Thursday, December 15, 2016

सिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स

भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.
त्या त्या दशकातले सिनेमे पाहिले की त्यावेळच्या एकंदर समाज मनोवृत्तीचे, त्यांच्या राहण्या, जेवण्या, रितीरिवाजांच्या, पेहरावाच्या संस्कृतिचे दर्शन इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मांकडे बाकी समाजाची बघण्याची, बघण्याच्या बदलत गेलेल्या नजरियाची प्रक्रियाही निरखता येते. हिंदी सिनेमांचं हे सर्वात मोठं आणि देखणं वैशिष्ट्य की त्यात अनेक जिनसी संस्कृती एकजिनसीपणे सामावून जाऊ शकल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी संस्कृती आपापल्या गुणवैशिष्ट्यांसह पडद्यावर साकारल्या.
भारतीय समाजावर, सिनेमावर, कलांवर, जाणीवांवर आत्तापर्यंत सर्वाधिक प्रभाव टाकणारी संस्कृती म्हणजे मुस्लिम संस्कृती जी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर सातत्याने साकारली आणि कधीच उपरी वाटू शकली नाही.
गझल, कव्वाल्या, मुशायरे, पर्दा, निकाह, तेहजिब, मुजरा, सुफी संगित हे आणि अशा तर्‍हेचे मुस्लिम संस्कृतिचे पडद्यावर वारंवार, गेली पन्नास दशकांहून जास्त काळ सातत्याने साकारले गेलेले घटक हिंदी सिनेमाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. तवायफ उमराव जानचा मुजरा आणि राजनर्तिका आम्रपालीचे नृत्य साकारणारा हिंदी सिनेमाच्या धमन्यांमधून वाहणारा संस्कृतीप्रवाह एकाच स्त्रोताशी नातं जोडणारा. मोगलेआझमच्या महालात बाळकृष्णाच्या पाळण्याला झोके देणार्‍या जोधाबाईच्या हाताला हात लावलेला अकबर आणि त्याच्या दरबारात मोहे पनघटपे गाणारी मधुबाला हिंदी सिनेमाचे प्रेक्षक असणार्‍या भारतीय समाजाला कधी वेगळे वाटूच शकले नाहीत. साहजिकच आहे कारण प्रत्यक्षातही त्याला आपल्या आकाशात गणेश चतुर्थीच्या आणि ईदच्या चंद्राची कोर ढळढळीतपणे एकत्र चमकताना पाहण्याची सवय होती. भारतीय सिनेमांमधली ही संस्कृती म्हणजे समाजातल्या दोन सर्वथा भिन्न असलेल्या संस्कृती कलेच्या संदर्भात किती एकजिव भिनून कातडीखाली एकप्रवाही होत गेल्या आहेत त्याचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहासच.
मोगल-ए-आझमची सुवर्ण जयंती भारतीय चित्रपटसृष्टीचे रसिक उत्साहाने साजरे केली. त्याबद्दल लिहूनही खूप आले. हा चित्रपट म्हणजे मुस्लिम संस्कृतीच्या त्यानंतरच्या काळात, भारतीय सिनेमांच्या पडद्यावरुन लयाला गेलेल्या उच्च कलात्मक सांस्कृतिक परंपरेचे शेवटचे वैभवशाली दर्शन होते. चित्रपटाच्या यशास कारणीभूत झालेला प्रत्येकजण मुस्लिम होता.
अभिनय (मधुबाला-दिलिप कुमार), गायन (रफी, बडे गुलाम अली खां), दिग्दर्शक (के.आसिफ), संगित (नौशाद).
उर्दू भाषेतली नजाकत आणि रुबाब, मुस्लिम तेहजिब, ऐश्वर्य आणि कलेचा संगम, सौंदर्य आणि शौर्य हे सारं यात एकवटलेलं होतं.
मुस्लिम संस्कृतीमधली जी काही चांगली वैशिष्ट्ये होती त्यांचं दर्शन इतरही अनेक चित्रपटांमधून अनेकदा झालं. चित्रपट रसिकांवर प्रत्येक वेळी त्याची मोहिनी पडली.

भारतीय चित्रपट रसिकांना या प्रकारच्या सिनेमांमधे प्रामुख्याने असणार्‍या शेरोशायरी, नाचगाणी, मुजरा, गझल, कव्वाल्या यांचेच फक्त आकर्षण होते का? हे आकर्षण होतेच पण अजूनही काहीतरी या सिनेमांमधून त्यांना मिळत होते.
ते 'काहीतरी' म्हणजे पडद्याआडच्या एका संस्कृतीचे दर्शन.
झाकलेले अधिक उत्साहाने पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल हे समाजातील प्रत्येकालाच असते. मुस्लिम समाज भारतीय समाजात राहूनही कुठेतरी आत्यंतिक खाजगीपणा जपणारा असाच राहिला. त्यांच्या बहुबेट्या कायम पडद्यात, त्यांची नमाजाची पद्धत, मस्जिद, त्यांचे शादीसमारंभ हे सारे दिसत असूनही अनोळखी. पण पडद्यावर मात्र चित्रपट रसिकांना खुले आम मुस्लिम स्त्रियांच्या अंतःपुरातही प्रवेश मिळाला. नकाबाआड दडलेलं देखणं मुस्लिम सौंदर्य सिनेमाच्या पडद्यावरुन कधी मीना कुमारी, सुरैय्या, नर्गिस, आणि अर्थातच मधुबाला, वहिदा रेहमानच्या रुपात रसिकांनी मनसोक्त न्याहाळलं.
शेरोशायरीची त्यांच्या मनावरची भुरळ तर गालिब, उमर खय्याम इतकी जुनी. त्यानंतर साहिर, शकिल बदायुनी, मजरुह, राजा मेहंदी अली खां यांनी उर्दू भाषेची सारी नजाकत सिनेरसिकांवर हात जराही आखडता न घेता उधळली. नौशाद, गुलाम मोहम्मद, खय्याम, सज्जाद हुसेन सारख्यांचे स्वरसाज त्यावर चढले.
नबाबी ऐश्वर्याची झगमग, राहणीमानातले शानशौक, रसिकता, आदब, मेहमाननवाझी, जिगर या सार्‍या खास मुस्लिम संस्कृतीतल्या वैशिष्ट्यपूर्ण छटा जेव्हा जेव्हा पडद्यावरुन दिसल्या तेव्हा त्या मोहकच भासल्या. सिनेरसिकांवर त्याची दीर्घकाळ मोहिनी पडली नसती तरच नवल.
मात्र सिनेमाच्या पडद्यावरुन दिसलेली संस्कृती आणि समाजाचं प्रत्यक्ष वास्तव या दोन्हींचं बदलत जाणारं रुप किती यथार्थ असू शकतं याचं उदाहरण जर बघायचं असेल तर त्याने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर साकारत गेलेल्या मुस्लिम संस्कृतीवर आधारीत चित्रपटांच्या वाटचालीचे निरिक्षण करावे. ऐतिहासिक, प्रेमकथांपासून, सामाजिक आणि आता दहशतवादी चित्रणापर्यंत प्रवास करत गेलेली ही संस्कृती. पडद्यावरच्या मुस्लिम संस्कृतीचा प्रवाह प्रत्येक येत्या दशकागणीक झपाट्याने बदलत गेलेला सिनेरसिकांनी पाहिला. समाजाचेच प्रतिबिंब पडद्यावर इतक्या खरेपणाने उमटलेले फार क्वचितवेळा दिसले.
१९२० ते ३० च्या दशकात लैला-मजनू, शिरी-फरहाद, हातिमताई आले,
१९३९ मधे सोहराब मोदीचा पुकार आणि ऐलान आला,
५७ मधे मिर्झा गालिब,
६० मधे के.आसिफचा मोगले आझम आणि गुरुदत्तचा चौदहवी का चांद,
६३ मधे मेरे मेहबूब,
७१ मधे कमाल अमरोहीचा पाकिझा,
७३ मधे गर्म हवा,
८१ मधे उमराव जान,
८५ मधे चोप्रांचा तवायफ,
८९ मधे सईद मिर्झांचा सलिम लंगडे पे मत रो,
९४ मधे मम्मो,
९६ मधे सरदारी बेगम,
२००८ मधे आशुतोष गोवारीकरचा जोधा-अकबर,
२०१० मधे कुर्बान, करण जोहरचा माय नेम इज खान, ..
चित्रपटांच्या यादीकडे फक्त नजर जरी टाकली तरी भारतीय मुस्लिम समाजाच्या बदलत गेलेल्या जीवनधारेचे, इतर समाजाच्या या संस्कृतीकडे बघण्याच्या बदलत गेलेल्या दृष्टीचे ठळक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
स्वातंत्र्यपूर्व काळातली बादशाही, नवाबी संस्कृती.
स्वातंत्र्योत्तर काळातला स्वप्नाळू, काव्यात्म, काहीसा भोळा भाबडा आविष्कार (तु हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा.. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा).
मधल्या म्हणजे सत्तर-ऐंशीच्या दशकातले स्मगलर्स, गँगस्टर्स..
आणि आत्त्ताच्या काळातले दहशतवादी, गुन्हेगारी संस्कृतीतल्या मुस्लिमांचे चित्रण करणारे चित्रपट.
हा प्रवास दीर्घ असला तरी अविश्वसनीय नाही, खोटा नाही याचे भान कधी नव्हे ते सिनेरसिकांना कायम राहिले कारण या प्रवासाचे साक्षिदार ते स्वतः होते.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावरुन अतिशय नेमकेपणे भारतातील मुस्लिम समाजसंस्कृतीच्या वाटचालीचे चित्रण होत गेले. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक संपता संपता आलेल्या चित्रपटांनी नकारात्मकतेचं एक सील मुस्लिम संस्कृतीवर ठोकल्यासारखं मारुन ठेवलं आणि आयरॉनिकली भारतातील बहुसंख्य समाज आजही ज्या हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात ते आहेत- सलमान, आमिर, शाहरुख, फराह, सरोज, राहत अली वगैरे खान कुलोत्पन्न किंवा जावेद अख्तर, फरहान अख्तर, शबाना आझमी वगैरे. या सर्वांनी मुस्लिम समाजातला पिढ्यान पिढ्यांचा चित्रपटाच्या पडद्यावरचा कलात्मक वारसा पुढे चालवला, आणि रसिकांनी त्यांच्यावर, मनात कोणताही संशय न ठेवता, राजकारण आड न आणता दिलखुलास प्रेम करण्याचा वारसा पुढे चालवला असंच म्हणायला हवं.

५०-६० च्या दशकातले अनारकली, पुकार, मोगलेआझम, मेरे मेहबूब, बहू बेगम, चौदहवी का चांद हे गाजलेले सिनेमे सुरेल संगिताने, अभिनयाने नटलेले होते. मुस्लिम समाजातली ही कलात्मकतेच्या कळसाला पोचलेली गौरवशाली पिढी. नवाबी, शायराना स्वभावाच्या, रोमॅन्टिक व्यक्तिरेखा यात होत्या.
'मेरे मेहबूब' मधे खानदानकी इज्जत कशी आपल्या रहात्या शाही हवेलीच्या लिलावाची वेळ येते तेव्हा पणाला लागली जाते याचं नाट्यपूर्ण चित्रण होतं. नवाब अख्तरला लिलावाच्या या दु:खद घटनेपुढे आपल्या प्राणांची काहीच किंमत नाही असं वाटत असतं. तरुण आणि आधुनिक विचारांचा अन्वर मात्र शेवटी त्याला पटवून देतो की, प्रतिष्ठा आणि इज्जत हे कोण्या हवेलीच्या विटामातीच्या यःकिश्चित ढिगार्‍याचे मोहताज नसतात. जगण्यातली सच्चाई आणि प्रामाणिकपणा तुम्ही किती टिकवून ठेवू शकता यावर ते अवलंबून असतं. जेव्हा तुमचा आत्मा तुम्ही विकायला काढता तेव्हा प्रतिष्ठा धूळीस मिळते. तुमची माणुसकी, चांगुलपणा पणाला लावता तेव्हा इज्जत धूळीला मिळते. अन्वर जेव्हा नवाब अख्तरला हे समजावून सांगत असतो, तेव्हा त्याचे हे बोलणे कोणत्याही समाजातल्या नितीमत्तांना आणि मूल्यांना साजेसेच असते. त्यामुळे त्यात काहीही अतिशयोक्ती वाटली नाही. नवाब अख्तर चित्रपटाच्या शेवटी आपली राजेशाही हवेली सोडून बाहेर पडतो.
पन्नास ते साठच्या दशकातल्या सरंजामशाहीची कालबाह्य मूल्ये मोडीत काढायला निघालेल्या, स्वतंत्र भारताच्या लोकशाही समाजाच्या दृष्टीने चित्रपटातली ही मूल्ये आणि हा शेवट सुसंगत असाच होता.
साठपर्यंतच्या दशकातल्या मुस्लिम सोशल्स सिनेमांमधून नवाबी, सरंजामी वातावरणातून आलेल्या, जुन्या संकुचित विचारसरणीच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या आणि त्यातून बाहेर पडू इच्छिणार्‍या मध्यमवर्गीय, उदार विचारसरणीच्या, सुशिक्षित नायकांच्या व्यक्तिरेखा दिसल्या.
हे मुस्लिम नवयुवक स्वतःला नव्याने घडवू पहाणारे होते. नवाबी घराण्याला महत्व न देता बाहेरच्या जगातल्या, खुल्या सांस्कृतिक वातावरणात ते रममाण होणारे नायक होते. कवी होते, शायर होते. सच्च्या, प्रामाणिक मनोवृत्तीचे होते.
ऐलान सिनेमातला जावेद, मेरे मेहबूब मधला अन्वर, चौदहवी का चांद मधला अस्लम, पालकी मधला नसिम, बहू बेगम मधला युसूफ या सार्‍या मुस्लिम नायकांच्या व्यक्तिरेखा खानदानी मुस्लिम पार्श्वभूमीमधून आलेल्या, सुसंस्कृत, आधुनिक जगात भक्कम पाय रोवणार्‍या आणि भविष्याकडे आशेने पाहणार्‍या अशा होत्या.
अजून एक कुतूहलजनक गोष्ट या दशकातल्या मुस्लिम सिनेमांमधे समान आहे. या सिनेमांमधल्या प्रेमकहाण्या बहुतेककरुन कॉलेजच्या पार्श्वभूमीवर खुललेल्या आहेत.
पर्दानशिन आणि तरीही कॉलेजात शिकणार्‍या नायिका म्हटल्यावर साधनाचे नकाबाआडचे ते सुंदर डोळे आणि नायकाशी टक्कर झाल्यावर खाली विखुरलेली पुस्तके गोळा करणारे तिचे नाजूक हात कोणाला आठवणार नाहीत? आणि त्यातला तो शेरवानी घातलेला, भावूक मनोवृत्तीचा " मेरे मेहबूब तुझे मेरे मुहोब्बत की कसम.. आ मुझे फिर उन्ही हाथोंका सहारा दे दे.." गाणारा नायक.
मेरे मेहबूब मधल्या 'अन्वर आणि हुस्ना' ला मिळालेले स्वातंत्र्य, प्रेम करण्याची मुभा ही केवळ आणि केवळ उच्च शिक्षणामुळेच मिळालेली आहे असा एक अप्रत्यक्ष संदेश मुस्लिम युवकांना यातून मिळत गेला नसल्यास नवलच
मेरे मेहबूब, मेहबूब की मेहंदी, बहूबेगम इत्यादी सर्वच सिनेमांमधे हा माहोल होता. कॉलेजातले शिक्षण आणि प्रेम यांची हमखास एकत्र सांगड घालणारा हा जमाना. मुशायर्‍यामधून गाणारा, आपल्या मनातल्या भावना रेडिओवरुन नायिकेपर्यंत पोचवणारा, कॉलेजातल्या 'पोएट्री कॉम्पिटिशन' मधे भाग घेणारा नायकही याच चित्रपटांची देन. .
मुस्लिम सामाजिक चित्रपटांचा पाया या सुरेल सिनेमांनी घातला. हळवा रोमान्स यात काठोकाठ भरुन होता.
मेरे मेहबूब प्रमाणेच 'दिल ही तो है' मधेही प्रमुख मुस्लिम नायक नायिकांच्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात राज कपूर आणि नूतन या नॉन मुस्लिम कलाकारांनी साकारल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना सहज स्विकारलं. " जिस घडी मैने तेरा चांद सा चेहरा देखा.. ईद हो के ना हो मेरे लिए ईद हुई.." असं म्हणणारा नूतनचा गोड चेहरा मुस्लिम सामाजिक प्रेमकथेमधे सहज मिसळून गेला.
कवी वृत्तीच्या, संवेदनशील विचारांच्या गुरुदत्तलाही याच पार्श्वभूमीवर सिनेमा काढायचा मोह व्हावा यात नवल काहीच नाही. त्याने प्रमुख भूमिका केलेला 'चौदहवी का चांद' या काळातला महत्वाचा मुस्लिम सोशल सिनेमा. त्याचा सहाय्यक अब्रार अल्वीने दिग्दर्शित केलेला 'साहिब, बिबी और गुलाम' जरी बंगालच्या जमिनदारी पार्श्वभूमीवरचा असला तरी त्याचे सारे सेटिंग हे टिपिकल मुस्लिम सोशल चित्रपटासारखेच होते.
मुस्लिम समाजातली स्त्रियांवर लादलेली 'पर्दा' पद्धत त्याकाळातल्या खानदानी, सरंजामशाही हिंदू समाजाला अनोळखी वाटण्याचे काहीच कारण नव्हते. साहिब बिबी मधल्या छोटी बहूच्या घुसमटण्यातून त्याचेच दर्शन झाले.
मुस्लिम सामाजिक सिनेमांमधून मात्र या 'पर्दा' किंवा 'नकाब' चे रोमॅन्टिक उदात्तीकरण जास्तच केले गेले. उदा. पालकी चित्रपटातले हे गाणे-
चेहरे से अपने आज तो पर्दा उठाईये
या इल्लाह मुझको चांदसी सूरत दिखाईये
अशी अनेक गाणी सापडतील.
नायिकेला बेपर्दा करुन तिचे सौंदर्य न्याहाळण्याची आस असलेला कवीहृदयाचा नायक आणि बुरख्याचा फायदा घेऊन नायिका बदलण्याचा डाव रचणारे खलनायक, हवेलीतली बेगम आणि कोठ्यावरची तवायफ अशी दोन टोकं असणार्‍या व्यक्तिरेखा दाखवून चांगल्या- वाईटाचा ठळक फैसला हे चित्रपट करत होते.

पण मग सत्तरचं दशक आलं आणि हिंदी चित्रपटांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखांच्या चित्रणात जाणवण्याइतका फरक पडला.
या काळातल्याही बर्‍याचशा व्यक्तिरेखा नवाबी होत्या पण त्यांच्यात तो खानदानी रुबाब शिल्लक नव्हता. ह्या व्यक्तिरेखा बहुतांशी ऐय्याश, उधळ्या, व्यसनी, कोठ्यावरच्या नाचगाण्यांमधे, मुजर्‍यामधे रमलेल्या, घरातली धनसंपत्ती दौलतजाद्यावर उधळणार्‍या अशा होत्या. उदा, मेरे हुझूर, पाकिझा, उमराव जान वगैरे मधले नवाब. पण बाकी सुरेल संगित, देखणे सेट, उत्तम केश-वेशभुषा, उत्कृष्ट अभिनय, डौलदार संवाद ही मुस्लिम चित्रपटांतली इतर सारी वैशिष्ट्ये यात पुरेपूर भरुन होती. चित्रपट अर्थातच रसिकांनी डोक्यावर घेतले.
या सिनेमांमधल्या पुरुष व्यक्तिरेखा कमकुवत, ऐय्याश होत्या आणि कोठ्यावर मुजरा करण्याचे नशिबी आलेल्या नायिका असहाय्य, आणि तरीही कुठेतरी स्वतंत्र, संवेदनशील वृत्ती जोपासणार्‍या, वेगळे जीवन जगण्याची इच्छा असणार्‍या होत्या. पाकिझामधली साहेबजान, उमरावजान मधली उमराव जान अदा.. या व्यक्तिरेखा हिंदी सिनेमांमधल्या ज्या काही मोजक्या, सशक्तपणे रेखाटलेल्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यांपैकी महत्वाच्या अशाच.

सत्तरच्या दशकातच समांतर सिनेमांची चळवळ सुरु झाली. ऐलान, सलिम लंगडे पे मत रो सारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमधून निम्न-मध्यमवर्गीय आर्थिक स्तरातल्या मुसलमान तरुणांच्या दिशाहीनतेवर भाष्य होतं. 'गर्म हवा' सारखा दर्जेदार, वेगळ्या पठडीतला संवेदनशील सिनेमाही सत्तरच्या दशकातच आला. गर्म हवा मधल्या मुस्लिम कुटुंबातून दिसलेले भारत पाक फाळणीमुळे जन्माला आलेले मानवी कारुण्य काळजाला स्पर्श करणारे होते.
सत्तरच्या दशकातल्या उत्तरार्धात आलेले दोन मुस्लिम सामाजिक चित्रपट महत्वाचे ठरतात. - निकाह आणि बाजार.
मुस्लिम समाजातल्या काही रुढींवर नकारात्मक टीका करणारे भाष्य पहिल्यांदाच ठळकपणे, कोणत्याही रोमॅन्टिक उदात्तीकरणाशिवाय केले गेलेले याच चित्रपटांमधुन दिसले.
बी.आर.चोप्रांच्या 'निकाह'ची कथा सशक्त होती. मुस्लिम समाजातल्या वाईट बाजूंना प्रकाशात आणणारी होती. उदा.मुस्लिम पुरुष कसे सहजतेनं, नुसतं ३ वेळा 'तलाक' शब्द उच्चारुन बायकोला निराधार आणि असहाय्य करु शकतात. पण यातल्या फॅक्ट्स तपासल्या नाहीत, इस्लाम असे सांगत नाही वगैरे विरोध करुन मुस्लिम समाजातल्या बर्‍याचशा कट्टर धर्मवाद्यांनी हा सिनेमा नाकारला.
मात्र 'बाजार' सिनेमाच्या बाबतीत त्यातून दिसणारे ढळढळीत, कटू वास्तव नाकारणे कोणालाच शक्य नव्हते. हा सिनेमा प्रत्यक्ष घडलेल्या, सत्य घटनेवर आधारीत होता. इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजाला टीकेच्या खाईत लोटणार्‍या, त्या समाजातल्या अशिक्षित, अल्पवयीन मुलींना पैशाच्या लोभापायी बाजारातल्या गुरांप्रमाणे विकण्याच्या एका घातक रॅकेटला उजेडात आणणारा होता.
हैद्राबादेतले गरीब मुस्लिम घरांतले आईवडिल, आपल्या दारिद्र्यावर उपाय म्हणून अल्पवयीन मुलींचा निकाह प्रौढ, श्रीमंत अरबांशी लावून देण्याच्या सत्य घटनांवर आधारीत 'बाजार' चित्रपटाने मुस्लिम समाजातील विदारक, काळ्या बाजूला समाजासमोर उघडे पाडले आणि वेगळेही पाडले.
बहुसंख्य भारतीय समाजाने हा मागासलेला, वाईट चालिरितींचा नव्याने पायंडा पाडणारा, स्त्रियांना कस्पटासमान लेखणारा समाज जणू नाकारुन टाकला. प्रगत विचारसरणीच्या, सुशिक्षित मुस्लिम समाजाने आपल्या समाजाची ही काळी बाजू टीकेस योग्य मानली. पण धर्मवादी, कट्टर मुस्लिम मुग गिळून गप्प राहिले. वर वर एकसंध वाटणार्‍या या दोन भिन्न विचारसरणीच्या धार्मिक संस्कृती, समाजात आणि कलेच्या प्रांतातही न सांधणार्‍या तफावतीने दुभंगण्याची सुरुवात सत्तरीच्या दशकात अशा तर्‍हेने होत होती.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर मुस्लिम समाजातील व्यक्तिरेखा संपूर्ण तीन तास लांबीच्या चित्रपटांमधून दिसण्याची सुद्धा ही अखेर ठरली.
हिंदी सिनेमांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखा हळूहळू १५-२० मिनिटांच्या अवधीत बसवणे सर्वांनाच सोयीस्कर वाटू लागले. उदा.- शोलेतला रहिम चाचा, मुकद्दर का सिकंदर मधली जोहराबाई.
आता चित्रपटांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखा अलिगढ कट शेरवानी घालणार्‍या, डोक्यावर जरीची, मळकी टोपी , पान तंबाखू चघळणार्‍या, तोंडातून ओघळणारे पानांचे लाल ओघळ पुसत इक्बाल-गालिबची शेरोशायरी वाक्यावाक्यातून झाडणार्‍या, आणि यातल्या स्त्रिया बुरखा किंवा जड, भरजरी लेहंगा, तोंडावर भडक रंगरंगोटी केलेल्या, कानात हैद्राबादी झुमके घालणार्‍या किंवा वयस्कर अम्मीजान टाईप पान चघळणार्‍या, नमाज पढणार्‍या अशा होत्या.
या व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या की आता कव्वाली नाहीतर मुजरा किंवा गझल ऐकायला मिळणार हे प्रेक्षकांना तोंडपाठ झाले. मुस्लिम संस्कृती म्हणजे कव्वाल्या, मुजरा हेच समिकरण रुढ झाले.
मुस्लिम समाजाची काही वेगळी परिमाणं पडद्यावरुन दिसणं बंद झालं.
सत्तरीच्या दशकाच्या अखेरीला हिंदी सिनेमाचाही चेहरामोहरा झपाट्याने बदलत गेला. मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधल्या गुन्हेगारी जगताला केन्द्रस्थानी ठेऊन सिनेमे निघायला लागाले.
ऐंशीच्या दशकाची सुरुवातच झाली अंडरवर्ल्ड डॉनचे चित्रण मुस्लिम व्यक्तिरेखेवर आधारित होताना पहाणे प्रेक्षकांनी सहज स्विकारले. पडद्यावरची नावं मुस्लिम नसली तरी या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष समाजातल्या कोणत्या डॉनवर किंवा गुंडांवर बेतल्या गेल्या आहेत हे सहज लक्षात येई.
निगेटिव्ह, खलनायकी स्मगलर्स कधी अरबी झगा घालून सिगार ओढणारे होते, कधी पांढरा सफारी घालून, डोळ्यांना सोनेरी काड्यांचा काळा चष्मा, हाताच्या दहाही बोटांत सोन्याच्या जाडजुड अंगठ्या, हातात नोटांनी भरलेली ब्रीफकेस घेतलेले हे ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपटांच्या पडद्यावरचे मुस्लिम व्यक्तिरेखेचे सहज दिसणारे दृष्य.
ऐंशीचे दशक संपता संपता हा ट्रेन्ड जास्तच ठळक होत गेला. गुलाम-ए-मुस्तफा, अंगार मधली मुस्लिम व्यक्तिरेखांची चित्रणं भडक होती.
एकंदरीतच हिंदी सिनेमाच्या पडद्यावरुन नॉर्मल, सुशिक्षित मुस्लिम नागरिक, ज्याला काही धार्मिक, कडवी, गुन्हेगारी परिमाणं चिकटलेली नाहीत, अशा व्यक्तिरेखा एकदम गायब झाल्या.
मध्यमवर्गिय समाजातही त्या कुठे दिसेना.
धार्मिक मुसलमानाचे चित्रण प्रतिकात्मकरित्या व्हायला लागले. यालाच समांतर असे काही अर्धे-कच्चे हिंदू-मुस्लिम ऐक्याला धरुन चित्रपट काढण्याचे प्रयत्नही होत होतेच. पण त्यांची हाताळणी हास्यास्पद, प्रचारकी होती. त्यांच्यात करमणूक मूल्यही धड नव्हते. इमानधरम, क्रान्तीवीर सारख्या सिनेमांमधून असे बटबटीत प्रसंग अनेक दिसले. त्यापेक्षा मग मनमोहन देसाईंच्या अमर अकबर अ‍ॅंथनीमधला धार्मिक ऐक्याचा मसाला सुसह्य होता. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांची आजपर्यंत पडद्यावर साकार झालेली सारी सांकेतिक, ढोबळ रुपे त्यांनी यात भाबडेपणाने आणली. पण निदान निखळ करमणूक हा एकमेव हेतू तरी प्रामाणिकपणे निभावला गेला होता.
१९९५ मधे आलेल्या 'बॉम्बे' मधे हिंदी सिनेमांतल्या मुस्लिम व्यक्तिरेखांना पुन्हा एकदा नवे पैलू मिळाले. १९९३ मधे मुंबईतल्या बॉम्ब स्फोटांच्या, त्यानंतरच्या उसळलेल्या दंगलीच्या जखमा अजूनही समाजाच्या मनावर ताज्या होत्या. या दंगलींची पार्श्वभूमी असलेल्या 'बॉम्बे' मधे हिंदू मुलाच्या प्रेमात पडून पळून जाणारी मुसलमान मुलगी होती, धर्मापेक्षा प्रेम महत्वाचे मानण्याचा यातला विचार प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रोमॅन्टिसिझमच्या पांघरुणामुळे स्विकारला. धार्मिक ओरखड्यांवर प्रेमाचे हे मलम कदाचित तात्पुरते सुखावह वाटले असावे.
वीर-झारा सारख्या सिनेमामधूनही हा रोमॅन्टिसिझम खास चोप्रा पद्धतीने भारतीय मुलगा आणि पाकिस्तानी मुलगी यांच्यातले प्रेम देश की मिट्टी, दोन्ही धर्मियांचे रक्त एकच, संस्कृतिचा वारसाही एकच वगैरेची फोडणी देऊन पडद्यावर आला. पण तोपर्यंत भारतीय समाजाचा एकमेकांच्या संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन साफ बदलला होता हे निश्चित.
हिंदी सिनेमांमधून आता मुस्लिम संस्कृतिचे नाही तर धर्माचे चित्रण होत होते.
सरफरोश सारख्या सिनेमांमधून सीमेवरुन चोरट्या मार्गाने भारतात घुसून कारवाई करणार्‍या, कलावंतांच्या बुरख्या आड आपला कडवा, धार्मिक, भारतद्वेषाचा चेहरा लपवणार्‍यांचे बुरखे फाडण्याचे प्रयत्न थेट झाले.
या पुढच्या सिनेमांनी मुस्लिम म्हणजे जिहाद, टेररिस्ट या समिकरणांना घट्ट केले. 'बॉम्बे' काढणार्‍या मणीरत्नमने आता त्याच्याच 'रोजा' मधून आता मुसलमानांची राष्ट्रीयता आणि जिहादी दहशतवाद यांच्यातला संघर्ष ठळकपणे अधोरेखित केला.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आता एखाद्या धबधब्यासारखे असे चित्रपट कोसळत राहिले. काही भडक होते, काही संवेदनशिलतेने भिडणारे होते. मा तुझे सलाम, पुकार, गदर, फिझा, मिशन काश्मिर, बॉर्डर, एलओसी, फना या सर्व चित्रपटांना आंतराष्ट्रीय मुस्लिम दहशतवादी कारवायांची पार्श्वभूमी होती.
दशतवाद्यांचा चेहरा, मोहरा, पेहराव, मुखवटा आंतरराष्ट्रीय असला तरी त्यामागचा मुस्लिम चेहरा लपून राहणारा नव्हताच. दहशतवादाला दुसरा चेहरा असूच शकत नाही हे या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात घट्ट रुजवले गेले. त्यात काही विकृत रंगही होते पण प्रेक्षकांनी सर्व सिनेमे उचलून धरले कारण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत दहशतवादाचा काळा चेहरा येऊन ठेपला होता. कोंडलेल्या, असहाय्य संतापाला सिनेमाच्या पडद्यावरुन वाट मिळत होती.
मात्र यात पडद्यावरच्या हिंदू देशप्रेमाला आणि राष्ट्रीयत्वाला झपाट्याने भडक राजकारणी रंगही चढत गेलेले लपून राहिले नाहीत.
'ब्लॅक फ्रायडे' सारखा एखादाच सिनेमा ज्याने तटस्थपणे आणि खरेपणे मुंबईवरील बॉम्बहल्ल्यामागच्या मुस्लिम कारवायांचे अत्यंत थंड डोक्याने केलेले सारे कटकारस्थान चित्रपटाच्या पडद्यावर कोणत्याही भडकपणा शिवाय दाखवले. घटनाच इतकी भडक होती की त्याला अजून कसलाही रंग द्यायची गरजच नव्हती. समाज हा चित्रपट पाहून सुन्न झाला.
अमेरिकेतल्या ९/११ घटनेनंतर तर आंतराराष्ट्रीय दशतवादाचा मुस्लिम चेहरा जगभरात उघडा पडला. भारतात दहशतवादी पडसाद जास्त तीव्रतेने उमटत होते. रोज उठून या कारवायांच्या नव्या बातम्या कधी स्वतःच्या शहरात, कधी दूरच्या सीमेवर घडत असलेल्या वाचाव्या लागत होत्या.
एकंदरीतच भारतात काय किंवा जगातही, काही असेही मुस्लिम तरुण असतील जे तुमच्या आमच्यासारखे रोज उठून ऑफिसला जात असतील, गाणी ऐकत असतील, पुस्तक, वृत्तपत्रे वाचत असतील, चहा पित असतील, हास्यविनोद करत असतील, आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाची काळजी करत असतील यावर कोणाचा सहजी विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती आली. दहशतवादी मुस्लिम तरुण कसे प्रशिक्षण घेतात, त्यांची मजबुरी, त्यांच्यावरही होत असलेले अन्याय वगैरेंना केन्द्रस्थानी ठेऊन या काळात काही चित्रपट बनले.
दहशतवाद्यांचा एक चेहरा माणसाचाही असतो वगैरे विधाने सामान्य माणसाने फारशा सहानुभूतीने स्विकारली नाहीत पण असे चित्रपट मात्र बनले, काही गाजले. उदा. गँगस्टर.
९/११ नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम चेहर्‍याला मिळत असलेली सावत्र वागणूक आणि त्याचा सामान्य, निरपराध मुस्लिम नागरिकांना, जे आहेत यावरही आता कुणाचा विश्वास राहिला नाही, त्यांची बाजू मांडणार्‍या कुर्बान, माय नेम इज खान, न्यूयॉर्क सारख्या चित्रपटांनी एकविसाव्या शतकाची अखेर झाली.
हिंदी सिनेमांमधून सकारात्मक, सामाजिक संदेश देणार्‍या चित्रपटांची संख्या आजवर नेहमीच जास्त राहिलेली आहे. समाजात एकत्रितपणे नांदत असलेल्या इतर धर्मियांची संस्कृती अगदी भाबड्या, एकसाची वाटाव्या इतक्या, पण शक्य तितक्या चांगुलपणानेच पडद्यावर आत्तापर्यंत चितारली गेली. त्यांना कधी विनोदाचे रंग दिले, कधी कारुण्याचे. त्या त्या धर्माच्या लोकांनीही ते सहजतेने स्विकारले.
शिख धर्मिय म्हणजे उदार, विशाल हृदयाचे, प्रामाणिक, निर्भय, कष्टाळू, आनंदी, ख्रिश्चन म्हणजे दयाळू, साधे, देवभक्त, अनाथ मुलांना आसरा देणारे, गोव्याचे असतील तर मौजमजा करुन जीवनाचा आनंद उपभोगणारे वगैरे.
हार्मनी हा भारतीय सिनेमांचा कायमच परवलीचा शब्द राहिलेला आहे. अशा वेळी अशी एक संस्कृती जी भारतात अनेक पिढ्या बरोबरीने नांदली, भारतीय कला, स्थापत्य, संगित, नृत्य, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत राहिली, अजूनही उमटवते आहे. त्या संस्कृतीचा संपूर्ण र्‍हास भारतीय चित्रपटाच्या पडद्यावरुन होणे ही गोष्ट खेदाची वाटते.
संस्कृतीच्या विलोभनीय रंगांवर धार्मिक कडवटपणामुळे जो काळा फराटा उमटला आहे तो आता दीर्घकाळ भारतीय सिनेमाच्या पडद्यावरुन आपले अस्तित्व दाखवत रहाणार हे निश्चित.
समाजाच्या अंगावर रक्तबंबाळ ओरखडे जोपर्यंत उमटत रहाणार आहेत तोपर्यंत तरी निश्चितच.
साहिरच्या भाषेत बोलायचे तर- हालात से लडना मुश्किल था, हालात से रिश्ता जोड लिया. जिस रात की कोई सुबह नही उस रातसे रिश्ता जोड लिया..
=================================================
लेख श्री व सौ मासिकामधे पूर्वप्रकाशित. 

1 comment:

mrinmayee said...

चारही लेख वाचले एकामागोमाग एक. मी सिनेमे फारच कमी पाहते, त्यामुळे तू लिहिलेस त्यातले फारसे नाहीच पाहिलेले. पण तरीही हे सगळं वाचत राहावंसं वाटलं, इतकी तुझी शैली मस्त धावती आहे शर्मिला. जाता जाता, मि. अँड मिसेस अय्यरमधला नायक मुस्लिम होता, पण स्टिरिओटाइप्ड नव्हता, ते आठवलं.