Thursday, October 28, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!

चित्रकला आवडते,गाणी ऐकायला आवडतात,अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात,कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे..
आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय..रंग,सूर,शब्द,चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या'कुहू'या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला..किंवा असं म्हणूयात'अनुभवला'तेव्हा विश्वास बसला.

दाट,गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल,खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा,पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर,मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र..त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप..खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी'कुहू'
कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते,गाणं मनात रुंजी घालतं,कुहूच सुरेल शीळ मनात घुमते,नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही..मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.


कुहूमधे कविताने स्वतःकाढलेली ४०-४५ऑईल पेंटिंग्ज आहेत,आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत,पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत,नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ,विलोभनीय व्हिडिओ आहे..अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत,दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे,समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत..या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला'पुस्तक'कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे.पुस्तक म्हणायचे कारण यात'शब्द'सर्वाधिक महत्वाचे,पायाभूत आहेत.शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात.शब्द येताना आपले रुप,रंग,नाद,लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच.अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत,आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.
कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली?कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही..पण हे अ‍ॅनिमेशन,संगीत,व्हिडिओज,कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड?शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत.कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे.कुहू हा गाणारा पक्षी.जंगलात रहाणारा.आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे.एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात.जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली.कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो.आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो..माणसाची भाषा त्याला शिकायची आहे,माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय..या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते..गोष्ट पुढे सरकत रहाते..विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात..त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं.हे कुहूचं जग आहे.ते अनुभवयालच हवं.
कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच,पण भारतीय साहित्यात एक नवी,आधुनिक वाट निर्माण होते आहे.कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे.मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते,बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो,जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे.कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.
ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे.तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र,भिन्न,ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही.सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले.आणि त्यासाठी तारण आहे'बौद्धिक मालमत्ता'.मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत'कल्पना'वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत,क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात!
कुहूचे महत्व यासाठीही.



कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल.त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे.तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.

शर्मिला फडके
'चिन्ह' ब्लॉगवरही प्रकाशित.

Wednesday, October 20, 2010

दिवाळी अंक आणि...

दिवाळी अंक आणि चित्रकला यांचं नातं मोठं मजेशीर.
म्हणजे असं की दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासून आतल्या पानापानांवर 'चित्रकला'दिसत तर असते पण'चित्रकलेवर'काय आहे हे शोधायचं झालं तर अंकांची पानच्या पानं उलटावी लागतात.तेव्हा कुठे एखाद दोन मोजके दिवाळी अंक हाताशी लागतात ज्यात चित्रकलेवर,चित्रकारांवर कोणी काही गंभीरपणे लिहिलेलं वाचायला सापडतं.एका अर्थाने चित्रकलेची ही दिवाळखोरीच होत असते दरवर्षी.
यावर्षीच्या म्हणजे २०१०सालातल्या दिवाळीत कोणकोणत्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय लिहून येतय याचा शोध घेताना जबरदस्त इंटरेस्टींग गोष्टी हाताशी लागल्या. .
त्याबद्दल सविस्तर इथे वाचा..

Saturday, October 09, 2010

'चिन्ह' ब्लॉग

पिकासो म्हणाला होता- पेंटींग म्हणजे चित्रकाराची डायरी.
'चिन्ह' म्हणजे त्या चित्रकारांची 'जीवनकहाणी'

'चिन्ह' ब्लॉग सुरु झाला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट.
कलेला वाहून घेतलेलं मराठीमधलं एकमेव आर्ट मॅगेझिन म्हणजे 'चिन्ह'.
जरुर भेट द्या. प्रतिक्रिया कळवा.

Friday, October 08, 2010

चिन्ह

'चिन्ह'साठी मी २००५ साली पहिल्यांदा लिहिलं.चित्रकार अतुल दोडियावर काहीतरी होतं ते.त्याच्या स्टुडिओत जाऊन गप्पा-मुलाखत वगैरे.त्यानंतरची चार वर्षे खूप वेगवेगळ्या चित्रकारांवर चिन्हसाठी लिहिलं.कला आणि जाणीवांच्या संदर्भात प्रत्येकवेळी जास्त जास्त समृद्ध होत गेले.गेल्या वर्षी लिहिलेल्या'राजा रविवर्मा आणि त्याने चितारलेल्या त्या सगळ्या देखण्या,दैवी चेहर्‍यांमागचा चेहरा शोधण्याच्या अनुभवांवरचा,रविवर्माच्या मळवलीच्या आता तर पूर्ण जमिनदोस्त झालेल्या पण शतकभरापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणार्‍या रविवर्मा प्रेसच्या दुर्दशेवरचा लेख मात्र खर्‍या अर्थाने अंतर्मुख करुन गेला.खूप काही देऊन गेला आणि घेउनही गेला.त्या अनुभवांवरही बरंच काही लिहिण्यासारखे आहे..'चिन्ह'वरच खरं तर इतकं काही लिहिण्यासारखं आहे!
'राजा रविवर्मा-एक शोधयात्रा'साठी दोन वर्षे जीवापाड मेहनत केली होती.विनायक परबने'चिन्ह'वार्षिकातल्या माझ्या या लेखावर भरभरुन लेख लिहिला तेव्हा केलेल्या मेहनतीची दखल आणि कलाक्षेत्रातल्या अचूक डॉक्युमेन्टेशनचे महत्व अजून कुणालातरी पटतय याची जाणीव मनाला खूप उमेद देऊन गेली.

राजा रविवर्मा - एक शोधयात्रा
"एक महत्त्वाची दंतकथा महाराष्ट्राने वर्षांनुवर्षे जपली, ती म्हणजे रविवर्माच्या चित्रातील महाराष्ट्रीय तरुणीच्या चेहऱ्याचे रहस्य. महाराष्ट्रातील अनेक पिढय़ांनी वर्षांनुवर्षे ही दंतकथा पुढल्या पिढीला सांगितली, जपली आणि पुढे नेली. त्याला यशस्वी व महत्त्वपूर्ण छेद देण्याचे काम यंदाच्या चिन्ह वार्षिकाने केले आहे. यातील ‘वह कौन थी?’ हा शर्मिला फडके यांचा लेख म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नुमनाच ठरवा. महाराष्ट्रामध्ये शोध पत्रकारिता होत असते. पण बव्हंशी ती राजकारणाशीच संबंधित असते. त्यातही ‘भांडाफोड’ हाच त्याचा उद्देश असतो. कधीकधी समाजकारणाशी संबंधित कुपोषणादी विषयही हाताळले जातात. पण अशाप्रकारे दृश्यकलेच्या संदर्भात केलेली शोधपत्रकारिता ही मात्र विरळाच. दृश्यकलेशी संबंधित सर्वांनी तर हा लेख वाचायलाच हवा. पण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही तो अवश्य वाचावा, म्हणजे एखाद्या शोधयात्रेमध्ये किती प्रकारे मेहनत घ्यावी लागते, किती व कशाप्रकारचा संयम ठेवावा लागतो याची त्यांनी नेमकी कल्पना येईल."... पुढे वाचा...