Sunday, June 24, 2012

गोल्ड ऑफ़ देअर बॉडीज


अनोख्या, लखलखीत सूर्यप्रकाशात सदैव न्हाऊन निघालेल्या ताहिती बेटांवर राहून पॉल गोगॅंने अक्षरश: असंख्य चित्र काढली. नजरेला भुल घालणारा तिथला निसर्ग, दाट, पाचूसारखी हिरवी अरण्यं, उबदार समुद्र, निळेशार तलाव आणि सुंदर ताहिती स्त्रिया. त्यांच्या त्वचेवरची झळझळती सुवर्णआभा, चेह-यावरचे निरागस भाव त्याच्या पेंटींग्जमधे उमटले. मात्र गोगॅंच्या या पेंटींग्जमधे फक्त एव्हढेच नव्हते.
ताहिती बेटांवरच्या प्राचीन, पोलिनेशियन संस्कृतीच्या अस्तित्त्वखूणा, तिथल्या माओरी आदिवासींच्या चालीरिती, रिवाज, त्यांच्या देवदेवता, अंधश्रद्धा या सा-याचे चित्रण, इतकेच नव्हे तर कालांतराने एकेकाळच्या इथल्या अस्पर्शित निसर्गावर, निरागस आदिवासींच्या जगण्यावर उमटत गेलेल्या आधुनिक युरोपियन संस्कृतीच्या प्रदुषणाच्या खुणाही गोगॅंच्या पेटींग्जमधून स्पष्टपणे उमटल्या. ताहिती बेटावरच्या निसर्गाने गोगॅंमधल्या चित्रकाराला भुरळ पाडली होती आणि त्याचवेळी त्याच्यातल्या संवेदनशील माणुसकीने, बुद्धीवादी विचारसरणीने त्याला अंतर्मुखही केले होते. पॉल गोगॅंने काढलेली ताहिती तरुणींची पेंटींग्ज नंतरच्या काळात जितकी गाजली तितकीच त्याने तिथल्या वास्तव्यात लिहिलेली, माओरी संस्कृतीच्या झपाट्याने होत जाणा-या -हासाचे, युरोपियनांच्या उन्मत्त, बेफ़िकिर, स्वैर वागण्याचे डोळस डॉक्युमेन्टेशन करणारी ताहितीयन जर्नल्सही गाजली.

जून १८९१ मधे पॉल गोगॅं ताहिती बेटांवर पोचला. गोड गुलाबी, एंजेलिक चेह-यांच्या तरुणींची दिवाणखान्याला शोभेलशी पेंटींग्ज करणा-यांच्या आणि ती मोठ्या संख्येनी विकत घेणा-यांच्या पॅरिसमधे रहाण्याचा त्याला उबग आला होता. नवे प्रदेश शोधत, अपरिचित जगामधे आपल्या कलाविष्काराला पोषक वातावरण धुंडाळत भटकणारे चित्रकार अनेक आहेत. मात्र गोगॅं त्या सर्वांपेक्षा वेगळा होता.
बाह्यत: बेदरकार, उद्धट, स्पष्टवक्ता गोगॅं मनाने हळवा, संवेदनशील होता. स्वैराचारी म्हणून नंतरच्या काळात शिक्का बसलेला गोगॅं खरं तर त्याच्या पत्नीवर, मुलांवर जीवापाड प्रेम करणारा होता. मर्चंट बॅंकिंगच्या पैसे मिळवून देणा-या क्षेत्राला लाथ मारुन त्याने पूर्णवेळ पेंटींगला वाहून घेतलं होतं खरं पण त्याची वास्तववादी,आधुनिक शैलीतली पेंटींग्ज कोणालाही आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे मिळत नव्हतेच शिवाय टीका पदरी पडत होती. श्रीमंतीची सवय असणा-या बायकोने घटस्फ़ोटाची नोटीस दिली होती, मुलांचे हाल होत होते. युरोपमधे कुठेच त्याला पेंटींगच्या जीवावर जगता येईना. शेवटी तो या फ़िल्दी युरोप चा त्याग करुन ताहिती बेटांवर कायमचे रहाण्याकरता गेला.
इथे अपल्याला स्वर्ग सापडेल अशी त्याच्यातल्या चित्रकाराला भाबडी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष वास्तव्यात त्याला तिथे स्वर्गीय निसर्गसौंदर्याच्या जोडीला प्रदुषित सामाजिक जीवनही अनुभवायला मिळाले. त्यामुळे तो व्यथित झाला. ख्रिस्ती मिशन-यांनी जगभर धर्मप्रसाराकरता फ़िरताना आपल्यासोबत आणलेल्या आधुनिक युरोपियन जीवनशैलीचा विपरित परिणाम बेटांवर हळू हळू आणि निश्चितपणे होत होता.

इथे दिलेल्या गोगॅंच्या या दोन पेंटींग्जमधे त्याच्या या दोन्ही अनुभवांची आणि दृष्टीकोनांची झलक दिसते.
गोल्ड ऑफ़ देअर बॉडीजपेंटींगमधे पुढील काळात गोगॅंची ओळख बनलेल्या त्वचेवर झळझळती सुवर्णआभा ल्यायलेल्या, निरागस चेह-याच्या माओरी तरुणी, पार्श्वभूमीवर ताहिती बेटावरचा अम्लान, देखणा निसर्ग, खास गोगॅंचे बोल्ड, कलरफ़ुल कॉम्पोझिशन आहे, आणि दुस-या पेंटींगमधे पश्चिमेकडून आलेल्या प्रगतीचे प्रतिक अशा खुर्चीवर बसलेली, मेलॉन्कलिक चेह-याची ताहिती स्त्री दिसते आहे. पेंटींगमधल्या भिंतीवर अजून एक पेंटींग आहे ज्यात ताहिती बेटांवरच्या आदीसंस्कृतीचे वैभव, तिथला एकेकाळचा स्वर्गीय म्हणून ओळखला जाणारा निसर्ग अजूनही अबाधित आहे. पेंटींग जितके साधे आहे तितकेच ट्रॅजिक आहे. खुर्चीवर बसलेली ही उदास स्त्री गोगॅंने अनुभवलेल्या प्राचीन आणि आधुनिक संस्कृतिच्या कात्रीत सापडलेल्या माओरी आदिवासींच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. कदाचित अशा द्विधा मनोवृत्तीत सापडलेल्या सगळ्या तिस-या जगातल्या संस्कृतीचेच हे प्रतिक आहे.

(दै.लोकमत 'मंथन' पुरवणीकरता लिहिलेला हा आर्ट कॉलम इथे पुनर्प्रकाशित)

Tuesday, June 12, 2012

स्क्रीsssssssम पुन्हा एकदा


अरे निदान संदर्भ देण्याचं तरी सौजन्य बाळगा.

आत्तापर्यंत मला आपल्या कॉलम/लेख/ब्लॉगपोस्ट्सची मराठीतल्या मराठीत झालेली चोरी पहायची सवय होती. पण आता इंग्रजी वृत्तपत्रेही सरळ सरळ (आणि शब्दशः) डल्ला मारायला लागलीत.
दै.लोकमतकरता मी लिहित असलेल्या 'चित्रभाषा' कॉलमचे एक वाचकचाहते श्री. रवी वेलणकर यांनी आजच सकाळी कुरिअरने 'डेक्कन हेराल्ड' च्या बंगलोर आवृत्तीमधले (२७ मे.१२) एक कात्रण मला पाठवले. 'द स्क्रीम' या माझ्या कॉलमचे (१३ मे.१२) शब्दश: भाषांतर कोणा गिरिधर खासनिसांनी संडे हेराल्ड- आर्ट अ‍ॅन्ड कल्चर करता केले आहे. काही फुटकळ वाक्य तेव्हढी स्वत्;ची घातली लांबी वाढवायला. केवळ धन्य प्रकार आहे हा.
'उचलेगिरी' इतक्यांदा झालीय की आता खरं तर त्याबद्दल काही आश्चर्य/राग इत्यादी वाटायचाही कंटाळा यायला हवाय. पण तरीही जे वाटतं ते उद्वीग्नतेच्या पलीकडचं असतं.


Sunday, June 10, 2012

हुसेन, भाभा आणि म्यूरल


गेल्या आठवड्यात *टीआयएफ़आर कलेक्शन प्रत्यक्ष टीआयएफ़आर मधे जाऊन पहाण्याची दुर्मिळ संधी मिळाली. विज्ञान संकुलाच्या देखण्या आवारात प्रवेश करत असताना आता ती सगळीच्या सगळी २६० चित्र-शिल्प आपण बघणार असल्याची अनिवार उत्सुकता काठोकाठ भरुन ओसंडत होती.   
टीआयएफ़आरचं आगळं वास्तुवैभव, गॉथिक खांबांच्या रांगा, आवारातली देखणी, फ़ुलांनी बहरलेली वृक्षराजी नजरेत जेमतेम सामावेपर्यंत रिसेप्शन लाउन्ज आलं आणि समोर इतक्या आकस्मिकपणे ते येऊन ठाकलं की सावरायलाही वेळ मिळाला नाही.

पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगातलं नजरेतही न सामावणारं लांबचलांब, भव्य म्यूरल. म्हणजे तिथे ते आहे माहीत असतं पण ते असं इतक्या अचानक, इतकं झळझळीत दिसत असेल हे अपेक्षितच नसतं.


टीआयएफ़आरच्या रिसेप्शन एरियाच्या वर, मेझनिन फ़्लोरच्या मोठ्या कॉरिडॉरची संपूर्ण भिंत व्यापणारे, आजूबाजूच्या भव्यतेत बेमालूम मिसळून जात त्या वास्तूला आगळी अभिजातता प्राप्त करुन देणारे ११५ मीटर लांबीचं हुसेननी रंगवलेलं भारत भाग्य विधाता म्यूरलचं असं अनपेक्षित सुंदर दर्शन.

म्यूरलचं सौंदर्य एकाच वेळी सलगपणे नजरेत सामावत नाही, रेलिंगचे खांब मधे मधे अडथळा आणतात म्हणून मग आपण जिन्याच्या पायर्‍या चढून वर जातो, म्यूरलच्या अगदी जवळ उभं राहून ते निरखतो. आणि मग प्रतिभेच्या पायर्‍या चढत अत्युच्च शिखराकडे जाणा-या चित्रकाराच्या कलेचं सगळं वैभव, सामर्थ्य, त्याचं हुनर, कौशल्य, त्याची सगळी वैशिष्ट्यपूर्णता एकत्रितपणे सामावून घेणा-या कलेचं दर्शन किती थक्क करुन सोडतं आपल्याला त्याची जाणीव होते.
जशी मला गेल्या आठवड्यात टीआयएफ़ आरमधलं हुसेनने रंगवलेलं ते म्यूरल बघताना झाली.

या म्यूरलची लहान आवृत्ती आधी पाहिली होती, मॉर्टिमर चॅटर्जीने लिहिलेल्या टीआयएफ़आर-कलेक्शनच्या पुस्तकात फोटो आहेत, नेटवरही हे म्यूरल न्याहाळलं होतं पण एखाद्या भव्य, विस्तारलेल्या वटवृक्षाला, त्याच्या पारंब्यांसहीत जवळून न्याहाळणे आणि त्या वटवृक्षाचे बोनझाय बघणे यात जो फ़रक तोच त्यातही. हुसेनच्या रंगांमधली पॅशन, त्याच्या प्रवाही, ठाशीव रेषांची लय, आकाररचनेचा आकर्षक मेळ या म्यूरलमधून संपूर्णपणे जाणवते.
१९६२-६३ या काळात हुसेनने हे म्यूरल रंगवले तेव्हा तो ४८ वर्षांचा होता. त्याची कला-कारकिर्द ऐन भरात होती.
डॉ. होमी भाभा समकालिन चित्रकलेचे प्रोत्साहक आणि संग्राहक होते. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपमधील चित्रकारांचे ते विशेष चाहते. टीआयएफ़आरच्या वार्षिक अंदाजपत्रकातील एक टक्का रक्कम चित्र-शिल्पखरेदीकरता राखून ठेवली जात होती.
१९६२ मधे भाभांनी आपल्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या या संस्थेकरता उभरत्या, समकालिन चित्रकारांकडून म्यूरल डिझाईन करुन घेण्याकरता स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेकरता हुसेनसह आरा, गायतोंडे, जामिनी रॉय, बद्रीनारायण, बेन्द्रे, हेब्बर, सतीश गुजराल, बी.प्रभा, रावळ इत्यादी चित्रकारांनी आपली स्केचेस पाठवली. त्यामधून हुसेनचे स्केच भाभांनी निवडले. इन्स्टीट्यूटमधे दोन वर्षे मुक्काम करुन हुसेनने हे म्यूरल रंगवले. १९६४ मधे ते रंगवून पूर्ण झाले.
एकदा एका मुलाखतीत हुसेनने सांगीतले होते- हे म्यूरल मला दोन महिन्यातही रंगवून पूर्ण करता आले असते. पण टीआयएफ़आरच्या सुंदर परिसरात रहाण्याचा मोह शिवाय डॉ.भाभा दर आठवड्याला म्यूरलची प्रगती कुठवर आली पहाण्याकरता फ़ेरी मारत तेव्हा ते करत असणारी स्तुती ऐकण्याचाही मोह जबरदस्त होता. त्यांचा सल्लाही उपयोगी पडे. इन्स्टीट्यूटमधे देशीविदेशी अनेक शास्त्रद्य रहात. प्रत्येकाच्या नावाची पाटी असणारी केबिन त्यांना दिलेली असे. डॉ. भाभांनी मलाही माझ्या नावाची पाटी असणारी केबिन दिली होती, रोज या शास्त्रद्न्यांसोबत मी लंच घेत असे. खूप सन्मानाचे आणि आनंदाचे ते दिवस होते.
तो सन्मान, ती खुशी म्यूरलमधे, त्यातल्या रंगांमधे प्रतिबिंबित झाली नसती तरच नवल. म्यूरल रंगवण्याची रुपये पंधरा हजार बिदागी मिळाली.
  
टीआयएफ़आरमधे म्यूरलच्या स्पर्धेत ज्या चित्रकारांनी स्केचेस किंवा लहान आवृत्त्या रंगवून पाठवल्या होत्या, त्या सर्व लावलेल्या आहेत. सर्वच म्यूरल सुंदर आणि त्या त्या चित्रकारांची नंतरच्या काळात नावाजली गेलेली वैशिष्ट्य साकारणारी आहेत. काही म्यूरल स्केचेस तर अत्यंत परिपूर्ण दिसतात, उलट हुसेनचे स्केच तितके बारकाईने केलेले दिसत नाही. हुसेन टीआयएफ़आर-कलेक्शनच्या पुस्तकात सांगतो की त्याला अजिबातच अपेक्षा नव्हती इतक्या मोठ्या नावांमधून त्याचे स्केच निवडले जाईल. पण पैशांची गरज होती आणि मित्रांनी आग्रह केला म्हणून काहीशा अनिच्छेने त्याने क्रेयॉनने म्यूरल स्केच रंगवून स्पर्धेकरता पाठवून दिले. नंतर दोन महिने उलटले तरी त्याला काहीच समजलं नाही. भाभांचे मित्र फ़िरोझा वाडियांना त्याने शेवटी काय झाले एन्ट्रीचे याबद्दल विचारले. वाडियांना आश्चर्य वाटले की हुसेनना काहीच कसे समजलेले नाही. त्यांनी उलटा भाभांना फोन लावला आणि हुसेनना सांगितले की म्यूरल तुलाच रंगवायचे आहे.

खरं तर दरम्यानच्या काळात टीआयएफ़आरमधे जे घडले ते डॉ. होमी भाभांची व्हिजन आणि कलेची जाण किती अचूक होती तेच दर्शवणारे आहे. संस्थेमधे हुसेनसोबत रावळ यांचे स्केचही फ़ायनल झाले होते. रावळ यांचे डिझाईन अचूक, बारकाव्यांसहित, ब्राईट रंगसंगतीचे, लयदार रेषांचे होते. संस्थेच्या सदस्यांपैकी सर्वांनाच तेच स्केच आवडले. मात्र भाभांनी निर्णयाची घाई केली नाही.
हुसेनचे स्केच आपण का निवडले याबद्दल नंतर बोलताना भाभांनी लिहिले आहे- रावळचे काम एलेगन्ट, व्यवस्थित आहे यात काहीच शंका नाही. पण काळाच्या कसोटीवर उतरणारी अभिजातता हुसेनच्या डिझाईनमधे आहे. दीर्घकाळानंतरही या म्यूरलमधल्या रेषा आणि रंग नवं काहीतरी देत रहातील.
प्रतिभावंत पारखायला प्रतिभावंताचीच नजर लागते आणि तिची अचूकता काळाच्या कसोटीवर खरी ठरते.
डॉ. होमी भाभा कधीच गेले. हुसेन जाऊनही आज एक वर्ष झाले. टीआयफ़आरमधले हे म्यूरल आता ५० वर्षांचे होईल. भाभांची व्हिजन आणि हुसेनची अभिजातता दोन्ही काळाच्या कसोटीवर किती खरे उतरले याची साक्ष देत टीआयएफ़आर आणि ते म्यूरल अजूनही तितक्याच देखणपणाने, ताजेपणाने देत.बघणा-याला चकित करत आहेत.  

==============================================================

*(टाटा इन्स्टीट्यूट ऑफ़ फ़ंडामेन्टल रिसर्च संस्थेचे संस्थापक आणि संशोधक डॉ. होमी भाभा स्वत: उत्कृष्ट आर्टिस्ट होते आणि कलेचे मोठे चाहते संग्राहक होते. स्वातंत्र्योत्तर भारतातल्या आधुनिक आणि समकालिन कलेचा महत्वाचा चित्र आणि शिल्पसंग्रह त्यांनी केला जो टीआयएफ़आर कलेक्शन म्हणून सुप्रसिद्ध आहे.)

'चित्रभाषा' कॉलम दै.लोकमतच्या रविवार 'मंथन' पुरवणीमधे प्रकाशित होतो. तिथून पुनर्मुद्रीत.  

Tuesday, May 22, 2012

द स्क्रीम

एडवर्ड मंच या नॉर्वेजियन इम्प्रेशनिस्ट चित्रकाराने १८९३ मधे पेंट केलेल्या द स्क्रीम चे पडसाद गेल्या आठवड्यात जगभरातल्या कलाक्षेत्रात जोरदार उमटले. न्यूयॉर्क येथे सदबीच्या जागतिक लिलावात हे चित्र कोणा अनामिक ग्राहकाने तब्बल सहाशे कोटींना विकत घेतले. सहाशे कोटी- आख्ख्या भारतीय कलाबाजाराची आजची अंदाजे किंमत साडेसातशे कोटींच्या आसपास आहे हे लक्षात घेतलं तर या एका पेंटींगच्या किंमतीचा प्रचंडपणा लक्षात येईल. पेंटींगला लिलावामधे मिळालेली ही आजवरची सर्वाधिक जागतिक किंमत.

द स्क्रीम चित्र नीट पाहिले तर लक्षात येईल की या चित्रातील इमेज आपण असंख्य वेळेला अनेक ठिकाणी पाहिलेली आहे.
खळबळलेल्या लाल, पिवळ्या पार्श्वभूमीवरचा भयग्रस्त चेहरा.
एका मानवसदृश आकृतीने कानांवर दोन हात घट्ट दाबून धरत भितीने फ़ोडलेली किंचाळी मंचने कॅनव्हासवर दृश्यरुपात चित्रित केली. आणि विसाव्या शतकात आधुनिक जगातील मानसिक तणावांचे, दडपणांचे, ऍन्क्झायटीचे प्रतिक म्हणून ती स्वीकारली गेली. १९६१ साली टाईम मासिकाने पहिल्यांदा आधुनिक जगातील मानसिक ताण-तणावांवर कव्हरस्टोरी केली तेव्हा मुखपृष्ठावर द स्क्रीम छापले. मग व्यावसायिक माध्यमांमधून, जाहीरातींमधून, कधी कार्टून, कधी डूडल म्हणून, टीशर्टवर, कॉफ़ी मग्जवर ही इमेज दिसली, हॉलिवूडच्या होम अलोन मधल्या मुलाने घरात शिरलेल्या दरोडेखोरांना घाबरवायला तिचा मुखवटा घातला, स्क्रीम या भयपट मालिकेत या चित्राला मध्यवर्ती पात्राइतकी महत्वाची भूमिका आहे. पॉप आर्टिस्ट ऍन्डी वॉरहॉलने केलेल्या पॉप्युलर कल्चरच्या घाऊक प्रतिमा चित्रणात मॅरलिन मन्रोसोबत द स्क्रीम आहे.
जगाच्या दृश्यस्मृतीत हे चित्र चांगलच ठसलेलं आहे.
मोनालिसाच्या चित्रानंतर सर्वाधिक सर्वपरिचित असलेली ही इमेज.
तिच्या हास्याप्रमाणेच या किंचाळीचे अर्थ लावले गेले, मानसिक, शास्त्रीय, सामाजिक विश्लेषणे केली गेली.
या गूढ चित्रामागची कथा त्यानेच सांगीतली आहे त्यामुळे खरं तर फ़ार काही रहस्य त्यात शिल्लक असायला नको. पण तसं झालं नाही.  
एडवर्ड मंचच्या मते हा निसर्गातून उमटलेला आक्रोश त्याला ऐकू आला आणि त्याने तो कॅनव्हासवर चित्रबद्ध केला. चित्राचे मूळ नाव द स्क्रीम ऑफ़ नेचर.
मंच ऍक्झायटी या मानसिक तणावातून उद्भवणा-या आजाराने ग्रस्त होता. मृत्यूच्या काळ्या सावलीत बालपण झाकोळून गेले. अगदी लहान वयात आईचा मृत्यू, लाडकी बहीण क्षयरोगामुळे गेली, एक बहिण मानसिक आजारी. वडलांना स्मृतीभ्रंश. किशोरवयात त्याला औदासिन्याने ग्रासले. त्यात भर पडली नॉर्वेतल्या मलूल सूर्यप्रकाशाच्या उदास नॉर्डिक वातावरणाची.
तारुण्यात प्रवेश करतानाच मंच नैराश्य, नकारात्मकता, अल्कोहोलिझमने ग्रस्त झाला.
आपल्या डायरीमधे तो लिहीतो, "आजार, वेडेपणा, मृत्यूच्या काळ्याकुट्ट खांबांनी माझ्या पाळण्याला आधार दिला."
एका संध्याकाळी ओस्लो नदीवरच्या पुलावरुन तो जात होता. मागे टेकडी, एका बाजूला शहराची गजबज, दुस-या बाजूला नदीचे पात्र, वर अथांग आकाश. एडवर्डची मानसिक, शारिरीक स्थिती त्यावेळी फ़ारशी काही बरी नव्हती. आजारी होता त्यामुळे चालताना थकल्यासारखं वाटत होतं. एका ठिकाणी तो थांबला. त्याची नजर आकाशाकडे गेली.
आकाश केशरी ज्वाळांनी वेढल्यासारखं. क्षितिजाचं पोट चिरत सूर्य मावळत होता, बघता बघता आकाश रक्ताळले. मंचला आजूबाजूच्या निसर्गातून एक भीषण किंचाळी उमटते आहे असा भास झाला. तो लिहितो -"मी भितीने कापत तिथे उभा होतो, निसर्गातून एक कर्णकटू, अमर्याद किंचाळी उमटते आहे असं माझ्या मनाला स्पष्ट जाणवलं."
घरी आल्यावर त्याने हे चित्र रंगवले. तो म्हणतो- आकाशातले ढग मी ख-याखु-या रक्तासारखे रंगवले, रंगवताना रंगांमधूनही किंचाळ्या ऐकू येत होत्या.
काहीच्या मते हे चित्र रंगवण्याच्या वेळी त्या टेकडिच्या पायथ्याशीच असलेल्या असायलममधे मंचची डीप्रेशनमधे असलेली बहिण उपचार घेत होती.
काहींच्या मते हे चित्र रंगवण्याच्या १० वर्षं आधी, १८८३ मधे युरोपात क्राकोटोच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे अनेक दिवस मंचने वर्णन केल्याप्रमाणे आकाशात वाजवीपेक्षा जास्त झळझळीत, ज्वालाग्राही रंग सूर्यास्ताच्या वेळी दिसत असत.
मंचने आपल्या एकाकी, उदास आयुष्याच्या सा-या खूणा, दु:खी बालपणाच्या सगळ्या स्मृती या चित्रात ओतल्या आहेत.
हताशा, संताप, असहायता, तणाव, भिती अशा नकारात्मक भावना, भडक रंगांची कोंडलेली खळबळ असलेले हे चित्र जगाची नयनरम्यता नाही, तर त्याचा अंत सूचित करतं असं अनेकांचं मत.

१८९३ ते १९१० या काळात मंचने या इमेजची २ ऑइल पेंटींग्ज आणि २ पेस्टल्स रंगवली. लिलावात सर्वोच्च जागतिक बोली लागलेलं पेंटींग खाजगी संग्रहातले आहे. पेंटींगच्या फ़्रेमवर मंचने चित्र रंगवताना आपली जी मनोवस्था होती तिचे वर्णन करणारे काव्य रंगवले आहे.
बाकीच्या तीन आवृत्त्या नॉर्वेजियन म्युझियममधे आहेत.
पुढील ११९ वर्षांच्या काळात एडवर्डने दृश्यरुपात अजरामर करुन ठेवलेल्या किंचाळीचे पडसाद म्युझियम्सच्या, कलापुस्तकांच्या बाहेर उमटले.
आपली अस्थिर मानसिक अवस्था ढासळून आपण पूर्णपणे वेडे बनू की काय अशी दहशत मंचच्या मनावर होती हे खरं पण पुढील म्हणजे विसाव्या शतकाला साजेसा एक शहाणपणाही त्याच्याकडे होता. आपल्या मानसिक असमतोलाला त्याने सर्जकतेकडे नुसते वळवलेच नाही तर आयुष्यातल्या वेदनेला एका शक्तिशाली कला-प्रतिकाच्या रुपात मिरवले. नैराश्यातही तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने आपल्यातल्या असमतोलाला कॅनव्हासवर रंगांच्या माध्यमातून ओतले.
याचा एक दूरगामी परिणाम झाला. मॉडर्न कल्चरमधे मानसिक असमतोल कलावंताच्या मनाचा एक पैलू म्हणून स्वीकारला जायला लागला. ज्याला एलेमेन्ट ऑफ़ मॅडनेस म्हणतात तो कलेतून डोकावणे सर्वमान्य झाले. इतके की ज्यांच्यात कसलाच असमतोल नव्हता तेही चित्रकार, कलावंत एलएसडी सारख्या ड्र्ग्जचा वापर करुन असंतुलित, भ्रमिष्ट मानसिक जग असते तरी कसे याचा अनुभव घेऊ लागले. सायकॉटीक कविता, साहित्य निर्माण व्हायला लागण्याचा हाच काळ.

ऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एडवर्ड मंचचे आयुष्य खरोखरच उध्वस्त होते.
मात्र त्याची चित्र काढण्याची उर्मी थक्क करणारी होती. हजारांहून जास्त ऑइल पेंटींग्ज त्याने केली, तितकीच वॉटर कलर्स. लिथोचा वापर करुन चित्रांच्या असंख्य प्रिन्ट्स त्याने बाजारात आणल्या.
एकेकाळी, असं वेडविद्र ध्यान रंगवून जगासमोर आणलं त्यामुळे देशाची बदनामी झाली असं म्हणणा-या नॉर्वे सरकारने त्याला राष्ट्रीय हिरोचा दर्जा दिला. २००१ पासून एडवर्ड मंचचा चेहरा एक हजार क्रोनरच्या नोटेवर झळकला. पॅरिसच्या लुव्रमधे मोनालिसाचं जे स्थान, ते ओस्लोच्या नॉर्वेजियन नॅशनल गॅलरीत द स्क्रीम पेंटींगचं.  

अभिजात चित्रांच्या अनेक प्रतिमा कलेच्या इतिहासातून, शतकांचा प्रवास पार करुन आधुनिक जगात सर्वपरिचित झाल्या आहेत. मोनालिसा, सूर्यफ़ुले, वॉटरलिलीज.. नजरेला सुखावणा-या या चित्रप्रतिमा. मात्र आधुनिक युगाची प्रतिमा हे स्थान द स्क्रीम ने पटकावले हे आश्चर्याचे पण तितकेच बोलके
या किंचाळीचे कायमच एक अनाम आकर्षण जगभरातल्या लोकांना वाटत राहीले. असंख्य वेळा पॅरडी होऊनही तिच्यातील ताकद जशीच्या तशी राहिली. आधुनिक जगाचा कोलाहल वाढला, असमतोल वाढला तशी ती वाढतच गेली, तीव्र, कर्कश बनत गेली.
ही किंचाळी म्हणजे आधुनिक जगातील नकारांचे विशुद्ध, प्रामाणिक चित्रण.
चित्रं काही वेळा व्यावसायिकरित्या अतीपरिचित झाली की मुळात ते एक अभिजात चित्र आहे, मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप खोलवरचा काही अर्थ त्या चित्रातून अभिप्रेत आहे हेही विसरलं जातं.
आता तर सर्वोच्च किंमतीचा टॅग 'द स्क्रीम'वर लागला आहे.
कलेपेक्षा किमतीचे महत्व जास्त असणार्‍या जगात मंचची किंचाळी कलाजगतात यापुढेही पडसाद उमटवत राहील ती किमतीचीच. 

Friday, May 11, 2012

वक्त- ’साठ’वण सिनेमांची


पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्‍यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
साठचं दशक आल्हाददायक होतं. मुगल-ए-आझम, संगम सारखे भव्य आणि नेत्रदीपक, हम दोनो, तेरे घर के सामने सारखे अवखळ आणि रोमॅन्टिक, ज्युवेल थीफ़, तिसरी मंझिल सारखे रहस्यमय आणि रोमांचक, बीस साल बाद, गुमनाम सारखे गूढ आणि संगीतरम्य, बंदिनी, गाईडसारखे संवेदनशील, पाकिझा, साहिब बिबी और गुलामसारखे काव्यमय सिनेमे साठच्या दशकाला झगमगते चांद लावून गेले, ज्यांची रोशनी अजूनही त्याच तेजाने झळाळते आहे.
यातला प्रत्येक सिनेमा पुन्हा पुन्हा पहावा आणि प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नव्याने सापडावे. यातल्या प्रत्येक सिनेमावर, त्यातल्या अभिनेता अभिनेत्रींवर, कथानकावर, दिग्दर्शनावर, संगीतावर आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे आणि तरीही अजून खूप काही सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे राहून गेले आहे असे पुन्हा पुन्हा वाटावे.
असं असूनही साठच्या दशकातल्या सिनेमांवर लिहीताना मला पहिल्यांदा आठवला तो ’वक्त’च. काय जादू होती या सिनेमाची?
सिनेमांना पर्सनॅलिटी आहे असं मानलं तर ’वक्त’ ला निर्विवादपणे स्टाईलिश, ग्लॅमरस, फ़ॅशनेबल आणि ट्रेन्डसेटर पर्सनॅलिटी बहाल होईल.
’वक्त’ पहिल्यांदा पूर्णपणे पाहीला अर्थातच टीव्हीवर. साठच्या दशकातले सिनेमे प्रत्यक्ष पडद्यावर झळकताना बघण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले नाही. सगळे भव्य, नेत्रदीपक इत्यादी सिनेमे टीव्हीच्या सोळा-अठरा इंची पडद्यावरच पहाता आले. कधीतरी मॅटीनीला लागणारे सिनेमे आणि हल्ली मुगल-ए-आझम, हम दोनो, नया दौर रंगीत होऊन पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकवले गेले ते अपवाद सोडून. मात्र त्याच्या कितीतरी आधीपासूनच छायागितात ’वक्त’ची गाणी अनेकदा पाहिली होती. विशेषत: ’आगे भी जाने ना तु..", ’कौन आया के निगाहोंमे चमक जाग उठी..’ आणि ’ऐ मेरी जोहराजबी..’ ही गाणी.
’आगे भी..’ गाण्यातली दुनिया अद्भूत होती. पुढे काय होणार माहीत नाही, मागे काय झालय आठवत नाही, आत्ताचा हा क्षणच तेव्हढा खरा.. साहीरने हे गाणं टीव्हीच्या पडद्यावर नजर चिकटवून बसलेल्या माझ्यासाठीच लिहिलं असावं इतकी मी या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात, प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दांत गुंतून गेलेली आठवतेय. म्हणजे आशाचा आवाजबिवाज किंवा रवीचं संगीत वगैरेमधे नाही. ते थोरच. पण ते सगळं नंतर. त्यावेळी मोहात पाडायचा तो त्या गाण्यातला माहोल.
आगे भी जाने ना तु.. गाण्याचं चित्रिकरण अत्यंत ’हॅपनिंग’ आहे. गाण्यातून ’कथा’ पुढे जाणं, गाण्यातल्या प्रत्येक ओळीत काही ना काही चित्तथरारक घडणं हे एक आणि दुसरं त्यातला देखणेपणा (खरं तर हा देखणेपणा ’वक्त’च्या सगळ्याच गाण्यांचं, आख्ख्या सिनेमाचंच प्रमुख वैशिष्ट्य. पण ते नंतर) अनुभवणं.
एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलातली आलिशान बॉलरुम शोभावी अशा हॉलमधे हे गाणं सुरु असतं. तो चिनॉयसेठचा रहाता बंगला असतो. पार्टीत हातात माईक घेऊन गाणारी ऍन्ग्लो इंडियन क्रूनर, गाण्याच्या तालावर नृत्य करणारे सोफ़िस्टीकेटेड, उच्चभ्रू स्त्री-पुरुष असा एकंदरीत माहोल. जस जसं गाणं पुढे सरकत जातं तसा हा माहोल असा काही खुलत जातो की बास.
पार्टीत राजकुमार कोण्या राजघराण्यातल्या शशिकलाला मिठीत घेऊन नृत्य करत आहे. अर्थात नृत्य हा एक बहाणा आहे, खरं तर तो तिच्या गळ्यातला रत्नजडीत (पचास लाखसे भी कई ज्यादा) हिर्‍याचा हार चोरण्याची संधी साधू पहातोय. या प्रसंगाच्या किनार्‍या किनार्‍याने इतरही काही घटना पार्टीत घडत जातात.
ड्रायव्हर असलेल्या शशी कपूरवर प्रेम करणारी श्रीमंत घरातली शर्मिला टागोर त्याच्याशी बोलायची संधी शोधू पहात असते, तो बाहेर कारपार्किंगमधे मालक चिनॉयसेठची गाडी राखत उभा असतो. साधना आणि सुनील दत्त एकमेकांच्या संगतीत बाकी सगळ्या दुनियेला विसरुन जाऊन, कारंजाचे तुषार झेलत गप्पांमधे मग्न झालेले असतात.
अकस्मात शशी कपूरची आजारी आई आजारी असते ती ’सिरियस’ होते. एक जण धावत धावत शशी कपूरला ती बातमी सांगायला येतो, शशी कपूर कावराबावरा होत आत जाऊन चिनॉयसेठची घरी जाण्याची आणि सोबत गाडी घेऊन जाण्याची परवानगी घेऊन घाईघाईने घरी पोचतो. घरी डॉक्टर आलेले असतात. आईची ट्रीटमेन्ट चालू होते. इकडे चिनॉयसेठने पाळलेला गुंड पार्टीत आधीच दारु पिऊन झोकांड्या खात घुसतो, साधनाला छेडायला लागतो. सुनील दत्त ते पाहून भडकतो. मग त्या दोघांची हातापाई. गुंड चाकू काढतो. राजकुमार मधे पडतो. मग त्यांची मारामारी. राजकुमार गुंडाला मै तुम्हे जानसे मार डालूंगा अशी धमकी देतो ती पार्टीतले सारे लोक ऐकतात (जनाब पॉइन्ट नोट किया जाये. नंतरच्या घटनांशी याचा जवळचा संबंध आहे). पार्टी फ़िसकटते. चिनॉयसेठ भडकतो. वगैरे वगैरे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ऍन्ग्लो इंडियन क्रूनर आपली हातात माईक घेऊन संथपणे झुलत गातच असते.. ये पल गवाना ना, ये पलही तेरा है..
गाणं इतक्यांदा पाहीलं की आता कोणत्या ओळीवर यातला काय प्रसंग घडणार हे तोंडपाठ.
नायक नायिकांच्या वेशभुषेमुळे सिनेमा इतका देखणा बनू शकतो हे पहिल्यांदा लख्खपणे उमगलं ’वक्त मधूनच. ही किमया चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनरची म्हणजेच भानू अथैयांची. भानूजींनी ’वक्त’मधे कमाल केली होती. साठच्या दशकाचा ट्रेडमार्क झालेले, नंतर जवळपास प्रत्येकच चित्रपटांमधून आपल्याला दिसलेले पंजाबी तंग चुडीदार, त्यांवरचं कशिदाकाम, मोत्यांचं भरतकाम, अनोख्या पद्धतीत नेसलेली साडी, साड्यांचे पेस्टल कलर्स, बुफ़ॉं हेअरस्टाईल, खड्यांचे नाजूक, चमचमते दागिने या सर्वांची सुरुवात ’वक्त’ पासून झाली.
वक्तने सिनेमांच्या वेशभुषेचा संपूर्ण चेहरामोहोराच बदलला आणि त्याचा ठसा या पुढच्या सर्व दशकांवर ठळकपणे पडला.
१९६५ साली आलेल्या ’वक्त’ने पुढच्या काळातल्या चित्रपटांमधे त्यानंतर वारंवार आढळून येणार्‍या ज्या अनेक गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करुन दिली त्यातली स्टायलिश, फ़ॅशनेबल लूक ही केवळ एक गोष्ट.
साठच्या दशकात दोन हिरो-एक हिरॉइन (संगम) किंवा एक हिरो-दोन हिरॉइन्स (हम दोनो) असणं कॉमन होतं पण एकाच सिनेमात त्या काळात टॉपला असलेले स्टार्स इतक्या मोठ्या संख्येने चमकवण्याची म्हणजेच ‘मल्टीस्टारर फ़िल्म्स’ची सुरुवात वक्तपासून झाली. यात एकाचवेळी सहा स्टार्स होते. बलराज सहानी, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर. यापैकी शर्मिला टागोरचा हा जेमतेम दुसराच सिनेमा. आदल्याच वर्षी झळकलेल्या ’काश्मिर की कली’ ने तिला स्टार बनवलं होतं.
’लॉस्ट ऍन्ड फ़ाउंड’ हा नंतरच्या काळात घासून घासून अतीगुळगुळीत बनलेल्या फ़ॉर्म्युला पहिल्यांदा वक्तमधेच वापरला.
पळणार्‍या लहान मुलाच्या पायांवर कॅमेरा रोखून नंतर तो मोठा झालेला, नायकाच्या रुपात दाखवणे ही स्टाइलही यश चोप्रांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमात ’वक्त’द्वारे दाखवली.
थरारक कोर्टरुम क्लायमॅक्स हाही या सिनेमातून रुजवलेला पायंडा.
तसं पाहीलं तर बी.आर.चोप्रा नवं काहीतरी करणारे म्हणून कायमच प्रसिद्ध होते. साठच्या दशकातच त्यांनी एकही गाणं नसलेले दोन सिनेमे प्रसिद्ध करण्याचं धाडस दाखवलं होतं (कानून आणि इत्तेफ़ाक).
चोप्रांना सामाजिक आशयाच्या, समस्याप्रधान कथानकाला मनोरंजनाच्या अवगुंठनामधून पेश करण्याची हातोटी अचूक जमलेली होती. पटकथा, अभिनय, संगीत, दिग्दर्शन हे चारही खांब भक्कम असले की सिनेमाचा डोलारा यशस्वीपणे पेलला जातोच हे त्यांनी या आधीच्या गुमराह, नया दौर, साधना, धूल का फ़ूल मधून सप्रमाण सिद्ध करुन दाखवले होते.
वक्तमधे बी.आर.च्या सामाजीकतेला साथ मिळाली या फ़िल्मद्वारे पहिल्यांदा स्वतंत्र दिग्दर्शन करणा-या यश चोप्रांच्या आधुनिक, नव्या विचारांची आणि ताज्यातवान्या टवटवीत सौंदर्यदृष्टीची.
यश चोप्रांच्या या पहिल्याच दिग्दर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वक्त त्या काळातला ह्यूज ब्लॉकबस्टर ठरला.
यश चोप्रांच्या पुढच्या सर्व यशस्वी फ़िल्म्समधल्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांची- आगळं कथानक, थरारक क्लायमॅक्स, उत्कृष्ट गाणी, काव्यमय संवाद, नयनरम्य लोकेशनवर शूटींग, लेटेस्ट, अभिरुचीसंपन्न फ़ॅशन्सनी नटलेले देखणे, अभिनयसंपन्न, त्या त्या काळातले टॉप मल्टी स्टार्स, यांची रुजुवात ’वक्त’ने करुन दिली.
यश चोप्रांनी ’वक्त’ मधून प्रेक्षकांना ज्या ऐश्वर्यसंपन्न जीवनशैलीची झलक प्रत्येक दृष्यांमधून दाखवली ती त्या काळातल्या प्रेक्षकांकरता स्वप्नवत होती. आधी कधीही ही दुनिया हिंदी सिनेमाच्या, तेही रंगीत पडद्यावरुन, प्रेक्षकांना दिसली नव्हती. वॉल टू वॉल उंची, मऊशार, लालभडक रुजाम्यांनी सजलेले बंगले, ज्यांच्या आवारात स्विमिंग पूल आणि आवारालगत बोटींग करता येतील असे रम्य तलाव आहेत. रेड-यलो स्पोर्ट्सकार उडवत रेसिंग करणारी, डॅशिंग तरुण मुलं, सकाळी शॉर्ट्स घालून बंगल्यातल्या हिरवळीवर नाजूकपणे बॅडमिंटन खेळणार्‍या, गार्डन चेअरवर बसून, बोनचायनाच्या टीसेटमधून चहा पिणार्‍या, शिफ़ॉनच्या तलम साड्या नेसून किंवा फ़ॅशनेबल चुडीदार घालून, लाल रुजाम्यांवर पहुडून दुपारी कादंबर्‍या वाचणार्‍या, गुलाबांच्या परड्या नीट लावून ठेवण्याचे, रेशमी, सळसळते पडदे बाजूला ओढण्याचे ’काम’ करणार्‍या, मनोरंजनासाठी पियानो छेडणार्‍या, बर्थडे पार्ट्यांमधून नाजूक हसत प्रेझेन्ट्स स्विकारणार्‍या आणि मेणबत्त्या विझवून केक कापणार्‍या, स्वीमसूट घालून पोहायला जाणार्‍या, पिकनिक्सना जाणार्‍या तरुण, देखण्या मुली- हे सगळं ’वक्त’ मधून चोप्रांनी सहजतेनं दाखवलं.
waqt_decor.jpg
मात्र ’वक्त’मधे हा दिखावा, भपकाच केवळ नव्हता. ’वक्त’चं संगीत, दिग्दर्शन, कथानक, स्क्रीप्ट, अभिनयाची बाजू तितकीच तगडी होती. ब्रिटिश फ़िल्म इन्स्टीट्यूटमधे जी दहा टॉप हिंदी फ़िल्म्सची स्क्रीप्ट्स ठेवलेली आहेत त्यातलं एक ’वक्त’चं आहे. ओरिजिनॅल्टी हा कथेचा स्ट्रॉन्ग पॉइन्ट होता.
अख्तर मिर्झांची कथा काळाचा अगाध महिमा दर्शवणारी, एका मोठ्या कालखंडातून प्रवास करणारी आहे. मिर्झांचं फ़ाळणीपूर्व आयुष्य पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात गेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात केदारनाथ ऍन्ड सन्स नावाची त्यांची कार्पेट बनवण्याची मोठी फ़र्म होती. क्वेट्टाच्या भूकंपाच्या तडाख्यात त्यांच्याही कुटूंबाची वाताहत झाली. पुढे अनेक वर्षांनी योगायोगाने त्या कुटूंबातील सदस्य पुन्हा एकत्र आले. याच आठवणींवरुन मिर्झांनी ’वक्त’ची कथा लिहिली. बी.आर.चोप्रांचं बालपणही लाहोरला गेलं असल्याने त्यांना या कथेविषयी आत्मभाव वाटला. या कथानकावर भव्यदिव्य, रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं. पटकथा-संवाद लिहिण्याचं काम त्यांनी अख्तर उल इमान यांच्याकडे सोपवलं (हे अमजदखानचे सासरे).
इमान यांनी कथानकाला कोर्टरुम ड्रामा, खूनाचं रहस्य, दैववादाची जोड दिली.
स्टोरी सुरु होते लाला केदारनाथांच्या नव्या दुकानाच्या, नव्या हवेलीच्या उद्घाटन प्रसंगाने.
waqt_store.jpg
त्याच दिवशी त्याच्या तिनही मुलांचा वाढदिवसही असतो. लाला केदारनाथ आपल्या स्वकतृत्वाने मिळवलेल्या यशाने संतुष्ट, अभिमानाने ओतप्रोत आहे. आनंदाने काठोकाठ भरलेला आहे. उत्सवी वातावरण आहे, तो आणि त्याची पत्नी लक्ष्मी नातेवाईक, शेजार्‍यापाजार्‍यांच्या स्वागतात मग्न आहेत. जल्लोश चालू आहे. गाणी बजावणी सुरु आहेत. लालाजींच्या रोमॅन्टीक ’ऐ मेरी जोहरजबी..’मुळे लक्ष्मी लाजून लालेलाल होते आहे.
कोणीतरी काळाचा महिमा वर्तवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लाला त्याला धुत्कारतो. जणू काळ ते ऐकतो आणि लाला केदारनाथला आपल्या सामर्थ्याची किंचितशी चुणूक दाखवायचं ठरवतो. त्याच रात्री भूकंप होतो. लालाची हवेली पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. मुलं, पत्नी हरवतात. लाला वणवण करत त्यांना शोधायला भटकत रहातो.
लक्ष्मीच्या कुशीतला धाकटा मुलगा तिच्यासोबतच रहातो. ते निर्वासितांच्या छावणीत रहायला लागतात, त्यांना दूर कुठेतरी हलवण्यात येते.
मोठा मुलगा अनाथालयात आहे असं समजतं म्हणून लाला तिथे पोचतो पण नेमका त्याच दिवशी तो मुलगा तिथल्या छळाला कंटाळून पळून जातो, पुढे चोरीमारी करुन पोट भरतो, चिनॉयसेठ त्याला आपल्या पंखाखाली घेतो.
इकडे लाला त्या अनाथालयातल्या लोभी मॅनेजरचा आपल्या मुलाचा छळ केला म्हणून चिडून खून करतो आणि तुरुंगात जातो.
काळाची पावलं वेगात पडत असतात. वीस वर्षं उलटतात.
मधल्या रवीला एक प्रेमळ, श्रीमंत जोडपं दत्तक घेतं. तो वकिल बनतो. श्रीमंत कुटुंबातली साधना त्याची मैत्रिण आहे, दोन्ही कुटुंबांचे स्नेहसंबंध आहेत.
सोफ़िस्टिकेटेड चोर बनलेला स्टायलिश राजा जज्जाच्या मुलीच्या म्हणजे साधनाच्या गळ्यातला नेकलेस चोरतो, तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर (अर्थातच जगदीश राज) त्याला सल्ला देतो की परत कर तो नेकलेस जर चोरला असशील तर. कारण जज्ज आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवसाला भेट म्हणून घेतलेला नेकलेस चोरीला गेला हे गप्प बसून सहन करणार नाहीत.
राजा वाढदिवसाच्या पार्टीत जाऊन नेकलेस आपल्याला मिळाला असं सांगत परत करतो. आणि साधनाच्या प्रेमात पडतो. तिच्या आधीपासूनच प्रेमात असलेला रवी त्याला आपला प्रतिस्पर्धी वाटतो.
राजा-रवी-साधना यांच्यातला प्रेमाचा त्रिकोण, काही प्रसंग नंतर यश चोप्राने जसेच्या तसे त्रिशुलमधे वापरलेत. अमिताभ-शशी-हेमा त्रिकोणात. त्यातही अमितभ आणि शशी एकमेकांचे भाऊ असतात हे दोघांना माहीत नसतं. अमिताभला जेव्हा ते कळतं तेव्हा तो स्पर्धेमधून बॅक आऊट होतो. इथे राजालाही कळतं रवी आपलाच भाऊ आहे, जेव्हा तो त्याचा खून करायला बेडरुममधे रात्री शिरतो आणि टेबलावर रवीचा बालपणातला फोटो बघतो तेव्हा. पण तो ते रवीला सांगत नाही. अबोलपणे त्याच्या सोबत रहातो.
पुढे राजावर चिनॉयसेठ स्वत: केलेल्या खूनाचा खोटा आळ घालतो तेव्हा रवीच त्याची बाजू लढवून त्याला खूनाच्या केसमधून सोडवतो. शेवटचा हा कोर्टड्रामा अफ़लातून आहे.
इथेच लाला केदारनाथ आणि त्याच्या तिनही मुलांची, पत्नीची पुनर्भेट होते.
खरं तर हा अविश्वसनीय प्रकार पण स्क्रीप्टमधे सगळे सुटे धागे इतक्या कौशल्याने या शेवटच्या प्रसंगात खूबीने जोडले आहेत की हा प्रसंग बघताना जराही अतार्किक वाटत नाही.
ढोबळ कथानक या मार्गाने जात असलं तरी खरे रंग भरतात यातले बारीकसारीक प्रसंग. राजा-चिनॉयसेठमधले, रेणू-रवीमधले, रवी-राजा-मीना, राजा-रवीमधले. या प्रत्येक प्रसंगातले संवाद, अभिनय लाजवाब.
वक्त मधे लाला केदारनाथ आणि त्याची तीन मुलं यांच्या भूमिकांकरता चोप्रांच्या मनात पृथ्वीराज कपूर आणि त्याची तीन मुले-राज, शम्मी आणि शशी कपूर यांना घेण्याचं पक्क होतं. दरम्यान त्यांनी ही कथा बिमल रॉयना वाचून दाखवली आणि त्यांचं मत विचारलं. बिमलदांनाही कथेतला ड्रामा, दैववाद हे सगळं आवडलं. फ़क्त त्यांनी स्टारकास्टबद्दल मुलभूत शंका व्यक्त केली. कपूर बापबेटे किंवा भाईभाई एकमेकांसमोर आल्यावर, परस्परांना चेह-यामोह-याने ओळखू शकणार नाहीत यावर प्रेक्षकांचा कदापी विश्वास बसणार नाही असं त्यांचं मत त्यांनी चोप्रांकडे व्यक्त केलं. त्यांनाही ते पटलं. त्यांनी ’वक्त’चं नव्याने कास्टींग केलं. आणि त्यानंतर ते इतकं अचूक ठरलं की आज ’वक्त’ त्याकरता प्रसिद्ध आहे. आदर्श कास्टींग.
बलराज सहानी लाहोरच्या सरकारी कॉलेजात चोप्रांचे सहाध्यायी होते. बलराजजी चांगल्या रोलच्या प्रतिक्षेत आहेत हे चोप्रांना ठाऊक होते. त्यांनी ’वक्त’ मधल्या मध्यवर्ती लाला केदारनाथ यांच्या भूमिकेकरता बलराज सहानींची निवड केली ती किती अचूक ठरली हे पुढच्या काळात सिद्धच झाले. प्रेक्षकांनी चोप्रांना त्याकरता मनोमन धन्यवाद द्यावेत अशा ताकदीने बलराज सहानींनी ही भूमिका वठवली. काळाने श्रीमुखात भडकाविलेल्या सामान्य माणसाचं रुप बलराज सहानींच्या लाला केदारनाथमधून अक्षरश: जिवंत झालं.
एका दृश्यात लाला चौपाटीवर बसून चुपचाप चणे खात असतो. एकेकाळचा गडगंज, आलिशान हवेलीचा मालक, तीन सुपुत्र, गुणी बायको असलेला लाला आता सर्वस्व गमावून, काळाच्या एका थपडीत कोलमडून जाऊन असा चौपाटीवर चणे खात पोट भरतोय, हे दाखवताना त्याच्या चेहर्‍यावर जी सुन्न उदासी आणि हताश परिस्थिती शरणता आहे ती बघून अंगावर काटा येतो. काळजातल्या सगळ्या जखमा चेहर्‍यावर वागवत लाला तिथे बसलेला असतो.
शेजारीच त्याचा मुलगाही असाच सुन्न, उदास होऊन बसलेला असतो. त्यालाही नुकतंच आपण आपल्या आईबापांच्या पोटचा सख्खा नाही तर दत्तक मुलगा आहोत हे सत्य उमगलय, आपला सख्खा बाप शेजारी बसलाय हे त्याला आणि ज्या आपल्या मुलांना शोधायला आयुष्यभर वणवण केली, तुरुंगातही जाउन आलो, तो असा शेजारी, हाताच्या अंतरावर बसला आहे हे लालाजींनाही माहीत नाही.
यश चोप्रांनी एकही संवाद नसलेला हा सीन विलक्षण परिणामकारकरित्या जमवलाय!
अजून एका प्रसंगात जेव्हा लाला केदारनाथ तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आणि खुल्या आकाशाकडे बघत मोकळा श्वास घेताना गलबलतो आणि शिपायाला सांगतो की तुरुंगात असताना बायको मुलांना दैवाच्या हवाली करुन टाकलं होतं मी, आता पुन्हा या विशाल दुनियेत आलोय, कुठे आणि कसा शोधणार मी त्यांना..
बलराज सहानींच्या अभिनयातली, त्यांच्या संवाद उच्चारणातली सहजता, नैसर्गिकता या प्रसंगात बघावी फ़क्त.
राजकुमार पूर्वी पोलिस ऑफ़िसर असल्यापासून चोप्रांना परिचीत होता. त्याच्या हट्टी, हेकेखोर स्वभावाचाही त्यांना चांगलाच परिचय होता. ’धूल का फ़ूल’ मधे त्यांनी आधी राजकुमारलाच घेतले होते, मात्र त्याच्या आडमुठ्या स्वभावाला वैतागून त्यांनी ती भूमिका रजेन्द्र कुमारला दिली. ’वक्त’मधला ’राजा’चा रोल तरीही राजकुमारनेच करावा अशी चोप्रांची इच्छा होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला ही भूमिका साजेशी आहे असं त्यांना प्रामणिकपणे वाटत होतं खरं तर धर्मेन्द्रही ही भूमिका करायला उत्सुक होता. पण चोप्रांनी राजकुमारकडेच ’राजा’ची भूमिका सोपवली आणि राजकुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं.
इमान यांनी लिहिलेल्या संवादांना त्याने आपल्या खर्जातल्या आवाजाने आणि ऍटीट्यूडने बहार आणली. ’ये चाकू है बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है," किंवा "चिनॉयसेठ, जिनके अपने घर शीशोंके होते है, वो दुसरोंपर पत्थर नही फ़ेका करते," या संवांदांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
राजकुमार पुढील काळात खर्‍या अर्थाने ’राजा’च्या भूमिकेबाहेर येऊच शकला नाही, इतका त्याच्यावर या भूमिकेचा शिक्का बसला.
चि्नॉयसेठच्या भूमिकेत रेहमानसारख्या बुजूर्ग अभिनेत्याने मस्त रंग भरलेत. त्याचा उजवा हात राजा आणि डावा हात मदनपुरीने रंगवलेला एक मवाली गुंड.
बाकी सुनील दत्तने उमदा, बडबडा, जवां दिल, वकिल रवी, जो राजाला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला खूनाच्या केसमधून सोडवतो तो मस्त रंगवला. त्याचे सारखे ’चष्मे बद्दूर, गुले गुलजार..’ म्हणणे जरा डोक्यात जाते, पण ठीक आहे.
साधना तर माझी आवडती हिरॉइन. ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधली तिच्या देखण्या चेहर्‍याची जादू रंगीत पडद्यावरही तितकिच खुलली. जुन्या हिरॉइन्सचा प्लस पॉईन्ट असलेली व्यक्तिमत्वातली ग्रेस साधनात पुरेपूर होती. श्रीमंत, देखण्या मीनाच्या भूमिकेत साधना अप्रतिम शोभली. वाढदिवसाच्या दिवशी तिचे प्रेझेन्ट स्वीकारताना कपाळावरच्या बटा सावरत नाजूकपणे ’थॅन्क यू’ म्हणणे थेट रोमन हॉलिडेतल्या ऑड्रे हेपबर्नच्या स्टाईलवरुन उचलले आहे. पण तिला शोभते. तिचे स्वीमसूटमधले दृश्य सेन्सॉरने कापले होते पण रिरिलिजच्या वेळी चोप्रांनी पुन्हा ते घुसडलेच.
waqt_anticipation.jpg
तीनही भावांमधला सर्वात धाकटा भाऊ विजय आईकडे म्हणजे अचला सचदेवकडेच असतो. हुषार विजय (बीए फ़र्स्ट क्लास फ़र्स्ट अर्थात) आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव असलेला, आजारी, खचलेल्या आईला सांभाळणारा. त्याचा बिचारेपणा, बापुडवाणेपण, परिस्थितीची समजूत शशी कपूरने यथार्थ दाखवली. दत्तक सुनील दत्तची धाकटी बहिण रेणू म्हणजे शर्मिला टागोर गरीब विजयच्या प्रेमात पडते, त्याच्या अभावग्रस्त परिस्थितीला समजावून घेत असते, पण शशी कपूर तिला न्यूनगंडातून सतत नाकारत रहातो. रेणू विजयला हट्टाने कार ड्रायव्हिंग शिकवते आणि नंतर आपल्या आजारी आईला उपचाराकरता मुंबईला आणावे लागल्यावर पोट भरण्याकरता विजयला हे ड्रायव्हिंगच उपयोगी पडते, त्याला चिनॉयसेठकडे ड्रायव्हरची नोकरी मिळते.
एकदा त्याच्या कारमधे मागे नेमकी रेणूच बसते, त्या सिनमधे शशी कपूरने बिचारेपणा वैतागवाणा होण्याइतका खरा रंगवलाय.
शर्मिला टागोरची रेणू मस्त. तिचा नंतर अती झालेला लाडीकपणा यात जरा सुसह्य आहे. भानू अथैयाने शर्मिला टागोरचे ड्रेसेसही सुंदर केलेत. बोटीवरच्या पिकनिकच्या वेळचा तिचा गुलाबी-पांढरा फ़्रील्सचा चुडीदार, काळे कशिदाकाम केलेला पांढरा चुडीदार एलेगन्ट दिसतो. तिच्या नाजूक शरिरयष्टीला सगळे ड्रेसेस शोभतातही.
साहीर लुधियानवी आणि रवी ही जादुई जोडी चोप्रांकडे होतीच. त्यामुळे वक्तच्या संगीतयशाबद्दल आधीपासूनच कधी संदेह नव्हता. ’चलो इक बार फ़िरसे अजनबी बन जाये हम दोनो..’ सारखी जादू साहीर-रवीने ’वक्त’मधून पुन्हा एकदा दाखवली. वक्तचं टायटल सॉंग ’आदमी को चाहिए वक्त.’ तर खास साहीरचा ठसा असलेलं गाणं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच काळाची महती प्रेक्षकांना अचूक समजली. बाकी ’ऐ मेरी जोहराजबीं..’ गाण्याने घडवलेला इतिहास तर सर्वपरिचित आहेच. "हम जब सीमटके आपके..", "कौन आया के निगाहोंमे चमक..", "जब तुम मुझे अपना कहते हो, अपनेपे गरुर आ जाता है..", "दिन है बहार के.." ही गाणी खार रवीच्या शैलीतली हळुवार रोमॅन्टिक.
’वक्त’ला फ़िल्मफ़ेअरचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यश चोप्रा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साधना, सहाय्यक अभिनेता राजकुमार, सर्वोत्कृष्ट कथा एफ़.ए.मिर्झा, संवाद अख्तर-उल-इमान असे मानाचे पुरस्कार मिळाले. पहिल्याच रंगीत सिनेमाकरता धरम चोप्रांनाही पदार्पणातच उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ीचा पुरस्कार मिळाला.
मला ’वक्त’ आवडतो त्याच्या स्टाईलिश, ग्लॅमरस रुपामुळे. दिग्दर्शक यश चोप्रांच्या पुढच्या सर्व सिनेमांमधे हा लुक त्यांचा युएसपी राहिलेला आहे, आणि त्याची सुरुवात झाली ’वक्त’ पासून. मात्र वक्तच्या स्टाईल आणि ग्लॅमर कोशंटचं निम्म क्रेडीट नि:संशयपणे घेऊन जाते सिनेमाची कॉस्च्युम डिझाईनर भानू अथैया.
साठच्या दशकातल्या सिनेमांची जादू, तसे सिनेमे पुन्हा आजतागायत निर्माण होऊ शकले नाहीत. पुन्हा निर्माण होतील याची जराही शक्यता नाही. सत्तरच्या दशकातल्या अनेक सिनेमांचे रिमेक झाले पण या सिनेमांना कोणी अजूनही हात लावू धजलेला नाही. साहजिकच आहे, कथानक जसंच्या तसं उचलू शकाल, पण बिमल रॉय, विजय आनंद, चोप्रांसारखे दिग्दर्शक, आसिफ़, अमरोहीसारखे निर्माते, नौशाद, एस.डी., शंकर जयकिशन, रवी, आर.डी. यांसारख्या संगितकारांना, ज्यांचा जादुई स्पर्श सिनेमा निर्मितीला लाभलेला होता ते कुठून आणणार? देव आनंद, शम्मी कपूर, राज कपूर, नूतन, मधुबाला, वैजयंती माला, मीना कुमारी, वहिदा, साधना सारख्या देखण्या, अभिनयसमृद्ध अदाकारी कोण करणार? या दिग्गज कलावंतांच्या, दिग्दर्शक, संगितज्ञांच्या कारकिर्दीतला हायेस्ट पीक परफ़ॉर्मन्स साठच्या दशकाने पाहीला होता.
=========================================================================
संदर्भ- विनोद मेहता (इंडियन सिनेमा)
भावना सोमैया ( दी गोल्डन एरा)
अरुणा अंतरकर
इंटरनेट डेटा बेस- विकिपिडिया, आयएमडिबी आणि इतर