Showing posts with label अवांतर. Show all posts
Showing posts with label अवांतर. Show all posts

Wednesday, October 26, 2011

रेषेवरची अक्षरे-२०११

रेषेवरची अक्षरे-२०११ चा यावर्षीचा अंक नेहमीसारखाच वाचनीय आहे.
अंकातील विशेष विभाग-"लैंगिकता आणि मी"एक वेगळा प्रयोग म्हणून अभिनंदनास पात्र तर आहेच शिवाय या विभागाची भट्टीही खास जमून आली आहे.
संपादकमंडळाचे अभिनंदन आणि अंकाच्या यशासाठी,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


जरूर वाचा.

Wednesday, October 20, 2010

दिवाळी अंक आणि...

दिवाळी अंक आणि चित्रकला यांचं नातं मोठं मजेशीर.
म्हणजे असं की दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासून आतल्या पानापानांवर 'चित्रकला'दिसत तर असते पण'चित्रकलेवर'काय आहे हे शोधायचं झालं तर अंकांची पानच्या पानं उलटावी लागतात.तेव्हा कुठे एखाद दोन मोजके दिवाळी अंक हाताशी लागतात ज्यात चित्रकलेवर,चित्रकारांवर कोणी काही गंभीरपणे लिहिलेलं वाचायला सापडतं.एका अर्थाने चित्रकलेची ही दिवाळखोरीच होत असते दरवर्षी.
यावर्षीच्या म्हणजे २०१०सालातल्या दिवाळीत कोणकोणत्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय लिहून येतय याचा शोध घेताना जबरदस्त इंटरेस्टींग गोष्टी हाताशी लागल्या. .
त्याबद्दल सविस्तर इथे वाचा..

Saturday, July 31, 2010

बातमी?

काल दुसरं काहीच महत्वाचं घडत नव्हतं देशात ज्याची बातमी व्हावी.दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सगळ्या चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज/विशेष बातमी/हेडलाईन काय तर डिम्पीने राहूलचं घर सोडलं.नक्की काय लायकीचे आहेत हे दोघे की त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सतत ऐकलच पाहिजे?All news channels are pathetic.

Thursday, March 25, 2010

..

अभिजीत देसाई गेला याबातमीवर विश्वास ठेऊ म्हणता ठेवताच येत नाहीये. नुकतंच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा कॉल आहे बघीतलं की मुद्दाम तो मिस करायचे आणि उलटा त्याला कॉल लावायचे.कारण एकच त्याची ’पुकारता चला हुं मैं..’ ची कॉलर ट्यून. त्याला ते माहित होतं त्यामुळे तो ती पूर्ण वाजू दिल्याशिवाय कॉल उचलायचा नाही. ते गाणं त्याच्या सेलवर एकलं की अभिजीत देसाईचं सगळं व्यक्तिमत्व समोर उभं रहायचं. त्याच्या फ़िल्म्सच्या, गाण्यांच्या आवडींसकट.तसाच होता तो अगदी. अभिजीतच्या बाबतीत ’होता..’ हे शब्द लिहिताना इतकं अस्वस्थ वाटतय.

अभिजीतच्या लोकप्रभामधल्या लिखाणाची मी प्रचंड चाहती होते. मला सिक्सटिजचं व्यसन लागायला तुझे लेख कारणीभुत असं सांगितलं की तो खुश व्हायचा.आणि ते खरंच होतं. जुन्या फ़िल्म्स त्याचं ऑब्सेशन होतं. रेग्युलर लिही गं रिलॅक्ससाठी म्हणून तो खूप कळकळीने सारखा सांगायचा. पण मला नियमित लिहायला जमायचं नाही. पण अमुक एक विषयावर लिहायचं डोक्यात आहे असं म्हटलं की त्याचा आवर्जून आठवण करुन द्यायला, लवकर लिही म्हणायला, काही संदर्भ हवे आहेत का तुला ते विचारायला फोन येणारच येणार.
त्याच्याकडचा संदर्भ अचाट होता. सिक्स्टीजच्या काळाचं त्याचं फ़ोटोकलेक्शन अफ़लातून होतं. ते त्याचं स्वत:च वैयक्तिक कलेक्शन होतं. कॉलेजात असल्यापासून मी हे फोटो जमवतोय सांगायचा. आणि अगदी अभिमानाने तो ते फोटो दाखवायचा. त्याच्याकडच्या फोटोंमुळे लेखाला शोभा यायची. कमालीची माहिती होती त्याच्याकडे त्या एकेक फोटोंसंदर्भात. एकदा निट बसून ऐकायच सगळं असं कितीदा म्हणाले त्याला.

भानूजींच्या लेखाबद्दल नेहमीप्रमाणेच मी देते रे, नक्की उद्या असा एक हवेत वायदा केल्यावर बघ हं पुन्हा फोन नाही करणार यासाठी तुला असं धमकावून त्याने फोन डिसकनेक्ट केला होता.आता पुन्हा त्याचा कॉल मिस करायची संधीच हा माणूस मला देणार नाहीये. इतकं हॉरिबल वाटतय अशा विचारांनी. इतकं भरभराटीला आलेलं करिअर, तो लिहिणार असलेली पुस्तकं.. सगळच अर्धवट. आणि त्याची गोड बायको आणि मुलगी.. बाप रे. त्यांचा तर विचारच करवत नाहीये. असं कोणी इतक्या सहज निघून जावू शकतं कायमचं?
अभिजीत.. इतक्या गप्पा अर्धवट राहिल्यात आपल्याही. आमच्यासारख्या तुझ्या इतक्या चाहत्यांना सांगण्यासारखं तुझ्याकडे इतकं सारं होतं ते न सांगताच असा अर्ध्यात निघून गेलास..
वी विल मिस यू ट्रिमेन्डसली!

Sunday, October 21, 2007

पुन्हा एक ब्लॉगारंभ.

सर्वप्रथम क्षिप्रा चे आणि नंदन चे आभार.

आभार दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे ह्या खेळात सहभागी केल्याबद्दल. दुसरं म्हणजे त्यानिमित्ताने माझाही एक ब्लॉग आहे ह्याची आठवण करुन दिल्याबद्दल.
खरंतर लिहिण्यासारखे इतके विषय असताना आणि लिहिण्याची इच्छा ही असताना न लिहिणे हा एक फार मोठा अपराध मानायला हवा. वेळ नसणे वगैरे सबबींना काही अर्थ नसतो कारण दिवसचे दिवस आपण असंख्य निरुपयोगी गोष्टींमधे बिनदिक्कत वेळ वाया घालवत असतो.
आता दसर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एक ब्लॉगारंभ.
लिहिण्याची गोष्ट मनात आल्यावर वाचण्याची येणार नाही असं होणार नाही. तेव्हा 'जे जे उत्तम' उपक्रमात द्यायचा परिच्छेद ह्या वाचनाच्याच संदर्भात द्यायचं मनात आलं.
अरुण टिकेकरांच एक छोटेखानी पण अत्यंत वाचनीय पुस्तक अक्षरनिष्ठांची मांदियाळी नुकतच मॅजेस्टिकमधे गवसलं. टिकेकर उत्तम व्यासंगी. त्यांनी लोकमुद्रा ह्या पुरवणीत त्यांच्या ग्रंथ-संग्रह आणि इतर वाचन-सफ़रीबद्दल लिहिलेले मनोज्ञ लेखन आपल्या कुणाच्याच स्मरणातून जाणारे नाही. त्या लेखांचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक.


------------------------------------------------------------------------------------------------


काव्य, कथा, कादंबर्‍या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पयर्‍या आहेत, असं मला वाटतं. यौवनात काव्याची मोहिनी पडावी यात काही नवल नाही. जीवनानुभवाचे चटके जेव्हा बसू लागतात तेव्हा कथा-कादंबर्‍या आपल्याला जवळच्या वाटू लागतात. आणि त्या चटक्यांनी जेव्हा आपल्याला समाधान मिळत नसेल, तेव्हा अमुक अमुक मोठी व्यक्ती अमुक क्षणी कशी वागली असेल यासंबंधी आपल्याला उत्सुकता वाटायला लागते. तेव्हा प्रत्येक वाचक चरित्र-आत्मचरित्र या वाड्ग्मयप्रकापर्यन्त येतो. चरित्र-आत्मचरित्राची गोडी लागली की आपण प्रगत वाचनाची एक तरी पायरी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. आज मराठीमधे जे थोडेफार वाचक आहेत, त्यातल्या बहुतेकांची अवस्था इथपर्यंत आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मराठीमधे चरित्र-आत्मचरित्रं आज बर्‍यापैकी खपतात. यापुढची पायरी म्हणजे तत्वचर्चेची आणि ती वाचनाची प्रगतावस्था म्हणायला पाहिजे. ही प्रगतावस्था किती लोकांनी गाठलेली आहे हे आपणच ठरवावं. फारशा लोकांनी ती गाठली असेल असं वाटत नाही. कारण तसं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. इतिहास हा जर माझा विषय असेल तर वाचक म्हणून मला कधीतरी असे प्रश्न पडलेच पाहिजेत की, इतिहास कशासाठी लिहायचा? कसा लिहायचा? जे राष्ट्र पुरुष आहेत त्यांच स्तुतीपठण करणारं लेखन करणं किंवा सनावळ्या देणं ही इथल्या इतिहास लेखनाची संकल्पना आहे. पण तळागाळातल्या लोकांना त्या काळी समजात काय स्थान होतं याचा कोणी इतिहासात उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज या गडावरुन त्या गडावर चढाई करत होते, तेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी काय पेरत होता, कुठली पिकं घेत होता, त्यावेळी कामगार वर्ग होता की नाही, उत्पादनं कोणती होती, त्यावेळचं खाद्यजीवन कशा प्रकारचं होतं. संतसाहित्य जर मी वाचत असेन तर जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून मला मिळतं की नाही? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, असं मला वाटतं. माझं वाचन धडपडत झालं. आपल्यापैकी बहुतेकांचही तसंच झालं असेल. आपल्या सर्वांना बर्‍यापैकी मर्गदर्शन मिळत गेले तर आपला बराचसा वेळ वाचेल आणि तो जर वाचला तर आपल्या सर्वांच्या दष्टिकोनातून ते बरं होईल असं मला वाटतं.

----------------------------- ------------------------------------------------------------------


मी कुणाला टॅग करत नाही कारण मी बर्‍याच उशिरा उतारा लिहिला आहे. त्यामुळे कल्पना नाही कोणाकोणचे आधीच खेळून झालेले आहे.

सर्वांना दसर्‍याच्या निमित्ताने 'मनोल्लंघनाच्या' शुभेच्छा.

परत भेटूच.

Wednesday, April 18, 2007

सायलेंट ट्रीटमेन्ट

खूप दिवसांत नवं काही टाकलं नाही. खरंतर इथे आल्यावर इतरांनीच इतकं सुंदर काहीकाही लिहिलेलं असतं की तेच वाचण्यात सारा वेळ निघून जातो. माझ्या एका लेखाची लिंक इथे टाकत आहे. लेख वाचून जरुर प्रतिक्रीया कळवा. कॉर्पोरेट जगतात घडत असतात अशा कितीतरी गोष्टी ज्यांवर लवकरच एक लेखमाला करणार आहे. म्हणूनच फ़ीडबॅकची गरज आहे.

http://www.loksatta.com/daily/20070415/chatura08.htm

Friday, April 14, 2006

नथ - एक असंस्कृत परंपरा


पारंपरिक महाराष्ट्रीयन स्त्रीचे दर्शन नथ ह्या दागिन्याशिवाय पुरेच होवू शकत नाही असे मानले जाते. पेशवाई संस्कृतीचा हा अगदी पिढ्यानपिढ्या घरांमधून जपला गेलेला, सणासमारंभात अभिमानाने मिरवण्याचा दागिना. पण नथ हा दागिना महाराष्ट्रात कसा व कुठून आला ते वाचल तर हा अभिमान शिल्लक राहील का?

नथ हा संपूर्ण अभारतीय असणार्‍या परकी संस्कृतीमधला आणि भारतीयांनी त्याज्य मानावा असा अलंकार. भारतात नाक टोचण्याची परंपरा नाही. रामायण, महाभारत, प्राचीन लेख, वेरुळ अजिंठा येथील चित्रे व शिल्पे यांत कोठेही नाकातील अलंकारांचा निर्देश नाही. ही चाल येथे मुस्लिम धर्मियांनी आणली. त्यांच्या संस्कृतीत स्त्रीची किंमत गुराढोरांएवढीच. उंटाच्या नाकात मध्ये भोक पाडून जी वेसण अडकवली जाते तिला 'बुलाक' असे नाव आहे. तीच बुलाकची संकल्पना दागिन्याच्या रुपात त्यांनी स्त्रीच्या नाकात अडकवली.हळूहळू येथे आलेले मुसलमान राज्यकर्ते झाले. त्यांची साम्राज्ये वाढली आणि येथील हिंदू सरदार सुभेदार त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले. त्यांच्या पोषाखाचे अनुकरण करु लागले. त्या वेळी हा बुलाक दागिना येथील हिंदू स्त्रियांच्या नाकातही प्रवेशला.
आज गुजराती, मारवाडी महिला नाकात मध्यभागी लोंबणारे सोन्याचे कडे व त्याला डाव्या आणि उजव्या बाजूंना अडकवून कानापर्यंत नेलेली सोन्याची साखळी असा जो अलंकार धारण करतात, तो म्हणजे दुसरे काहीही नसून ही सोन्याची किंमतवान वेसणच आहे.
महाराष्ट्रात हा दागिना थोडा उशिराच आला ( बहामनी राजवट ) पण येथेही त्याला तीच प्रतिष्ठा लाभली. त्याला प्राकृत भाषेतील 'नथ' हा शब्द वापरला गेला. नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार रईस लोकांनी या मूळच्या नथीचे रुप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून जे नथीचे नवे स्वरुप तयार केले तेच आता महाराष्ट्रात चालू आहे.
नथ या अलंकाराला कोणतीही भारतीय आणि सन्मान्य परंपरा नही हे सत्य आपणास कधी नाकारता येणार नाही. संस्कृती परंपरा जपण्याच्या नादात आपण कसे कधी कधी चुकीच्या चालीरितींचे जतन करतो इतकेच नव्हे तर पुढल्या पिढ्यांनीही त्या जपाव्यात हा आग्रह अजाणतेपणातून धरतो त्याचे हे रत्नजडीत उदाहरणच म्हणायचे

Wednesday, March 15, 2006

गृहिणी दीपशिखा

शरू रांगणेकरांनी आपल्या बहारदार आणी खुसखुशीत शैलीत भारतीय व्यवस्थापकांच केलेलं सुरस आणि चमत्कृतीपूर्ण वर्णन ( Ref. In the Wonderland Of Indian Managers ) वाचताना माझ्या डोळ्यांपुढे राहून राहून ज्यांना कौतुकानं (!!) आद्य व्यवस्थापक म्हणून संबोधल जातं, त्या घरोघरीच्या गृहव्यवस्थापिका उर्फ़ सामान्य भाषेत गृहिणी उभ्या राहत होत्या.

स्वत : शरू रांगणेकर तर नेहमीच कधी मिश्किलपणे तर कधी उपरोधिकपणे गृहिणींची उदाहरणं देत आले आहेत. त्यामुळंसुद्धा असेल कदाचित, पण भारतीय व्यवस्थापकांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त आणि मस्त अशा मनोवृत्तीचं त्यांनी केलेलं वर्णन मला गृहिणींसाठीच जास्त चपखल वाटलं.

सगळ्याच भारतीय बायका, मग त्या नोकरी करणार्‍या असोत वा नसोत, स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या असोत वा राजकारणात, कलावंत असोत वा खेळाडू, त्यांना स्वत : ला आपण कशा आधी छानशा गृहिणी आहोत आणि बाकी सगळं नंतर, म्हणजे गृहिणीपण सांभाळून मग, असं दाखवायला भारी आवडतं. दाखवायला शब्द महत्वाचा आहे. कारण खरं ते निभवायला किती कठीण असतं ते समजेपर्यंत आणि त्यांनी ते मान्य करेपर्यंत त्या ना धड गृहिणी राहिल्या असतात, ना इतर काही. पण आदर्श गृहिणीपणाचा देखावा करण्यात त्या मनापासून रमतात.

फ़ारसं काही वेगळ करुन दाखवावं, अशी त्यांची स्वत : कडून किंवा इतरांची त्यांच्याकडून अपेक्षाच नसल्यानं हा देखावा बहुतेक वेळा पुरेसा ठरतो.

मूळ मुद्दा असा की, सुस्त, व्यस्त, त्रस्त, मस्त हे भारतीय व्यवस्थापकांच्या स्वभावाचं चित्रण गृहव्यवस्थापिकांना चपखल का आणि कस बसतं? आपण जरा आजुबाजुला नजर टाकूया का?

सुस्त गृहव्यवस्थापिका

' बघू ' , नंतर, काय घाई आहे?, मला बाई कंटाळा .... ' हे यांचे परवलीचे शब्द. कामाची चालढकल, दिरंगाई करण्यात यांचा हातखंडा. नोकरी करणार्‍या गृहिणींना या विभागात बसवता येणार नाही असं कुणाला वाटत असेल, तर तो मोठाच गैरसमज आहे. सुस्तपणाला कामाच्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तर भरपूर वाव. टेबलावरच्या बराच काळ न हललेल्या फ़ायली, लेडीज रुममध्ये जास्तीत जास्त घालवलेला वेळ, त्यांच्यावर महत्वाची कामं कधीच न सोपवण्याची त्यांच्या बॉसनं घेतलेली खबरदारी त्यांच्या 'सुस्त'पणाच द्योतक असतं. मुलांच्या शाळांची तयारी करताना यांना ऑफ़िसचं हजेरीपत्रक काठायला उशीर होतो म्हणून सहानुभूती दाखवावी, तर त्यांच्या मुलांचीही शाळेची पहिली घंटा कायम चुकलेलीच दिसते. गंमत म्हणजे घरात असताना बहुतेक वेळा त्यांचा सुस्तपणा छुपाच असतो. किंबहुना तो छुपा राखण्याइतकी चतुरता त्यांच्यात उपजतच असते. त्यांच्या मागं कुणी ऑफ़िसमधल्या सहकार्‍यांनी किंवा शेजारणींनी तगादा लावलाच तर उद्या, पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी असे वायदे करताना त्या जराही कचरत नाहीत.

यांचा दुसरा गुण म्हणजे दुसर्‍यांकडून कामं वेळेत करवू घेणं यांना व्यवस्थित जमतं. त्यात त्या जराही सुस्तपणा दाखवत नाहीत. यांचे नवरे आणि मुलं साहजिकच स्वावलंबी असतात. याच कारण त्यांचा सुस्तपणा असं चुकूनही मनात आणू नका. कारण आपण नोकरी करुन घर सांभाळतो आणी घराला कशी योग्य शिस्त लावली आहे, याबद्दल आपली पाठ वरचेवर थोपटून घेण्यात त्या सर्वात पुढे असतात. यांची मोलकरीण शक्यतो दांडीच मारत नाही. कारण जितक्या दिवसांची दांडी, तितक्या दिवसांच साठलेलं कामं हे समीकरण त्यांना महागातच पडतं. छे, छे, पगार कापण्याच चुकीच धोरण त्या कधीच अवलंबत नाहीत. तुम्ही दुर्दैवाने कामसू आहात आणि त्यांची शेजारीण आहात, तुम्ही तुमच्या मोलकरणीला इतकं सारंकाही देता, पण तुमच्या घरी दांडी मारून तुमची मोलकरीण सुस्त शेजारणीचं कामं हळूच संध्याकाळी येऊन करूण टाकते. याचं कारणं तुमचा मूर्ख कामसूपणा. सिंकमधे चमचा सुद्धा राहिलेला चालत नाही तुम्हाला. मग भांड्यांचा ढिगारा न घासता तुम्ही राहूच देणार नाही, हे तुमच्या मोलकरणीला बरोबर माहीत असतं.

गृहिणीच्या भूमिकेत घरात वावरताना या जशा आपल्या घरातल्या पसार्‍याबद्दल संकोच बाळगत नाहीत, तसच ऑफ़िसात टेबलभर पसरलेल्या कागदांचाही बाऊ करत नाहीत. पसारे आवरत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घेणं महत्वाचं, असं त्या ठणकावून सांगतात. पण ऑफ़िसातही उगाच घाईगर्दी करुन चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा वेळ लागला तरी चालेल अस बजावतात.

सुस्त गृहव्यवस्थापिका बहुतेकदा वजनदार असतात, त्यामुळं उगाचच त्या आनंदी असल्याचा आभासही उत्पन्न होतो. ऑफ़िसचा, कामाचा ताण पदतो म्हणून वरचेवर हॉटेलातून पार्सलं मागवावी लागतात, फ़ास्ट फ़ूड खाल्लं जातं, असं त्या अगदी दु : खी चेहर्‍यानं सांगतात, तेव्हा तुमचा लगेचच विश्वास बसतो. स्वयंपाकचा व्याप उगाचच वाढवत बसण्यापेक्षा इतर चार 'क्रिएटिव्ह' कामं करावीत असं त्या वारंवार सांगत असल्या, तरी ती इतर चार कामं कायम गुलदस्त्यातच राहतात.

एकंदरीत काय, तर 'संथ वाहते कृष्णामाई' च्या धर्तीवर त्यांच कार्य चालतं. फ़क्त एक लक्षात ठेवा, कधी काळी एखाद्या बॅंकेत कर्जमंजुरीसाठीचा तुमचा अर्ज या व्यक्तिमत्वाच्या स्त्री अधिकार्‍यांच्या हातात गेला, तर पुढची तीन चार आर्थिक वर्षं तुमचं कर्ज मंजूर व्हायला लागणारं हे नक्की.

व्यस्त गृहव्यस्थापिका

सुस्त गृहिणींच्या अगदी उलटा यांचा स्वभाव. सदैव घाईत. कामत अतिव्यग्र. हातात तीन पिशव्या, शिवाय खांद्यावर एक लटकवलेली, अशा त्या या दुकानातून त्या दुकानात, घरातून शाळेत, शाळेतून बॅंकेत अशा धावत असतात. एका फ़ेरीत अनेक कामे होऊ शकतात, यावर मुळी त्यांचा विश्वासच नसतो. मी आहे म्हणून ... हे त्यांचे पालुपद. भरपूर कामात असल्याचा देखावा करण्यात यांचा हातखंडा. कुणाकडच्या लग्नकर्यात वा समारंभात यांचा 'नारायणी' अवतार पाहून भलेभले भुलतात. ऑफ़िसात कधी या चुकून खुर्चीवर आढळल्याच, तर त्या फ़ोनवर बोलण्यात गुंग असतात. कुठल्या चर्चेकरता किंवा कामाकरता त्यांना अजिबात वेळ नसतो. भरपूर काम आधीच शिल्लक आहे आणि आख्ख्या ऑफ़िसात त्या एकट्याच काम करणार्‍या आहेत, असं त्यांच्या वरिष्ठांना पटवण्यात त्या यशस्वी असल्यानं त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर अधिक काम सोपवायला नेहमीच कचरतात.



त्रस्त गृहव्यवस्थापिका



यांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या कामात या व्यस्त असतात, त्याविषयी त्यांची सतत तक्रार असते. यांची मोलकरीण भांडी कधीच स्वछ घासत नाही, यांच विजेच बील इतरांपेक्षा नेहमीच जास्त येतं, असं त्यांना खात्रीपूर्वक वाटतं. 'माझी घरात कुणाला कदर नाही' असं त्यांच वाक्य वारंवार कानावर पडल्यानं बर्‍याचदा खरोखरच तशी परिस्थिती निर्माण होते. ऑफ़िसात काम यांना करावं लागतं, पण सवलती इतर नटमोगर्‍यांना असं त्या कायम तणतणत राहतात. ऑफ़िसात सहकार्‍यांशी आणि घरी सासूशी, नणंदेशी यांचे कायम खटके उडतात. यांची कटकट ऐकण्यापेक्षा फ़ायली स्वत : च बघणं योग्य असा निर्णय वरिष्ठ स्वत : हूनच घेतात. शिवाय यांचा त्रस्तपणा आजुबाजुला एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा सहजी पसरतो. त्यांच्या सहवासात राहिल्यावर तुमच्याही कपाळावर आठ्यांच जाळं पसरलं, तर नवल नाही.



मस्त गृहव्यवस्थापिका



इथं मस्तं शब्द गुणवत्तादर्शक आहे. या जिथं जातील, तिथलं जग जणू त्या उजळून टाकतात. आदर्शपणाचा आव आणण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. वेळच्या वेळी कामं आटोपून इतर चार छंद जोपसण्याइतका उत्साह त्यांच्यात नेहमीच असतो. ऑफ़िसात सुद्धा तक्रारीला त्या वावच ठेवत नाहीत. हे सगळं त्यांना सहजी जमतं, उपजतच असतं असं जरी आजुबाजूचे समजत असले, तरी त्या मागं त्यांची मेहनत, नियोजन, जीवनाकडं पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याची जाणीव कुणालाच नसते. यांची मुलं गुणी निघतात, यशस्वी होतात, यांना बढती चटकन मिळते, याबद्दल हेवात्मक चर्चा त्यांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त मैत्रीणी नेहमीच करतात. पण शंभरात एखादीच अशी मस्तं हे त्याही मान्य करतातच.
शरु रांगणेकर 'मस्त' व्यक्तिमत्वाच्या व्यवस्थापकाला 'दीपशिखा' म्हणून संबोधतात. दीपशिखेची ही उपमा अशा एखाद्याच गृहव्यवस्थापिकेला देता येईल, जिच्यामुळं सारं घरदार उजळून निघतं.

Tuesday, February 28, 2006

मित्र मैत्रिणींनो .....

हाय!! .... ब्लॉग चे नाव उर्दूमध्ये असले तरी मी मराठीच आहे आणि मराठीतच लिहिणार आहे. खरतर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच ब्लॉग चा शुभारंभ करण्याच मनात होत. थोडा उशिर झाला. पूर्वी इंग्रजीमधून blogging केल्याने ब्लॉगविश्व तस ओळखीच आहे पण मराठीमधून हा ब्लॉग सुरु करण्या आधी थोडा मराठी ब्लॉगविश्वाचा फेरफटका मारला तेव्हा अगदी आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. किती छान नोंदी केल्यात मराठीमधे मुलामुलींनी. साहित्य, वैयक्तिक, प्रवास अनुभव, चालू घडामोडी अशा कितीतरी विषयांवर देशविदेशातील पब्लिक लिहितं आहे. संख्या त्यामानाने फार नाही. पण मला वाटत युनिकोड सुविधा नुकतीच लोकांपर्यंत पोचली आहे. हळूहळू वाढेल मराठी ब्लॉगर्स ची संख्या.

माझी ओळख पण ह्या निमित्ताने करुन देते. मी मुंबईची मराठी पत्रकार. तसं व्यवसायाने मराठी इंग्रजी भाषेत कॉपिरायटींग करते पण पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे आणि आवड असल्याने, आणि मनमोकळ लिहिता याव, बंधन नसाव म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करते. अर्थात Free Lancing . व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे माझ्या आवडीचे लेख विषय. ब्लॉग मध्येही त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करीन. प्रवास आणि संगित हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय. पण खुप कमी वेळ त्यासाठी काढता येतो ही खंत कायम मनात असते. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा पण माझा छंद.

भेटत राहूच. तुम्हा सर्वांची ओळख होऊन ती खुप खुप वाढेल ही खात्री आहे.
इथे नियमीत येण्याइतका सलग वेळ मिळो ही सदिcछा मी माझी मलाच देऊन घेते.