Sunday, July 01, 2012

'गँग्ज ऑफ वासेपूर'


'गँग्ज ऑफ वासेपूर' ची अठरा रिळं पहात थिएटरमधे बसणं हा जबरी अनुभव!!
 यात रक्तपात, हिंसाचाराचं पिढ्यानपिढ्यांचं सूडनाट्य आहे(च) आणि त्याच्याही पलीकडे मानवी भावनांचा विलक्षण, अंगावर येणारा खेळ आहे, किडामुंगीप्रमाणे मेलेली माणसं आहेत, आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून पुन्हा तोच सूड, तेच कारुण्य, तेच एक्स्प्लॉयटेशन नशिबी घेऊन जन्मलेले नवे जीव आहेत, जगण्यातला मलूल उत्सव आहे, कोळशासारखा काळा विनोद आहे, पॅशन आहे, सेक्स आहे आणि पुन्हा अपरिहार्य रक्ताचा सडाही आहेच.. सूडाचं आणि आयुष्याचं सूत्र अखंडीत आहे.

धनबादच्या कोळसा खाणीत काम करणारे कामगार आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन काला पत्थरमधे पाहीलं होतं. आणि आता गँग्ज ऑफ वासेपूरमधेही.
काय फरक आहे?
यश चोप्रा (आणि तत्सम दिग्दर्शक) यांच्यामधे आणि अनुराग काश्यपमधे नेमका काय फरक आहे हे ज्यांना जाणून घ्यायचय त्यांनी हा सिनेमा बघावा.

4 comments:

Meghana Bhuskute said...

अ-ग-दी.
टीव्ही नि सिनेमाच्या अदृश्य पण ताकदवान प्रभावांची तेवढी भर घालीन मी या वर्णनात. बाकी तंतोतंत.

Panchtarankit said...

ह्या सिनेमाच्या विषयी अनेक वाईट साईट प्रतिक्रिया वाचल्या होत्या.
पण हे कसदार परीक्षण वाचून शंकेचे मळभ दूर झाले
आता हा सिनेमा नक्की पहिल्या जाईल.

शर्मिला said...

मेघना, हो. स्क्रीप्टमधे काय चपखल, सटल वापर आहे या माध्यमांच्या प्रभावाचा. सुरुवातीचं क्यूं की सास भी कभी बहु थी.. आणि कसम पैदा करने वाले की मधला मिथून डान्स हिलेरियस आणि हे दोन्ही कधी त्या त्या वेळी 'फॅन' कॅटेगरीतून बघितलेलं नसूनही आत्ता पडद्यावर पहाताना वियर्डली नॉस्टेल्जिक वाटलं तेव्हा मजा आली.
पण हा सिनेमा पाहील्यावर आणि तो 'एंजॉय' केल्यावर मनात येऊन गेलंच की किलबिल आणि तत्सम सिनेमांपासून या सिनेमापर्यंतच्या दृश्यप्रवासात रक्तपात, हिंसाचार या पेक्षाही 'माणसे सहज मारणे-मरणे' या प्रकाराला मन आणि दृष्टी किती सहजपणे सरावत-स्वीकारत गेली आहे. सिनेमाबाहेरच्या वास्तवातही एका पातळीवर हे असंच घडत गेलय.

नितीन- विस्कळीतपणातली सूत्रबद्धता स्क्रीप्टमधून अभ्यासण्याकरता तरी नक्की बघावा हा सिनेमा.

Meghana Bhuskute said...

मागे कुठेसं वाचलं होतं, की हिंदी सिनेमा भारतातल्या विविधतेला एका सूत्रात आणणारा धागा आहे. त्यात उपरोध अनुस्यूत होता. पण हा सिनेमा पाहताना हा एकजिनसी (सपाटीकरण करणाराही?) प्रभाव अंगावर येण्याइतका जाणवला. इतका की - प्रशासन नामक गोष्ट त्या प्रदेशात पोचत नाही. पण सिनेमा (किंवा माध्यमं) पोचतात.
असुरक्षित वाटलं, आपल्या मचूळ आयुष्याबद्दल शरमल्यासारखं वाटलं, हायसंही वाटलं!
आपली नजर इतकी मेलेली-सरावलेली असूनही हे सगळं पाहायला भाग पाडल्याबद्दल अनुराग कश्यपला सलाम.
तू अनुराग कश्यप आणि त्याच्या सिनेमांवर स्वतंत्रपणे दीर्घ काहीतरी लिही ना, मजा येईल.