Sunday, April 16, 2006

वाचत असलेली पुस्तके

माझ्या पुस्तक वाचनात शिस्त नाही. म्हणजे एका वेळी एक पुस्तक वाचून पूर्ण करणे किंवा एका लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपविणे, पुस्तका मधून आपल्याला काय मिळालं, पुस्तकाचा सारांश, टिपणं वगैरे काढून ठेवणं मला कधी जमलच नाही. खरतर अशी ही शिस्त वाचनाला लावून घेणे अत्यंत चांगली व आवश्यक गोष्ट आहे. त्यासंदर्भात काही लेखन करने, परीक्षण करणे, आपल्या इतर लेखांसाठी संदर्भ म्हणून टिपणांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यामुळे शक्य तर होतातच पण वाचन सुरळीत चालू असल्याचा एक फ़ील पण येतो.

मला एकतर एकावेळी अनेक पुस्तके वाचायची खोड. म्हणजे समजा मी दुकानातून, प्रदर्शनातून चार पुस्तके आणली तर मी घरी आल्यावर ती एकामागून एक सगळी वाचायला सुरुवात करते. लायब्ररीची पुस्तके सोबतीला असतातच. वाचन वेळ मिळेल तस कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी चालू असतं त्यामुळे मग त्या त्या वेळी हाताला येईल ते, पर्स मधे असेल ते पुस्तक आधीच्या पानावरुन पुढे वाचायला सुरुवात होते. अपवाद असतोही एखाद्या खूपच मनाची पकड घेणार्‍या पुस्तकाचा. पण तसे पुस्तक अपवादानेच हातात पडते हल्ली. रात्रभर जागून हातातले पुस्तकं संपवल्याशिवाय झोपच न येणे असा प्रसंगच खूप कमी येतो.

मॅजेस्टीकच्या ग्रंथयोजनेची मी सभासद आहे. परवा त्या योजनेची वार्षिक मुदत संपली. मग एकदम एकावेळी खूप पुस्तके विकत घ्यायचा सुवर्णयोग आला. अधाशासारखी पुस्तके विकत घेतलीत. आणि आणल्यापासून ह्या पुस्तकाची दोन पाने, त्याची काही प्रकरणे असं चालू केलय. न वाचलेलं पुस्तकं घरात अवतीभवती असणं मनाला त्रासदायक असतं. चैनच पडत नाही. पण ह्यावेळी मात्र मी मनाशी ठरवलय की जमेल तितकं शिस्तीने पुस्तकं वाचायची. त्यांची जमतील तशी परीक्षणं पण लिहायची. त्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग उघडायचा मनात आहे.

सध्या माझ्या अवतीभवती पसरून असलेली पुस्तकं ही आहेत्:

१ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२ ब्र - कविता महाजन
३ मौनराग -महेश एलकुंचवार
४ स्टुडिओ - सुभाष अवचट
५ जगण्यातील काही - अनिल अवचट
६ फुलवा -डॉ. श्रीश क्षिरसागर
७ सिनेमाचे दिवस - विजय पाडळकर
८ कोबाल्ट ब्लू -सचिन कुंडलकर
९ चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
१० रानातल्या वाटा -मारुती चितमपल्ली
११ केशराचा पाऊस -मारुती चितमपल्ली
१२ भूमी -आशा बगे
१३ राजा रविवर्मा - रणजित देसाई
१४ भूप -मोनिका गजेन्द्रगडकर ( ह्या विद्याधर पुंडलिकांच्या कन्या )

तर मित्रांनो .... शक्य तितक्या लवकर संपवते ही पुस्तके आणि लिहीते त्यावर जमेल तस परीक्षण

Friday, April 14, 2006

नथ - एक असंस्कृत परंपरा


पारंपरिक महाराष्ट्रीयन स्त्रीचे दर्शन नथ ह्या दागिन्याशिवाय पुरेच होवू शकत नाही असे मानले जाते. पेशवाई संस्कृतीचा हा अगदी पिढ्यानपिढ्या घरांमधून जपला गेलेला, सणासमारंभात अभिमानाने मिरवण्याचा दागिना. पण नथ हा दागिना महाराष्ट्रात कसा व कुठून आला ते वाचल तर हा अभिमान शिल्लक राहील का?

नथ हा संपूर्ण अभारतीय असणार्‍या परकी संस्कृतीमधला आणि भारतीयांनी त्याज्य मानावा असा अलंकार. भारतात नाक टोचण्याची परंपरा नाही. रामायण, महाभारत, प्राचीन लेख, वेरुळ अजिंठा येथील चित्रे व शिल्पे यांत कोठेही नाकातील अलंकारांचा निर्देश नाही. ही चाल येथे मुस्लिम धर्मियांनी आणली. त्यांच्या संस्कृतीत स्त्रीची किंमत गुराढोरांएवढीच. उंटाच्या नाकात मध्ये भोक पाडून जी वेसण अडकवली जाते तिला 'बुलाक' असे नाव आहे. तीच बुलाकची संकल्पना दागिन्याच्या रुपात त्यांनी स्त्रीच्या नाकात अडकवली.हळूहळू येथे आलेले मुसलमान राज्यकर्ते झाले. त्यांची साम्राज्ये वाढली आणि येथील हिंदू सरदार सुभेदार त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले. त्यांच्या पोषाखाचे अनुकरण करु लागले. त्या वेळी हा बुलाक दागिना येथील हिंदू स्त्रियांच्या नाकातही प्रवेशला.
आज गुजराती, मारवाडी महिला नाकात मध्यभागी लोंबणारे सोन्याचे कडे व त्याला डाव्या आणि उजव्या बाजूंना अडकवून कानापर्यंत नेलेली सोन्याची साखळी असा जो अलंकार धारण करतात, तो म्हणजे दुसरे काहीही नसून ही सोन्याची किंमतवान वेसणच आहे.
महाराष्ट्रात हा दागिना थोडा उशिराच आला ( बहामनी राजवट ) पण येथेही त्याला तीच प्रतिष्ठा लाभली. त्याला प्राकृत भाषेतील 'नथ' हा शब्द वापरला गेला. नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार रईस लोकांनी या मूळच्या नथीचे रुप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून जे नथीचे नवे स्वरुप तयार केले तेच आता महाराष्ट्रात चालू आहे.
नथ या अलंकाराला कोणतीही भारतीय आणि सन्मान्य परंपरा नही हे सत्य आपणास कधी नाकारता येणार नाही. संस्कृती परंपरा जपण्याच्या नादात आपण कसे कधी कधी चुकीच्या चालीरितींचे जतन करतो इतकेच नव्हे तर पुढल्या पिढ्यांनीही त्या जपाव्यात हा आग्रह अजाणतेपणातून धरतो त्याचे हे रत्नजडीत उदाहरणच म्हणायचे