Sunday, December 04, 2016

सिनेमा आणि संस्कृती- लग्न (दोन)

हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
बागेत, रस्त्यावर, ट्रेनमधे, एअरपोर्टवर, समारंभात, प्रवासात.. हिंदी सिनेमातल्या नायक नायिका जगात कुठही अचानक भेटू शकतात आणि त्यांना आपल्यातल्या जन्म जन्मांतरीच्या रिश्त्याची ओळख पटू शकते. हिंदी सिनेमांमधे पहली मुलाकात ही लग्नापर्यंतच्या प्रवासातली सर्वात महत्वाची आणि आवश्यक पायरी मानली असली तरी बहुतेक वेळा ती खुलवली जाते फ़क्त गाण्यंच्याच माध्यमांतून. पहिल्या भेटीनंतर, परिचय, एकमेकांची ओळख म्हणजे स्वभाव, आवडीनिवडी यांतून परस्परांचा अंदाज घेत, भांडण, गैरसमज, समजुतदारपणा यांचे टप्पे ओलांडत मग परस्परांसोबत लग्नाच्या आणाभाका घेण्यापर्यंतचा प्रवास हा गाण्यांचे थांबे घेत घेत पार पडल्याने फ़ार कमी वेळा यात भावनिक तीव्रता जाणवली.
इंग्रजी सिनेमांमधे मात्र ही गाणी प्रकरण नसल्याने प्रथम भेटीच्या प्रसंगांना खुलवण्यात दिग्दर्शकांची कसोटी लागलेली अनेकदा दिसून आली.
'पी.एस. आय लव्ह यू' नावाच्या एका भावरम्य सिनेमात त्या दोघांचे लग्न होऊन दहा वर्षांचा काळ उलटला असतो. आणि मग तो ट्युमरमुळे मरतो. आजारपणाच्या काळात त्याला जाणवतं की लग्नानंतरच्या दहा वर्षांत ती भावनिक दृष्ट्या आपल्यावर नको इतकी अवलंबून राहिलेली आहे. तिच्या आयुष्याचा फ़ोकसच संपूर्णपणे बदलून गेला आहे. आपण गेल्यानंतर तिला पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आयुष्याची उभारणी करणे किती कठिण जाईल या जाणिवेतून तो अस्वस्थ होतो आणि मग तो तिला पत्र लिहून ठेवतो. आपल्या मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या काही काळात तिला सावरायला मदत करणारी, तिला मार्गदर्शन करणारी, काही निर्णय घ्यायला मदत करणारी ही सारी पत्रं तिला खरंच खूप उपयोगी पडतात.
आणि मग तिला एक पत्र वाचताना कळते की आता हे शेवटचे पत्र.
या पत्रात त्याने ते दोघं दहा वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटले होते त्यावेळचा प्रसंग वर्णन केला असतो. पडद्यावर हा सारा भागच अत्यंत सुरेख खुलवला आहे. आयर्लंडमधे ती हिच हायकिंग करायला आली असताना एकदा रस्ता चुकते आणि त्याला ती रस्त्याच्या मधोमधच अत्यंत गोंधळून जाऊन उभी राहिलेली दिसते.
हिरव्या पिवळ्या गवताच्या कुरणावर एखाद्या रंगीबेरंगी पुष्पगुच्छासारखी ती दिसत असते.
"इतके रंग एकाच व्यक्तिच्या अंगावर मी पहिल्यांदाच पहात होतो," तो मिश्किलपणे पत्रात लिहितो. तिचा निळा पिवळ्या फ़ुलांचा शर्ट, केशरी स्कार्फ़, लाल हॅट, ब्राऊन शूज, पांढरा बेल्ट, जांभळा स्कर्ट. इतके सारे रंग अंगावर ल्यायलेली ती असतेही खूप वेगवेगळ्या तर्‍हेतर्‍हेच्या आवडीनिवडी, छंद, उत्साह मनात जपलेली. उन्मुक्त. तिला रस्ता दाखवत चालत जात असताना त्या दोघांची मैत्री होते. खूप गप्पा करतात ते. ती त्याला कविता म्हणून दाखवते, शब्द विसरत असते मधून मधून पण तरी तिचा उत्साह प्रचंड असतो.
" मला काहीतरी करुन दाखवायचय आयुष्यात. काहीतरी वेगळं." ती त्याला सांगते.
" काय करायचय?" तो कुतुहलाने विचारतो.
"माहीत नाही." प्रामाणिक भाबडेपणाने ती म्हणते," काय ते माहित नाही. पण काहीतरी स्वत:चं. जे फ़क्त मीच करु शकते."
तो पत्रात तिला लिहितो- 'आपल्या त्या पहिल्या भेटीत तुझ्या प्रेमात मी पडलो आहे हे जाणवण्याचा हाच तो क्षण. तु मला आवडलीस. तुझा उत्साह, तुझ्यातली कला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं आवडलं. आणि तुझा गोंधळही आवडला. तुला नक्की काय करायचय याचा निर्णय घेणं अवघड जातय हे मला समजलं. जोपर्यंत तुला आयुष्यात काय हवय, कुठपर्यंत जायचय हे कळत नाही तोपर्यंत एका दिशा दाखवणार्‍याची गरज तुला नेहमीच भासणार हे मला कळत होतं. तुझ्यावर प्रेम आहे हे उमगलं तेव्हाच मला हेही समजलं होतं. तुला नीट मुक्कामाला पोचवेन हे मी तुला वचन दिलं होतं. आता दहा वर्षांनंतर मला जाणवतय की आपण खूप प्रेमाचा संसार केला असला तरी तुला ती दिशा दाखवायचय अजून राहूनच गेलं. मला ती पहिली भेट आत्ता आठवतेय आणि त्या रस्त्यावरची तु .. जिला काहीतरी स्वत:च करायचं होतं ती मला नीट आठवतेय. पण तु मात्र तिला विसरुन गेलीस.'
पत्र पुरं करताना तो तिला धीर देतो आणि सांगतो, ते माझं वचन आता पुरं होईल. तुला ती दिशा नक्की मिळेल.
लग्न म्हणजे नुसतं एकमेकांवर प्रेम करणं नाही. किंवा खरं तर प्रेमाचा अर्थच मुळी एकमेकांची क्षमता समजून घेत त्याप्रमाणे एकमेकांचं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करत जाणे. एकमेकांच्या सोबतीने प्रवास करताना एकमेकांना सतत ओळखत रहाणे. सिनेमामधे पहिल्या भेटीचा प्रसंग पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाने किती सुरेख हा अर्थ उलगडून दाखवला!
आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या भव्य, पोषाखी चित्रपटातही तरुण अकबर आणि जोधाने एकमेकांच्या व्यक्तिमत्वांची ओळख करुन घेत, भिन्न संस्कृतींमधून आलेल्या एकमेकांच्या चालीरिती जाणून घेत, समज गैरसमजांवर मात करुन परस्परांच्या ओढीची खात्री पटवत मग प्रेमाच्या कबुलीपर्यंतचा प्रवास आणि तोही लग्न झाल्यावर खूप छान, नजाकतीने खुलवला होता.
भारतीय समाज व्यवस्थेमधे खरं तर एकमेकांना ओळखण्याचा, समजा गैरसमजांच्या कसोटीचा काळ हा लग्नानंतरच सुरु होतो. पण दुर्दैवाने सिनेमांच्या पडद्यावर नेमकी तिथेच 'द एन्ड' ची पाटी येत असल्याने याचे चित्रण दिग्दर्शकांनी अगदी क्वचित केले.. यात बासू भटटाचार्यांचे नाव सर्वात आधी घेणे आवश्यक आहे हे निश्चित. बासूदांनी सत्तरच्या दशकापासून अनुभव, आविष्कार, गृहप्रवेश पासून आस्था पर्यंतच्या सिनेमांमधून पती पत्नी नात्यातले चढ उतार, ताण, अस्थिरता यांचे बर्‍यापैकी वास्तव चित्रण केले.
१९७१ मधे आलेला बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली.
'अनुभव' ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते. त्रुफ़ांच्या चित्रपटांचा प्रभाव आहे असा समीक्षकी दावाही अनेकांनी केला पण यातली सुंदर गाणी, चित्रपटाची हाताळणी, कलात्मकता, पेहेराव आणि मुख्यत: पात्रांचे व्यक्तीचित्रण यांतून हा संपूर्णपणे आधुनिक भारतीय चित्रपटच वाटला हे नक्की.
अमर (संजिव कुमार) आणि मिता (तनुजा) हे मुंबईत रहाणारे लग्नाला सहा वर्ष उलटून गेलेले सुखवस्तू घरातले जोडपे. सहा वर्षांमधेच लग्नाला शिळेपणा आलेला. परस्परांविषयीच्या ओढीला ओहोटी लागलेली. संबंधांमधे तोच तोच पणा डोकावत असलेला.
अमर वर्तमानपत्राचा कायम बिझी संपादक आणि मिता घरात छान छान साड्या नेसून, नीट केस बांधून परफेक्ट पत्नी दिसायचा प्रयत्न करणारी. आपल्या लग्नात नकळत साचलेपणा आलाय, शारीरीक ओढही वाटेनाशी झालीय हे लक्षात आल्यावर मात्र मिता आपल्या दिखावू पत्नीपणाचा बुरखा काढून फ़ेकून देते. घरातल्या सार्‍या कामाचा ताबा घेतलेल्या जुन्या नोकरांना काढून टाकते, स्वत: स्वयंपाक करायला लागते, नवर्‍याकडे वैयक्तिक लक्ष पुरवायला लागते.
वरवर पारंपारिक वाटणार्‍या या दृष्यांमधून सिनेमा चक्क अगदी फ़ेमिनिस्ट वाटावा अशा तर्‍हेने झुकतो. घराचा कंट्रोल घेत असतानाच मिताला स्वत:च्या आयुष्याचा ताबा मिळतो आणि मग नवर्‍याचा आणि संसाराचा. त्याच्या ऑफ़िसात तो बॉस असेल पण घरात संपूर्णपणे तो मिताच्या म्हणण्याला मान देतो, तिच्याबद्दल त्याला आदर वाटायला लागतो. एकत्र जेवण घ्यायला लागताना हळूहळू अमर आणि मिता एकमेकांना नव्याने ओळखायला लागतात.
आणि मग मिताचा जुना कॉलेजातला मित्र अमरचा असिस्टंट म्हणून येतो. मिताचा तो जुना प्रियकर असतो. अमरला हे अर्थातच माहित नसते. मिताला तो अजूनही आवडतो पण आपल्या लग्नाला कोणताही धोका पोचवण्याची तिची तयारी नसते. जुन्या मित्राला ती उगीचच मुद्दाम डाफ़रुन बोलते. अमरला जेव्हा कळतं की मिताचा हा जुना मित्र तेव्हा तो अस्वस्थ होतो. मिता प्रत्येकवेळी अमर जेलस झाला की मनातून खूष होते. वरवर तिने कितीही अस्वस्थ झाल्याचा आव आणला तरी मनातून ती खुष आहे, नवर्‍याच्या जेलसीतून त्याच्या प्रेमाची खात्री पटतेय म्हणून. नवर्‍याला थोडी असुरक्षितता वाटलेली चांगलीच, म्हणजे तो पुन्हा आपल्या प्रेमाला गृहित धरण्याची चूक करणार नाही हे ती उमगून आहे. मिताचा संपूर्ण ताबा आहे आता घरावर, नवर्‍यावर, संसारावर आणि मुख्य म्हणजे स्वत:वर.
बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. मिताचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तिच्या नंतरच्या आयुष्यात नवर्‍याला तिने स्वीकारायला लावणे, इतकेच नाही तर आधीच्या प्रियकराशी कोणत्याही दडपणाखाली किंवा चोरटेपणाने न वागता, आता ह्या लग्नात तुला स्थान नाही हे ठामपणे स्पष्ट करणे आणि तरीही तो आवडतो हे न नाकारणे, लग्नात निर्माण होणारे पेचप्रसंग आत्मविश्वासाने सोडवणे, सुखी संसार असेल तरच नातेसंबंध सुखाचे होतात हे ओळखून असणे, आणि संसार सुखाचा होण्यात मोठा वाटा पत्नीचाच असतो याची जाणीव पतीलाही करुन देणे हे बासूदांनी पडद्यावर फ़ार छान दाखवले.
भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक.
बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.
continued...

*लेख श्री व सौ मासिकात तसेच मायबोली या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित

No comments: