक उभा करणारं.
गुलाम महंमद हे नौशादांचे सहायक संगीतकार होते. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा हा पहिलाच सिनेमा. इतक्या बेहतरीन, हॉन्टींग चाली त्यांनी दिल्या आणि त्यांचे रसिकांनी केलेले कौतुक पहायला हा बिचारा संगीतकार जिवंत राहू शकला नाही हे किती दुर्दैवाचे.
सिनेमा पूर्ण झाल्यावर वितरकांनी कमाल अमरोहींना सुचवून पाहीले की या अनोळखी संगीतकाराच्या नावावर सिनेमा खपणार नाही, कोणी नावाजलेला, नव्या दमाचा संगीतकार श्रेयनामावलीत येईल असे पहा. पण अमरोहीने ही सूचना साफ़ धुडकावून लावली. गुलाम महंमद हयात नसताना त्यांचा असा अपमान करणे माझ्याच्याने शक्य नाही, ते जिवंत असते तर कदाचित त्यांना विनंती केली असती, पण आता नाही. त्यांनी जी मेहनत करुन सुंदर संगीत दिले त्याचा मान मला राखलाच पाहीजे, असे कमाल अमरोहींचे विधान काळजाला स्पर्श करुन जाणारे आहे.
चलते चलते यूंही कोई मिल गया था, थाडे रहियो, इन्ही लोगोंने, चलो दिलदार चलो, आज हम अपनी मुहोब्बत का असर देखेंगे, मौसम है आशिकाना.. अशी एक से एक गाणी पाकिझाची शान ठरली. कमाल अमरोहींचा विश्वास सार्थ ठरला.
एकुण बारा सुरेल गाणी सिनेमाकरता बनवली होती, सगळीच काही वापरता आली नाहीत. पण एचएमव्हीने काही वर्षांनंतर या गाण्यांची डबल एलपी काढली जी रसिकांकरता खजाना ठरली.
लता मंगेशकरांचा मधाळ आवाज पाकिझामधे अलौकिक पातळीवर पोचला आहे असं म्हटलं तर यत्किंचितही अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरांवरची हुकूमत काय असते ते चलो दिलदार चलो.. या एकाच गाण्याच्या उदाहरणावरुनही सहज पटते. पुरुष गायकाचा म्हणजे रफ़ीचा आवाज या गाण्यातल्या फ़क्त ध्रूवपदात वापरला आहे. रफीच्या चलो दिलदार चलो.. या व्याकूळ सादेला प्रतिसाद देणारा लताचा हम है तैय्यार चलो.. म्हणणारा डीव्हाईन आवाज, हे दोन्ही आपल्याला क्षितिजापल्याडच्या दुनियेत तरंगत घेऊन जातात त्यांच्यासोबत.
या गाण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतो कारण हे गाणं नुसत्या रोमॅन्टिकपणात अडकत नाही, यात काहीतरी सुटत चालल्याचा, सगळ्यांना सोडून क्षितिजापार, चंद्रालाही मागे टाकून जाण्याचा जो हळवा मूड आहे तो मनाला कातर करुन सोडतो, गाण्यातल्या एको इफ़ेक्टमुळे स्वर मनात घुमत रहातात.
हळूवारपणे, संथ वेग पकडत पाण्यावर तरंगणारी शिडाची नौका.. आओ खो जाये सितारोंमे कही.. आओ भूल जाये दुनियाको कही.. असे स्वर उमटवत हळू हळू चांदण्यांमधे लहरत जात असते, तो मूड केवळ अविस्मरणीय. लताचा आर्त स्वर अंधारात हलकेच विरत जाणारा.
शेवटच्या श्वासाची लय सांधणारी ही साद आहे.
पाकिझा हा प्रवास आहे साहेबजानचा.
गुलाबी महालातल्या लालजर्द गालिच्यावर थिरकणार्‍या तिच्या नाजूक गोर्‍या पावलांचा,
सलिमला मोहात पाडलेल्या तिच्या पैंजण घातलेल्या उघड्या पावलांचा,
पांढर्‍याशुभ्र तक्तपोशीवर लाल रक्ताचे ठसे उमटवणार्‍या तिच्या रक्तबंबाळ जखमी पावलांचा.
अखेर तिची पावलं गुलाबांच्या पाकळ्यांवरुन सलिमच्या दुनियेत प्रवेशतात.
तिचा प्रवास संपतो.
पाकिझाचा प्रवास मात्र सुरु व्हायचा असतो.
* संदर्भ-
विनोद मेहता (इंडियन सिनेमा),
अभिजीत देसाई (शिणुमामागची गोष्ट)