Showing posts with label कधीतरी मी. Show all posts
Showing posts with label कधीतरी मी. Show all posts

Sunday, July 29, 2012

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच!

 मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.

हजार वेळा वाटतं की काश रस्किन बॉन्डसारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रोज इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहावं...

Monday, August 23, 2010

भेट.

झिमझिमत्या पावसात मी आणि मिथिला काल संध्याकाळी एनसिपिएला गेलो.
भन्नाट वारा.
मागे मुंबईचं क्षितिज काळसर पावसाळी ढगांमधे मावळत गेलं.रस्त्यावरची माणसांची गर्दी मागे मागे जात रस्ता शांत होत गेला.
एनसिपिएच्या टोकाला वेडावाकडा वारा आणि पावसाच्या सरी.पावसाच्या एका जोरदार झोतात आम्ही क्षणात चिंब भिजूनच गेलो. काही हरकत नाही.एकमेकींकडे समजुतदारपणे पहात आम्ही हसलो.निसर्गाचा मुक्त आविष्कार अंगावर झेलूनच त्याला भेटण्यात मजा.
फॉयरमधे टेबलावरची त्याची पुस्तकं चाळत असताना मागे किंचित लोकांची गडबड.मिथिलाने अधिरपणे खांद्यावर हात टेकवत मागे पहायला खुणावलं.
रस्किन बॉन्ड.वाटोळा,गोल गोरा चेहरा,ओठांवरचं मिश्किल हसू,चष्म्याआडचे उत्साही,लुकलुकते निळे डोळे.
रस्टी तोच होता.अजूनही तसाच.'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय..इट इज यू अँड आय..!'त्यानेच एके ठिकाणी लिहिलं होतं ते आठवलं.
ओळख पटताच मी त्याच्याजवळ गेले.माझीही ओळख दिली.हातात हात मिळवला.
त्याच्या हातांचा गार स्पर्श हिमालयाच्या शिवालीक पर्वतराजींमधून वहात येणार्‍या झर्‍यासारखा नितळशांत.
"तुमची पहिली भेट लॅन्डोरमधे व्हावी असं मनापासून वाटत होतं.पण आत्ता इथे मुंबईमधे होतेय आणि इतक्या सहज ह्याचही अप्रुप वाटतय खूप."माझा आवाज किंचित कापत होता."पण मी लॅन्डोरला येणार आहे हे नक्की.कदाचित ह्याच मार्चमधे."
त्याने कुतूहलाने माझं बोलणं ऐकून घेतलं."नक्की या.भेटायला आवडेल तिथे.सीझनही फार छान असतो त्यावेळी"तो मी पुढे केलेल्या त्याच्या'द बुक ऑफ नेचर'वर ऑटोग्राफ देत म्हणाला.
मी आनंदाने मान डोलावली.मनात हसूनही घेतलं.ऋतूंच्या चांगल्या असण्या नसण्याशी मला काय देणं घेणं?हिमालयातला प्रत्येक ऋतू रस्किनचा हात धरुनच तर पाहून झाले आहेत.
त्याने ईमेलमधे सुचवल्याप्रमाणे मी त्याच्या अनुवादित केलेल्या कथांच्या प्रती आणल्या होत्या त्या सोपवल्या.त्याने आभार मानले.काही इतर बोलणंही झालं.त्याच्या भोवती आता हळूहळू इतर चाहत्यांची,क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवार्डच्या शॉर्टलिस्टेड लेखकांची,मेंबर्सची गर्दी वाढायला लागली.माणसांनी त्याला घेरून टाकलं.मी काढता पाय घेतला.मला तसाही आता आतल्या ऑडिटोरियममधे होणार्‍या कार्यक्रमामधे काही इंटरेस्ट राहिलेला नव्हता.रस्किन बॉन्डला भेटण्यासाठीच फक्त मी आले होते.
जिना उतरुन खाली आल्यावर आम्ही परत मागे वळून वर पाहिलं.
माणसांच्या जंगलात रस्टी बावरुन गेला होता.

Wednesday, July 21, 2010

चीनमधून बेचैन

नाही.ही काही चीनचं राजकीय वगैरे विश्लेषण मनात ठेऊन केलेल्या प्रवासवर्णनाची सुरुवात नाही.
गेले जवळपास दोन महिने चीनमधे होते आणि तरीही असलं काहीही मी करणार नाहीये.इतक्यात :P
यावेळी तिकडे जाताना साईटसिईंग फारसं मनात नव्हतं.
एकतर माझ्यासोबत भटकत बसायला मोशायला वेळ असेलच असं सांगता येतं नव्हतं कारण ही माझी प्लेझर टूर असली तरी त्याची स्ट्रिक्टली बिझिनेस टूर होती.आणि भाषा येत नसताना एकटीने चीनमधे फिरणं,तेही तुम्ही ओन्ली व्हेज कॅटगरीमधे असताना तर निव्वळ अशक्यप्राय गोष्ट.तरीही चीनमधे एकंदरच चिक्कार भटकणं झालं.Unplanned.तिथे झालेली माझी मैत्रिण श्यू तिच्या पीचफार्मर आईवडिलांकडेही रहायला घेऊन गेली.अगदी छोट्याश्या त्या गावात रहाताना इतकं सुंदर वाटलं.पर्ल बकच्या कादंबरीतल्या साध्यासुध्या चिनी शेतकर्‍यांनाच अवतीभवती बघतेय असं अनेकदा वाटलं.शांघाय, बेजिंगने त्यांच्या आलिशान नखर्‍याने जितकं मला प्रभावित केलं नाही तितकं श्यूच्या त्या लिनहाय गावाने केलं.
यावेळी चीनमधे वेळ आहे तेव्हा मी माझी गेले 4-5 वर्षं अर्धवट लिहिली गेलेली कादंबरी नक्कीच पूर्ण करणार असं जाताना मारे मोशायला दहादा सांगितलं.अगदी वागवायला आणि वापरायला सुटसुटीत लेनोव्हो नेटबुकही त्यासाठी घेतलं.पण त्या कादंबरीची अगदी एकही ओळ लिहून झाली नाही.एकंदरीतच माझ्याबाबतीत प्लॅनिंग हा प्रकार काम करत नाही.म्हणजे टुडू लिस्ट्स वगैरे अगदी भारंभार रोज बनवणार.पण त्यापैकी प्रत्यक्षात दहा टक्केही उतरणार नाही.रोज उठून मोशायच्या अपार्टमेन्टबाहेरच्या त्या सुंदर गार्डनमधे मी अगदी नेटबुक घेऊन जाणार आणि मग गार्डनला लगटून वहाणार्‍या नदीकडे नाहीतर आजूबाजूला पळणार्‍या सफरचंदी गालांच्या चिनी बच्चेकंपनीकडे,तिथल्या जॉगिंगला आलेल्या पेन्सिल-स्लिम देहयष्टीच्या चिनी सुंदर्‍यांकडे आणि त्यांच्या त्यामानाने जरा यडचापच दिसणार्‍या चिनी जोडिदारांकडे पहात नुसतंच नेटबुकचा चार्ज संपवण्यात बराच काळ घालवणार.नाहीतर युबिसी कॅफेमधे बेजिंग हुटांग्स न्याहाळत नुसतीच तंद्री लावणार.असं अनेकदा झाल्यावर मी तो प्रकारच बंद केला.इथे असताना मोशायचे कान अक्षरशः किटवून टाकले होते अनेकदा की मला निवांत, निसर्गरम्य ठिकाणी, झिमझिमत्या पावसाला काचेतून पहात,हातात कॉफीचा कप घेत दिवसचे दिवस घालवण्याची संधी मिळू देत.बघ मग माझी कादंबरी कशी लग्गेच पूर्ण होईल.कप्पाळ.एक प्रकरणही पूर्ण केलं नाही.हा चायना नोट्स मात्र रेग्युलर काढल्या.आणि हजारांनी फोटो काढले.तिथून ब्लॉगसाईट अ‍ॅक्सेस होत नव्हती नाहीतर अगदी रोज एक चायना पोस्टकार्ड टाकलं असतं इथे इतकं सारं निरर्थक सुंदर जमा होत होतं जवळ.
इथे आलेय परत तर डोक्यावर पुन्हा धबाधबा लिहिण्याच्या प्रोफेशनल असाईन्मेन्ट्स कोसळायला लागल्यात.ज्यांच्या डेडलाईन नेहमीप्रमाणे गेल्याच आठवड्यात संपल्यात.मोशाय पुन्हा परदेशात गेला.आता नेहमीच रुटीन धावपळीचं चक्र चीड्चीड होण्याइतक्या सुरळीतपणे सुरु होईल.आता हातातला शिल्लक वेळही बघता बघता संपून जाईल.चिन्हं वार्षिकाचं काम सुरु होईल.रविवर्मा स्टोरीचा पुढचा भाग करायचा आहे.थोडक्यात काय तर ऑफिस, फ्री- लान्सिंगच्या चक्रात बाहेरचा सुंदर झिमझिमता पाऊसही बघण्याइतकी चैन परवडणारी नाहीये सध्या काही दिवस.
भटकून पोट मात्र कधीच भरत नाही उलट खिसे नको इतके रिकामे होतात हे नेहमीप्रमाणेच लगेच कळलं.इतका खर्च झालाय की खड्डा भरुन काढायला पुन्हा नको त्या असाईन्मेन्ट्स स्विकारल्या जाणार.पुन्हा भटकंतीचे प्लॅन्स करायचे तर त्यासाठी पुरेसे पैसे जमवणं भागच आहे हे क्रेडीट कार्डाचे चेक्स भरताना नेहमीसारंखच डोळ्यापुढे चमकून गेलं.नैराश्याच्या झटक्यात ठरवूनही टाकलं आता कुठेही जाणार नाही पण अमृताचा फोन आल्यावर ऑगस्टमधे लेहलदाख करायचे प्लॅन्स सुरु झालेही.बिच्चारी कादंबरी पुन्हा एकदा नेटबुकमधेच बंदिस्त.पुन्हा आता जेव्हा मी अगदी निवांतपणे,एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तासंतास हातात कॉफीचा कप घेऊन लिहिण्याची चैन करायला जाईन तेव्हा होईलच म्हणा ती पूर्ण.नाहीच तर मार्गारेट मिशेल किंवा गेला बाजार नेमाडेंनंतर कादंबरी लिहायला घेतल्या गेलेल्या सर्वाधिक वेळेची नोंद माझ्या नावावर होईल हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------P.S.
जावेद अख्तर खूप वगैरे काही आवडत नाही.पण ट्विटरवर त्याने लिहिलेलं बरेचदा आवडतं:-
वापस जो चाहो जाना तो जा सकते हो
मगर
अब इतनी दूर आ गयें हम;देखो,अब नही

Thursday, March 25, 2010

..

अभिजीत देसाई गेला याबातमीवर विश्वास ठेऊ म्हणता ठेवताच येत नाहीये. नुकतंच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा कॉल आहे बघीतलं की मुद्दाम तो मिस करायचे आणि उलटा त्याला कॉल लावायचे.कारण एकच त्याची ’पुकारता चला हुं मैं..’ ची कॉलर ट्यून. त्याला ते माहित होतं त्यामुळे तो ती पूर्ण वाजू दिल्याशिवाय कॉल उचलायचा नाही. ते गाणं त्याच्या सेलवर एकलं की अभिजीत देसाईचं सगळं व्यक्तिमत्व समोर उभं रहायचं. त्याच्या फ़िल्म्सच्या, गाण्यांच्या आवडींसकट.तसाच होता तो अगदी. अभिजीतच्या बाबतीत ’होता..’ हे शब्द लिहिताना इतकं अस्वस्थ वाटतय.

अभिजीतच्या लोकप्रभामधल्या लिखाणाची मी प्रचंड चाहती होते. मला सिक्सटिजचं व्यसन लागायला तुझे लेख कारणीभुत असं सांगितलं की तो खुश व्हायचा.आणि ते खरंच होतं. जुन्या फ़िल्म्स त्याचं ऑब्सेशन होतं. रेग्युलर लिही गं रिलॅक्ससाठी म्हणून तो खूप कळकळीने सारखा सांगायचा. पण मला नियमित लिहायला जमायचं नाही. पण अमुक एक विषयावर लिहायचं डोक्यात आहे असं म्हटलं की त्याचा आवर्जून आठवण करुन द्यायला, लवकर लिही म्हणायला, काही संदर्भ हवे आहेत का तुला ते विचारायला फोन येणारच येणार.
त्याच्याकडचा संदर्भ अचाट होता. सिक्स्टीजच्या काळाचं त्याचं फ़ोटोकलेक्शन अफ़लातून होतं. ते त्याचं स्वत:च वैयक्तिक कलेक्शन होतं. कॉलेजात असल्यापासून मी हे फोटो जमवतोय सांगायचा. आणि अगदी अभिमानाने तो ते फोटो दाखवायचा. त्याच्याकडच्या फोटोंमुळे लेखाला शोभा यायची. कमालीची माहिती होती त्याच्याकडे त्या एकेक फोटोंसंदर्भात. एकदा निट बसून ऐकायच सगळं असं कितीदा म्हणाले त्याला.

भानूजींच्या लेखाबद्दल नेहमीप्रमाणेच मी देते रे, नक्की उद्या असा एक हवेत वायदा केल्यावर बघ हं पुन्हा फोन नाही करणार यासाठी तुला असं धमकावून त्याने फोन डिसकनेक्ट केला होता.आता पुन्हा त्याचा कॉल मिस करायची संधीच हा माणूस मला देणार नाहीये. इतकं हॉरिबल वाटतय अशा विचारांनी. इतकं भरभराटीला आलेलं करिअर, तो लिहिणार असलेली पुस्तकं.. सगळच अर्धवट. आणि त्याची गोड बायको आणि मुलगी.. बाप रे. त्यांचा तर विचारच करवत नाहीये. असं कोणी इतक्या सहज निघून जावू शकतं कायमचं?
अभिजीत.. इतक्या गप्पा अर्धवट राहिल्यात आपल्याही. आमच्यासारख्या तुझ्या इतक्या चाहत्यांना सांगण्यासारखं तुझ्याकडे इतकं सारं होतं ते न सांगताच असा अर्ध्यात निघून गेलास..
वी विल मिस यू ट्रिमेन्डसली!

Monday, March 08, 2010

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या, किंवा त्याकाळात पडावे लागलेल्या काही महिलांनी मतदानाचा हक्क, समान पगाराच्या, कामाच्या ठिकाणी किमान सोयीच्या मुळ मागणीपासून सुरु केलेला एक लढा बघता बघता स्त्रीमुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे चालवला गेला.
चळवळ सुरु झाली ती वेळ, तो काळच असा होता की स्त्रीमुक्तीचा शारिरीक आणि मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची नितांत गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगनला भरलेल्या एका आंतराराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात क्लारा झेटकिन्स या जर्मनीतल्या स्त्रीवादी कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करु शकतील अशी कल्पना पहिल्यांदा मांडली. एकत्रित जागतिक महिला दिनाच्या या कल्पनेला सतरा देशांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शंभर महिलांनी त्यादिवशी जोरदार पाठिंबा देत उचलून धरले. त्या शंभर महिलांमधे जगात पहिल्यांदाच संसदेमधे निवडून येण्याचा मान मिळालेल्या तीन फिनिश संसद सदस्य महिला होत्या आणि इतर महिला कामगारांच्या प्रतिनिधी होत्या.
१९१० सालच्या महिलामेळाव्यात 'आंतराष्ट्रीय महिलादिनाची' कल्पना पहिल्यांदा मांडली गेली याअर्थाने आजचा २०१० सालातला महिला दिन शंभरावा होऊ शकतो. अर्थात याचे बीज याआधी दोन वर्षे म्हणजे १९०८ साली न्यूयॉर्क शहरामधे १५०० कामगार महिलांनी जो संतप्त मोर्चा काढला होता त्याचवेळी पडले होते तेव्हा शंभरावा महिला दिन २००८सालीच होऊन गेला असेही काही जण म्हणतात. तर काहीजण म्हणतात जरी कोपनहेगनला महिला दिनाचा संकल्प सोडला असला तरी तो अधिकृतरित्या साजरा झाला पुढच्या वर्षी म्हणजे १९११ साली ऑस्ट्रिया, जर्मनी येथे तब्बल दोन लाख महिलांच्या उपस्थितीत. तेव्हा शंभरावा वाढदिवस २०११ साली.
शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला दिन नक्की कधी या वादाला अजिबात महत्त्व नाही कारण मानवमुक्तीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात अशी एक दोन इकडची तिकडची वर्षे खरोखरच क्षुल्लक ठरतात. खरे महत्त्व आहे ते स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल नक्की कशी होत गेली ते जाणून घेण्याला.
स्त्रीवादी चळवळींची सुरुवात मूलतः झाली 'लैंगिक समानते'च्या विचारांमधून आणि ती व्यापक होत 'स्त्रीहक्का'च्या मागणीपर्यंत येऊन स्थिरावली. या चळवळींच्या वाटचालीत असंख्य वळणं, खाचखळगे, उंचवटे येत राहिले. त्यांना विरोध तर कायमच होत राहिला. 'फेमिनिझम' हा मुळचा फ्रेन्च शब्द १८९५ साली यूकेच्या 'डेली न्यूज' मधून पहिल्यांदा इंग्लिश भाषिकांच्या नजरेस पडला तेव्हापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. आणि ती सुद्धा क्वीन व्हिक्टोरियाकडून " mad, wicked folly of 'Woman's Rights" अशा शब्दांमधे!
मात्र या आधी बरीच वर्षे, अगदी अठराव्या शतकातच एका नव्या स्त्रीवादी विचारसरणीचा उदय झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट नावाच्या एका तत्वज्ञ विचारसरणीच्या लेखिकेने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकाद्वारे. फेमिनिस्ट विचारधारा रुजवणारी ही पहिली लेखिका. मेरीने आपल्या पुस्तकातून स्त्रियांची जडणघडण आणि शिक्षण लहानपणापासूनच पुरुषी दृष्टीकोनातून, त्यांना काय आवडेल या विचारांतूनच केले जात असल्याने स्त्रियांची स्वतःबद्दलची अपेक्षाच मर्यादित रहाते हा विचार मांडला तो त्याकाळाच्या मानाने धाडसाचा होता आणि त्याबद्दल तिला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. मेरीच्या मते समाजातल्या भेदभावाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच जबाबदार असतात, पुरुषावर वर्चस्व गाजवण्याची प्रचंड ताकद स्त्रीमधे असूनही ती आपल्या शक्तीचा वापर करत नाही असे तिचे मत होते. अपुर्‍या आणि चुकीच्या शिक्षणामुळे बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात हा विचारही तिच्या पुस्तकात होता. तिने मांडलेल्या काही प्रश्नांना आजही समाधानकारक उत्तरे मिळू शकत नाहीत.
एकोणिसाव्या शतकात जेन ऑस्टिन, एलिझाबेथ गॅस्केल, ब्रॉन्टे भगिनी, लुइझा मे अल्कॉट सारख्या लेखिका स्त्रियांचे प्रश्न, त्यांची दु:ख, निराशा याबरोबरच सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखाही आपल्या कादंबर्‍यांमधून मांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आदर्श स्त्रीच्या 'व्हिक्टोरियन इमेज'मधे स्त्रियांना गुदमरवायला कारणीभूत ठरलेल्या 'द एंजल इन द हाऊस' सारख्या पुस्तकांच्या आकर्षणातून स्त्रियांना बाहेर काढणे फार कठीण होते. १८४३ साली मरियन रीड नावाच्या स्कॉटिश लेखिकेने A plea for women मधून पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्याच्या अन्यायाबद्दल लिहिले आणि आपल्याला काही सुप्त अधिकार आहेत ज्यांचा वापरच आपण अजून केला नाही हा विचार जोमाने काही जागरुक स्त्रियांच्या मनात पसरला. याच सुमारास आपल्या वैवाहिक जीवनातल्या अत्याचारांना बळी जायचे नाकारत घराबाहेर पडलेल्या कॅरोलिन नॉर्टन या ब्रिटिश महिलेला स्त्रियांना कायद्याचे पाठबळच नसल्याची जाणीव विदारकपणे झाली होती. पण तिने आवाज उठवला होता आणि अगदी राणी व्हिक्टोरियापर्यंत जाउन दाद मागितली होती. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना किमान कायद्याचे संरक्षण तरी असावे हा विचार ब्रिटनमधे सुशिक्षितांमधे चर्चेला आला.
अर्थातच स्त्रियांचे हे प्रश्न सुटे सुटे चर्चेला येत होते आणि स्त्रियांचा परस्परांना पाठिंबा तर अजिबातच नव्हता. उलट अशा घरफोड्या आणि विद्रोही विचारधारेच्या स्त्रियांपासून आपण किती वेगळ्या आहोत हे दाखविण्याची चढाओढच समाजातल्या प्रतिष्ठित महिलांमधे होती. एखादीच फ्लोरेन्स नाईटिंगेल त्या काळात होती जिला आपल्यातल्या क्षमतेची जाणीव होती आणि त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत तिने आपल्याला हवी तीच करिअर निवडण्याचे धाडस तेव्हा दाखवले.
मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव हळूहळू होत होता आणि स्त्रियांचे वैवाहिक अधिकार, मालमत्तेवरचा अधिकार, कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवज उठवण्याचे धाडस अशा विषयांना तोड फुटत होते. बार्बारा लिग स्मिथने ब्रिटनमधे स्त्रियांना एकत्र बोलावून, चर्चा करण्याचे, सभा घेण्याचे काम सुरु केले. त्यांच्या सभा लॅन्गहॅम पॅलेसमधे व्हायच्या आणि म्हणून या 'लेडिज ऑफ द लॅन्गहॅम पॅलेस'. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८५५ मधे विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकारांसाठी कमिटी नेमली गेली. स्त्रिया निदान स्वतःचे प्रश्न मांडायला एकत्र जमायला लागल्या होत्या. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल होते.
स्त्रीवादी चळवळींचा हा सुरुवातीचा इतिहास जेव्हा स्त्रियांचे प्रयत्न एकाकी, अपुरे होते. पण त्यातूनच पुढे शैक्षणिक क्षेत्रात, राजकिय, सामाजिक क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढला. वाढतच गेला.
स्त्रीवादी चळवळींना नंतरच्या काळातही काही अतिरेकी, हटवादी स्त्रीकार्यकर्त्यांमुळे असेल किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या पक्क्या पारंपरिक पुरस्कर्त्यांच्या कडव्या भुमिकेतून आलेल्या विरोधामुळे असेल.. पण एक उपहासात्मक स्वरुप लाभत गेले. आजही त्यांची चेष्टा उडवणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. परंतु स्त्रियांनी शिकावे, त्यांचे राहणीमान उंचावावे, स्वत्व-सन्मानाची ओळख त्यांना व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्या सबल व्हाव्यात, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, मतदानाचा अधिकार मिळावा, समाजात एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून तळमळीने ज्यांनी ज्यांनी काम केले होते त्यांचे जर स्मरण आज प्रत्येक स्त्रीने (आणि स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा) केले नाही तर तो मानवी कृतघ्नपणा ठरेल.
'संयुक्ता' तर्फे जागतिक महिला दिनाचे स्मरण याच कृतज्ञ भावनेतून ठेवले जात आहे. स्त्रीवादी चळवळींचा इतिहास, त्यातले महत्वाचे टप्पे,स्त्रीवादी चळवळींचे कार्यकर्ते या सार्‍यांबद्दल 'संयुक्ताच्या' व्यासपीठावरुन आपण जाणून घेऊया.
'फेमिनिस्ट' चळवळीला ज्यांचा हातभार लागला त्या सार्‍याच कार्यकर्त्यांची नोंद इतिहासही ठेवू शकला नाही. काही महत्वाची नावे मात्र कधीही विस्मृतीत जाऊ नयेत-कारण काल 'त्या' होत्या म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत.

एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन (१८१५ ते १९०२)- पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना हिने केली.
ग्रेस ग्रीनवूड (१८२३ ते १९०४)- पहिली महिला वार्ताहार.
मरियन हाईनिश( १८३९-१९३६)- स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला.
केट शेफर्ड (१८४७-१९३४)- स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून या न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला गेला. १८९३ साली तिथे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले.
एमिलिन पॅन्खर्स्ट (१८५८-१९२८)- ब्रिटनमधे हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली.
बिबी खानुम अस्तराबादी ( १८५९-१९२१)- इराणियन लेखिका. स्त्रीवादी चळवळीची बीजे इराणमधे रुजवण्याचे कार्य हिच्या हातून सुरु झाले.
इडा बी. वेल्स (१८६२-१९३१)- अमेरिकेत स्त्रियांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून लढा देणार्‍या महिलांमधे पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला म्हणून हिचे नाव महत्वाचे ठरते.
शिरीन इबादी(१९४७)- स्त्रिया आणि मुले यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हिने उभारलेली चळवळ फार महत्वाची ठरते. स्त्रीवादी चळवलींमधे नोबेल शांती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला.
कॅरोलिन एगान- मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची पहिली पुरस्कर्ती.
एमिली हॉवर्ड स्टोवे - व्यावसायिक वैद्यकिय संघटनांमधे स्त्रियांना सहभागी करुन घेतले जावे यासाठी प्रयत्न. कॅनडामधे स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ.
अन्सार बर्नी (१९५६)- पाकिस्तानमधे स्त्रीवादी चळवळीचे विचार पसरवण्यासाठीचे प्रयत्न जाहिररित्या सुरु करण्याचे धाडस हिने प्रथम दाखवले.

इराणियन-कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई, इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान, केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत. याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका, कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले. स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते.

काही भारतीय नावे ज्यांनी काही ना काही प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व माजी आणि भावी कार्यकर्त्यांना समर्पित करुया.

Tuesday, August 04, 2009

असंच!

( खरं तर या पोस्टला काही अर्थ नाही तसा. पण अर्थाचंच लिहायला हवय असं कोणी सांगीतलं? अर्थात मुद्दाम ठरवून निरर्थक लिहायचं असंही काही नाही. मेल थ्रू पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करायचं बरेच दिवस मनात होतं ते आज करायचं ठरवलं पण विषयच डोक्यात नव्हता. मग समोर एचटी च्या संडे सप्लीमेन्टमधून दोन चिरतरुण सुंदर चेहरे डोकावताना दिसले. )

महाराणी गायत्री देवी आणि अभिनेत्री लीला नायडू.
दोन्ही सर्वात सुंदर स्त्रिया लागोपाठ जाव्यात हा काय विचित्र योगायोग? केवळ व्होगच्या यादीत प्रसिद्ध झाली त्यांची नावे म्हणून त्या जगातल्या सर्वात सुंदर स्त्रिया असं नाही मला म्हणायचं. खरोखरच अतिशय क्लासिक चेहरे होते दोघींचे.

सिक्किम ट्रेकला आम्ही गेलो होतो तेव्हा येताना कुचबिहार संस्थान ला दोन दिवस राहिलो होतो. जवळच लतागुरी अभयारण्य होतं ते पहाणं हा मुख्य हेतू होता. सिक्किम-भुतानचा नितांत सुंदर निसर्ग पाहिल्यावर कोणत्या कधी नावही न ऐकलेल्या कुचबिहार संस्थानातले कोणे एका काळातले राजवाडे आणि गतवैभव पहाण्यात निदान मला तरी बिल्कूल इंटरेस्ट नव्हता. शिवाय त्या राजवाड्याचं रुपांतर म्युझियममधे केलं आहे हे ऐकल्यावर तर ते स्कीपच करायचं ठरवलं. पण मग लतागुरी दुस-या दिवशी बघायचं ठरलं आणि कुचबिहारच्या हॉटेलात संध्याकाळ घालवणं जिवावर आलं. राजवाडा सरप्राइजींगली अतिशय उत्त्तम अवस्थेत होता. उतरत्या संध्याकाळी तिथे रोषणाईसुद्धा केली होती.
राजवाड्यात शिरल्यावर पहिल्याच दालनात एका डिव्हाईनली सुंदर टीनएज मुलीचा घोड्याशेजारी उभा असलेला एक ब्लॅक ऍन्ड व्हाईट आता सेपिया टोन आलेला फोटोग्राफ पाहिला आणि पाय हलेचनात. रोमन हॉलिडेमधली ऑड्रे हेपबर्न माझ्यामते आत्तापर्यंतची सर्वात सुंदर रॉयल ब्युटी. पण हा फोटो तर तिच्यापेक्षाही निदान शंभर पटींनी सुंदर होता. सारं दालनच या सुंदर मुलीच्या फोटोंनी भरुन गेलेलं. अगदी तान्हेपणापासून पुढच्या सर्व टप्प्यांमधे ते सौंदर्य उमलत जाताना प्रत्येक फोटोत दिसत होते.
कुचबिहार म्हणजे गायत्रीदेवींचे जन्मस्थान हे मला माहितच नव्हते. काहीशा अंधा-या त्या दालनात प्रत्येक छायाचित्रातून गायत्री देवींचे अलौकिक सौंदर्य उजळून निघत होते. कमळासारखे डोळे असणे म्हणजे काय हे त्यादिवशी कळलं.
इतर राजघराण्यातील स्त्रियांनी कितीही तलम शिफॉन नेसून गळ्यात टपो-या मोत्यांचा दुपदरी सर घालून महाराणी गायत्री देवींची नक्कल केली तरी त्यांच्या त्या अस्सल क्लासिक फ़ेस कटची बरोबरी करता येणे कुणाला कधीच शक्य नव्हते.

आणि लीला नायडू!!

मला खूप पूर्वी टीव्हीवर पाहिलेला ब्लॅक ऍन्ड व्हाईट ’अनुराधा’ अनेक कारणांसाठी कधीही विसरता आलेला नाही. त्यातली ती नाजूक, क्लासिक युरोपियन चेहरे शैलीतली अभिनेत्री, बलराज सहानीची संयत एक्स्प्रेशन्स, रवीशंकरांची त्यातली सतार आणि ते गाणं.. जाने कैसे सपनोंमे खो गयी आखियां... ’

नंतर कधीतरी बेनेगलच्या त्रिकाल मधे सुद्धा लीला नायडू दिसल्या होत्या. तेव्हां प्रौढ वय असणार त्यांचं. पण तरीही तितक्याच आवडल्या.

मात्र या कितीही सुंदर स्त्रिया असल्या तरी वयानुसार काळाला सुद्धा आपल्या खुणा त्यांच्या चेह-यावर उमटवण्याचा मोह आवरणे शक्य झाले नसावे. त्या तशा उमटल्याही. पण सौंदर्य किंचितही न उणावता.

गायत्री देवी आणि लीला नायडू या दोघींच्या वृद्धत्वातल्या चेह-यावरचं सुरकुत्यांचं अस्पष्ट जाळं पाहिलं की मला जीएंची ती अप्रतिम उपमा आठवते. " एखाद्या तेजस्वी महावस्त्राला अंगभुत पडलेल्या चुण्या असाव्यात तशा त्या खानदानी चेह-यावरच्या सुरकुत्या .." वृद्धत्वातल्या सौंदर्याचं इतकं अचूक वर्णन दुसरं नाही आणि ह्या शब्दांना सार्थ ठरवणारे इतके सुंदर चेहरेही दुसरे नाहीतच.

Saturday, March 14, 2009

पेल्टोफ़ोरम डायरी


फ़ेब्रुवारी महिना संपला.
उन्हाळा चांगलाच सुरु झालेला आहे. मुंबईत तो तसा कधी नसतो म्हणा! पण या दिवसांत घाम कमी त्यामुळे उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवतो. आजूबाजूचा शिल्लक निसर्गही धूळभरला, रुक्ष आणि कोमेजलेला.
भर दुपारी माझ्या खिडकीबाहेरच्या त्या कृश, काटकिट्या, तपकिरी फांद्यांचा पसारा कसाबसा सावरत उभ्या असणा-या उदास पेल्टोफ़ोरमला (दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा असाच दिसतोय) पहात मी हातातलं रस्किनचं पुस्तक हताशपणे मिटते. मला त्याचा (पुन्हा एकदा) हेवा वाटत असतो. या दिवसांत त्याच्या खिडकीबाहेरच्या चेरीच्या झाडांवर गुलाबी कळ्या उमलायच्या घाईला आलेल्या आहेत. वसंत त्याच्या दाराशी आहे अगदी आता. हिमालयातल्या देवदारांनी भरलेल्या उतारांवरच्या गावातल्या त्याच्या घराच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याच्या हाताच्या अंतरावर असतो. आणि तो लवकरच फ़ुलणार असतो.

------------------

मार्चचा पहिला आठवडा संपत आला. उन आता अजूनच वाढलय. अगदी सकाळी आठलाही डोळ्यांवर गॉगल्स चढवावे असं वाटायला लागतं. अकरानंतर तर घामाच्या धाराच सुरु होतात. आंब्यांना आणि ब-याचशा झाडांना छान कोवळी पालवी फ़ुटतेय तांबुस.
माझ्या खिडकीबाहेरचा पेल्टोफ़ोरम अजूनही तसाच आहे. मळकट, तपकिरी सुकलेल्या आपल्य काटकिळ्या फांद्यांचा ढिगारा कसाबसा सांभाळत. काही घरी येणारे तर अगदिच मेलय हे झाड असंही खुशाल म्हणतात. मी लक्ष देत नाही.

-------------------

यावर्षी मुंबईत थंडीही अजिबात पडली नव्हती. फ़ेब्रुवारी महिना संपत आला की खिडकीच्या काचांआडून सोनसळी, उबदार उन्हाच्या लडी अंगावर खेळायला सुरुवात व्हायची आणि कदाचित म्हणूनही असेल पण पेल्टोफ़ोरमचे ते कृश विरुप नजरेला एरवी इतकं खुपायचं नाही.
पण आता त्याकडे बघवेना. संक्रांतीच्या आसपास उडवलेल्या पतंगांपैकी एक पांढरा पतंग एका काडीसारख्या सुकलेल्या फांदीच्या टोकावर अडकून निर्जिवपणे हलत होता. तेव्हढीच काय ती त्या झाडावर जिवंत हालचाल.
शिशिर ऋतुंत तसंही पेल्टोफ़ोरमवर मागे राहिलेलं अस्तित्व असतं फक्त तांब्याच्या लांबट चपट्या शिक्क्यांसारख्या दिसणा-या शेंगांचं. त्या काटकिळ्या फांद्यांना झाकून टाकून आपलं रस्टी कॉपरशिल्ड बेअरर नाव सा-या हिवाळाभर सार्थ करत रहातं हे झाड.
पेल्टोफ़ोरमवर अजून ताम्रयुगच चालू आहे एकंदरीत. हवेत मार्च महिन्यातला ताजा, सोनेरी गंध पसरला असला तरी या झाडावर त्याच्या सुवर्णयुगाची वैभवी झळाळी पसरायला अजून वेळ आहे. वसंत फार दूर आहे...!

------------------------

मार्चचा दुसरा आठवडा सुरु झाला आणि एका पहाटे खिडकीच्या काचेबाहेरचे केशरी पडदे दूर केल्या केल्या समोरच्या उगवतीच्या फिकट कोवळ्या प्रकाशातून एक तेजस्वी, पोपटी, तजेलदार हिरव्या नव्हाळीचा झोतच सामोरा आला. गेले दोनेक दिवस छोट्या, हिरव्या चिंचेच्या पानांहून खूपच सतेज आणि थोड्या मोठ्या आकाराच्या पानांचे झुबके फांद्यांच्या कृश हातांच्या ह्या त्या कोप-यांवर झालरींसारखे झुलत होते खरे पण त्याचा हा एवढा मोठा हिरवा मंडप असा एका रात्रीतून बनेल असं वाटलच नव्हतं.

मी अतीव आनंदाने काचा उघडते. पानांचा हिरवा पिसारा नजरेसमोर फ़ुलून आला होता. पोपटी पानांच्या गर्दीतून मधूनच माना वर काढून आता सोबत मिळाल्याच्या आनंदात डुलणारे ताम्रवर्णी शेंगांचे तुरे अचानक देखणे, सतेज दिसायला लागले.
सूर्य पूर्ण उगवला आणि त्याच्या सोनेरी प्रकाशाचे झोत आज नेहमीसारखे डायरेक्ट खिडक्यांमधून घरात अधिरपणे नाही घुसले. हिरव्या पानांशी लडिवाळपणे बिलगून पूर्ण एका पानगळीच्या मोसमात राहून गेलेल्या गप्पांची देवाणघेवाण करुन झाल्यावर मग सावकाश ते माझ्यापर्यंत पोचले.
मला घाई नव्हती.
नजरेसमोरची सोनेरी हिरव्या कवडशांची नक्षी आता हा एक आख्खा वसंत ऋतूभर माझ्या खिडकीबाहेर माझ्यासाठी ओठंगून राहणार होती. शिवाय आता लगेचच येणा-या एका रात्रीत कधीतरी ह्या हिरव्या नकाबामागून ते लख्ख सुवर्णमुद्रांचं सौंदर्य अशाच पहाटे माझ्यापर्यंत ह्याच खिडकीतून येऊन पोचणार होतं. विस्तृत वैभव अचानकच डोळ्यांपुढे ओतण्याचं या झाडाचं कसब आता माझ्या परिचयाचं झालं होतं.

मी आनंदाने वाट पहायला तयार होते.


-------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या घरातून थेट समोर दिसणारा पेल्टोफ़ोरम गेली ६/७ वर्षं तरी तिथे आहे. आता त्याचा विस्तार चांगलाच पसरलाय. रस्त्यावर अजूनही इतर बरीच पेल्टोफ़ोरम, गुलमोहोर, करंज आणि अर्थातच आंब्याची, नारळीची झाडे आहेत. पण आमच्या खिडकीसमोरचा पेल्टोफ़ोरम स्वत:च्याच मस्तीत असल्यासारखा. इतर झाडांवर जेव्हा पालवी तेव्हा हा उघडाबोडका आणि बाकीच्या झाडांवर पावसाच्या झडीत एकही फ़ुल शिल्लक रहात नाही तेव्हा याच्या छतावर पिवळ्याजर्द फ़ुलांचे बुंदके भरभरुन.
पूर्वी फक्त हॉलच्याच खिडक्यांमधून याच्या फांद्या दिसायच्या आणि दुस-या मजल्यावरच्या आमच्या घराच्या लेव्हलला जेमतेम पोचायच्या. आता पूर्ण बहरात असला की नजरेत मावत नाही. स्वयंपाकघर, बेडरुमच्या खिडक्यांमधूनही याच्या फांद्या नजरेसमोर दिसतात. चार वर्षांपूर्वी हॉलच्या पूर्वाभिमुख अर्ध्या भिंतींवरच्या खिडक्या काढून आम्ही फ़्रेन्च विन्डोज बसवल्या. ती भिंत पूर्ण काचेचीच झाली.
आणि त्याच वर्षी पेल्टोफ़ोरमला पहिला भरगच्च बहर आला.

बरेच दिवस आधी हिरव्या पालवीने आणि ताम्रशेंगांनी भरलेल्या त्याच्या फांद्यांवर बुंदीसारख्या कळ्यांचे उभट तुरे डोकावत होते. बघता बघता सा-या झाडाची कॅनोपी या तु-यांनी भरुन गेली. मग त्यावर एकटं दुकटं चुकार पिवळं फ़ुलही दिसायला लागलं होतं. पण पानांची हिरवी गर्दी इतकी दाट की त्यांच्याकडे लक्षही जात नव्हतं. त्यात ह्या फ़ुलांचा रंग अमलताशाच्या फ़ुलांसारखा तकतकित पिवळा नाही. थोडी गडद झाक आणि मधोमध चॉकलेटी पुंकेसरांचा वर्तुळाकार झुबका.
तपकिरी शेंगांची गर्दी आणि हिरवी पाने अजूनही झाडावर ऐन बहरात असताना ही तुरळक फ़ुले फारशी आकर्षक दिसत नव्हती. मात्र एक दिवस पहाटे झाडावरच्या सगळ्याच कळ्यांनी ठरवून ठेवल्यासारखे डोळे उघडले आणि सोनेरी जरतारी बुंदक्यांसरख्या फुलांनी झाडावरचं प्रत्येक हिरवं पान झाकून टाकलं.
भिंतीच्या काचा पूर्ण पिवळ्या रंगांनी रंगल्या.
ते सोनेरी वैभव अवर्णनीय होतं.
घरात येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या सोनेरी झगमगत्या अक्षरश: डोंगरासारख्या आकारात रचलेल्या फ़ुलांच्या राशीकडे पहात रहात. उतरत्या दुपारी त्यावर सातभाईंचा गजबजाट, फ़ुलपाखरांची येजा सुरु होई. सकाळी मधमाशा गर्दी करत. काही उघड्या काचांमधून घरातही शिरत.
पण आमची तक्रार नसे.
अगदी मध्यरात्री सुद्धा उठून ते फ़ुलांच वैभव पहात बसावं असं होतं. आकाशात चंद्राच्या प्रकाशात ते पिवळे जरतारी बुंदके अजूनच सतेज होत. पायातळीचा रस्त्यावरही याच फ़ुलांचे यलोकार्पेट. सारा आसमंतातच सोनेरी आभा पसरुन रहाते.

पेल्टोफ़ोरम त्यावर्षीपासून आमच्या खिडकीसमोर असाच भरभरुन फ़ुलतोय.
वाट पहायला लावतो आणि बहरतो तेव्हां हातचं राखून न ठेवता. मनसोक्त.

त्या फ़ुलांच्या कडांनी कातरल्यासारख्या दिसणा-या नाजूक नक्षीदार पातळ सोनेरी पाकळ्य़ांमधून असंख्य पिवळी त्या फ़ुलांपेक्षा थोड्या फ़िक्या रंगांची फ़ुलपाखरं बागडतात. एखाद्या संध्याकाळी दुर्मिळ ब्लू मॉर्मोनही फ़ुलांवर पंख पसरुन जातं. पहाटेला भारद्वाज त्या सुवर्णराशीवर बसून जातो आणि पिवळे चिमुकले टिट्स, केशरी फ़ुलचुखे, सनबर्ड्स तर झाडावरुन मुक्काम हलवयालाच तयार नसतात.

मुंबईत एप्रिल-मे चा उन्हाळा तेव्हा ऐन भरात असतो. भर दुपारी घामाच्या धारा वहात असताना खिडकीत बसून त्या पिवळ्याजर्द सोनमोहोरांच्या राशीवर आपले निळे पंख पसरुन निवांत पहुडलेलं एखादं फ़ुलपाखरु मला दिसतं.
मला आता रस्किनचा हेवा वाटत नसतो. माझ्याही खिडकीबाहेर वसंत फ़ुललेला असतो. पेल्टोफ़ोरम ऐन बहरात असतो.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पेल्टोफ़ोरम इंडिजिनस नाही. दक्षिण अमेरीकेतून तो आपल्या इथे आलेला आणि आता मुंबईच्या मातीने, पक्षांनी, फ़ुलपाखरांनी आपलाच मानून टाकलेला. उप-यांना आपलं म्हणायच्या त्यांच्या सवयीनेही असेल बहुतेक.
मुळ या मातीतलं नाही म्हणूनच बकुळ, अमलताश (बहावा)चा असतो तसा याचा कुठलाच उल्लेख संस्कृत काव्यांत, चालिरीतींत, अगदी गुलमोहोराचा असतो तसा आधुनिक साहित्यामधेही नाही. त्यादृष्टीने इतक्या देखण्या फ़ुलांचं वैभव अंगावर वागवूनही हा उपेक्षितच. शिवाय अतिरेक करुन मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर याची लागवड करुन सर्वसामान्य करुन टाकलेला. मुंबईत एकेकाळी गुलमोहोर आणि बहाव्याच्या रोडऍव्हेन्य़ूसाठी असणा-या पॉप्युलॅरिटीवरही पेल्टोफ़ोरमच्या संख्येने मात केली. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा पण त्या बळकट नसतात, केबलच्या जाळ्यांना याचा अडथळाच होतो आणि तरी अगदी छोट्या गल्ल्यांमधूनही काही सेन्स न दाखवता मुन्सिपाल्टीने हा लावून टाकलेला. त्यामुळे अनेकांच्या रोषालाही हा पात्र.

माझ्या दृष्टीने मात्र माझ्या खिडकीबाहेर निसर्गाचं एक संपूर्ण चक्र फ़ुलत ठेवणारा हा पेल्टोफ़ोरम अगदी खास. माझ्या घरासाठीच फ़ुलणारा. फ़ुलेल आता. मग मी फोटो टाकीन :)


-------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 20, 2009

फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन? माय फ़ूट!!

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

Friday, February 13, 2009

रस्किन, गुलझार आणि मी (:P)

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच! मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य (म्हणजे त्यात पैसा मिळतो आणि यात नाही हा सोडून) आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन सारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहिता यावं.
नाही जमत :(
असाईन्मेन्ट्सचं टेन्शन आणि उलटून गेलेल्या डेडलाईन्स नजरेसमोर दिसत असताना साध्या खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरम कडे नाही लक्ष जात भलेही त्यावर सोनेरी बुंदक्यांसारख्या फ़ुलांच्या राशी जमा झालेल्या असोत.
तर ते जाऊचदेत.
जिनियस क्रिएटिव्ह आणि आपल्यासारखे कुडमुडे क्रिएटिव्ह ह्यांत इतपत फरक तर असणारच. नाही कां?

Friday, November 02, 2007

नस्तं प्रदर्शन.

काल शिवाजी पार्क वर भव्य वगैरे ग्रंथ प्रदर्शन आणि गड किल्ले दर्शन होतं ते बघायला गेले होते. खरं तर आदल्या दिवशीच्या पेपर मधे ते सगळ्या खंडीभर सेलेब्रिटीजनी नामवंत कवींच्या कविता वाचून प्रदर्शनाचं उद्घाटन केल्याचं वाचलं होतं तेव्हाच जायचा उत्साह कमी झाला होता. हल्ली सेलेब्रिटीज म्हणजे सर्कशीतले विदुषक झालेले असतात. आपलं क्षेत्र काय आहे? आपण कशात कशासाठी प्रसिद्ध आहोत ते बाजूला. जिथे जिथे मिडीया एक्स्पोजर तिथे तिथे सगळेच नाचायला तयार. कविता वाचल्या तरी ठिक आहे. पण वाचायच्याच तर त्या नामवंतांच्या कशाला? इतके उच्च दर्जाचे अत्यंत गुणवान नवोदीत कवी उपेक्षेच्या अंधारात पडून आहेत. त्यांना तरी आपल्या प्रसिद्धीचा फ़ायदा देवून उजेडात आणण्याचे पुण्यकर्म ह्या सेलेब्रिटीजनी करावं नां? पण नाही. घ्या एक संदीप खरे नाहीतर ग्रेस नाहीतर प्रद्न्या लोखंडे नाहीतर नीरजा नाहीतर गेला बाजार सौमित्र आहेच. आणि पाडा त्यांच्याच कविता. मग त्यांचा अर्थ कुणाला उलगडलेला असो वा नसो. ग्रेस च्या किंवा सौमित्रच्या कविता असे अर्ध्या हळकुंडांनी पिवळे पडलेले सेलेब्रिटीज म्हणत असतात तेव्हां त्या कवींची कीव येते.

तर ते प्रदर्शन. शिवाजी पार्क चं.

आख्ख्या हायवेवर, फ़्लाय ओव्हर वर पोस्टर्स लागलेली. सर्व नामवंत प्रकाशक सहभागी असल्याचे दिसत होते. तेव्हां ती एक उत्सुकता होती पण तितकी नाही कारण आता दिवाळीच्या सुमारास अजीर्ण होईल इतकी पुस्तक प्रदर्शन दादर-पार्ले-डोंबिवली ह्या मराठी सांस्कृतिक त्रिकोणातल्या सर्व शक्य अशक्य जागांवर भरतच असतात. पण सोबत महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचही प्रदर्शन होतं. तेव्हा ते एक added attraction.

गड किल्ले प्रदर्शन अत्यंत badly oraganised. सगळीकडे फक्त फोटो लावलेले. काही ठराविक किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकृती होत्या पण त्यांवर माहीती निट नाही. सिंधुदुर्गाला जल दुर्ग म्हणायचं की गिरीदुर्ग? मग एका बघण्याच्या मर्यादे नंतर माणिक गड कोणता आणि प्रबळ गड कोणता हे फोटोत सारखच दिसायला लागलं. शेकडो किल्ले महाराष्ट्रात आणि सगळे मोस्टली उध्वस्त अवस्थेत. तेव्हा ह्या तुटलेल्या कड्याचा एक फोटो. त्या बुरुजाचा एक वगैरे. तेव्हा ते प्रदर्शन भराभर मागे टाकून एकदाचे पुस्तकांच्या स्टॉलवर पोचलो. क्रेडीट कार्डची सोय केली आहे हे अनाउन्स करत होते तेव्हां जरा हुरुप आला. चक्कं जाताना टॆक्सी करुनच जावं. अनायासे डिस्काउन्ट पण मिळेल आणि वर क्रेडीट कार्डाची सोय तेव्हां मला अगदी आपण दोन्हीं हातांत भरभरुन पुस्तकं वहातोय असं सुखद दृष्य पहिल्या स्टॉलवर पाय ठेवतानाच दिसायला लागलं. इतर वेळी पाहिलेली पण घ्यायची राहून गेलेली सगळी पुस्तकं भराभर नजरेसमोरून जायला लागली.
पहीला स्टॉल. असंच एक प्रकाशन. एक सोनेरी काडीचा चष्मा लावलेले गृहस्थ काउंटरवर. मी चारपाच पुस्तकं उचलली. गृहस्थांनी बिल बनवलं.
क्रेडीट कार्ड साठी एकच मेन काऊंटर असेल नां? :मी .
माहीत नाही. आठशे त्र्याण्ण्व द्या: गृहस्थ निर्विकारपणे.
अहो पण. क्रेडीट कार्ड?
माहीत नाही.
डिस्काउन्ट लिहिलाय तो चाळीस टक्के?
तो फ़क्त ठराविक पुस्तकांवर?
मग ह्यां पुस्तकांवर?
दहा टक्के देवू. - आवाज मेहेरबानी टाईप.

मी पुस्तकं खाली ठेवली. आमचा जवाहरवाला तसाही वीस टक्के देतोच. मॆजेस्टीक मधे बुक क्लब ची मेम्बर तेव्हां तिथे पंचवीस टक्के. इथे दहा टक्क्यांची भीक कशाला? ती सुद्धा रोख पैसे मोजून? हा अनुभव मग पुढचे दोन तीन स्टॉल.

साहीत्य अकादमीचा आणि नॆशनल बुक ट्रस्टचा स्टॊल पाहून खुशी वाटली. ही पुस्तकं सहजासहजी बघायलाही मिळत नाहीत. इतके सुंदर अनुवाद किंवा विविध विषयांवर असूनही योग्य मार्केटींग अभावी फ़ुकट पडून रहातात वाचकांच्या नजरेलाही पडण्या ऐवजी. तिथून मात्र तिथल्या निरुत्साही सरकारी मुद्रेच्या लोकांना न जुमानता पाच सहा पुस्तकं घेतलीच.

व्यक्तीमत्व विकास, पाकक्रीया, ऐतिहासिक पुस्तकं, व.पु. ह्यांना मिळत रहाणारा वाचक प्रतिसाद मन खंतावून टाकतो बरेचदा. वाचक कधी बाहेर पडणार त्यांतून? पुढच्या इयत्तेकडे इतकी कमी जण कां जातात? ग्रंथालीची सुरेख छोटेखानी ज्ञानयज्ञ मालीकेतली पुस्तके धुळ खात पडून. पॉप्युलर प्रकाशनाच्या तेंडूलकरांच्या कम्पाईल्ड पुस्तकांना ओलांडून सगळे पुढे. पानवलकर सासणे कोणाच्या खिजगणततीतही नाहीत. ते तरीही ठिक आहे. प्रत्येकाची आवड असते. पण एक मौज आणि ग्रंथाली आणि डिंपल प्रकाशनाची लोकं सोडली तर कोणालाही आपली पुस्तकं आकर्षकपणे नुसती मांडूनच चालत नाहीत तर विक्रेत्याच्या मुखावर सुद्धा आपुलकी, उत्साह अशा भावभावनांची गरज असते हे लक्षातच नाही असं वाटणारी परिस्थिती. राज ठाकरेंनी स्टॉल्सची भाडी अवास्तव लावून जबरदस्ती तिथे बसवल्यासारखे सगळे. स्वत:च चहा पिण्यात, वडे खाण्यात मग्न विक्रेते. उरलेली नुसती माश्या हाकत बसलेली नाहीतर पुस्तकं हाताळणार्या सर्वांनाच संशयास्पद नजरेनी न्याहाळत. आयमिन अशा मोठ्या प्रदर्शनात असते भिती लोकांनी पुस्तकं उचलून पिशव्यां मधे वगैरे घालण्याची पण त्यासाठी नजर ठेवायला थोडी डिस्क्रीट पद्धती वापरा की. हे काय आपलं सगळ्यांनाच तशा नजरेनी बघणं?
खरंतर हल्ली किती उत्साहात प्रदर्शनं भरवतात पुस्तकांची. नव्या नव्या स्कीम्स आणतात. पण स्टॉलवरचे विक्रेते जर पुस्तकप्रेमी नसतील तर प्रदर्शन कशी निरस होऊ शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण. मैत्रेय प्रकाशनाच्या स्टॊललवर मात्र अगदी उलट अनुभव. या या. हे गणिताच्या कोड्यांचं पुस्तक बघा. अगदी बुद्धीला चालन देतं बरं का. आणि हे विणकामाच्या नव्या टाक्यांच पुस्तंक. अगदी लेटेस्ट. not bad. मी कोणत्याही angle ने विणकाम मुद्रेची दिसत नसूनही विक्रेत्याचा उत्साह कमी होईना. मग अचानक शिरिष कणेकरच्या पुस्तकांच्या रांगेसमोरुन त्याने माझी परेड केली. आता आधी कॉलम वाचा. त्यातल्या त्याच त्या शिळ्या कढीला उत विनोदांना हसा आणि मग परत त्यांची पुस्तकं पण तिनशे रुपये देऊन विकत घ्या? वेल. मला काही इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा मी निला सत्यनारायण चं एक पूर्ण-अपूर्ण उचललं.
आता दिवस दिवाळी अंकांचे. हे एक प्रकरण मात्र असं आहे की घेतल्या वाचून रहावत नाही आणि घेतल्यावर गेले ते दिन गेले म्हणून रडल्यावाचून वाचवत नाही. मौज चे अंक गौरी वाचून सूने आणि दीपावलीचे अंक दळवींवाचून रिकामे. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

Wednesday, October 24, 2007

तरीही शब्दातच..

सगळेच अनुभव शब्दांत व्यक्त करता आलेच पाहिजेत असा हट्ट कां असतो आपला? एकतर बोलून तरी दाखवायचं किंवा लिहून तरी! आपण सारे सतत हेच करत असतो. दुसर्‍यांपर्यंत अनुभव पोचलेच पाहिजेत आपले असा तरी अट्टाहास कां असावा आपला? अनुभव घ्यावा. आत आत खोलवर झिरपू द्यावा. आपल्यातच. पण नाही.
आपण सगळेच किती शब्दांच्या व्यापात हरवून जायला आसुललेले असतो!

कधी कधी शब्द म्हणजे नुसता गोंगाट असतो. प्रत्यक्ष अनुभवापासून ते विचलित करतात. जसं एखादा फोटोग्राफर आठवणी साठवून ठेवण्याच्या अतिउत्साहापायी वर्तमानात जगण्याचे हरवून बसतो.

त्या संदर्भात एक झेन कथा वाचली होती ती आठवली...


एके दिवशी एक तरुण भिक्षू आणि त्याचे गुरु फुजियामा पर्यंत लांब फेरफटका मारायला जात होते. त्या भिक्षूने तो बर्फाळ डोंगर बर्‍याच वेळा पाहिला होता. तरी त्याला प्रथमच तो खर्‍या अर्थाने जाणवला. जाता जाता तो रानफ़ुलांचे रंग, त्यातली एकतानता, पक्ष्यांच्या भरार्‍या, पहाटेचं तेज आणि हिरवा ताजेपणा, पवित्र पांढर्‍या पाईन वृक्षांचे अंकुर याबद्दल उत्साहाने सांगत होता:" कसं सगळं घडवलय! हा दगड कित्ती दगडी आहे! किती सुंदर आहे ना सगळं? बुलबुलचा आवाज किती गोड... ऐकतो आहेस न? किती अद्वितीय आहे!"

काही तरी पुटपुटत, लंगडत वृद्ध गुरु पुढं जात राहिले. सरते शेवटी शिष्याच्या लक्षात गुरुंच दीर्घ मौन आलं. आणि तो तळमळीनं थोड्या मोठ्यांदाच म्हणाला," हे असं नाही कां? हे पर्वत, ह्या नद्या आणि ही भव्य पृथ्वी, हे सर्व अलौकिक नाही कां? हे सुंदर नाही कां?"

गुरु त्याच्याकडे वळून ठामपणे म्हणाले," हो रे!! पण हे असं सारखं म्हणत राहाण्यात काय हाशिल आहे?"

...............



टी.एस.इलियट काय वेगळं म्हणाला होता?

शब्द... ताणतात
तडकतात ओझ्याखाली
आणि कधीतरी तुटतात.
तणावाखाली निसटतात,
घसरतात, नष्ट होतात.
अचूकते अभावी कुजतात
एका जागी टिकत नाहीत.
स्थिर राहत नाहीत.

शब्द जर इतकेच पोकळ आणि उथळ असतील तर कशाला हा अट्टहास आपला तरी की सगळे अनुभव शब्दांत मांडताच आले पाहिजेत?

Wednesday, June 14, 2006

भुतान पासून नंदुरबार पर्यंत

एप्रिल अखेरीस माझं जे भटकणं सुरु झालं ते जून च्या चार तारखेला शेवटी संपल. ह्या काळात मी सिक्किम, दार्जिलिंग, भुतान असा एक पंधरा दिवसांचा, नंदुरबार चा तीन दिवसांचा आणि पुणे, कोल्हापुर चा सहा दिवसांचा असा प्रवासदौरा केला. भुतान सिक्किम चा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता. ह्या प्रवासाची डायरी मला खरेतर लगेचच इथे टाकायची होती पण आल्या आल्या लगेचच पुणे कोल्हापुर झालं. मग मुलीची शाळा खरेदी, आवराआवरी, प्रवासाचा शीण त्यातच असाईनमेंट्स च्या डेडलाईन्स ह्यात सिक्किम भुतान बरच लांब राहिलं खरं.

नंदुरबार ला ऐन उन्हाळ्यात जाणं म्हणजे स्वत:हून आगीच्या भट्टीत उडी टाकण्यासारखेच. आम्हा मुंबईकरांना ही खानदेशातली रसरसती उन्हाची काहिली सहन होत नाही हेच खरं. अपेक्षेप्रमाणेच तिकडे गेल्यावर उन्हाचा प्रचंड त्रास झाला खरा पण ज्या कारणासाठी रादर जे पहायला आम्ही तिकडे गेलो होतो ते पाहिल्यावर उन्हाचा त्रास विसरायलाच झाला. डॉ. उर्जिता जैन आणि त्यांचे पती डॉ. चेतनकुमार जैन या दोघांनी मिळून नंदुरबार, धुळे दरम्यानच्या रखरखीत उजाड पट्ट्यात नक्षत्रवनाच अक्षरश: नंदनवन फुलवलय. वनौषधींच्या क्षेत्रातल उर्जिता जैनांचं चं कर्तृत्व वादातीतच आहे. आता त्यांनी तिथेच Herbal Science and Techology' च कॉलेज सुरु केलय. ते पहायला जैन दांपत्यानी आग्रहानी निमंत्रीत केलं होत. मी नक्षत्रवना बद्दल बरेच दिवस ऐकून होते. पहायची उत्सुकता तर होतीच. आता कॉलेजच निमित्त होत तर जावच म्हणून अगदी ऐन मे मधे जायच होत तरी पाय मागे घेतला नाही. आणि खरच गेल्याच चीज झाल. तिथला तो दहाहजार sq. ft. इतक्या प्रशस्त जागेतला वनौषधी महाविद्यालयाचा पसारा, अत्याधुनीक प्रयोगशाळा, A.C. क्लास रुम्स, चैतन्य वनातली झाडे, रक्तचंदनाचे ओळीने लावलेले वृक्ष, जैन पतीपत्नींचा पाहुणचार सारचं मन प्रसन्न करणारं होत. नक्षत्रवनातल्या रुद्राक्षाच्या झाडाखाली पडलेला रुद्राक्षाच्या सडा आणि भुर्ज वृक्षा च्या सावलीतला थंडावा ह्या दोन गोष्टी तर मी मला नाही वाटत कधी विसरेन.

भुतान सिक्किम ट्रेक तर अफलातून होता. त्याचं वर्णन असं जाता जाता करणं केवळ अन्यायकारक ठरेल.

दरम्यान वाचन बरच झालय पण विस्कळीतपणे. सलग जे वाचून झालय त्याबद्दल बुकशेल्फ़ मधे टाकतेच एकदोन दिवसांत.

नंदन ने पुस्तकनिष्ठांची मांदियाळी सुरु केलीय ती ज्या कौतुकास्पदरीत्या मराठी ब्लॉगर्स पुढे चालवत नेत आहेत ते पाहून इतका आनंद झाला! कोणं म्हणतं नवी पिढी पुस्तके वाचत नाही म्हणून?? सर्वांचेच वाचन, साहित्याची जाण प्रगल्भ आहे. अभिमान वाटण्यासरखीच आहे. आणि ह्यासाठी पहिले अभिनंदन नंदनचे करायला हवे!!

Tuesday, February 28, 2006

मित्र मैत्रिणींनो .....

हाय!! .... ब्लॉग चे नाव उर्दूमध्ये असले तरी मी मराठीच आहे आणि मराठीतच लिहिणार आहे. खरतर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच ब्लॉग चा शुभारंभ करण्याच मनात होत. थोडा उशिर झाला. पूर्वी इंग्रजीमधून blogging केल्याने ब्लॉगविश्व तस ओळखीच आहे पण मराठीमधून हा ब्लॉग सुरु करण्या आधी थोडा मराठी ब्लॉगविश्वाचा फेरफटका मारला तेव्हा अगदी आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. किती छान नोंदी केल्यात मराठीमधे मुलामुलींनी. साहित्य, वैयक्तिक, प्रवास अनुभव, चालू घडामोडी अशा कितीतरी विषयांवर देशविदेशातील पब्लिक लिहितं आहे. संख्या त्यामानाने फार नाही. पण मला वाटत युनिकोड सुविधा नुकतीच लोकांपर्यंत पोचली आहे. हळूहळू वाढेल मराठी ब्लॉगर्स ची संख्या.

माझी ओळख पण ह्या निमित्ताने करुन देते. मी मुंबईची मराठी पत्रकार. तसं व्यवसायाने मराठी इंग्रजी भाषेत कॉपिरायटींग करते पण पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे आणि आवड असल्याने, आणि मनमोकळ लिहिता याव, बंधन नसाव म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करते. अर्थात Free Lancing . व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे माझ्या आवडीचे लेख विषय. ब्लॉग मध्येही त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करीन. प्रवास आणि संगित हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय. पण खुप कमी वेळ त्यासाठी काढता येतो ही खंत कायम मनात असते. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा पण माझा छंद.

भेटत राहूच. तुम्हा सर्वांची ओळख होऊन ती खुप खुप वाढेल ही खात्री आहे.
इथे नियमीत येण्याइतका सलग वेळ मिळो ही सदिcछा मी माझी मलाच देऊन घेते.