Wednesday, November 24, 2010

चायना पोस्ट-तीन (श्यूच्या घरी.पीच फार्मवर)

या आठवड्यात मधे एक चिनी सण होता.ड्रॅगन फेस्टीवल.सुझन म्हणजे श्यूचा एसेमेस आला की ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे.तुला यायचय कां?मी एका पायावर तयार झाले.
श्यूचे वडिल होंगियानपासून जरा लांब लिन हाय नावाच्या शहराजवळ रहात होते.त्यांच्या पीचच्या बागा होत्या.ताज्या,तयार पीचची नुकतीच तोडणी झाली होती.श्यूच्या आईचा आग्रह होता की पीच खायला श्यूने घरी यायलाच हवय.
श्यू आणि मी त्या दिवशीच्या शॉपिंगनंतर खूप भटकलो होतो.चायनिज ब्यूटी सलूनमधे,सुपरमार्केटमधे,बागेत वगैरे अनेक ठिकाणी.इंग्लिश आणि चायनिज बोलू शकणारी श्यू सारखी लोकल मुलगी बरोबर असल्याने मला खूप निर्धास्त वाटायचं.शिवाय ती बार्गेनही मस्त करायची.एका कन्फ्युशियस टेम्पलबाहेर असणार्‍या जेडच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून मला हवी असणारी जेडची बांगडी तिने त्या दुकानदाराने आठशे युआन किंमत सांगितल्यावर बराच चिनी कलकलाट करुन तिने मला ती शंभर युआनला मिळवून दिल्यापासून माझा तिच्याबद्दलचा आदर फारच वाढला होता.श्यूजवळ भयंकर पेशन्सही होता.माझ्या निरुद्देश भटकत रहाण्याचा,चालताना असंख्य अडाणी,बारिकसारिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा,सारखं थांबून काही ना काही गोष्टींचे फोटो काढण्याच्या टिपिकल टुरिस्टी उत्साहाचा तिला कधी कंटाळा येत नाही.
श्यूच्या घरी जाण्यासाठी आम्ही भल्या सकाळी सहा वाजता होंगियानच्या बसस्टेशनवर गेलो.बसस्टेशन चकचकीत आणि एअरपोर्टसारखं सजलेलं.सुरक्षाव्यवस्था सुद्धा तशीच.सामानाचं स्कॅनिंग,चेकइन अगदी साग्रसंगीत.काडीवर आईसफ्रूटसारखे लांबट लालसर मासाचे तुकडे लावून ते विकायला अनेक जण येत होते.
श्यूने आम्ही गेल्यावेळी घेतलेला ड्रेस घातला होता.खरं तर हा पार्टीफ्रॉक.त्यामुळे बरंच अंग उघडं टाकणारा आणि अगदी तोकडा.श्यूला छान दिसत होता पण तरी बसप्रवासाच्या दृष्टीने अगदि अयोग्य असं मला वाटून गेलं.पण ती बिनधास्त होती.इथे जनरलीच अत्यंत शॉर्ट ड्रेसेस घालायची फॅशन आहे.मात्र रस्त्यांवर,बसमधे किंवा कुठेही कधिच इव्हटिझिंगचा त्रास नसतो.चीनमधे रात्रीबेरात्रीही मुली बिनधास्त एकेकट्या फिरु शकतात.अतिशय सेफ आहे त्यादृष्टीने संपूर्ण चायना.
या बसचा पाऊण तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही लिनहाय शहरात पोचलो.तिथून एक दुसरी बस घेतली.त्यातून अर्धा तास प्रवास.आता डोंगराळ,खेड्यांमधून प्रवास सुरु झाला.हवा कमालीची गार झाली.एका अगदी साध्या,धुळीने भरलेल्या खडबडीत रस्त्यावरच्या स्टॉपवर आम्ही उतरलो.श्यूचं गाव अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.पण आम्ही इथे उतरलो कारण इथे भाज्यांच मार्केट आहे.मी शाकाहारी असल्याने श्यू माझ्यासाठी भाज्या,टोफू वगैरे घेऊन घरी जाणार आहे.तिच्या गावात ताज्या भाज्या रोज येत नाहीत.
भाज्या आणि मास इथे शेजारी शेजारीच हारीने लावून ठेवलेलं होतं.आख्खे सोलून ठेवलेले विविध आकारांचे अगम्य प्राणी,अ‍ॅल्युमिनियमच्या टोपांमधले समुद्री जीव,प्लास्टीकवर मांडून ठेवलेले रांगते,सरपटते जीव यांच्यामधून मी जीव मुठीत धरुन कशीतरी भाज्यांच्या एका स्टॉलवर श्यूचा हात धरुन पोचले.चिनी भाजीवाले आणि वाल्या प्रचंड कुतूहलाने माझ्या भारतीय अवताराकडे पहात होत्या.इंदू इंदू करत मधूनच हाका मारत खुदूखुदू हसत होत्या.स्टॉलवर बांबूचे कोंब,चायनिज कॅबेज,गाजरे,फरसबी,समुद्र वनस्पती,सोयाबिनच्या हिरव्या शेंगा,ताजे टोफूचे स्लॅब्स,टोमॅटो,मश्रूम्स यांचे जीव हरखवून टाकणारे ताजे,टवटवीत ढीग होते.श्यूने प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं.




मग जवळच्या टपरीवरुन कोकचा मोठा चार लिटरचा कॅन घेतला आणि आम्ही एका सायकल रिक्षात बसलो.अगदी डगमगती सायकलरिक्षा.ओढणारा चिनी दणकट बांध्याचा.या सगळ्या सायकलरिक्षा चालवणार्‍यांची कपड्यांची स्टाईल अगदी एकसारखी.गुडघ्यापर्यंत पोचणार्‍या अर्ध्या चड्ड्या आणि अर्ध्या बाह्यांचा रंगित शर्ट पोटावरुन गुंडाळत छातीपर्यंत दुमडून घेतलेला.बरेचसे चिनी दुकानदार,रस्त्यावरचे विक्रेते वगैरे हे असे पोटं उघडी टाकून फ़िरत असताना इतकी विचित्र दिसतात.
श्यूच्या गावात पोचेपर्यंत तो सायकलरिक्षावाला मागे वळून अखंड बडबडत होता.श्यू मधून मधून त्याचं बोलणं अनुवाद करत मला सांगत होती.यावर्षी पाउस जास्त झाला त्यामुळे पीचच्या फ़ळांचं नुकसान झालं आहे.फ़ळांच्या साली काळ्या पडल्या त्यामुळे भाव कमी आला.नुकसान झालं.सरकारी मदत मिळाली तरच निभाव लागणार यावर्षी वगैरे.मला एकदम मी नाशिकजवळच्या द्राक्षांच्या मळेवाल्यांची गार्‍हाणी ऐकतेय असा भास झाला.
लिनहाय आणि आजूबाजूचा हा सारा भाग पीचच्या बागांसाठी प्रसिद्ध.बहुतेकांच्या बागा आहेत.उरलेले सारे तोडणीच्या कामाचे मजूर.गाव बर्‍यापैकी गरीब.रस्ते मातीचे.पण आजूबाजूला कमालीची स्वच्छता.कुठेही कचराकुंड्यांमधून बाहेर वहाणारा कचरा नाही,प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे नाही की गावातला टिपिकल बकालपणा नाही.चीनमधे आपल्याकडे असतात तशाच प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर आहे.पण त्या पिशव्यांचा कचरा किंवा प्रदुषण दिसलं नाही.एकंदरीतच चीनमधे कचरा समस्या कशी हाताळतात हा एक स्वतंत्र,इंटरेस्टींग विषय आहे.बिजिंगसारख्या मोठ्या शहरात कित्येक टन कचरा उचलण्याचा बॅकलॉग रोज शिल्लक रहातो अशा तर्‍हेच्या बातम्या चीनी सीसीटीव्ही या(एकमेव)चॅनेलवरुन कानावर पडायच्या.पण इतर मध्यम,लहान आकारांच्या शहरांमधे चिनी रोजच्यारोज प्रचंड संख्येने कचरा पैदा करत असतात.स्टायरोफ़ोमचे डिस्पोजेबल कप,प्लेट्स,पॅकिंग मटेरियल,प्लास्टिकच्या बाटल्या,चॉपस्टिक्स,खाण्यापिण्याचे ऑरगॅनिक वेस्ट यांचे ढिगारेच्या ढिगारे रात्री उशिरा दुकाने बंद आणि रस्त्याकडेची रेस्टॉरन्ट्स बंद झाल्यावर फ़ूटपाथच्या कडेला गार्बेज बॅग्जमधे भरुन लावून ठेवलेले असतात.ओला-सुका, रिसायकलिंगसाठीचा वगैरे कचर्‍याचं वर्गिकरण वगैरे काहीही केलेलं नसतं.मग त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावतात हे जाणून घेणं इंटरेस्टींग आहे शहर व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून.पण ते नंतर.
लिनहायमधे घरं दगडांनी बांधलेली.काहींना बाहेरुन गिलावाही दिलेला नाही.


एका पायवाटेवरुन बरच आत चालत गेल्यावर श्यूचं घर आलं.घराला बाहेर मोठा दरवाजा आणि आत एक रिकामा मोठा हॉल.त्यात पीचतोडणीला लागणा-या बांबूच्या टोपल्या,मोठ्या कात्र्या,आणि इतर अवजारे,टोपल्या वगैरे भिंतीला अडकवून,टेकवून ठेवलेले.तीनचार सायकली आणि एक लाकडी बसायचा बाक.चिनी सिनेमांमधल्या शेतकरी चिनीलोकांच्या डोक्यांवर ह्मखास दिसणार्‍या त्या टिपिकल बांबूच्या कामट्यांच्या विणलेल्या मोठ्या कडांच्या हॅट्सही टांगलेल्या.




भिंतीवर चेअरमन माओचा फ़ोटो.एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअर.त्यावर चाललेला चिनी सिनेमा श्यूची मावशी आणि म्हातारी आजी टक लावून पहात बसलेल्या.श्यूची आई बाहेर गेली होती ती नंतर आली.श्यूचे वडिल.त्यांच नाव सॉंग.अगदी गरीब,लाजाळू स्वभावाचे,डोळ्याच्या कडांना सुरकुत्या पाडत हसणारे,घोट्याच्या वर दुमडलेल्या ढगळ पॅन्ट घातलेले मध्यमवयिन शेतकरी गृहस्थ.श्यू आपल्या आईवडिलांबद्दल बसमधून येताना खूप काही आदराने सांगत होती.अगदी अभावग्रस्त परिस्थितीत श्यू आणि तिच्या बहिणीला त्यांनी मोठं केलं,शिक्षण दिलं,कर्ज झालं तरी मुलींना काही कमी पडू दिलं नाही.साँग कुटुंबिय आणि लिनहाय गाव पर्ल बकच्या कादंबरीतून उचलून आणल्यासारखं वाटायला लागलय मला एकंदरीत.

श्यूच्या बाबांनी कोकचे ग्लास भरुन बाहेर आणले आणि आम्ही स्थिरस्थावर होतोय इतक्यात वीज गेली.टिव्ही बंद झाला.श्यूची आजी दु:खाने काहीतरी पुटपुटली आणि बाहेर निघून गेली.आता संध्याकाळपर्यंत पॉवर येणार नाही.श्यू म्हणाली.चीनच्या मोठ्या शहरांमधे जरी वीजेचा झगमगाट असला तरी उर्वरीत चीनमधे,विशेषत:अशा गावांमधे वीजेचा तुटवडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजूनही आहे.बिजिंग ऑलिम्पिकनंतर तर पॉवरकटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे.सहा सात तास वीज जाणं हे नेहमीचंच आहे असं श्यू म्हणाली.
श्यूची मावशी हॉलच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरात गेली आणि श्यू आणि मी बाकी घर बघायला जिन्यावरुन चढून वर गेलो.वर तीन बेडरुम्स आणि टॉयलेट.ते मात्र चकचकीत,पाश्चात्य पद्धतीचे.चीनमधे गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केलेल्या सुधारणांमधे ही एक म्हणजे पाश्चात्य टॉयलेट्स सर्वत्र,सार्वजनिक ठिकाणांवर सुद्धा अतिशय स्वच्छतेने मेन्टेन केलेली.काही ठिकाणी पौर्वात्य पद्धतीची म्हणजे भारतात असतात तशी टॉयलेट्स अजूनही आहेत पण त्यांचं प्रमाण जवळपास नाहीच.खेड्यांमधे सुद्धा स्वच्छता दिसण्याचं कारण हेही एक.

घराच्या मागे छोट्या पॅचमधे चिनी हर्ब्जचं गार्डन.आपल्याकडच्या तुळशींसारखी रोपटी.कोरफ़ड आणि एक विशिष्ट गुलाबी छटेची लहान फ़ुलं येणारी रोपं.चिनी लोकं अजूनही पारंपारिक चिनी वैद्यकाला खूप मानतात.चिनी हर्ब्ज,फ़ुलं घातलेलं गरम पाणी दिवसभर कधीही पितात.हिरव्या पानांचा चहा पिणं पूर्वीपासून प्रतिष्ठित लोकांमधेच जास्त प्रचलित.सामान्य,गरिब चिनी जनतेला ग्रीन टी परवडत नाही.हर्ब्ज,सुकवलेली मोग-याची,जिरॅनियमची फ़ुलं घातलेल्या गरम पाण्यालाही ते चहाच म्हणतात.चिनी भाषेतला चहाचा उच्चार आपल्या चाय च्या जवळचा.
श्यूची मावशी मला काहीतरी हातवारे करुन विचारत होती.मला काही केल्या कळेना.श्यू आसपास नव्हती.इतक्यात श्यूची लहान मावसबहिण शाळेतून आली.तेरा चौदा वर्षांची.तिने उत्साहाने दप्तरातून इंग्रजीचं पाठ्यपुस्तक काढलं.तिला इंग्रजी वाचता येत होतं पण बोलता येत नव्हतं.सराव नाही म्हणून.पुस्तकातल्या इंग्रजी शब्दांवर बोट टेकवत तिने मावशीचं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं.मावशी म्हणत होती तिला चिनी पद्धतीचा ब्रेड करता येतो तो मला चालेल कां?आणि आज सण होता त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन कां?शाकाहारी असेल तर मला काहीही चालण्यासारखं होतच.
मावशीने पांढर्‍या पिठाचे गोळे फ़्रीजमधून काढले.लाकडी ओट्यावर एक खोलगट वोक आतमधे बसवला होता.दुसर्‍या बाजूला जरासा उथळ तवा बसवलेला होता.लाकडी ओट्यामागे चुलीला असते तशी आत लाकडं टाकून पेटवायची सोय होती.गॅसचं सिलिंडर होतं पण ते महाग पडतं त्यामुळे रोजचा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवरच होतो असं श्यूने सांगितलं.मावशीने उथळ तव्यावर झाकण ठेवून पांढर्‍या पिठाचे गोळे भाजत ठेवले.आणि भाज्या चिरायला लागली.तिचं सटासट बारिक तुकडे करत भाज्या चिरण्याचं कौशल्य बघण्यासारखं होतं.


भाज्या चिरुन होईपर्यंत श्यूची आई आली.हसरी,गोड आणि जेमतेम पंचविशीची वाटेल अशी.भाषा येत नव्हती त्यामुळे माझ्या खांद्यांवर हात टेकवून,हसून बघत तिनं बिनभाषेचं उबदार स्वागत करत मला स्वयंपाकघरातच ये असं खुणावलं.
त्यानंतरच्या अर्ध्या तासात मला चिनी पाककला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पहायला मिळाला.एकामागून एक चिनी भाज्या,नूडल्स,टोफ़ू,भाताचे प्रकार श्यूची आई इतक्या झटपट बनवत होती आणि सगळं त्या एकाच खोलगट वोकमधे.नुसतं थोडं तेल टाकून त्यावर आलं,लसणाचे काप टाकून कधी गजर-मटार-सिमला मिरची,कधी समुद्र वनस्पती,कधी टोफ़ू-टोमॆटो,चायनिज कोबी-बटाटे असं सगळं एका मागून एक परतत ती डिशेस भरत होती.काही भाज्यांवर घरगुती राईस वाईनचा शिपकारा मारुन स्मोकी चव आणत होती.बाजूच्या शेगडीवर एका वाडग्यात खास चिनी जातीचा बुटका तांदूळ रटरटत होता.त्यात घरगुती गुळ घालून त्याचा खिरीसारखा पदार्थ बनवला होता.



सणासाठी त्रिकोणी सामोश्यासारखे मोमो बनवून त्यात समुद्र वनस्पती-शैवालांपासून बनवलेले सारण भरले होते.हे मोमो समुद्रात अर्पण करतात ड्रॅगन फ़ेस्टीवलच्या दिवशी.या सणामागची कथा इंटरेस्टींग होती.
फ़ार प्राचीन काळी म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्य आजच्यासारखे मलूल नव्हते,तेजस्वी होते आणि लोक दयाळू होते तेव्हा एका गावात एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन प्रेमी रहात होते.समुद्रात जाऊन मासे मारुन आणताना एकदा एक अजस्त्र राक्षसी लाट गावावर चाल करुन येताना त्यांनी पाहिली.गावाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रॅगन देवाचा धावा केला.ड्रॅगनने त्यांना पाठीवर बसायला सांगितले आणि मग ते त्या लाटेचा मुकाबला करायला समुद्रात शिरले.ड्रॅगनने त्या लाटेला अडवायचा खूप प्रयत्न केला.लाट मागे गेली पण ते दोघे प्रेमी समुद्रात बुडाले.गावकर्‍यांनी त्यांना खूप शोधलं पण त्यांची प्रेत मिळाली नाहीत.त्यांचा समज आहे की ड्रॅगनच्या आशीर्वादामुळे ते दोघे जिवंतच आहेत समुद्रात म्हणून त्यांना या दिवशी हे गोड जेवण समुद्रात अर्पण करुन देतात.मोमोमधे भरायचे सारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असते.
श्यूच्याआईने त्यादिवशी तब्बल चौदा भाज्यांचे प्रकार,तांदूळाचीखीर,चिनी ब्रेड,मोमो,नूडल्स,पीचचा मुरंबा,ताजी फळे असे भरगच्च प्रकार बनवून जेवायचे टेबल भरुन टाकले.अत्यंत चवदार.त्यानंतर बिजिंग,शांघाय,होंगझो वगैरे ठिकाणी खास चिनी शाकाहारी पदार्थ मोठमोठ्या हॉटेल्समधून शेफ़ला सूचना देऊन बनवून घेतलेले सुद्धा खायला मिळाले.पण या प्रेमळ चिनी कुटुंबातील घरगुती आदरातिथ्यात ज्या अप्रतिम चिनी जेवणाचा अनुभव घेतला तो केवळ अशक्य.जेवताना श्यूच्या वडिलांनी घरगुती वाईनने बशा भरल्या.चिनी कुटुंबात मुली,बायकांनी बिअर पिणे उथळपणाचे लक्षण मानतात.पण वाइन प्यायलेली चालते.नव्हे तसा आग्रहच असतो.फ़क्त ती वाईन घरी बनवलेलीच हवी.आम्ही प्यायली ती वाईन यामे आणि प्लम या दोन फ़ळांच्या आणि तांदळाच्या मिश्रणातून बनवल्याची माहिती श्यूने दिली.




जेवणानंतर आमचा फ़ोटोंचा कार्यक्रम झाला.श्यूच्या आईला फ़ोटो काढून घ्यायचा खूप उत्साह होता आणि वडिल लाजत होते.

आमची जायची वेळ झाली तेव्हा आम्हाला पोचवायला बस्टस्टॉपपर्यंत सारं कुटुंब आलं.श्यूच्या वडिलांच्या खांद्यावर एक मोठी पेटी आणि हातात एक करंडी होती.ओझं खूपच जड वाटत होतं म्हणून मी कुतूहलाने चौकशी केली.श्यू हसली आणि काही बोलली नाही.बसस्टॉपवर उभी असलेली तमाम चिनी मंडळी माझ्या भोवती गोळा झाली.’नी हाव’म्हणजे चिनी हाय हॅलोचा कलकलाट झाला.माझ्या गालांना काही चिनी काकूंनी हात लावला.मी फ़ोटो काढायला गेले तेव्हा सगळे ओळीत उभे राहिले.मला त्यांचा उत्साह,कुतूहल मजेशिर वाटले.श्यू म्हणली आमच्या खेड्यात येणारी तु पहिलीच भारतीय.म्हणून सगळे खुश आहेत.मी सुद्धा हे ऐकून खूशच झाले.




बस आली तेव्हा लगबगीने श्यूच्या वडिलांनी हातातला खोका आणि करंडी आमच्या पायाशी रचून ठेवले आणि तेही बाजूच्या सीटवर बसले.पुढच्या बसस्टॉपवर पुन्हा त्यांनी ते सामान उचलले आणि आमच्या दुसर्‍या बसमधे ठेवले.श्यूला काही सूचना दिल्या आणि ते उतरले.
होंगियान स्टेशनवर तो जड खोका आणि करंडी उचलून टॅक्सीत ठेवताना आमच्या नाकीनऊ आले.त्यात झिमझिम पाऊस सुरू झाला.टॅक्सीत बसल्यावर मी वैतागतच श्यूला विचारले काय इतकं घेऊन घरी चालली आहेस?श्यू म्हणाली हे तुझं सामान आहे.माझं नाही.मी थक्क.म्हटलं आहे काय यात?पीच.आणि प्लम.मी अवाक.
इतके?हो.पीच एकुण नव्वद आहेत आणि प्लम पन्नास.आणि वडिल म्हणाले एका आठवड्यात संपवायला लागतील.
नव्वद पीच आणि पन्नास प्लम.जेवणाच्या टेबलावरच्या चौदा भाज्या.चिनी आदरतिथ्याने थकून जात मी टॅक्सीच्या सिटवर मान टेकवून झोपी गेले.
---------------------------------
होंगियानमधे परतलो तेव्हा काळोख गडद झाला होता.जॉगर्स पार्कमधे चिनी मुली संगिताच्या तालावर मोहक नाचत होत्या.अतिशय तालबद्ध आणि सिन्क्रोनाईज्ड हातापायांच्या हालचाली.बागेमागच्या नदीत काहीजण गळ टाकून मासेमारी करत बसले होते.मध्यमवयीन चिनि पुरुष तायकान्डोचे व्यायाम करत होते.चिनी आज्या सफ़रचंदी गालांच्या नातवंडांना फ़िरवत होत्या.पाण्याच्या काठावरच्या दिव्यांचा झगमगाट नदीवर पसरला होता.
नदीच्या दुसर्‍या तीरावर मोठमोठी सरकारी चिनी होर्डिंग्ज होती.त्यापलीकडचे काहीही दिसत नव्हते इतक्या जवळजवळ आणि उंच होर्डिंग्ज.शहरांबाहेरच्या हायवेच्या किंवा फ़्लायओव्हरच्याही एका बाजूला अशीच उंचच उंच साउंड बॅरिकेड्स आणि होर्डिंग्ज असतात.पलिकडचं काही दिसूनच नये याची दक्षता घेत उभारल्यासारखी.
नदीपलीकडच्या तीरावरच्या या होर्डिंग्जमागे जुनं होंगियान शहर आहे.
तिथे काय आहे?ते असं लपवलं कां आहे?तिथे असाच झगमगाट आहे की वीजतुटवडा आहे?स्वच्छता आहे की कचर्‍याचे इथून उचललेले ढीग तिथे विल्हेवाटीला नेऊन टाकतात?समृद्धी आहे की अभाव?
चीनमधे असे प्रश्न विचारायची मुभा नाही आणि सोयही नाही.पर्यटकांना तर नाहीच नाही.त्यांनी असे प्रश्न विचारले तरी उत्तरे मिळत नाहीत.स्थानिक लोकं इतर बाबतीत भरपूर बोलतात.चिनी प्रगतीबद्दल बोलताना त्यांचं तोंड थकत नाही.पण त्यापलीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांना वेळ नसतो.अचानक त्यांना इंग्रजी कळेनासं होतं.
--------------------------------
परवा रविवारी जवळच्या डोंगरावर आपण सगळे ट्रेकिंगला जाऊया.तुम्ही दोघं आणि मी आणि ज्यो.खूप प्रसिद्ध आहेत इथले ट्रेकिंग रुट्स.श्यू म्हणाली.मला आवडलं असतं.पण पुढचे सलग दोन आठवडे आम्ही चिनी पर्यटनाला जाणार होतो.शांघाय,बिजिंग बघायला.चीनची भिंत,फ़ॉरबिडन सीटी,तियान्मेन स्क्वेअर,समर पॅलेस,शियांचं टेराकोटा वॉरियर वगैरे.होर्डिंग्जपलीकडची जुनी चिनी शहरं काही बघायला मिळणार नव्हती पण शतकांपूर्वीचे प्राचीन राजवाडे,भिंती,चिनी साम्राज्याचे अवशेष येत्या दोन आठवड्यांमधे दिसणार होते.ते बघायला हवेच होते.
बिजिंग शहरातल्या प्रशस्त,भव्य रस्त्यांच्या जाळ्यापलीकडे समांतर अशा जुन्या बिजिंग शहरातल्या अनेक गल्ल्या आहेत.हुटॉंग्ज नावाने त्या प्रसिद्ध आहेत.गेल्या काही दशकांतल्या,विशेषत:ऑलिम्पिकच्या काळात बिजिंगमधे झालेल्या कायापालटामधे नवं,अत्याधुनिक बिजिंग शहर वसवलं गेलं,स्कायस्क्रॅपर्सनी बिजिंगचं आकाश भरुन गेलं.पण या हुटॉंग्जमधून अजूनही पारंपारिक,जुन्या चिनी पद्धतीची घरं,संस्कृती पहायला मिळते.
अत्याधुनिक,झगमगाटी नवं बिजिंग आणि हजारो वर्षांपूर्वीची फ़ॉरबिडन सीटी अजूनही जशीच्या तशी आपल्या पोटात ठेवलेलं प्राचीन बिजिंग.यांच्या मधला एक फ़ार मोठा काळाचा तुकडा या हुटाँग्जमधे अजूनही शिल्लक आहे.सगळ्याच हुटाँग्ज होर्डींग्ज मागे आणि मॉल्सच्या लखलखाटामागे दडवून ठेवणं चिनी सरकारला जमलेलं नाहीच.
बिजिंगमधे असताना या हुटाँग्जमधून फ़ेरफ़टका मारण्याची संधी अनेकदा घेतली.त्यासगळ्या अनुभवांवर पुन्हा कधीतरी.

चायना पोस्ट-दोन

सुझन आणि चिनी बाजार

रविवारी सकाळी साडेआठलाच सुझनचा फोन आला की आपण शॉपिंगला जाऊया कां?मी एका पायावर तयार.शॉपिंगच्या निमित्ताने शहरात भटकता आले असते.
सुझन विशीतली हसरी,खेळकर चिनी मुलगी आहे.इथे जॉब करते आणि एक लहान अपार्टमेन्ट भाड्याने घेउन दोन मैत्रिणींसोबत शेअर करुन रहाते.सुझनची आणि माझी ओळख जॉगर्सपार्कमधे झाली.माझ्या नवर्‍याच्या ऑफिसात ती बरेचदा इंटरप्रिटर म्हणून यायची त्यामुळे त्याची आणि तिची ओळखही होती.
सुझनला बर्‍यापैकी इंग्रजी येतं.पण तिला शांघायला जॉब करायचाय आणि आत्ता येतय तितकं इंग्रजी तिथे पुरेसं नाही म्हणून तिला शक्यतो जास्तीतजास्त इंग्रजी बोलण्याचा सराव हवाय.प्रोफेशनल क्लासेसची फी परवडत नाही.म्हणूनही ती माझ्याशी मैत्री करत आहे असं तिने बर्‍यापैकी स्पष्टपणे सांगून टाकलं.माझी काहीच हरकत नव्हती.
होंगियान औद्योगिक शहर असल्याने इथे नोकरीच्या निमित्ताने एकट्या रहाणार्‍या खूप मुली आहेत.त्यांची एक वेगळीच दुनिया आहे.कामांचे प्रचंड तास आणि फक्त रविवारी सुट्टी असल्याने सुझनला मला भेटायला जास्त वेळ येता येत नाही पण तिचे सारखे फोन आणि एसेमेस सुरु असतात.
सुझन बरोबर वेळेवर आली.तिच्यासोबत एक मित्र होता.ज्यो.तिने ओळख करुन दिली.त्याला इंग्रजी काही बोलता येत नव्हते त्यामुळे तो फक्त सारखा डोळे अजून बारीक करत हसत होता.कॉफी पिऊन तो गेला.ज्यो आपल्याबरोबर शॉपिंगला का नाही येणार असं मी सहज सुझनला म्हणाले तर ती लगेच उत्तरली.कशाला येईल?तो काही माझा बॉयफ्रेन्ड नाही.आता यामागे काय लॉजिक मला कळलं नाही.म्हटल मित्र तर आहे ना?तर म्हणाली नाही.त्याचं लग्न झालय आणि त्याची मुलगी आणि बायको दुसर्‍या शहरात असतात.जेमतेम विशीच्या दिसणार्‍या ज्योला मुलं वगैरे आहे हा धक्काच होता.
चीनमधे असे धक्के सारखे बसतात.तिथल्या लोकांची वयच कळत नाहीत.एकतर सगळे एकजात स्लीम आणि त्वचा कमालीची नितळ.शिवाय तलम,काळ्याभोर,चमकदार केसांचं वरदानच सगळ्यांना.चिनी मुलींचे ते मोकळे ठेवलेले,सळसळीत सुंदर केस हेवा वाटायला लावणारे असतात.काही वेळा बीड्सचे रबरबॅन्ड्स किंवा पिना लावून त्या ते अनोख्या पद्धतीने मागे वळवून बांधतात.मात्र कसेही बांधले तरी कपाळावर रुळणार्‍या बटा हव्यातच.चिनी मुलींची ही लेटेस्ट फॅशन.सुझनच्या कपाळावरच्या बटाही अगदी डोळ्यांवर झुकलेल्या.
टॅक्सी न घेता आम्ही चालतच रस्त्यावरुन निघालो.आम्ही रात्री ज्या कॉफीहाऊसच्या रस्त्यावरुन फिरायचो त्याच रस्त्यावरुन थोडच पुढे जाउन सुझन एका लहानशा गल्लीतून आत वळली.चीनच्या भव्य रस्त्यांवरुन पटकन आत वळणार्‍या ह्या गल्ल्या खूप डिस्क्रिट असतात.आपल्याला तर दिसतच नाहीत.कुठल्या तरी दुकानाच्या शोकेसच्या बाजूने ही गल्ली आत वळली होती.
आत वळलो आणि एकदम बाजाराची गजबजच अंगावर आली.पाश्चात्य संस्कृतीतून एकदम पौर्वात्य संस्कृतीत पाय ठेवल्यासारखं झालं.गोंधळ,गजबजाट आणि गडबड.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने दुकाने.सेलचे कपडे बाहेर टांगलेले.रस्त्यांवरही कपड्यांचे ढीग.आपल्या फॅशनस्ट्रीट किंवा लिंकिंग रोडसारखाच प्रकार.काही चिनी वयस्कार बायका कडेला बसून घट्ट भिजवलेल्या डोशासारख्या पिठाचे तापलेल्या मोठ्या तव्यावरुन पातळ,पापुद्र्यासारखे डोसे काढत होत्या.घट्ट गोळा डायरेक्ट तव्यावरच फिरवायच्या.मग ते पातळ डोसे एकावर एक ठेवून,चार-पाच डोशांची गुंडाळी करुन विकायच्या.काही बायका खुर्च्यांवर बसून शर्टांवर नाहीतर जीन्सवर बारीक भरतकाम करत होत्या.काही कडधान्य निवडत गप्पा मारत होत्या.हातगाडीवर उकडलेली मक्याची कणसं,रताळी,बटाटे,शिंगाडे विकत होते.यामे,चेरी,सफरचंदाचे ढीग होते.
आम्ही दुकानांमागून दुकानं बघत जात होतो.सुझनला काहीच पसंत पडत नव्हतं.तिला एक छान पार्टीफ्रॉक हवा होता.आणि मॅचिंग शूज आणि बॅग.होंगझो नावाच्या दुसर्‍या शहरात त्यांच्या कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींच गेटटुगेदर होतं पुढच्या वीकेन्डला.तिच्या बजेटमधे बसणारा फ्रॉक शेवटी एकदाचा मिळाला.माझ्याकडे खूप छान कपडे नाहीयेत.फक्त जीन्स आहेत.त्यामुळे मला एकही बॉयफ्रेन्ड अजून मिळालेला नाही असं नंतर ज्यूस पिताना सुझन म्हणाली तेव्हा मला मजाच वाटली.
पण सुझन गंभीर होती.कॉलेजात असताना एकही बॉयफ्रेन्ड नसणं म्हणजे आमच्याकडे खूप हसतात सगळे.एकटं पडायला होतं. कुठे जाताना जोडीदार कोणीतरी लागतोच सोबत.म्हणून मग मी ज्यो बरोबर मैत्री ठेवलीय.सुझन सांगत होती.
म्हटल कसा हवाय तुला बॉयफ्रेन्ड?तर म्हणाली मला चीनी दिसणारी मुलं आवडत नाहीत.भारतीय सुद्धा नाही.मला लिओनार्दो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट सारखा दिसणारा बॉयफ्रेन्ड हवा आहे.म्हणूनच मला शांघायला जायचय.तिकडे खूप वेस्टर्नर्स असतात. मी पुन्हा थक्क.मला आपलं वाटलेलं सुझनला शांघायला जॉब करायचाय म्हणजे करिअर पुढे न्यायच्या दृष्टीने तिला ते महत्वाचं वाटत असणार.तर हे वेगळंच.
सुझनच्या इतर मित्रमैत्रिणींशीही नंतरच्या काळात बर्‍यापैकी ओळख झाली.सगळ्या वीस ते तेवीस वयोगटातल्या.वेगवेगळ्या लहान गावांहून होंगियानमधे नोकरीसाठी आलेल्या.स्वतंत्र, अनिर्बंध आयुष्य.पाश्चात्य संस्कृतिची कमालीची ओढ.फॅशन्स, कपडे,मेकप,ब्यूटी ट्रीटमेन्ट्स यात बराचसा पगार खर्च होतो.घरी जेवण कोणीच बनवत नव्हत्या.वेळच नसतो आणि येतही नाही.दुपारचे जेवण फॅक्टरीमधे मिळते.सकाळी इथे सगळीकडे रस्त्यावर कुठेही सहज मऊ,पेजेसारखा चिकट भात आणि त्यात भाज्या,बीफ घातलेले,किंवा सूपसारख्या पातळ पदार्थात राईसनूडल्स घालून वाडगे तयार ठेवलेले असतात.जॉबला जाताना बहुतेक तेच खाऊन जातात.बाकी इतरवेळी सूर्यफुलाच्या,कलिंगडाच्या भाजलेल्या बिया सोलून किंवा सोयाबिनचे भाजलेले दाणे खात रहायचे.स्मोकिंगचं प्रमाण प्रचंड.मुलगे-मुली दोन्हींमधे.सुझनची मैत्रिण म्हणाली स्मोकिंगमुळे वजन वाढत नाही.कमी वजन असण्याचं इतकं कमालीच ऑब्सेशन चीनी तरुणींना आहे.अक्षरश:वीतभर कंबर आणि पेन्सिलसारखी फिगर असली तरी मी जाडी दिसतेय असं म्हणणार्‍या चिनी मुली बघितल्यावर मला आपल्याकडच्या झिरो फिगर क्रेझचं आश्चर्य वाटेनासं झालं.जेवताना स्टरफ्राईड भाज्या समोर आल्या की,त्यातली फरसबीची शेंग किंवा कोबीचा तुकडा चॉपस्टिकमधे धरुन सुझन तो बाजूला ठेवलेल्या गरम पाण्याच्या ग्लासमधे बुचकळायची आणि मग तोंडात टाकायची.असं कां विचारलं तर म्हणाली.खूप तेलकट आहे.गरम पाण्यात बुडवलं की तेल निघून जातं.धन्य!.
सुझनला माझ्या नावाचा उच्चार करणं फारच अवघड जायचं.तुझं दुसरं एखादं सोपं नाव नाहीये कां असं तिने मला दोनतीनदा विचारलं.म्हटलं माझं नाही.पण तुझं नक्कीच असणार.चिनी लोकांच स्वतःच नाव वेगळं आणि बाहेरच्या लोकांसाठी इंग्लिश नाव वेगळं असतं.तर म्हणाली आहे.पण तुला सांगितलं तर तु हसशील.बर्‍याच आग्रहानंतर तिने नाव सांगितल.श्यू टिंग.खूपच क्यूट वाटलं मला हे.सुझनपेक्षा खूपच गोड.तिला म्हटलं आता मी तुला श्यू म्हणणार.
---------------------------------------------------------------

कंटीन्यूड...

चायना पोस्ट- एक

प्रवासात असतानाच एक इंटरेस्टींग ट्रॅव्हलोग लिहायची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती.म्हणजे कसं की बॅकपॅक ट्रॅव्हलिंग करताना अनेक जण पाठीवरच्या सॅकमधे लॅपटॉप घेऊन फिरतात आणि आज काय पाहिलं,काय खाल्लं,कोण भेटलं याबद्दल आपल्या ब्लॉगवर टाकतात.वगैरे वगैरे..वाचणार्‍यांच्या पेशन्सची फारशी फिकीर न करता लिहिलेले असे ट्रॅव्हलोग आधी इतके उगीचच वाचून झाले होते की आता निदान सूड म्हणून तरी इतरांना असलं वाचायला लावायचंच असाही एक खुनशी विचार यामागे असू शकत होता.)
ते असो.
पण या आधी अशा संधी आल्या तेव्हा प्रवासात एकतर लॅपटॉपचे ओझे वहायचे,संध्याकाळी थकून आल्यावर कंटाळा झटकून लिहित बसायचे हे काही जमलेलं नव्हतं.चीनमधे ते जमायला अजिबातच हरकत नव्हती.मोकळा वेळ हाताशी होता आणि हवं तसं भटकायलाही मिळणार होतं.अगदी रोज ट्रॅव्हलोग लिहिता आला असता.ब्लॉगवर रोज एक पोस्ट:पण हाय रे दैवा..देशात येऊन पर्यटकांना मुक्तपणे भटकायची मुभा आता चीनी सरकारने बर्‍यापैकी उदारपणे दिलेली असली तरी त्यांचे प्रसारमाध्यमं,इंटरनेट इत्यादींवरील निर्बंध मी विसरूनच गेले होते.ब्लॉगरसाईट्स तिथे उघडतच नव्हत्या तर पोस्टणार काय कप्पाळ?
पण आता इथे लिहायच्या निमित्ताने एकेक करुन नोंदी वाचत असताना लक्षात येतय किती आणि काय काय पाहिलं मी चीनमधे असताना.
मुंबईतल्या सततच्या धावपळीच्या,कामाच्या,डेडलाईन्सच्या टेन्शन्सच्या पार्श्वभूमीवर चीनमधे मिळालेला निवांत वेळ मला तापलेल्या मरुभूमीवर सापडलेल्या पाण्याच्या साठ्यासारखा होता.तीव्रतेने हवासा.नवर्‍याच्या खेपा चीनमधे कामाच्या निमित्ताने नेहमीच होत असतात.आत्ता त्याच्याबरोबर मी गेले होते खरी पण कामातून सुट्टी काढून माझ्यासोबत फिरत बसायला त्याला कितपत वेळ काढता येईल याबद्दल तो स्वतःही साशंक होता.पण माझी काही तक्रार नव्हती.अमुकच स्थळ बघायलाच हवं असा माझा आग्रह कधीच नसतो.फिरणं महत्वाचं.मग असं फिरत असताना वाटेत आलंच सामोरं एखादं महत्वाचं पर्यटन स्थळ तर ते बघायला आवडणार निश्चित.पण त्यासाठी आटापिटा करुन तिथपर्यंत पोचावसं फारसं वाटत नाही.
-------------------------------
चीनमधे सलग काही महिने राहून आल्यावर अनेकांनी तु'हे'बघीतलस कां?'ते'बघीतलस का?असे प्रश्न विचारले.विशेषतःपर्यटन कंपन्यांसोबत जे चीनची सफर करुन आले होते त्यांच्याकडे मी काय काय बघीतलं हे तपासून पहाण्याची एक मोठी यादीच होती.बहुतेकवेळा मी गप्पच होते.'हे','ते'वगैरे ज्यांच्याबद्दलचे त्यांनी प्रश्न विचारले ती सर्व चीनमधली सुप्रसिद्ध पर्यटनस्थळे होती.ती'बघायलाच हवी'वर्गवारीतलीच होती यात काहीच शंका नाही.त्यातली बरीचशी मी सुद्धा पाहून आले होते.माझ्या कॅमेर्‍यात त्या पर्यटनस्थळांचे फोटोग्राफ्सही होते.पण'काय पाहिलं?'बद्दल बोलताना मला फारसं त्या स्थळांविषयी बोलावसं का वाटत नव्हतं याचं मग मलाही जरा आश्चर्यच वाटलं.चीनबद्दलचं माझं आकर्षण जुनं होतं.परदेशांमधे आजवर अनेकदा दीर्घकाळ राहून,फिरुन आल्यावरही मनातलं चीनबद्दलचं गूढ-पौर्वात्य आकर्षण जराही फिकं झालेलं नव्हतं उलट जास्त जास्त खोल जात होतं.
पण हे आकर्षण तिथल्या पर्यटनस्थळांविषयीचं नव्हतंच कदाचित असं आता लक्षात येतय.
काही काही फोटोंमधल्या ठिकाणांबद्दल तर मला तपशिलवार फारसं सांगताही आलं नाही.म्हणजे तिथे कसे,कुठून गेलो..त्याचा इतिहास वगैरे.चीनमधल्या पर्यटनस्थळांबद्दल बोलताना'इतिहास'फार महत्वाचा.सगळीच स्थळं ऐतिहासिक.हे अमुक एका सम्राटाच्या काळातलं..ते तमुक सम्राटाच्या ऐतिहासिक काळात बांधलेलं वगैरे.सम्राटांची चिंग,मिंग,यिंग वगैरे नावही मला सारखीच वाटली आणि त्याचा इतिहासही.तेव्हा कदाचित हे एक कारण असावं मला फारसं काही त्यांच्याविषयी न बोलावसं वाटण्यामागे.
पण तरीही चीनमधे मी पाहिलं खूप.
---------------------------------------------------------------
प्रवासात असताना मुक्कामाच्या अनोळखी शहरात पोचावं तर ते संध्याकाळीच.प्रवास संपल्यावर,शहरात शिरताना दिवसभराच्या धावपळीनंतर जरा संथावलेलं,घरी परतणार्‍या लोकांच्या गडबडीने जरा नादावलेलं शहर दूरस्थपणे पहिल्यांदाच निरखून बघायला मला आवडतं.वेंगझोच्या एअरपोर्ट पोचलो तेव्हा दुपार कलून बराच वेळ झाला होता.वेंगझो एअरपोर्ट छोटेखानी.गोव्यासारखा दिसणारा.तिथून तीन तासांच्या कारड्राइव्हच्या अंतरावर असणार्‍या होंगियान शहरात प्रवेशत असताना चीनमधली पहिली संध्याकाळ पाहिली.
प्रत्येक शहरातली संध्याकाळ वेगळी असते.प्रत्येक शहरात खुललेला सांजप्रकाश वेगळा असतो.वेंगझो ते होंगियान शहरापर्यंतचा द्रूतमार्ग दोन्ही बाजूंच्या गर्द झाडीने व्यापलेला.घरी परतायला अधीर झालेला तिथला सूर्य रस्त्यातच भेटला.तो दिलदारपणा दाखवायच्या मूडमधे.दिवसभर वाटूनही अजून शिल्लक राहिलेली,वरची लखलखती पांढर्‍या किरणांची शोभा उधळून झाल्यावर,तळाशी साचलेली सप्तरंगी किरणे मुठी मुठीने शहरावर भिरकावत आपली पोतडी रिकामी करुन टाकायची घाई त्याला झालेली.
रस्त्याच्या एका बाजूला डोंगरांच्या रांगा आणि दुसर्‍या बाजूला नक्की काय आहे ते झाडांपलीकडे नजर पोचू न शकल्याने नीटसे समजत नव्हते.रस्ता मधूनच कधीतरी जमिनीखालच्या एक एक दीड दीड किमी.लांबीच्या बोगद्यातून तर कधी उंचच उंच फ्लायओव्हरवरुन जाणारा.दुतर्फा गर्द हिरव्या झाडीची भव्य लॅन्ड्स्केप्स आणि स्वच्छ,गुळगुळीत रस्त्यांची ही मजा नंतर चीनमधे मनसोक्त अनुभवली खरी पण पहिल्यांदाच चीनमधल्या एका शहरात शिरत असतानाचा हा रस्त्याचा अनुभव सुखद आणि अनोखा वाटला.मला वाटतं ९९%भारतीय पर्यटक कधीही,कोणत्याही परक्या देशात गेले की त्यांचा त्या त्या देशातला सर्वात पहिला अनुभव या अशा गुळगुळीत,सुखद रस्त्यांवरच्या प्रवासाचाच असतो आणि तो नोंदवून ठेवण्याचा मोह त्यांना नाहीच आवरत.यामागचे लॉजिकल रिझनिंग विषद करुन सांगण्याची गरज अर्थातच नाही).
गडद गुलाबी,केशरी आभाळ.सिंदूरी रंगाची संध्याकाळ.घडीव,लाल दगडांनी बांधून काढलेले पर्वतांचे रस्त्यापर्यंत पोचलेले पायथे.पर्वतकडांवरुन दगड,गोटे,माती घरंगळून रस्यावर कोसळू नये म्हणून पायथ्याला गुंडाळलेल्या बेंगरुळ जाळ्यांच्या तुलनेत हे नक्कीच देखणं दिसत होतं.होंगियान शहरातून गाडी आत शिरली तेव्हा काळसर हिरवा रंग वरच्या झाडांमधून सावकाश पाझरत रस्त्याच्या दोन्ही किनार्‍यांवर साकळत होता.सर्वसामान्य चिन्यांच्या तुलनेत अजस्त्रच म्हणावी अशी साडेसहा फूट उंची लाभलेला आमचा ड्रायव्हर ली अखंड वेळ त्याच्या सेलफोनवरुन कुणाशी ना कुणाशीतरी भांडणार्‍या आवाजात बोलत होता.तो भांडत नाहीये तर चिन्यांचा नॉर्मल आवाजाचा टोनच तो आहे हे ज्ञान नवर्‍याने लगेच पुरवले.
----
चीनचा दक्षिण-पूर्व भागातला ताइझो प्रांत.त्यातले होंगियान हे छोटे औद्योगिक शहर.औद्योगिक कारखाने शहराबाहेर आणि शहर आधुनिक,सुखसोयींनी परिपूर्ण.शांघाय,बिजिंगसारख्या मोठ्या शहरांचा नोकझोक,नखरा होंगियानमधे नाही पण डोंगरांच्या पोटात वसल्याने हवा थंडगार,ताजी आणि शहरात भरपूर ताज्या पाण्याची तळी.शहराबाहेरच्या शेतजमिनीवर मोठ्या व्यासाचे प्लास्टिक पाईप्स अर्धे कापून जमिनीवर एका शेजारी एक रचून ठेवल्यासारखी दिसणारी लांबट,बुटकी,पांढरी पॉलीहाऊसेस.त्यांच्यामधे मश्रूम्स वाढवतात.
आमचं अपार्टमेन्ट एका प्रचंड मोठ्या कॉम्प्लेक्समधे दहाव्या मजल्यावर आहे.रस्त्याच्या पलीकडे थोड्या अंतरावर वाहणारी नदी आणि तिच्या काठावर गर्द झाडीने भरुन गेलेली बाग आमच्या अपार्टमेन्टच्या खिडकीतून दिसते.बागेच्या सुरुवातीला एक अर्धवर्तुळाकार लाकडी स्टेज जमिनीलगत आहे.एअरोबिक्स साठी.त्यावर रात्री उशिरापर्यंत संगीत चालू असते.चिनी तरुण मुलं-मुली आपापल्या सोयीने कामावरुन आल्यावर तिथे जाउन संगीताच्या तालावर नृत्याचा व्यायाम करतात.चीनमधे सर्वत्र फिटनेसचे प्रचंड वेड असल्यासारखे दिसते.जिकडे तिकडे जीमच्या पाट्या,जॉगर्स पार्क.
रात्री शहरात फेरफटका मारायला बाहेर पडलं की ठळकपणे नजरेस पडतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी,गर्दीने भरुन गेलेली छोटी,छोटी चिनी रेस्टॉरन्ट्स.प्रशस्त,स्वच्छ टाईल्स घातलेल्या फूटपाथवर खुर्च्या आणि टेबलं टाकून ऑफिसातून परतताना घरी जायच्या आधी जरा गप्पा-टप्पा,खाणी-पिणी करण्याच्या मूडमधले चिनी मोठमोठ्या आवाजात कलकलाट करत,हसत बसलेले.
रेस्टॉरन्ट्सच्या बाहेर भाज्या,नूडल्स,फळे कापून,रचून ठेवलेली.ग्रेव्हीत कसले कसले डंपलिंग्ज घातलेल्या चिनी कढया,उकळत्या सूप्सचे ब्लोस टेबलावर भरुन ठेवलेले.आणि या सार्‍याचा संमिश्र,नाकाला अनोळखी असा उग्र वास.
आम्ही कोपर्‍यावरच्या बेकरीतून ब्राऊन ब्रेड आणि तीळ लावलेले बन्स घेतो.बेकरी चकचकीत,स्वछ.होंगियानमधे एकमेव.मला तिचा पत्ता विसरुन चालणार नाहीये.मी शाकाहारी असल्याने मला चीनमधे असताना कायम पुढच्या जेवणाची भ्रांत पडण्याचा धोका आहे.इथे नूडल्स मधे कम्पल्सरी सिझनिंग घालतातच आणि ते म्हणजे माशांच्या पेस्ट्स किंवा बीफची सुकवलेली पावडर. तेव्हा शाकाहारी नूडल्स हा प्रकार फारसा अस्तित्वातच नाही.ब्रेड आणि बन्स चीनमधे निदान मिळायला लागलेत हे माझं सुदैव. होंगियानमधे आणि एकंदरच चीनमधे या ऋतूत भाज्या,फळे भरपूर असतात तेव्हा खाण्याची चिंता फारशी असणार नाही असं वाटतय.
रस्त्यांवर खूपच दुकाने होती.ड्रेसेस,चायना गोल्ड,शूज,केएफसी,मॅकडोनाल्ड्स(हेही गेल्या काही वर्षांतलं)होंगियानमधे एकुण सहा मोठे मॉल्स आहेत.पण एकंदर चीनमधे ही अशी लहान लहान रस्त्याच्या शेजारची दुकाने खूप दिसतात.हे भारताशी मोठंच साम्य.रस्त्याच्या एका बाजूला मोठा बाईकर्स वे.पूर्वी त्यातून फक्त सायकली जायच्या.आता त्यातून बहुतेक रिचार्जेबल इलेक्ट्रॉनिक बाइक्सच जाताना दिसतात.आवाज न करता झपकन मागून येतात.त्यांना स्पीडलिमिट ताशी तीस किमी.अशी ठरवून दिलेली आहे.पण ती कोणी पाळत नाही.
अपार्टमेन्टच्या खाली ई-बाईक्सची रांगच लागलेली असते.सोसायटी त्यांना चार्जिंग पॉइन्ट्स पुरवते.काहीजणं लिफ्टमधून बाईक्स आपल्या घरात घेऊन जातात आणि चार्ज करतात.दर दोन दिवसांनी चार्जिंग करावं लागतं.रस्त्यांवर सायकल रिक्षाही खूप दिसतात.पण सायकली फारच मोजक्या.
रस्त्याच्या कडांना ठराविक अंतरांवर झाडं होती त्यांच्या फांद्यांचा विस्तार एकसारखा डोक्यावर गोल.झाडे शिस्तीत वाढावी,रस्त्यांवर अस्ताव्यस्त फांद्या येऊन रहदारीत अडथळा येऊ नये म्हणून फांद्यांना खालून बांबूंचे टेकू लावून ठेवतात.कम्युनिस्ट शिस्त.माणसांमधून आता नाहिशी व्हायला लागलेली दिसत होती पण झाडांना मात्र होती.

रस्त्यावर अचानक एक पुरातन इमारत दिसली.सोबत असलेल्या इंग्रजी येणार्‍या चिनी मित्राने सांगितले की ही २००० वर्षं जुनी,हेरिटेज दर्जा दिलेली इमारत आहे.काळ्या लाकडाची,वर पॅगोडासारखं उतरतं,कोपर्‍यात दुमडलेल्या,खालून वर वळलेल्या लाल कडांचं छत.सर्व दारं,खिडक्या कडेकोट बंद.बाकी सार्‍या झगमगाटी आधुनिक चिनी रस्त्यावरचं हे एकच प्राचीन इतिहासाच्या खुणा वगवणारं घर एकाकी,अंधारात बुडून गेलेलं.
-----------------------------------------------------------------
कंटीन्यूड...

Thursday, October 28, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!

चित्रकला आवडते,गाणी ऐकायला आवडतात,अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात,कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे..
आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय..रंग,सूर,शब्द,चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या'कुहू'या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला..किंवा असं म्हणूयात'अनुभवला'तेव्हा विश्वास बसला.

दाट,गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल,खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा,पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर,मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र..त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप..खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी'कुहू'
कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते,गाणं मनात रुंजी घालतं,कुहूच सुरेल शीळ मनात घुमते,नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही..मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.


कुहूमधे कविताने स्वतःकाढलेली ४०-४५ऑईल पेंटिंग्ज आहेत,आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत,पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत,नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ,विलोभनीय व्हिडिओ आहे..अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत,दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे,समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत..या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला'पुस्तक'कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे.पुस्तक म्हणायचे कारण यात'शब्द'सर्वाधिक महत्वाचे,पायाभूत आहेत.शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात.शब्द येताना आपले रुप,रंग,नाद,लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच.अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत,आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.
कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली?कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही..पण हे अ‍ॅनिमेशन,संगीत,व्हिडिओज,कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड?शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत.कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे.कुहू हा गाणारा पक्षी.जंगलात रहाणारा.आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे.एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात.जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली.कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो.आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो..माणसाची भाषा त्याला शिकायची आहे,माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय..या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते..गोष्ट पुढे सरकत रहाते..विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात..त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं.हे कुहूचं जग आहे.ते अनुभवयालच हवं.
कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच,पण भारतीय साहित्यात एक नवी,आधुनिक वाट निर्माण होते आहे.कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे.मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते,बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो,जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे.कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.
ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे.तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र,भिन्न,ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही.सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले.आणि त्यासाठी तारण आहे'बौद्धिक मालमत्ता'.मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत'कल्पना'वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत,क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात!
कुहूचे महत्व यासाठीही.



कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल.त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे.तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.

शर्मिला फडके
'चिन्ह' ब्लॉगवरही प्रकाशित.

Wednesday, October 20, 2010

दिवाळी अंक आणि...

दिवाळी अंक आणि चित्रकला यांचं नातं मोठं मजेशीर.
म्हणजे असं की दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासून आतल्या पानापानांवर 'चित्रकला'दिसत तर असते पण'चित्रकलेवर'काय आहे हे शोधायचं झालं तर अंकांची पानच्या पानं उलटावी लागतात.तेव्हा कुठे एखाद दोन मोजके दिवाळी अंक हाताशी लागतात ज्यात चित्रकलेवर,चित्रकारांवर कोणी काही गंभीरपणे लिहिलेलं वाचायला सापडतं.एका अर्थाने चित्रकलेची ही दिवाळखोरीच होत असते दरवर्षी.
यावर्षीच्या म्हणजे २०१०सालातल्या दिवाळीत कोणकोणत्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय लिहून येतय याचा शोध घेताना जबरदस्त इंटरेस्टींग गोष्टी हाताशी लागल्या. .
त्याबद्दल सविस्तर इथे वाचा..

Saturday, October 09, 2010

'चिन्ह' ब्लॉग

पिकासो म्हणाला होता- पेंटींग म्हणजे चित्रकाराची डायरी.
'चिन्ह' म्हणजे त्या चित्रकारांची 'जीवनकहाणी'

'चिन्ह' ब्लॉग सुरु झाला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट.
कलेला वाहून घेतलेलं मराठीमधलं एकमेव आर्ट मॅगेझिन म्हणजे 'चिन्ह'.
जरुर भेट द्या. प्रतिक्रिया कळवा.

Friday, October 08, 2010

चिन्ह

'चिन्ह'साठी मी २००५ साली पहिल्यांदा लिहिलं.चित्रकार अतुल दोडियावर काहीतरी होतं ते.त्याच्या स्टुडिओत जाऊन गप्पा-मुलाखत वगैरे.त्यानंतरची चार वर्षे खूप वेगवेगळ्या चित्रकारांवर चिन्हसाठी लिहिलं.कला आणि जाणीवांच्या संदर्भात प्रत्येकवेळी जास्त जास्त समृद्ध होत गेले.गेल्या वर्षी लिहिलेल्या'राजा रविवर्मा आणि त्याने चितारलेल्या त्या सगळ्या देखण्या,दैवी चेहर्‍यांमागचा चेहरा शोधण्याच्या अनुभवांवरचा,रविवर्माच्या मळवलीच्या आता तर पूर्ण जमिनदोस्त झालेल्या पण शतकभरापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणार्‍या रविवर्मा प्रेसच्या दुर्दशेवरचा लेख मात्र खर्‍या अर्थाने अंतर्मुख करुन गेला.खूप काही देऊन गेला आणि घेउनही गेला.त्या अनुभवांवरही बरंच काही लिहिण्यासारखे आहे..'चिन्ह'वरच खरं तर इतकं काही लिहिण्यासारखं आहे!
'राजा रविवर्मा-एक शोधयात्रा'साठी दोन वर्षे जीवापाड मेहनत केली होती.विनायक परबने'चिन्ह'वार्षिकातल्या माझ्या या लेखावर भरभरुन लेख लिहिला तेव्हा केलेल्या मेहनतीची दखल आणि कलाक्षेत्रातल्या अचूक डॉक्युमेन्टेशनचे महत्व अजून कुणालातरी पटतय याची जाणीव मनाला खूप उमेद देऊन गेली.

राजा रविवर्मा - एक शोधयात्रा
"एक महत्त्वाची दंतकथा महाराष्ट्राने वर्षांनुवर्षे जपली, ती म्हणजे रविवर्माच्या चित्रातील महाराष्ट्रीय तरुणीच्या चेहऱ्याचे रहस्य. महाराष्ट्रातील अनेक पिढय़ांनी वर्षांनुवर्षे ही दंतकथा पुढल्या पिढीला सांगितली, जपली आणि पुढे नेली. त्याला यशस्वी व महत्त्वपूर्ण छेद देण्याचे काम यंदाच्या चिन्ह वार्षिकाने केले आहे. यातील ‘वह कौन थी?’ हा शर्मिला फडके यांचा लेख म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नुमनाच ठरवा. महाराष्ट्रामध्ये शोध पत्रकारिता होत असते. पण बव्हंशी ती राजकारणाशीच संबंधित असते. त्यातही ‘भांडाफोड’ हाच त्याचा उद्देश असतो. कधीकधी समाजकारणाशी संबंधित कुपोषणादी विषयही हाताळले जातात. पण अशाप्रकारे दृश्यकलेच्या संदर्भात केलेली शोधपत्रकारिता ही मात्र विरळाच. दृश्यकलेशी संबंधित सर्वांनी तर हा लेख वाचायलाच हवा. पण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही तो अवश्य वाचावा, म्हणजे एखाद्या शोधयात्रेमध्ये किती प्रकारे मेहनत घ्यावी लागते, किती व कशाप्रकारचा संयम ठेवावा लागतो याची त्यांनी नेमकी कल्पना येईल."... पुढे वाचा...

Sunday, September 19, 2010

आप अगर आप ना होते तो क्या होते?

यहाँ दिल खर्च हो जाते हैं अक्सर.... कुछ नहीं बचता - मुम्बई का मंज़र

Only He can write like this!!

Monday, August 23, 2010

भेट.

झिमझिमत्या पावसात मी आणि मिथिला काल संध्याकाळी एनसिपिएला गेलो.
भन्नाट वारा.
मागे मुंबईचं क्षितिज काळसर पावसाळी ढगांमधे मावळत गेलं.रस्त्यावरची माणसांची गर्दी मागे मागे जात रस्ता शांत होत गेला.
एनसिपिएच्या टोकाला वेडावाकडा वारा आणि पावसाच्या सरी.पावसाच्या एका जोरदार झोतात आम्ही क्षणात चिंब भिजूनच गेलो. काही हरकत नाही.एकमेकींकडे समजुतदारपणे पहात आम्ही हसलो.निसर्गाचा मुक्त आविष्कार अंगावर झेलूनच त्याला भेटण्यात मजा.
फॉयरमधे टेबलावरची त्याची पुस्तकं चाळत असताना मागे किंचित लोकांची गडबड.मिथिलाने अधिरपणे खांद्यावर हात टेकवत मागे पहायला खुणावलं.
रस्किन बॉन्ड.वाटोळा,गोल गोरा चेहरा,ओठांवरचं मिश्किल हसू,चष्म्याआडचे उत्साही,लुकलुकते निळे डोळे.
रस्टी तोच होता.अजूनही तसाच.'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय..इट इज यू अँड आय..!'त्यानेच एके ठिकाणी लिहिलं होतं ते आठवलं.
ओळख पटताच मी त्याच्याजवळ गेले.माझीही ओळख दिली.हातात हात मिळवला.
त्याच्या हातांचा गार स्पर्श हिमालयाच्या शिवालीक पर्वतराजींमधून वहात येणार्‍या झर्‍यासारखा नितळशांत.
"तुमची पहिली भेट लॅन्डोरमधे व्हावी असं मनापासून वाटत होतं.पण आत्ता इथे मुंबईमधे होतेय आणि इतक्या सहज ह्याचही अप्रुप वाटतय खूप."माझा आवाज किंचित कापत होता."पण मी लॅन्डोरला येणार आहे हे नक्की.कदाचित ह्याच मार्चमधे."
त्याने कुतूहलाने माझं बोलणं ऐकून घेतलं."नक्की या.भेटायला आवडेल तिथे.सीझनही फार छान असतो त्यावेळी"तो मी पुढे केलेल्या त्याच्या'द बुक ऑफ नेचर'वर ऑटोग्राफ देत म्हणाला.
मी आनंदाने मान डोलावली.मनात हसूनही घेतलं.ऋतूंच्या चांगल्या असण्या नसण्याशी मला काय देणं घेणं?हिमालयातला प्रत्येक ऋतू रस्किनचा हात धरुनच तर पाहून झाले आहेत.
त्याने ईमेलमधे सुचवल्याप्रमाणे मी त्याच्या अनुवादित केलेल्या कथांच्या प्रती आणल्या होत्या त्या सोपवल्या.त्याने आभार मानले.काही इतर बोलणंही झालं.त्याच्या भोवती आता हळूहळू इतर चाहत्यांची,क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवार्डच्या शॉर्टलिस्टेड लेखकांची,मेंबर्सची गर्दी वाढायला लागली.माणसांनी त्याला घेरून टाकलं.मी काढता पाय घेतला.मला तसाही आता आतल्या ऑडिटोरियममधे होणार्‍या कार्यक्रमामधे काही इंटरेस्ट राहिलेला नव्हता.रस्किन बॉन्डला भेटण्यासाठीच फक्त मी आले होते.
जिना उतरुन खाली आल्यावर आम्ही परत मागे वळून वर पाहिलं.
माणसांच्या जंगलात रस्टी बावरुन गेला होता.

Sunday, August 15, 2010

पीपली लाईव्ह

पीपली लाईव्ह पाहून ६३वा स्वातंत्र्यदिन'साजरा'केला.त्यातल्या ज्या प्रत्येक विनोदावर थिएटर हसत होतं त्या प्रत्येक विनोदानंतर मन जास्त जास्त खिन्न होत गेलं.खूप वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर सत्यजित रेंचा सद्गतीमधे तो पोट आणि पाठ एकत्र झालेला ओम पुरीचा शेतकरी..त्याचं ते मुकाट मरुन जाणे पाहिलं होतं.हादरुन जायला झालं होतं मनातून.
आज पीपली लाईव्ह बघताना त्या मरण्याचा तमाशा झालेला आपण पाहत आहोत इतकाच फरक जाणवून गेला.आणि हे होतच रहाणार अशा मनाच्या निर्लज्ज स्वीकारामुळे आपली हादरुन जाण्याची संवेदनशिलता सुद्धा संपली आहे हाही एक फरक!
बाकी शेतकरी अजूनही तसाच आहे.

Saturday, July 31, 2010

बातमी?

काल दुसरं काहीच महत्वाचं घडत नव्हतं देशात ज्याची बातमी व्हावी.दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सगळ्या चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज/विशेष बातमी/हेडलाईन काय तर डिम्पीने राहूलचं घर सोडलं.नक्की काय लायकीचे आहेत हे दोघे की त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सतत ऐकलच पाहिजे?All news channels are pathetic.

Sunday, July 25, 2010

वाचायच्या आधीच..

हिंदू हातात आलं आणि अगदी गार गार वाटलं. येताना टॅक्सीत पुरेसा प्रकाश मिळेना बाहेर काळे ढग दाटून आलेले म्हणून, तर मी अगदी खिडकीच्या बाहेर तिरकं काढून वाचायचा प्रयत्न करत होते आणि तशी जेमतेम दोन पाने वाचली मग मिटवून टाकलं. अशा पुस्तकांना रात्रच हवी वाचायला. निरव रात्र. बाहेर पावसाचा आवाज आणि गच्च काळोख. आपल्यापुरत्या प्रकाशाच्या चौकोनात आपल्या आवडणारच याची खात्री असणारं पुस्तक. फार कमी वेळा अशी पुस्तकं हातात येतात.
हिंदू प्रकाशित वगैरे झाली पण खरं तर का कोणास ठाऊक पण मला अजिबात घाई गडबडीने ती वाचायची उत्सुकता वाटत नव्हती. म्हणजे आहे मी नेमाडे किंवा कोसला म्हणूयात तर कोसलाप्रेमी गटातलीच तेव्हा कादंबरीबद्दल उत्सुकता जरुर होती. पण एक तर ती काही मी प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आगाऊ नोंदणी वगैरे केलेली नव्हती. त्याबद्दल रोज बातम्या वाचल्या जात होत्या की अमुक जणांनी नोंदवली वगैरे पण मी पडले अशा बाबतीत आळशी. मग ती प्रकाशित झाली तेव्हाही काही मी त्या समारंभाला गेले नाही. मग पार्ल्याच्या मॅजेस्टिकमधे डोकावले तर तिथल्या हिंदूच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती फक्त आगाऊ नोंदणीदारांसाठी आहेत वगैरे कळल्यावर मला वैताग. म्हटलं जाऊचदे. तरी वाटलं पुढे जवाहरमधे विचारावं. निघाले आणि पाऊस सुरु झाला जोरदार. कशाला हिंदूला भिजवा आता. बघू उद्या म्हणत मी तशीच घरी. बरं अजून कोणी काही झाली बुवा आमची वाचून. आवडलीय नाही आवडली काहीच बोलेना. अर्थात मला त्याने फरक पडणाराच नव्हता. मला ती आवडणारच हे मला माहित होत. एक तर मला पुस्तकं, सिनेमे वगैरेबाबत अगदी सिक्स्थ सेन असल्यासारखं आधी कळतच की आपल्याला हे आवडणार. हे नाही आवडणार. आणि हा अंदाज एरीली ९०% वेळा बरोबर ठरतो. मिथिला म्हणते की आता आवडणार म्हटलय ना म्हणून आवडतच. तर त्यात काही अर्थ नाही. १०% वेळा नाही आवडत त्याचं काय? एक तर आधीच वाचलेलं की या पुस्तकात पुरातन मोहन्जोदडो संस्कृतीतल्या उत्खननाची वगैरे थ्रिलिंग पार्श्वभूमी आणि नेमाडे लिहिणार म्हणजे पुरेसा विस्तृत पट घेऊन याची खात्रीच.
तर हिंदू काही त्यादिवशी हातात आली नाही. दुसर्‍या दिवसापासून मुंबईत धुआंधार पाऊस. काल म्हणजे शनिवारी दादरला आयडियल, मॅजेस्टिकवर धाड घालायचं ठरवलं पण पाऊस काही थांबला नाही. पण आज सकाळी प्रहार मधे प्रभा गणोरकरांनी हिंदूबद्दल लिहिलेलं वाचलं आणि ताडकन उठलेच. सही दिसतय आणि हे लगेच अगदी लगेच वाचण मस्ट आहे आणि आपण काय पाऊस, सवलत करतोय मूर्खासारखं असं म्हणत गेले रविवारची दुपार विसरुन दादरच्या शिवाजी मंदिर मॅजेस्टिकमधे. तिथे पुन्हा तेच. प्रती फक्त आगाऊ नोंदणीधारकांकरता. बुक केलय कां? म्हटलं नाही पण हवय आत्ताच. त्या काऊंटरमागच्याला काय वाटलं काय माहीत. तो तिथल्या मुलाला म्हणाला त्या काल सही करुन आलेल्या पंधरा प्रती आहेत त्यातली एक आण. आणि माझ्या हातात प्रत. अगदी नेमाडेंच्या सहीची वगैरे. मग मी असं एखादंच पुस्तक घेणं बरं नसतं म्हणत अजून तीन घेतली. त्यातलं एक अजित हरिसिंघानींचं बाईकवरचं बिर्‍हाड.सानियाचं अशी वेळ, मिलिंद बोकिलचं समुद्रापारचे समाज. सॉरी चार घेतली. तारा वनारसेंचं तिळा तिळा दार उघड. मग वाढलेल्या टॅरिफची वगैरे किरकोळ चिंता न करता टॅक्सी. पुस्तकांना असं बसमधून वगैरे नेणंही बरोबर नाही. मग टॅक्सीत बसल्या बसल्या पहिलं पान उघडलं.
प्रस्तावना-

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरुन जगण्याची समृद्ध अडगळ

सुरुवात-
कोण आहे?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तु कोण?
मी तु आहे, खंडेराव.
अंमळ चुळबुळात्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वतःलाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
ही तर मोठीच आफत आली आपल्यासारख्या माणसावर. हल्ली सांगायला गोष्टच तेव्हढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं. असं म्हणून मी वरच्या तंबूच्या कापडावरचे काळेपांढरे ठिपके पाहत पुन्हा झोपी जातो. पुन्हा दिसायला लागतो मी मोठ्या मेहनतीने तयार केलेला सप्तसिंधू भुप्रदेशाचा नकाशा. आकाशातून खूप उंचीवरुन अफगाणीस्तानातल्या शरयू नदीपासून राजस्थानातल्या सरस्वती नदीपर्यंतच्या या नव्या नकाशामुळेच माझं संशोधन सर्वचर्चित झालं.


आवडलं. आवडलं हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ. मला कळतं वाचायच्या आधीच बरोबर.

Wednesday, July 21, 2010

चीनमधून बेचैन

नाही.ही काही चीनचं राजकीय वगैरे विश्लेषण मनात ठेऊन केलेल्या प्रवासवर्णनाची सुरुवात नाही.
गेले जवळपास दोन महिने चीनमधे होते आणि तरीही असलं काहीही मी करणार नाहीये.इतक्यात :P
यावेळी तिकडे जाताना साईटसिईंग फारसं मनात नव्हतं.
एकतर माझ्यासोबत भटकत बसायला मोशायला वेळ असेलच असं सांगता येतं नव्हतं कारण ही माझी प्लेझर टूर असली तरी त्याची स्ट्रिक्टली बिझिनेस टूर होती.आणि भाषा येत नसताना एकटीने चीनमधे फिरणं,तेही तुम्ही ओन्ली व्हेज कॅटगरीमधे असताना तर निव्वळ अशक्यप्राय गोष्ट.तरीही चीनमधे एकंदरच चिक्कार भटकणं झालं.Unplanned.तिथे झालेली माझी मैत्रिण श्यू तिच्या पीचफार्मर आईवडिलांकडेही रहायला घेऊन गेली.अगदी छोट्याश्या त्या गावात रहाताना इतकं सुंदर वाटलं.पर्ल बकच्या कादंबरीतल्या साध्यासुध्या चिनी शेतकर्‍यांनाच अवतीभवती बघतेय असं अनेकदा वाटलं.शांघाय, बेजिंगने त्यांच्या आलिशान नखर्‍याने जितकं मला प्रभावित केलं नाही तितकं श्यूच्या त्या लिनहाय गावाने केलं.
यावेळी चीनमधे वेळ आहे तेव्हा मी माझी गेले 4-5 वर्षं अर्धवट लिहिली गेलेली कादंबरी नक्कीच पूर्ण करणार असं जाताना मारे मोशायला दहादा सांगितलं.अगदी वागवायला आणि वापरायला सुटसुटीत लेनोव्हो नेटबुकही त्यासाठी घेतलं.पण त्या कादंबरीची अगदी एकही ओळ लिहून झाली नाही.एकंदरीतच माझ्याबाबतीत प्लॅनिंग हा प्रकार काम करत नाही.म्हणजे टुडू लिस्ट्स वगैरे अगदी भारंभार रोज बनवणार.पण त्यापैकी प्रत्यक्षात दहा टक्केही उतरणार नाही.रोज उठून मोशायच्या अपार्टमेन्टबाहेरच्या त्या सुंदर गार्डनमधे मी अगदी नेटबुक घेऊन जाणार आणि मग गार्डनला लगटून वहाणार्‍या नदीकडे नाहीतर आजूबाजूला पळणार्‍या सफरचंदी गालांच्या चिनी बच्चेकंपनीकडे,तिथल्या जॉगिंगला आलेल्या पेन्सिल-स्लिम देहयष्टीच्या चिनी सुंदर्‍यांकडे आणि त्यांच्या त्यामानाने जरा यडचापच दिसणार्‍या चिनी जोडिदारांकडे पहात नुसतंच नेटबुकचा चार्ज संपवण्यात बराच काळ घालवणार.नाहीतर युबिसी कॅफेमधे बेजिंग हुटांग्स न्याहाळत नुसतीच तंद्री लावणार.असं अनेकदा झाल्यावर मी तो प्रकारच बंद केला.इथे असताना मोशायचे कान अक्षरशः किटवून टाकले होते अनेकदा की मला निवांत, निसर्गरम्य ठिकाणी, झिमझिमत्या पावसाला काचेतून पहात,हातात कॉफीचा कप घेत दिवसचे दिवस घालवण्याची संधी मिळू देत.बघ मग माझी कादंबरी कशी लग्गेच पूर्ण होईल.कप्पाळ.एक प्रकरणही पूर्ण केलं नाही.हा चायना नोट्स मात्र रेग्युलर काढल्या.आणि हजारांनी फोटो काढले.तिथून ब्लॉगसाईट अ‍ॅक्सेस होत नव्हती नाहीतर अगदी रोज एक चायना पोस्टकार्ड टाकलं असतं इथे इतकं सारं निरर्थक सुंदर जमा होत होतं जवळ.
इथे आलेय परत तर डोक्यावर पुन्हा धबाधबा लिहिण्याच्या प्रोफेशनल असाईन्मेन्ट्स कोसळायला लागल्यात.ज्यांच्या डेडलाईन नेहमीप्रमाणे गेल्याच आठवड्यात संपल्यात.मोशाय पुन्हा परदेशात गेला.आता नेहमीच रुटीन धावपळीचं चक्र चीड्चीड होण्याइतक्या सुरळीतपणे सुरु होईल.आता हातातला शिल्लक वेळही बघता बघता संपून जाईल.चिन्हं वार्षिकाचं काम सुरु होईल.रविवर्मा स्टोरीचा पुढचा भाग करायचा आहे.थोडक्यात काय तर ऑफिस, फ्री- लान्सिंगच्या चक्रात बाहेरचा सुंदर झिमझिमता पाऊसही बघण्याइतकी चैन परवडणारी नाहीये सध्या काही दिवस.
भटकून पोट मात्र कधीच भरत नाही उलट खिसे नको इतके रिकामे होतात हे नेहमीप्रमाणेच लगेच कळलं.इतका खर्च झालाय की खड्डा भरुन काढायला पुन्हा नको त्या असाईन्मेन्ट्स स्विकारल्या जाणार.पुन्हा भटकंतीचे प्लॅन्स करायचे तर त्यासाठी पुरेसे पैसे जमवणं भागच आहे हे क्रेडीट कार्डाचे चेक्स भरताना नेहमीसारंखच डोळ्यापुढे चमकून गेलं.नैराश्याच्या झटक्यात ठरवूनही टाकलं आता कुठेही जाणार नाही पण अमृताचा फोन आल्यावर ऑगस्टमधे लेहलदाख करायचे प्लॅन्स सुरु झालेही.बिच्चारी कादंबरी पुन्हा एकदा नेटबुकमधेच बंदिस्त.पुन्हा आता जेव्हा मी अगदी निवांतपणे,एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तासंतास हातात कॉफीचा कप घेऊन लिहिण्याची चैन करायला जाईन तेव्हा होईलच म्हणा ती पूर्ण.नाहीच तर मार्गारेट मिशेल किंवा गेला बाजार नेमाडेंनंतर कादंबरी लिहायला घेतल्या गेलेल्या सर्वाधिक वेळेची नोंद माझ्या नावावर होईल हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------P.S.
जावेद अख्तर खूप वगैरे काही आवडत नाही.पण ट्विटरवर त्याने लिहिलेलं बरेचदा आवडतं:-
वापस जो चाहो जाना तो जा सकते हो
मगर
अब इतनी दूर आ गयें हम;देखो,अब नही

Thursday, May 06, 2010

Kasab got his verdict!

अजमल कसाबला मरेपर्यंत फाशी.
भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो! तुकाराम ओबळेंच्या आत्म्याला आता थोडी स्वस्थता लाभेल.
पण अजमल ही फक्त सापाची शेपटी आहे. दहशतवादाचा आख्खा विषारी अजगर पाकिस्तानात सुस्तावून पडलेला आहे त्याला कधी ठेचणार? मास्टरमाईन्ड मिळेपर्यंत कसाबाच्या फाशीचा पूर्ण आनंद लुटता येणार नाही.
अर्थात तसंही याच भारतीय न्यायसंस्थेने फाशीची शिक्षा सुनावलेले ३८ जण अजून रांगेत आहेत त्यानंतर कसाबचा नंबर लागणार. म्हणजे कधी अजून पंचवीस वर्षांनी कसाबला फासाच्या दोराला लटकलेलं बघता येणार? तोपर्यंत सीएसटी स्टेशनात मारले गेलेल्या त्या सार्‍या निरपराध आत्म्यांनी काय करायचं? नुसतंच तळमळायच?

तरीही पुन्हा भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो!
उज्वल निकम आणि जज टहलियानींचे आभार.

Saturday, May 01, 2010

'A Pack Of Lies'- गौरीच्या मुलीचं पुस्तक

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.

उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.

उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.

गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले.
मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.

या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.

आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.

स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.

आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!

उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?

Thursday, March 25, 2010

..

अभिजीत देसाई गेला याबातमीवर विश्वास ठेऊ म्हणता ठेवताच येत नाहीये. नुकतंच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा कॉल आहे बघीतलं की मुद्दाम तो मिस करायचे आणि उलटा त्याला कॉल लावायचे.कारण एकच त्याची ’पुकारता चला हुं मैं..’ ची कॉलर ट्यून. त्याला ते माहित होतं त्यामुळे तो ती पूर्ण वाजू दिल्याशिवाय कॉल उचलायचा नाही. ते गाणं त्याच्या सेलवर एकलं की अभिजीत देसाईचं सगळं व्यक्तिमत्व समोर उभं रहायचं. त्याच्या फ़िल्म्सच्या, गाण्यांच्या आवडींसकट.तसाच होता तो अगदी. अभिजीतच्या बाबतीत ’होता..’ हे शब्द लिहिताना इतकं अस्वस्थ वाटतय.

अभिजीतच्या लोकप्रभामधल्या लिखाणाची मी प्रचंड चाहती होते. मला सिक्सटिजचं व्यसन लागायला तुझे लेख कारणीभुत असं सांगितलं की तो खुश व्हायचा.आणि ते खरंच होतं. जुन्या फ़िल्म्स त्याचं ऑब्सेशन होतं. रेग्युलर लिही गं रिलॅक्ससाठी म्हणून तो खूप कळकळीने सारखा सांगायचा. पण मला नियमित लिहायला जमायचं नाही. पण अमुक एक विषयावर लिहायचं डोक्यात आहे असं म्हटलं की त्याचा आवर्जून आठवण करुन द्यायला, लवकर लिही म्हणायला, काही संदर्भ हवे आहेत का तुला ते विचारायला फोन येणारच येणार.
त्याच्याकडचा संदर्भ अचाट होता. सिक्स्टीजच्या काळाचं त्याचं फ़ोटोकलेक्शन अफ़लातून होतं. ते त्याचं स्वत:च वैयक्तिक कलेक्शन होतं. कॉलेजात असल्यापासून मी हे फोटो जमवतोय सांगायचा. आणि अगदी अभिमानाने तो ते फोटो दाखवायचा. त्याच्याकडच्या फोटोंमुळे लेखाला शोभा यायची. कमालीची माहिती होती त्याच्याकडे त्या एकेक फोटोंसंदर्भात. एकदा निट बसून ऐकायच सगळं असं कितीदा म्हणाले त्याला.

भानूजींच्या लेखाबद्दल नेहमीप्रमाणेच मी देते रे, नक्की उद्या असा एक हवेत वायदा केल्यावर बघ हं पुन्हा फोन नाही करणार यासाठी तुला असं धमकावून त्याने फोन डिसकनेक्ट केला होता.आता पुन्हा त्याचा कॉल मिस करायची संधीच हा माणूस मला देणार नाहीये. इतकं हॉरिबल वाटतय अशा विचारांनी. इतकं भरभराटीला आलेलं करिअर, तो लिहिणार असलेली पुस्तकं.. सगळच अर्धवट. आणि त्याची गोड बायको आणि मुलगी.. बाप रे. त्यांचा तर विचारच करवत नाहीये. असं कोणी इतक्या सहज निघून जावू शकतं कायमचं?
अभिजीत.. इतक्या गप्पा अर्धवट राहिल्यात आपल्याही. आमच्यासारख्या तुझ्या इतक्या चाहत्यांना सांगण्यासारखं तुझ्याकडे इतकं सारं होतं ते न सांगताच असा अर्ध्यात निघून गेलास..
वी विल मिस यू ट्रिमेन्डसली!

Wednesday, March 10, 2010

मुंबई मोमेन्ट्स..

शामियानाच्या फ़िल्मस्क्रीनिंगला खूप महिन्यांनंतर गेले.तेही यावेळी स्क्रीनिंग इरॉस प्रीव्ह्यू थिएटरला आहे असं सायरस म्हणाला म्हणूनच केवळ.दरवेळी त्यांचा व्हेन्यू असतो जाझ बाय द बे.ते जायला खूप ऑड पडतं.शिवाय तिथून रात्री ९ वाजता चर्चगेटला जाणं म्हणजे एक दिव्य असतं.एक तर टॅक्सी मिळता मिळत नाही.एरवी एनसिपिएला किंवा यशवंतरावला काही असलं की कितीही उशीर झाला तरी सोबत कोणी न कोणी असतं तरी.पण जाझला मुद्दाम उठून नवोदितांच्या डॉक्युमेन्टरीज पाह्यला यायला कोणाला फ़ारसा उत्साह नसतो.इतक्या उशिरापर्यन्त थांबून तर नाहीच नाही.मग एकटीने चालत येणंही इतक्या रात्रीचं त्या एरियातून शक्य होत नाही.सायरस किंवा त्याचे कोणी मित्र सोडायला येतातही पण म्हणजे त्यांच्या गप्पा आणि इतर आवरुन निघेपर्यन्त आणखी तासभर उशिर.
व्हेन्यू सोयीचा नाही या एका कारणासाठी मी बरीचशी स्क्रीनिंग्ज बुडवते यावरुन सायरस आणि इतर कट्टर शामियानावाले वैतागतात पण तरी निष्ठेने माहिती कळवत रहातातच.काही महिन्यांपूर्वी बान्द्र्याला झेन्जीमधे त्यांना स्क्रीनिंगला जागा मिळाली होती पण यांची जेमतेम दोन स्क्रीनिंग्ज झाली आणि ते रेस्टॉरन्टच बंद पडलं.सबर्ब्जवाल्यांना कलेची काही चाड नाही वगैरे टिपिकल साऊथबॉम्बे रिमार्क्स मारायला सायरस मोकळा.पण त्याचा वैताग जायझ होता.बिचारा इतका उत्साहाने,कळकळीने शॉर्टफ़िल्म्स दाखवायला धडपडतो आणि आमच्यासारखे आळशी टॅक्सी मिळत नाही उशिरा असल्या कारणांनी जायचं टाळतो.
अर्थात आम्हा सबर्ब्जवाल्यांसाठी आता पृथ्वीहाऊस किंवा सेन्ट ऍन्ड्र्य़ूज,भवन्स वगैरे अनेक जवळच्या ठिकाणीही मधून मधून इतर कोणी शॉर्टफ़िल्म्स दाखवत असतात.पण सायरसला हे कोण सांगणार?
सायरस माझा जुना मित्र.शामियाना शॉर्टफ़िल्म क्लब त्याचाच आहे आणि शामियानाशॉर्टस या जगभरातल्या डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सची खबरबात सांगणा-या न्यूजजर्नलचा तो एडिटरही आहे.शॉर्टफ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीजचं आमचं दोघांचं वेड सारखंच.पण मला त्या इतरांनी बनवलेल्या पाह्यलाच फक्त आवडतात(तेही जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या जागीच जाऊन) आणि त्याला मात्र आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स इतरांना आवर्जून दाखवण्याचा पहिल्यापासून शौकच आहे.दोन वर्षांपूर्वी त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर त्याने अशाच हौसेने जमा करुन ठेवलेल्या देशविदेशांमधील डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सच्या डिव्हिडिजचं एक स्क्रीनिंग असं सहज आपल्या सगळ्या दोस्तमंडळींसाठी अगदी भाड्याने प्रोजेक्टर वगैरे आणून केलं होतं.मस्त पार्टी झाली होती ती.ते स्क्रीनिंग प्रचंड पॉप्युलर झालं.इतकं की त्यातून शामियाना फ़िल्म क्लब उभा राहिला.
एक्स्क्लुजिवली शॉर्टफ़िल्म्स दाखवणारा हा मुंबईतला एकमेव क्लब.आता शामियाना पुणे,दिल्ली,अहमदाबाद,बंगलोर वगैरे शहरांतही पसरला आहे.शॉर्ट फ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीज बनवण्याचं प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने घेणा-या यंगस्टर्सना स्क्रीनिंगसाठी प्लॅटफ़ॉर्म मिळण्याची खूप मारामार असते.फ़िल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेन्टरीजही जिथे आजकाल कोणी दाखवायला उत्सुक नसतात तिथे या बिचा-यांना कोण विचारणार!बर सगळ्यांनाच काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधे,फ़ेस्टीवल्सना आपल्या फ़िल्म्स पाठवणं जमतं किंवा परवडतं असं नाही.सायरस आवर्जुन या फ़िल्म्स दाखवतो,सेशन इन्टरऍक्टिव करण्याकरता फ़िल्ममेकर्सनाही स्क्रीनिंगच्या वेळी बोलावतो,त्यांना त्यांच्या फ़िल्म्सविषयी बोलायला लावतो,प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सांगतो.यंग शॉर्टफ़िल्म मेकर्सना खूप छान एक्स्पोजर मिळतं शामियाना मुळे.
यावेळी इरॉसला गेले तर धक्काच बसला.दुस-या मजल्यावरचं प्रीव्ह्यू थिएटर खचाखच भरलं होतं.अगदी दोन वर्षांपूर्वी जेमतेम पंधरा डोकी असायची.त्यातली दहा केसी,सोफ़ाया किंवा झेवियर्सच्या फ़िल्ममेकिंग किंवा मासमिडिया शिकणा-या मुलांचीच असायची.कधी कधी आजूबाजूला रहाणा-या काही श्रीमंत म्हाता-या पारशी बायका त्यांचा लवाजमा घेऊन यायच्या,मोठ्या आवाजात बडबड करत अर्धा तास बसायच्या मग हे काही इन्टरेस्टींग दिसत नाही असं म्हणत निघून जायच्या.
यावेळी इतक्या महिन्यांनी गेले त्याचं अक्षरश: चीज झालं.ज्या पाच फ़िल्म्स पाहिल्या त्या केवळ आणि केवळ अप्रतिम होत्या.विशेष म्हणजे या सगळ्या फ़िल्म्स मुलींनी बनवलेल्या होत्या.
पहिली शॉर्ट फ़िल्म’लाल जुतो’श्वेता मर्चंट या कोलकात्याच्या सत्यजित रे फ़िल्म इन्स्टीट्युटमधून फ़िल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीने बनवली होती.कमलकुमार मजुमदार या बंगाली कथालेखकाच्या अतिशय साध्या,सुंदर कथेवर आधारीत ही फ़िल्म होती.अ‍ॅडोलसन्ट प्रेमाचे फ़ार सुरेख चित्रण बंगाली मध्यमवर्गीय घराच्या वातावरणात या फ़िल्ममधून दिसले.२००७ सालासाठीचे राष्ट्रीय पारितोषिक या फ़िल्मला मिळाले आहे.
बाकी दोन फ़िल्म्स खूप छोट्या पण तितक्याच परिणामकारक होत्या.एल.व्ही.प्रसाद फ़िल्म मेकिंग इन्स्टीट्युट्मधल्या एका मुलीने बनवलेली’ओरे ओरु नाल’ओन्ली वन डे)नावाची नऊ मिनिटांची फ़िल्म आणि प्राग मधल्या फ़िल्म इन्स्टीट्युटमधून शिकलेल्या किम जोगतियानी या मुंबईकर मुलीची एक साडेचार मिनिटांची फ़िल्म’बॅक टु स्क्वेअर वन’.
चौथी शॉर्ट फ़िल्म इटालियन होती.’रिट्रीटींग’ नावाची.या फ़िल्मलाही खूप आंतराष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत.दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर एक इटालियन मुलगी आणि त्यांच्या घरात लपून राहिलेला एक अमेरिकन सैनिक यांच्यात निर्माण झालेले कोवळे भावबंध खूप सुरेख दाखवले होते.ही फ़िल्मही बारा मिनिटांचीच होती.
इतक्या छोट्या कालावधीत एक कथा इतक्या परिणामकारकरित्या फ़ुलवणे किती कौशल्याचे काम असते!
डॉक्युमेन्टरी एकच होती.तिचा विषय होता वॉर विडोज.केसी कॉलेजमधे शिकणार्‍या सहा मुलींनी सातार्‍याला जाऊन ह्या डॉक्युमेन्टरीचे चित्रीकरण केले होते.साताराच का तर संपूर्ण महाराष्ट्रात सैन्यात भरती होणार्‍यांचे प्रमाण सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि तिथे सैनिक प्रशिक्षण संस्थाही आहे.सरकारने जाहीर केलेली मदत देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांपर्यंत न पोचणे,त्यांचे शिक्षण,नोकरी याबाबतीतली जबाबदारी घेण्याची शासनाची उदासिनता हे सर्व या डॉक्युमेन्टरीमधून नीट सामोरे आले आणि मन विषण्ण झाले.या पाचही फ़िल्म्स बनवणा-या मुलीही स्क्रीनिंगच्या वेळी आल्या होत्या.त्यांच्यासोबतचे इंटरऍक्शन सेशनही इन्टरेस्टींग होते.यानिमित्ताने जगात बनणा-या शॉर्ट फ़िल्म्सपैकी ६०% फ़िल्म्स स्त्रिया बनवतात ही माहितीही मिळाली.
यानिमित्ताने पुन्हा एकदा शामियानाशी नातं जुळलं याचा मनापासून आनंद वाटला.वे टु गो सायरस!

Monday, March 08, 2010

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या, किंवा त्याकाळात पडावे लागलेल्या काही महिलांनी मतदानाचा हक्क, समान पगाराच्या, कामाच्या ठिकाणी किमान सोयीच्या मुळ मागणीपासून सुरु केलेला एक लढा बघता बघता स्त्रीमुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे चालवला गेला.
चळवळ सुरु झाली ती वेळ, तो काळच असा होता की स्त्रीमुक्तीचा शारिरीक आणि मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची नितांत गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगनला भरलेल्या एका आंतराराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात क्लारा झेटकिन्स या जर्मनीतल्या स्त्रीवादी कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करु शकतील अशी कल्पना पहिल्यांदा मांडली. एकत्रित जागतिक महिला दिनाच्या या कल्पनेला सतरा देशांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शंभर महिलांनी त्यादिवशी जोरदार पाठिंबा देत उचलून धरले. त्या शंभर महिलांमधे जगात पहिल्यांदाच संसदेमधे निवडून येण्याचा मान मिळालेल्या तीन फिनिश संसद सदस्य महिला होत्या आणि इतर महिला कामगारांच्या प्रतिनिधी होत्या.
१९१० सालच्या महिलामेळाव्यात 'आंतराष्ट्रीय महिलादिनाची' कल्पना पहिल्यांदा मांडली गेली याअर्थाने आजचा २०१० सालातला महिला दिन शंभरावा होऊ शकतो. अर्थात याचे बीज याआधी दोन वर्षे म्हणजे १९०८ साली न्यूयॉर्क शहरामधे १५०० कामगार महिलांनी जो संतप्त मोर्चा काढला होता त्याचवेळी पडले होते तेव्हा शंभरावा महिला दिन २००८सालीच होऊन गेला असेही काही जण म्हणतात. तर काहीजण म्हणतात जरी कोपनहेगनला महिला दिनाचा संकल्प सोडला असला तरी तो अधिकृतरित्या साजरा झाला पुढच्या वर्षी म्हणजे १९११ साली ऑस्ट्रिया, जर्मनी येथे तब्बल दोन लाख महिलांच्या उपस्थितीत. तेव्हा शंभरावा वाढदिवस २०११ साली.
शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला दिन नक्की कधी या वादाला अजिबात महत्त्व नाही कारण मानवमुक्तीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात अशी एक दोन इकडची तिकडची वर्षे खरोखरच क्षुल्लक ठरतात. खरे महत्त्व आहे ते स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल नक्की कशी होत गेली ते जाणून घेण्याला.
स्त्रीवादी चळवळींची सुरुवात मूलतः झाली 'लैंगिक समानते'च्या विचारांमधून आणि ती व्यापक होत 'स्त्रीहक्का'च्या मागणीपर्यंत येऊन स्थिरावली. या चळवळींच्या वाटचालीत असंख्य वळणं, खाचखळगे, उंचवटे येत राहिले. त्यांना विरोध तर कायमच होत राहिला. 'फेमिनिझम' हा मुळचा फ्रेन्च शब्द १८९५ साली यूकेच्या 'डेली न्यूज' मधून पहिल्यांदा इंग्लिश भाषिकांच्या नजरेस पडला तेव्हापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. आणि ती सुद्धा क्वीन व्हिक्टोरियाकडून " mad, wicked folly of 'Woman's Rights" अशा शब्दांमधे!
मात्र या आधी बरीच वर्षे, अगदी अठराव्या शतकातच एका नव्या स्त्रीवादी विचारसरणीचा उदय झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट नावाच्या एका तत्वज्ञ विचारसरणीच्या लेखिकेने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकाद्वारे. फेमिनिस्ट विचारधारा रुजवणारी ही पहिली लेखिका. मेरीने आपल्या पुस्तकातून स्त्रियांची जडणघडण आणि शिक्षण लहानपणापासूनच पुरुषी दृष्टीकोनातून, त्यांना काय आवडेल या विचारांतूनच केले जात असल्याने स्त्रियांची स्वतःबद्दलची अपेक्षाच मर्यादित रहाते हा विचार मांडला तो त्याकाळाच्या मानाने धाडसाचा होता आणि त्याबद्दल तिला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. मेरीच्या मते समाजातल्या भेदभावाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच जबाबदार असतात, पुरुषावर वर्चस्व गाजवण्याची प्रचंड ताकद स्त्रीमधे असूनही ती आपल्या शक्तीचा वापर करत नाही असे तिचे मत होते. अपुर्‍या आणि चुकीच्या शिक्षणामुळे बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात हा विचारही तिच्या पुस्तकात होता. तिने मांडलेल्या काही प्रश्नांना आजही समाधानकारक उत्तरे मिळू शकत नाहीत.
एकोणिसाव्या शतकात जेन ऑस्टिन, एलिझाबेथ गॅस्केल, ब्रॉन्टे भगिनी, लुइझा मे अल्कॉट सारख्या लेखिका स्त्रियांचे प्रश्न, त्यांची दु:ख, निराशा याबरोबरच सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखाही आपल्या कादंबर्‍यांमधून मांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आदर्श स्त्रीच्या 'व्हिक्टोरियन इमेज'मधे स्त्रियांना गुदमरवायला कारणीभूत ठरलेल्या 'द एंजल इन द हाऊस' सारख्या पुस्तकांच्या आकर्षणातून स्त्रियांना बाहेर काढणे फार कठीण होते. १८४३ साली मरियन रीड नावाच्या स्कॉटिश लेखिकेने A plea for women मधून पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्याच्या अन्यायाबद्दल लिहिले आणि आपल्याला काही सुप्त अधिकार आहेत ज्यांचा वापरच आपण अजून केला नाही हा विचार जोमाने काही जागरुक स्त्रियांच्या मनात पसरला. याच सुमारास आपल्या वैवाहिक जीवनातल्या अत्याचारांना बळी जायचे नाकारत घराबाहेर पडलेल्या कॅरोलिन नॉर्टन या ब्रिटिश महिलेला स्त्रियांना कायद्याचे पाठबळच नसल्याची जाणीव विदारकपणे झाली होती. पण तिने आवाज उठवला होता आणि अगदी राणी व्हिक्टोरियापर्यंत जाउन दाद मागितली होती. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना किमान कायद्याचे संरक्षण तरी असावे हा विचार ब्रिटनमधे सुशिक्षितांमधे चर्चेला आला.
अर्थातच स्त्रियांचे हे प्रश्न सुटे सुटे चर्चेला येत होते आणि स्त्रियांचा परस्परांना पाठिंबा तर अजिबातच नव्हता. उलट अशा घरफोड्या आणि विद्रोही विचारधारेच्या स्त्रियांपासून आपण किती वेगळ्या आहोत हे दाखविण्याची चढाओढच समाजातल्या प्रतिष्ठित महिलांमधे होती. एखादीच फ्लोरेन्स नाईटिंगेल त्या काळात होती जिला आपल्यातल्या क्षमतेची जाणीव होती आणि त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत तिने आपल्याला हवी तीच करिअर निवडण्याचे धाडस तेव्हा दाखवले.
मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव हळूहळू होत होता आणि स्त्रियांचे वैवाहिक अधिकार, मालमत्तेवरचा अधिकार, कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवज उठवण्याचे धाडस अशा विषयांना तोड फुटत होते. बार्बारा लिग स्मिथने ब्रिटनमधे स्त्रियांना एकत्र बोलावून, चर्चा करण्याचे, सभा घेण्याचे काम सुरु केले. त्यांच्या सभा लॅन्गहॅम पॅलेसमधे व्हायच्या आणि म्हणून या 'लेडिज ऑफ द लॅन्गहॅम पॅलेस'. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८५५ मधे विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकारांसाठी कमिटी नेमली गेली. स्त्रिया निदान स्वतःचे प्रश्न मांडायला एकत्र जमायला लागल्या होत्या. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल होते.
स्त्रीवादी चळवळींचा हा सुरुवातीचा इतिहास जेव्हा स्त्रियांचे प्रयत्न एकाकी, अपुरे होते. पण त्यातूनच पुढे शैक्षणिक क्षेत्रात, राजकिय, सामाजिक क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढला. वाढतच गेला.
स्त्रीवादी चळवळींना नंतरच्या काळातही काही अतिरेकी, हटवादी स्त्रीकार्यकर्त्यांमुळे असेल किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या पक्क्या पारंपरिक पुरस्कर्त्यांच्या कडव्या भुमिकेतून आलेल्या विरोधामुळे असेल.. पण एक उपहासात्मक स्वरुप लाभत गेले. आजही त्यांची चेष्टा उडवणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. परंतु स्त्रियांनी शिकावे, त्यांचे राहणीमान उंचावावे, स्वत्व-सन्मानाची ओळख त्यांना व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्या सबल व्हाव्यात, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, मतदानाचा अधिकार मिळावा, समाजात एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून तळमळीने ज्यांनी ज्यांनी काम केले होते त्यांचे जर स्मरण आज प्रत्येक स्त्रीने (आणि स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा) केले नाही तर तो मानवी कृतघ्नपणा ठरेल.
'संयुक्ता' तर्फे जागतिक महिला दिनाचे स्मरण याच कृतज्ञ भावनेतून ठेवले जात आहे. स्त्रीवादी चळवळींचा इतिहास, त्यातले महत्वाचे टप्पे,स्त्रीवादी चळवळींचे कार्यकर्ते या सार्‍यांबद्दल 'संयुक्ताच्या' व्यासपीठावरुन आपण जाणून घेऊया.
'फेमिनिस्ट' चळवळीला ज्यांचा हातभार लागला त्या सार्‍याच कार्यकर्त्यांची नोंद इतिहासही ठेवू शकला नाही. काही महत्वाची नावे मात्र कधीही विस्मृतीत जाऊ नयेत-कारण काल 'त्या' होत्या म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत.

एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन (१८१५ ते १९०२)- पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना हिने केली.
ग्रेस ग्रीनवूड (१८२३ ते १९०४)- पहिली महिला वार्ताहार.
मरियन हाईनिश( १८३९-१९३६)- स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला.
केट शेफर्ड (१८४७-१९३४)- स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून या न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला गेला. १८९३ साली तिथे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले.
एमिलिन पॅन्खर्स्ट (१८५८-१९२८)- ब्रिटनमधे हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली.
बिबी खानुम अस्तराबादी ( १८५९-१९२१)- इराणियन लेखिका. स्त्रीवादी चळवळीची बीजे इराणमधे रुजवण्याचे कार्य हिच्या हातून सुरु झाले.
इडा बी. वेल्स (१८६२-१९३१)- अमेरिकेत स्त्रियांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून लढा देणार्‍या महिलांमधे पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला म्हणून हिचे नाव महत्वाचे ठरते.
शिरीन इबादी(१९४७)- स्त्रिया आणि मुले यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हिने उभारलेली चळवळ फार महत्वाची ठरते. स्त्रीवादी चळवलींमधे नोबेल शांती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला.
कॅरोलिन एगान- मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची पहिली पुरस्कर्ती.
एमिली हॉवर्ड स्टोवे - व्यावसायिक वैद्यकिय संघटनांमधे स्त्रियांना सहभागी करुन घेतले जावे यासाठी प्रयत्न. कॅनडामधे स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ.
अन्सार बर्नी (१९५६)- पाकिस्तानमधे स्त्रीवादी चळवळीचे विचार पसरवण्यासाठीचे प्रयत्न जाहिररित्या सुरु करण्याचे धाडस हिने प्रथम दाखवले.

इराणियन-कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई, इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान, केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत. याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका, कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले. स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते.

काही भारतीय नावे ज्यांनी काही ना काही प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व माजी आणि भावी कार्यकर्त्यांना समर्पित करुया.

Monday, March 01, 2010

रेल अफ़ेअर

खूप वर्षांनी सलग आणि मोठा प्रवास ट्रेनने करण्याची संधी आली.नाहीतर'वेळ वाचतो'या एका अपरिहार्य कारणामुळे दरवेळी फ्लाईटचाच पर्याय माझ्याकडून स्विकारला जातो.तरी ट्रेनने जाणार म्हटल्यावर-२०/२२ तासांचा प्रवास..अगं किती बोर होशील?आणि किती वेळ फुकट जाणार प्रवासात.शिवाय ट्रेन पोचणारही अवेळी पहाटे.खूप त्रासाचं आहे टॅक्सीने शहरात जाणं..मिळालेले एक नाही सतरा सल्ले आणि टीका चक्क कानाआड केल्या.
मला हे सगळं माहित होत आणि कबूलही होत.पण मला ट्रेननेच जायच होतं.एकतर यावेळी खरच मला एरवी असते तशी कमी वेळेची कटकट डोक्याशी नव्हती,वाचायच्या पुस्तकांचा बॅकलॉग खूप राहिला होता,काही कामाच्या नोट्स काढायच्या होत्या,काही महत्वाच्या इश्यूजवर शांतपणे विचार करण्याइतका निवांत वेळ हवासा वाटत होता आणि हे सगळं फक्त ट्रेनमधेच एकट्याने प्रवास करत असतानाच शक्य झाल असतं याची खात्री होती.
आणि मग खरंच ट्रेन अंगात अगदी भिनून गेली.प्रवास दोन रात्रींचा होता.सेकंड एसीचा डबा स्वच्छ,शांत होता.समोर एक जमशेदपूरला उतरणार असलेलं छोटं कुटूंब काही'नॉर्मल'चौकशा सोडल्या तर फारसं नाकखुपसं नव्हतं.त्यांची आपापसातली मैथिली भाषा कानाला खूप गोड वाटत होती.दोन लहान मुलं पत्ते,उनो खेळायची,चित्र काढायची,थोडं भांडायची आणि उरलेला वेळ त्यांच्या बाबाच्या लॅपटॉपवर सिनेमा बघायची.त्यांची आई त्यांना सारखी मधून्मधून खायला द्यायची.इतर वेळी झोपायची.राहिलेली सांसरिक झोप पूर्ण करायला तिलाही ट्रेनइतकी निवांत जागा मिळाली नसावी.नवरा रिडर्स डायजेस्ट वाचायचा आणि सारखा बाजूच्या एका मोठ्ठ्या प्लास्टिकच्या पिशवीतल्या छोट्या,चकचकीत पाकिटांमधला पानमसाला खात तंद्री लावून बसायचा.
मी अगदी सुखाने पुस्तकं वाचली,गाणी ऐकली,थोडं लिहिलं आणि बाकी अख्खा वेळ नुसतंच खिडकीबाहेर बघत,प्रत्येक थांबणार्‍या स्टेशनवरची खास संस्कृती बघत निवांत मग्न राहिले.धावणार्‍या रुळांकडे बघत राहिलं की मनातले सगळे इकडे तिकडे विस्कटून राहिलेले विचार कसे छान ओळीत मनात आपोआप लय धरतात.
-------------------------------------------------------------------------------
ट्रेन पहाटे पाचच्या सुमारास पोचणार होती.समोरचं कुटूंब अडीच वाजता उतरुन गेल्यावर मला झोपच आली नव्हती.खिडकीतून बाहेरचा मिट्ट अंधार आणि त्यात मिसळून गेलेलं काचेतलं माझच प्रतिबिंब पहात मी कधीपासूनच आवरुन बसले होते.डोळ्यांवर अर्धवट झोप होती आणि अंगात गेल्या दोन दिवसांच्या ट्रेनच्या प्रवासाची गुंगी शीण धरुन होती.मधेच कधीतरी डुलकी लागली असणार बहुतेक.एकदम दचकून जाग आली तेव्हा मंद हिसका देत ट्रेन मंद गतीने पुन्हा लय पकडत होती.आता डुलकी लागली तर तिचे गाढ झोपेत रुपांतर होणार या भितीने थोड्यावेळाने मी उठून दरवाजात जाऊन उभी राहिले.
मधे कुठेही उंचवट्याचा अडथळा नसलेला पश्चिम बंगालचा दाट,काळसर हिरव्या रंगातला सलग मोकळा माळरानासारखा प्रदेश,छोटीशी घरे,मधे चौकोनी,लंबगोल तलावांचे चमकते आरसे आणि बाकी क्षितिजापर्यंत फक्त उंच,लवलवत्या पाणगवताच्या टोकावरच्या शुभ्रसफेद काशफुलांच्या झुबक्यांचा समुद्र.पहाटेच्या अस्प्ष्ट अंधार-उजेडात वाहत्या वार्‍याच्या झुळकांवर लाटालाटांनी लहरत असणारा..
कुठे पाहिलं आहे मी हे या आधी?मनातली काही रिळं उलगडली.
[माझ्या मनात सिनेमाच्या पडद्यावरच्या काही दृष्यांची रिळं अगदी खोलवर रुतून बसलेली असतात.वेळी अवेळी ही रिळं नजरेसमोर प्रोजेक्ट होत रहातात.कोणतही निमित्त, कोणताही ऋतू त्यासाठी पुरेसा असतो.मला त्यात काही नवल वाटत नाही.आपल्या फिल्मी फॅसिनेशनचा हा एक अपरिहार्य भाग हे मी गृहित धरलेलं आहे.या रिळांतली बहुसंख्य दृष्य ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट सिनेमांमधलीच आहेत,काही इस्टमन कलर्ड आहेत,काही नुसतेच आवाज आहेत,काही ओझरते क्लोज अप्स आहेत,काही ठळक लॅन्डस्केप्स आहेत..]
वार्‍याच्या झोतावर डुलणार्‍या या पांढर्‍याशुभ्र काशफुलांचा पसारा..त्यातून दोन मुलं धावत येत आहेत.खांबाला कान लावून क्षितिजापलीकडून येणार्‍या आगगाडीचा कानोसा घेणारी त्यातली ती सावळी,कृश, टपोर्‍या डोळ्यांची मुलगी आणि तिच्याकडे कुतुहलाने पहाणारा,कपाळावर कागदी चांदीचा मुकुट बांधलेला तो तिचा मस्तीखोर धाकटा भाऊ!मग कधीतरी निळ्या आकाशात काळ्या धुराचा लांबलचक पट्टा उमटवत एक ट्रेन धडधडत येते.वाफेच्या इंजिनाची शिट्टी मोकळ्या आसमंतात घुमते.ती दोघे त्या काशफुलांच्या समुद्रातून वाट काढत जीव खाऊन धावत जेमतेम रेल्वेट्रॅकजवळ पोचतात तोपर्यंत क्षितिजाच्या पार पुन्हा दिसेनाशीही होते.धुराचा पट्टा आणि एक लांबलचक शिट्टी मागे सोडत.
नजरेसमोरुन ते दृष्य इतकं स्पष्ट सरकत गेलं..वाटलं आत्ता त्याच ट्रेनच्या दरवाजात मी उभी आहे कां?स्टेशन जवळ आलं आणि काशफुले दिसेनाशी झाली.माझ्या डोळ्यांसमोरुन उलगडत गेलेल्या त्या दृष्याची रिळंही संपली.
उंच लवलवत्या गवताच्या टोकावरच्या काशफुलांच्या पसार्‍यामधून मान वर करुन ट्रेनकडे अचंबित नजरेने पहाणारा तो मुलगा.. अप्पू त्याचं नाव.त्याच्यामागून धावत आलेल्या त्याच्या दिदीला,तिचं नाव दुर्गा;मात्र ती ट्रेन दिसलीच नव्हती.तिच्या आयुष्याचा पुढचा खंडित प्रवास सूचित करणारे रेंच्या पाथेर पांचालीतले हे अविस्मरणीय दृष्य.अनेकांनी अनेक प्रकारे पुढच्या काळात इंटरप्रिट केलेलं.जिथे ते चित्रित झालं त्या पश्चिम बंगालमधल्याच एका काशफुलांच्या माळरानावरुन माझी ट्रेन जात असताना या अंधार-उजेडाच्या ट्वायलाईटमधे मला ट्रेनमधून जाताना समोर काशफुले होती म्हणून पाथेर पांचालीतलं ते दृष्य आठवलं.पण समजा धुआंधार पाऊस असता तर ट्रेनमधल्या मला इजाजत आठवला असता.
एका अंधारुन आलेल्या दिवशी पावसाचा दाट पडदा बाजूला सारत ट्रेनमधून उतरणारा आणि मग वेटिंगरुममधे दिवसभर बसून एकेकाळच्या पत्नीसोबत आयुष्यातल्या चुकलेल्या आणि निघून गेलेल्या वेळांचा जमाखर्च मांडत बसलेला त्यातला नासिरचा महेन आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या नव्या जीवनसाथीसोबत त्याच स्टेशनात येणार्‍या ट्रेनमधे बसून एका नव्या प्रवासाचे प्रस्थान ठेवताना आधीचं सार आयुष्य त्यातल्या आठवणींसकट कायमचं तिथल्या वेटिंगरुममधेच सोडून निघून जाणारी सुधा आठवली असती.
मध्यरात्रीचा गडद अंधार असता तर कदाचित लांबून दिसणार्‍या एखाद्या दुसर्‍या ट्रेनच्या आवाजात मला..'यूंही कोई मिल गया था..सरे राह चलते चलते...'असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या पाकिझातल्या साहेबजानच्या नजरेत उमटलेली,रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी,न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी त्यातली ती ट्रेनची शिट्टी ऐकू आली असती.त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्ट्मधे ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकातीची सारी दास्तान उमटत असते.आपली नाजूक,गोरी पावले जर्दलाल पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान..त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला..न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीतून तसे बजावलेले असते म्हणून केवळ!
नुसत्या एका ट्रेनशी निगडित अशी सिनेमांची रिळं नक्की आहेत तरी किती आपल्या मनात?मला कुतुहल वाटलं!
सत्यजित रेंप्रमाणेच धावत्या ट्रेनचा मेटाफर वापरुन त्याला समांतर असा आयुष्याच्या सुखदु:खांचा,बदलत्या ऋतूंचा,दुरावत गेलेल्या आणि पुन्हा जवळ आलेल्या नातेसंबंधांचा लेखाजोखा सिनेमाच्या पडद्यावर कलात्मकरित्या मांडणारे कितीतरी दिग्दर्शक देशी विदेशी चित्रपटांच्या दुनियेत आहेत.
अगदी ब्रीफ एन्काउन्टर,ब्रीज ऑन द रिव्हर क्वाय आणि डॉ.झिवागो सारख्या एकाहून एक भव्य चित्रपटांमधे ट्रेनला महत्वाची भुमिका देणार्‍या डेव्हिड लिनपासून ते सुटलेली ट्रेन पकडू शकण्याच्या किंवा न शकण्याच्या शक्यतेद्वारे मनातला प्रेमाचा गोंधळ-गुंता सोडवू पहाणार्‍या इम्तियाझ अलीपर्यंत अनेकजण. डेव्हिड लिनच्या ब्रीफ एन्काउन्टरमधलं द मिलफोर्ड जन्क्शन स्टेशन जिथे अ‍ॅलेक आणि लॉरा चोरुन भेटत असतात किंवा जब वी मेटमधली गीत चुकून उतरते ते स्टेशन.. रेल आणि रिलचं एक अजब अफेअरच या स्टेशनांवरुन सुटणार्‍या,तिथे थांबणार्‍या ट्रेनमधे जन्माला येत असतं.
चित्तथरारक साहसे,स्फोट,दरोडे,खून याबरोबरच हळुवार प्रेमप्रसंग,भेटी,ताटातुटींचीही दृष्यं,दोस्तीच्या कहाण्या,आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारं तत्वज्ञान किंवा स्टेशनं एकदा मागे पडली की त्याकडे वळून पाहण्याचा काहीच उपयोग नाही,आयुष्यात पुन्हा ते मुक्काम परतून येत नाहीत,त्यावेळी भेटलेली माणसं पुन्हा भेटत नाहीत अशा अर्थांची..आयुष्यातली प्रत्येक भावना जिला दृष्यात्मक परिमाण आहे ती प्रत्येक या पडद्यावरच्या रेलदुनियेमधे मौजुद आहे.
१९०३ मधे एडविन पोर्टरचा'द ग्रेट ट्रेन रॉबरी'आला आणि पडद्यावरचं हे रेल-रिल अफेअर खर्‍या अर्थाने सुरु झालं.त्यानंतर मग आगगाडीवर पडलेल्या दरोड्यांना सिनेमामधे दाखवायची लाटच आली.बुच कॅसिडी आणि द सन डान्स किड -१९६९),मायकेल क्रिश्टनने १९७९ मधे पुन्हा त्याच नावाचा सिनेमा काढून पोर्टरच्या कामगिरीला जणू सलाम केला.मात्र हे कोणतेच मी पाहिलेले नाहीत.७४ला आलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारीत'मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस'ची डिव्हिडी मात्र मिळाली.हा सिनेमा मस्त होता.त्यातली रात्री कंपार्टमेन्ट्स बाहेरच्या पॅसेजमधून जाणारी ती स्कार्लेट किमोनो घातलेली पाठमोरी बाई! एखाद्या कोसळत्या पावसाच्या किंवा हुडहुडी भरवणारी थंडी पडलेल्या रात्री मस्त उबदार ब्लॅन्केट पांघरुन,गरम कॉफीचे कप संपवत बघावा हा मुव्ही!१९३२ साली झालेल्या एका खर्‍याखुर्‍या किडनॅपिंग केसवरुन अ‍ॅगाथाने ही कादंबरी लिहिली होती. इस्तंबूलची ती ओरिएन्ट एक्स्प्रेसही खरीखुरी.स्वतः अ‍ॅगाथाने कादंबरी लिहिण्याच्या काही वर्षं आधी त्यातून प्रवास केला होता. तेव्हा एका बर्फाच्या वादळामुळे तुर्कस्थानातल्या शेर्केस्को स्टेशनच्या आधी तब्बल सहा दिवस ती ट्रेन आणि त्यातले प्रवासी,ज्यात अ‍ॅगाथाही होती अडकून पडले.हे झालं १९२८ साली.त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ३१ साली आपल्या आर्किऑलॉजिस्ट नवर्‍याला भेटून निन्वे गावातून परतताना पुन्हा एकदा अ‍ॅगाथाने ओरिएन्ट एक्स्प्रेसमधून प्रवास केला आणि यावेळी ती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात रेल्वेलाईनच वाहून गेल्यामुळे पुन्हा २४ तास त्या ट्रेनमधे अडकून पडली. अ‍ॅगाथाच्या कादंबरीत आलेले प्रत्येक पात्र म्हणजे तिला या दोन प्रसंगी ओरिएन्ट एक्स्प्रेसमधे भेटलेले खरेखुरे सहप्रवासी.अ‍ॅगाथाने १९३४ साली ही कादंबरी लिहिली आणि अर्थातच ती प्रचंड गाजली.१९७४ साली त्यावर हा सिनेमा काढला गेला तो मुळ साहित्य कलाकृतीशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहूनही उत्कृष्ट सिनेमा कसा बनू शकतो हे सिद्ध करणार्‍या अगदी काही मोजक्या सिनेमांपैकी एक ठरतो.याचे श्रेय दिग्दर्शक सिडनी ल्युमेटचं.१९२०-३० या काळातलं वातावरण इतकं हुबेहुब नैसर्गिक वाटतं यात.यातली मर्डर मिस्टरी जबरदस्त आहेच शिवाय ग्लॅमरस कॉस्च्युम्स,कॅरेक्टर्सचा एलेगन्स,स्टाईल,देखणी सिनेमॅटोग्राफी,त्यातले ते एक से एक स्टार्स-शॉन कॉनेरी,अ‍ॅन्थनी पर्किन्स,लॉरेन बॅकाल,जॉन गिलगुड,व्हॅनेसा रेडग्रेव्ह आणि इन्ग्रिड बर्गमन!अशा कितीतरी कारणांनी हा सिनेमा माझ्या आवडत्या ट्रेन मुव्हीजपैकी सर्वात बेस्ट ठरतो.
रहस्यपटांचा अजून एक सम्राट आल्फ्रेड हिचकॉक सुद्धा या रेलदुनियेच्या इतक्या प्रेमात होता की असं म्हणतात त्याला रेल्वे टाइमटेबलही तोंडपाठ असायचं.'कंपार्टमेन्ट्स सीन्स'हे त्याच्या अनेक सस्पेन्स फिल्म्सचं महत्वाचं अंग.आठवून पहा-३९ स्टेप्स,स्ट्रेन्जर्स ऑन अ ट्रेन,नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट.त्याचा द लेडी व्हॅनिशेस हा सिनेमा तर संपूर्णपणे ट्रान्स-युरोपियन ट्रेनमधे सेट केला होता.ट्रेन कंपार्टमेन्टमधल्या मर्यादित,बंदिस्त जागेचा,गतीचा वापर करुन दृष्यांमधली रहस्यमयता,उत्कंठा,थरार विलक्षण उंचीपर्यंत नेऊन पोचवण्याचे हिचकॉकचे कौशल्य अचाट होते.
हॉलिवुडमधे बनलेल्या टिपिकल रोमॅन्टिक ट्रेन मुव्हीजची तर जंत्रीच डोळ्यापुढे येते.त्यातला द फ्रेन्च कनेक्शन लक्षात ठेवण्यासारखा.मात्र ट्रेनमधे भेटून नंतर नातं फुलत गेलेल्यांपैकी मला सर्वात आवडलेला सिनेमा म्हणजे ९५ला आलेला रिचर्ड लिन्कलेटरचा'बिफोर सनराईझ'..एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे,आयुष्याला नुकते सुरुवात करणारे तरुण जेसी आणि सेलिन. तो अमेरिकन,पुढे जाऊन नक्की काय करायचय याचा काहीच विचार मनात पक्का नाही,असाच भटकायला बाहेर पडलेला.ती फ्रेन्च आर्टिस्ट..शिक्षण संपवून करिअर सुरु करायच्या आधी प्रवासाला बाहेर पडलेली.आजीला भेटायला जाणार असते.दोघांची ओळख होते,गप्पा जमतात.इतक्या जमतात की दोघे ट्रेनमधून मधेच एका स्टेशनवर,व्हिएन्नाला उतरतात.परतायची ट्रेन ठरलेली असते.पहाटेची.त्या वेळेपर्यंत,ती पूर्ण रात्र दोघे शहरातल्या रस्त्यांवरुन निरुद्देश गप्पा मारत भटकतात...अखंड गप्पा. आवडीची पुस्तकं,सिनेमे,संस्कृती,सेक्स,भाषा,न सुटणारे प्रश्न,क्रायसिसवर शोधलेली उत्तरं असं काहीही.त्यातून एकमेकांची अंतर्बाह्य ओळख होते.आयुष्यातल्या संकल्पना स्पष्ट होत जातात...खूप अजब मैत्री जमते दोघांची आणि मग पहाटे सूर्य उगवत असताना दोघे एकमेकांचा फोन नंबरही न घेता आपापल्या ठरलेल्या ट्रेनने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात.एक बेफिकिरी मनात असते कदाचित.आयुष्य इतकं मोठं आहे,गोलही आहे असं म्हणतात.भेटू नक्की असंच स्टेशनवर पुन्हा कधीतरी. कदाचित दोनेक वर्षांतच?त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लोटतात.नऊ वर्षांनी दिग्दर्शकाने याचा सिक्वेल काढला.तो'बिफोर सनसेट'.ज्यात जेसी आणि सेलिन पुन्हा भेटतात.नऊ वर्षांनीच.असंच अचानक.यावेळी दोघे जास्त मॅच्युअर्ड,अनेक अनुभव दोघांच्या गाठीशी.आपल्या तेव्हाच्या गप्पांचा,त्यावेळी व्यक्त केलेया मतांचा,तेव्हाच्या मनातल्या स्वप्नांचा लेखाजोखा आता ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकमेकांशी ते मांडतात तेव्हा मजा येते.ट्रेनमधे सुरु झालेल्या मैत्रीचा असा पुढचा अनोखा प्रवास फार उत्कटतेने यात साकार केला आहे.कोणत्याही हिंदी सिनेमामधे अशी म्हटलं तर औपचारिक पण तरी प्रवासात काही काळाकरता का होईना जमलेल्या नात्यांमधली उत्कटता दाखवली गेली नाही.
भारतीय रेल्वे संपूर्ण जगात सर्वात जास्त लांबीचं जाळ असणारी म्हणून सुप्रसिद्धच आहे.इथली समाजसंस्कृती रेल्वेशी इतकी एकरुप झालेली त्यामुळेच कदाचित पण अगदी नियम केल्यासारखा रेल्वेशी संबंधित निदान एक तरी सीन हिंदी सिनेमांमधे असतोच असतो.हिंदी सिनेमाच्या इतिहासात अगदी सुरुवातीच्या काळात तर अशा रेल-सिनेमांची रांगच होती.१९३०मधे तुफान मेल,डेक्कन क्वीन,फ्रॉन्टियर मेल.ह्यातले ट्रेनच्या टपावरचे फियरलेस नादियाचे स्टंटसीन्स खूप गाजलेले होते म्हणे)सिनेमाच्या शेवटी सुटणार्‍या ट्रेनमधून निघून जाणार्‍या,डब्याच्या दारात उभ्या असणार्‍या हिरो किंवा हिरॉईनला भेटायला आख्खा प्लॅटफॉर्म संपेपर्यंत धावून मग शेवटी बाहेर आलेल्या हाताला पकडून वर ट्रेनमधे अलगद उडी मारणार्‍यांचे क्लायमॅक्स तर शेकड्यांनी सापडतील.अगदी जब जब फुल खिले पासून डिडिएलजे पर्यंत.(धावणार्‍या बहुतेकवेळा हिरॉइनीच आणि हात देऊन वर खेचून घेणारे मात्र हिरो-ही एक टिपिकल हिंदी फिल्मीगिरी).
मात्र एखाद्या डोर सारख्या सिनेमामधे अशाच तर्‍हेच्या क्लायमॅक्सला चालत्या ट्रेनच्या डब्यातून एका स्त्रीचा हात आधार द्यायला बाहेर येतो आणि तो पकडून आपल्या आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात करायला ट्रेनमधे चढणारीही दुसरी एक स्त्रीच असते तेव्हा असा वेगळा शेवट नक्कीच लक्षात रहातो.
मात्र हॉलिवुडच्या तुलनेत रेल्वेवर आधारीत भव्य,थरारक दृष्ये साकारण्यातही हिंदी सिनेमा फारच कमी पडला.रवी चोप्राचा महत्वाकांक्षी द बर्निंग ट्रेन हॉलिवुडच्या द कॅसान्ड्रा क्रॉसिंग आणि द टॉवरिंग इन्फर्नोचं कडबोळं करुन बनवला गेला.त्यात ८०च्या दशकातला प्रत्येक मोठा स्टार होता,बर्‍यापैकी कुशलतेने केलेले स्टंटसीन्स होते पण पडद्यावर बात कुछ जमीं नही.माझ्या दृष्टीने अपवाद एकच-शोलेतला तो घोड्यांवरच्या दरोडेखोरांचा आणि संजिव कुमार,जय-विरूचा मुकाबला,त्यात कोळशांच ते धगधगते निखारे असलेलं इंजिन,तो गोळॉ लागलेला मोटरमन आणि फावड्याने इंजिनात कोळसे लोटत असणारा धरम,टपावरुन उलटी कोलांटी मारत गोळ्या उदवणारा अमिताभ..सॉल्लिड मजा येते अजून प्रत्येक वेळी तो सीन बघताना.धूम २ मधेही ट्र्नमधली हाय प्रोफाईल रॉबरी दाखवली गेली पण सिनेमाच्या शेवटी लक्षात राहिला तो फक्त हॅन्डसम ऋतिकच.
पण हिंदी सिनेमांमधल्या ट्रेन्सच्या डब्यांमधून,खिडक्यांमधून रोमान्स मात्र असंख्य फुलले.त्यांची सुरेल गाणी बनली.ट्रेनमधे चित्रित झालेली ही सर्वच्या सर्व गाणी अगदी बिनचूकपणे मेलोडियसच आहेत.यातल्या अनेक गाण्यांमधे दार्जिलिंगची वळणदार रस्त्यांच्या कडेवरुन हळूवारपणे धावणारी छोटीशी ट्रेन फार महत्वाची रोमॅन्टिक वाहकाची भुमिका बजावते.बतासिया लुपला त्यामुळे अगदी ऐतिहासिकच महत्व प्राप्त झालय.या दार्जिलिंग ट्रेनच्या मोहातून अमेरिकन दिग्दर्शक वेस अ‍ॅन्डरसनही सुटला नाही.त्याने तर'द दार्जिलिंग लिमिटेड'नावाचाच सिनेमा काढला.यातून प्रवास करताना आपल्यातले गैरसमज,भांडणं सोडवू पहाणार्‍या तीन भावांची कहाणी कुछ खास जमी नही.
मात्र हिंदी सिनेमाचा खरा प्रेक्षक खुश होतो तो या दार्जिलिंग ट्रेनच्या टपावर बसून त्यांचा लाडका देव आनंद जेव्हा जिया हो.. जिया हो जिया कुछ बोल दो..'अशी प्रेयसीला मनवणारी गाणी म्हणतो तेव्हा.कधी तो ट्रेनच्या डब्यात बसून बेफिकिरपणे'है अपना दिल तो आवारा..न जाने किसपे आयेगा..'गातो,किंवा वरच्या बर्थवर झोपलेल्या वहिदाला उद्देशून'अपनी तो हर आह इक तुफान है..उपरवाला जानकर अंजान हैं..'असं खट्याळपणे छेडतो,'फुलोंकी रंग से दिलकी कलमसे तुझको लिखी रोज पाती..'अशा काव्यमय प्रेमाची बेहतरीन गाणी गातो तेव्हा हिंदी सिनेमातल्या ट्रेन्स खर्‍या अर्थने लयबद्ध धावायला लागतात.
हिंदी सिनेमांच्या पडद्यांवर असे अनेक अविस्मरणिय रेल-रोमान्स आले आहेत.ट्रेनच्या खिडकीत पुस्तक वाचण्याचा बहाणा करणार्‍या पण सारं लक्ष रस्त्यावरुन जाणार्‍या जीपमधे बसून'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तु..'हे किशोरचं सर्वात प्रसन्न गाणं गाणार्‍या रुबाबदार राजेश खन्नाकडे असलेली,प्रत्येक वेळावलेल्या मानेच्या लाडिक झटक्यातून आणि गालावरची खळी दाखवणार्‍या खट्याळ हसण्यातून फुलटू फ्लर्टींग करणारी आराधनातली शर्मिला टागोर(आणि त्याच ट्रेनमधून ३६ वर्षांनंतर आलेल्या परिणितामधे'कस्तो मजा..'गाणारा तिचा मुलगा सैफ),टपावर बसून रडणार्‍या उदास पद्मिनीला'होगा तुमसे प्यारा कौन..हमको तो तुमसे है प्यार..ओ कांची'गात समजावणारा गोड ऋषी,'झोंका हवाका आजभी जुल्फें उडाता होगा नां..'असं हळुवारपणे आठवणारा हम दिल दे चुके मधला सलमान,टपावर बेभानपणे 'छैंया छैंया..'नाचणारा आणि डिडिएलजेच्या सुरुवातीला आणि शेवटी क्लायमॅक्सलाही ट्रेन पकडण्यासाठी जीव तोडत धावत येणार्‍या काजोलला आश्वासकतेने हात देऊन वर खेचून घेणारा,किंवा'और मै चाहता हूं ये ट्रेन बार बार छुटे'म्हणणारा शाहरुख..तिसरी मंझिलच्या ओपनिंग सीनमधेच ट्रेनच्या डब्यात आशा पारेखला सतावणारा शम्मी आणि त्याच्यासोबतचा तो गोलमटोल शेटजी,अशा कितीकांना सोबत घेत,प्रत्येक पिढीतल्या सिनेमाप्रेमींसाठी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर ही रोमॅन्टिक रेल्वे अखंड धावत राहिली आहे.
प्रेम,मैत्री,वियोग,पुनर्भेटीची हळुवार स्टेशन्स घेत पुढे जाणारी हीच रेल्वे इतिहासातल्या काही काळ्या मानवी कृत्यांनाही पोटात घेऊन धावली आहे.विसाव्या शतकातल्या मानवी क्रौर्याची आणि सहनशिलतेची परिसीमा गाठणार्‍या,मानवी संस्कृतीचा सारा नक्षाच उतरवून टाकणार्‍या दोन घटना-एक ज्यूंचे सामुहिकरित्या केले गेलेले भयानक शिरकाण आणि दुसरी भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत दोन्ही देशांतल्या निरपराध नागरिकांची झालेली कत्तल.फक्त मानवच जबाबदार असलेल्या या दोन भयंकर क्रूर घटनांवर आधारीत सिनेमे जखमेवरची खपली मुद्दाम उचकटून काढण्याचा शापच मिळाल्यासारखे पुन्हा पुन्हा येत रहातात.स्टिव्हन स्पीलबर्गच्या द शिन्डलर्स लिस्टमधला हृदय पिळवटून टाकणारा,ज्यूंचा तो ट्रेनमधला शेवटचा प्रवास,पामेला रुक्सचा'ट्रेन टु पाकिस्तान',दीपा मेहताचा १९४७-अर्थ,अनिल शर्मांचा गदर-यातल्या प्रत्येक सिनेमातली ती निरपराध नागरिकांच्या रक्तबंबाळ देहांनी भरुन ओसंडणार्‍या ट्रेन्सची दृष्ये काळीज थिजवून टाकतात.
२८ डिसेबर १८९५ हा जागतिक सिनेमाचा जन्मदिवस.ल्युमिएर बंधूंनी पॅरिसमधल्या ग्रॅन्ड कॅफेमधे'सिनेमातोग्राफ'चं प्रथम प्रात्यक्षिक करताना जो'चित्रपट'दाखवला त्यात स्टेशनात शिरणारी एक ट्रेन होती.स्टेशनवर ट्रेनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले प्रवासी होते.दूर जाणारे रुळ होते.कोळशाच्या इंजिनाचा धूर सोडणारी आगगाडी स्टेशनवर येताच प्रवाशांची लगबग उडते असं त्यात दाखवलं होतं.सिनेमा पहिल्यांदाच बघणारे प्रेक्षक ती स्टेशनात शिरणारी ट्रेन बघून आधी प्रचंड घाबरले,मग विस्मयचकित झाले आणि त्यानंतर ते जे त्या स्टेशनावरच्या ट्रेनच्या विलक्षण मोहात पडले,ते आजपर्यंत..एक शतक उलटून गेल्यानंतरही त्या झुकझुक आवाज करत,निळ्या आकाशात काळ्या धुराची रेघ सोडत जाणार्‍या पडद्यावरच्या आगगाडीचे आकर्षण यत्किंचितही उणावलेले नाही.
सिनेमाच्या पडद्यावरचा हा प्रवास अविरत चालूच रहाणार आहे.;कारण Like diamonds.. Trains are Forever!
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)