Friday, February 20, 2009

फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन? माय फ़ूट!!

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

Friday, February 13, 2009

रस्किन, गुलझार आणि मी (:P)

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच! मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य (म्हणजे त्यात पैसा मिळतो आणि यात नाही हा सोडून) आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन सारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहिता यावं.
नाही जमत :(
असाईन्मेन्ट्सचं टेन्शन आणि उलटून गेलेल्या डेडलाईन्स नजरेसमोर दिसत असताना साध्या खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरम कडे नाही लक्ष जात भलेही त्यावर सोनेरी बुंदक्यांसारख्या फ़ुलांच्या राशी जमा झालेल्या असोत.
तर ते जाऊचदेत.
जिनियस क्रिएटिव्ह आणि आपल्यासारखे कुडमुडे क्रिएटिव्ह ह्यांत इतपत फरक तर असणारच. नाही कां?

Wednesday, August 27, 2008

पत्ता पत्ता.. बुटा बुटा..

ऑगस्ट-सप्टें. हे महिने म्हणजे वर्षाऋतुचा जवळजवळ मध्य. या दिवसांत पाऊस चांगला स्थिरावलेला असतो. निसर्गाला त्याने सर्वांगाने बहरुन आणलेलं असतं. वेली, झुडुपे, झाडे, वृक्ष सारेच पानाफ़ुलांनी नखशिखांत सजलेले. जमिनीतलं प्रत्येक पडलेलं बीज रुजुन वर आलेलं असतं. ऋतु आणि निसर्गाशी कायमच मनोरम गुंफ़ण करुन असलेली आपली सण-संस्कृती साहजिकच या दिवसांत पर्णफ़ुलांच लेणं लेवूऩच साजरी होते यात नवल नाही.
दुर्गाबाई श्रावणसाखळीतल्या शेवटच्या दुव्याचे म्हणजे भाद्रपदाचे वर्णनच मुळी सर्व ऋतुंचे सार असणारा महिना असे करताना लिहितात, " वसंताचे पुष्पवैभव, ज्येष्ठाचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल सारेच काही ह्या महिन्यात अनुभवायला मिळते."
समृद्ध हिरवाईने खुललेल्या ह्या भाद्रपदात आपल्या घरात पाहुणे येणा-या आद्यदेवतेचे श्री गणरायांचे स्वागत जनलोक ह्याच बहुविध पत्री,फ़ुले,फ़लादींच्या समर्पणाने करतात हेही साहजिकच. त्यासाठीच्या सगळ्याच वनस्पती नैसर्गिकपणे उगवणा-या. ती फ़ुले, पत्री गोळा करुन आणायचं कामही घरातल्या लहान मुलामुलींचं किंवा स्त्रियांच. ताज्या,टवटवीत निसर्गाच्या इतक्या समीप जाऊन त्याचा परिचय दृढ करुन घ्यायची किती छान संधी ही!
लहानपणी ठाण्याला रहात असताना घराभोवतीचं या दिवसांतलं अंगण मधुमालती, अनंत, चाफ़ा, सोनटक्का, गुलबक्षी, जाई, पारिजातक, कण्हेर, कृष्णकमळीच्या फ़ुलांनी, दुर्वा-तुळशींच्या गजबजाटाने फ़ुलून आलेलं असायचं. मला वाटतं पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इतपत हिरवाई सा-यांच्याच अंगणांमधे असायची. सोबतीला फ़ेर धरुन जांभूळ, उंबर, पांगारा वगैरेंची मोठी झाडेही असायचीच.
त्यानंतरच्या काळात मात्र अंगणच संकोचली आणि रस्त्यावरच्या मुद्दाम लावलेल्या बहावा, गुलमोहोर, पेल्टोफ़ोरम, आणि रेनट्रीच्या पाना फ़ुलांशिवाय इतर हिरवाई पहायला ह्याच स्त्रिया, मुलेमुली मोठ्या संख्येने नेचर ट्रेल्स नाहीतर जंगलांच्या वाटांवर फ़िरु लागली. ऑगस्ट-सप्टें. महिन्यांमधे शिलोंढा, जिजामाता उद्यानापासून कांसच्या पठारावर मोठ्या संख्येने जाणारे ग्रूप्स हेच तर दर्शवतात. पण मग य सा-यातून हाती पडतय ते फ़क्त दूरुन निसर्गाला निरखणं. त्याच्याशी ख-या अर्थाने जवळीक साधलीच जात नाही जी स्वत:च्या अंगणातल्या फ़ुलझाडांची फ़ुले-पत्री डोळसपणे, आपलेपणे हाताळण्यातून, निरखण्यातून साधली जायची आपोआप ही रुखरुख ख-या निसर्गप्रेमीच्या मनातून जाता जात नाही.
त्याची टोचणी बनली ती मात्र नुकतीच फ़ुलबाजारात गेल्यावर फ़ुलांच्या ढिगांनी ओसंडून वाहणा-या टोपल्यांशेजारी रस्त्यावर रचला गेलेला हिरव्या पानांचा अस्ताव्यस्त ढिगारा पाहिला तेव्हां.

"पत्री घ्या ताई" फ़ुलवाला त्या व्यक्तिमत्वहीन, नुसत्याच हिरव्या रंगाचे अस्तित्व मिरवणा-या पानांना विस्कटत मला म्हणाला.

ही पत्री? मला लहानपणी घरच्या गणपतीच्या फ़ुलांच्या परडीशेजारच्या तबकातली सुबकपणे रचलेली तजेलदार, टवटवीत पत्री आठवली. प्रत्येक पान स्वत: गोळा केलेलं.
"वरच्या कोवळ्या पानांना नका हाताळू गं. खालची जुन पानं नख न लावता अलगद तोडा. फ़ांद्यांशी धसमुसळेपणा नको." अशा आजीच्या पाने, फ़ुले कशी खुडावीत याबद्दलच्या किमान पन्नास सूचनांचा मान राखून गोळा केलेली ती पत्री.

फ़ुलवाल्यासमोरचा तो पानांचा ढिग मी जरा चाचपून वर खाली केला. ही कोणती पाने? गणपतीच्या पूजेला जी २१ पत्री लागतात त्यांपैकी ह्यात एकही तर दिसत नाही. इतरच झाडांचा पर्णसंभार हवा तसा ओरबाडलेला. द.भा.धामणस्करांच्या ओळी आठवून मन कळवळून गेले.-

" सकाळ झालीय
फ़ुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्त्र जनावर काठीने
पाना-फ़ुलांवर हल्ले करीत आहे.
बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हां
इथल्या झाडांना
फ़ुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुख-या मुळापर्यंत पसरलेली असेल... "

-------------------------------------------------------------------------

आपल्या सणांची ऋतु आणि निसर्गाशी सांगड घालताना आपल्या पूर्वजांनी निसर्गात होत असणारे बदल लक्षात घेऊन मोठ्या कौशल्याने त्यामागच्या परंपरा निर्माण केल्या. या दिवसात बहरणा-या बहुतेक सा-याच वनस्पती औषधी गुणधर्म असणा-या. त्यांचे जीवनचक्रही मर्यादित कालाचे. त्यांना योग्य प्रकारे हाताळणे म्हणूनच जास्त गरजेचे.

फ़ुलबाजारातून नुसतीच पानांची कोणतीही गर्दी आपल्या घरातल्या देवाला वाहण्यापेक्षा त्या वनस्पतींची ओळख, त्यांचे उपयोग आणि महत्व नव्याने माहित करुन घेणे अत्यंत आवश्यक बनलेले आहे. अंगणातल्या वनस्पती दूर जंगलात, तिथून परत बाजारात पोचल्या आणि तिथून कदाचित त्यांचा मार्ग अस्तंगत होण्याच्या दिशेने झपाट्याने जाऊ शकतो तेव्हां वनस्पतींना या अर्थाने ’समर्पयामी’ म्हणून निरोप द्यायची वेळ टाळायची तर ’पत्री’ म्हणुन गणपतीला अर्पण करायच्या वनस्पती नक्की कोणत्या, त्या कोठून येतात, कशा प्रकारे उगवतात, किती प्रमाणात असतात, त्यांचे उपयोग, रोजच्या व्यवहारातले महत्व, निसर्गात त्यांची विपुलता किती प्रमाणात शिल्लक आहे, नसल्यास त्या किती प्रमाणात वापरल्या पाहिजेत म्हणजे नष्ट होणार नाहीत असे अनेक विचार आपण नक्कीच करु शकतो.

गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस वनस्पतींची माहिती, त्यांचे स्थानिक व शास्त्रीय नाव, कुळ व औषधी उपयोग माहिती झाली तर ह्या वनस्पतींची वैयक्तिक पातळीवर लागवड, जोपासना, संरक्षण आणि संवर्धन करता येईल पुन्हा अधिक डोळसपणे आणि मग त्यातून नेचर ट्रेलला जाण्यापेक्षा जास्त समाधान आणि फ़ुलबाजारातून विकत आणलेल्या पत्री वाहाण्यापेक्षा जास्त पुण्य कदाचित आपल्या पदरात पडेल.


पुढच्या पोस्टमधे (निसर्गायण ह्या ब्लॉगवर) ह्या एकवीस वनस्पतींची शास्त्रीय माहिती देईन. शक्यतो फोटोग्राफ्ससकट.

Friday, June 13, 2008

मांजा.




राही अनिल बर्वे चा 'मांजा' समोर पडद्यावर पाहणे हा सोपा अनुभव नव्हता. मुंबईत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मिफ मधे पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनासहीत सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा सुवर्णशंख पुरस्कार मिळालेली ही फिल्म मी दुसर्‍यांदा यशवंतराव मधे पहात असतानाही मन तसेच सुन्न झाले होते.

जेमतेम चाळीस मिनिटांचा मांजा समोर पडद्यावर उलगडत जाताना त्यातल्या प्रत्येक ब्लॅक ऍन्ड व्हाईट फ्रेममधून एक काचेरी धार अतिथंडपणे तुमच्या संवेदनशिलतेचा गळा खोलवर चिरत मन रक्तबंबाळ करुन सोडत जाते.

अनेक भीषण 'वास्तवांना' आत्तापर्यंत पडद्यावर अनेकदा पाहून आता निर्ढावलीय असं वाटायला लागलेली तुमच्यातली सेन्सिबिलिटीही समोरच्या रांका आणि चिमीच्या रोजच्या आयुष्यातल्या एका कोणत्याही २४ तासांत जे काही घडून जातं ते पाहून अंतर्बाह्य विछिन्न होऊन जाते, आणि मग मनावर काजळी धरत जाते एका दाट अस्वस्थतेची.. आपण जिथे सुखाने रहातोय त्या ह्या चकचकीत शहराच्या आंतरत्वचेवर फाटक्या चिंध्यांप्रमाणे लोंबकळत रहाणार्‍या वस्त्यांमधल्या कोणत्याही १०-१२ वर्षांच्या रांका आणि त्याच्या ४-५ वर्षांच्या बहिणीला हे सारं कदाचित रोजच भोगावं लागत असणार...!.
मांजाचा विषय चाईल्ड मोलेस्टेशनचा आहे आणि पटकथेतून तसेच दिग्दर्शनातून राही प्रत्येक फ्रेममधून ज्या धाडसाने तरीही संयतपणे, विषयावरची पकड किंचितही न सोडता, आवश्यक त्या 'डार्कनेस'सह आपल्यासमोर आणतो त्याला तोड नाही.
इतक्या कमी वेळात तिनही महत्वाच्या पात्रांच्या स्वभावतले कंगोरे, बारकाव्यांसहीत आणि मोजक्या परिणामकारक संवादासहीत विलक्षण ताकदीने आपल्यापर्यंत पोचतात..

शहराच्या क्षितिजावर म्लान काळेपणाने उडणार्‍या कावळ्यांच्या थव्यासारखी रांकाच्या आयुष्यात येणारी रोजची एक संध्याकाळ. दुष्काळी खेड्यातून आईबाप आणि किंचितश्या खुळ्या बहिणीसोबत शहरात जगायला आलेला रांका. काही दिवसांतच आई शरीर विकून पैसे कमवायचा सोपा रस्ता पकडायला निघून गेलेली आणि ते पाहून बापाने गाडीखाली जीव दिल्यावर काहीही मिळणारं काम करुन धाकट्या बहिणीला हिमतीने सांभाळत रस्त्यावर राहताना कसं जगायचं असतं हे आजूबाजूची परिस्थिती रांकाला शिकवत असतेच. ते शिकताना डोळ्यांतली उमज वय उलटून गेलेल्या माणसाची बनत चाललेली.
पतंग उडवण्याच्या वयातल्या रांकाचे हात आता काचांचा भुगा करत मांजा बनवण्यात गुंतलेले. पोट भरायचं त्याचं ते साधन. त्या संध्याकाळी तो तेच करत असताना, धांदोट्या झालेल्या फ्रॉकच्या मागे कोणीतरी मस्करीत बांधलेली पोचट डबड्यांची माळ फरपटवत, आपल्या अशक्त चिरचिर्‍या आवाजात रडत चिमी भावाला शोधत तिथे येऊन पोचते.
खाकी वर्दीतला तो हवालदार नेहमीप्रमाणे तिथेच आसपास घोंगावत आहे. ह्या हल्लीच दिसायला लागलेल्या अनाथ भावंडांची त्याला काहीशी काळजी आणि कुतुहल. त्याच्या अकारण चौकशा, विनाकारण सलगी. कामात लुडबुड करणार्‍या चिमीवर रांका खेकसतो तेव्हां हवालदार त्याच्यावरच डाफरत चिमीला समजावतोही. तिच्या फ्रॉकच्या मागची डबड्यांची माळही सोडवतो.
संध्याकाळ आणखी गडद,काळी होत जाते.
काचांचा थर दिलेला मांजा रात्रभर सुकवायला म्हणून दोन खांबांना ताणुन बसवून देत रांकाने आजचे काम संपविलेलं.त्यानंतरचं मग फुटपाथवरच्या दिव्याच्या मलूल उजेडातलं रांका चिमीचं, भटक्या कुत्र्याला पंगतीला घेऊन झालेलं 'जेवण', हवालदाराच्या जवळ येत पुन्हा झालेल्या गप्पा.
त्या कधी नव्हें ते मिळालेल्या शाब्दिक फुंकरीने सैलावलेलं रांकाचं मन आणि त्याभरात चिमीला आईस्क्रीम खायला घेऊन जाण्याची त्याने हवालदाराला दिलेली परवानगी.
'चांगला आहे हवालदार'.. मग बिडीचं थोटूक फुंकताना हातभट्टीवाल्या मित्राला तो सांगतो तेव्हां त्याच्याकडून अचानक कळलेला हवालदाराचा विकृत स्वभाव.
मध्यरात्रीच्या तडकलेल्या अंधारात जिवाच्या आकांताने रांका बहिणीला हाका मारत सैरभैर धावत सुटतो. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या राबिटमधलं अशक्त हुंदके देत झोपलेलं चिमीचं चिमुकलं शरीर, तिचा फोलकटासारखा उडून बाजूला लटकणारा फ्रॉक आणि मुर्दाड थंडपणाने रांकालाच समजवणारा हवालदाराचा निर्लज्ज अविर्भाव.. जग असंच वागत असतं रांका, शिकून घे.
रांका आंधळ्या आवेशाने लाथा बुक्क्यांसकट तुटून पडताना हवालदाराचा फक्त कोडगा पश्चात्ताप.
पहाटे चिमीला रस्त्यावरुन चालवत नेताना रांका तिला चुचकारायला तिच्या खांद्यावर थोपटायला जातो तेव्हां भ्यालेल्या कोकरागत चिमी अंग काढते आणि रांका मुळासकट हादरतो आणि दिवसभर काही न सुचून वणवणल्यावर त्याच्या मनात पडते ती सुडाची ठिणगी.
त्याच रात्रीच्या अंधारात मग रांकाने हवालदाराचा दारुच्या गुत्त्यामधे घेतलेला तो विलक्षण सूड.
तो घेताना त्या एवढ्याशा पोरामधे जागलेली मानवी स्वभावातल्या कमजोर जागांवर अचूक प्रहार करण्याची जाण.
रक्ताने ओघळून जात मांजा संपतो तेव्हां रिकाम्या लटकत राहिलेल्या फिरकीप्रमाणे आपलं मन सुन्न भिरभिरत रहातं. मात्र मांजाचा हा शेवट नसतो.
सुदैवाने.
शेवट होतो तो चिमीच्या भाबड्या, विस्कटून गेलेल्या नजरेत माणसावरच्या विश्वासाचा कोवळा किरण पुन्हां उमटवण्यात तिच्या भावाला यश मिळाल्यावरंच.
'मांजा' कृष्णधवल रंगातली डिजिटल फिल्म आहे. संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट, दुपार आणि मग पुन्हां रात्र अशा २४ तासांतल्या प्रत्येक प्रहराचं, तेही मुंबई शहरातल्या धारावी सारख्या एखाद्या बकाल वस्तीतल्या प्रहरांचं यात चित्रण आहे. चिआरास्क्युरोचा-प्रकाश छायेचा खेळ काळ्या-पांढर्‍या रंगामधून दृश्यांमधे किती ताकद आणू शकतो त्याचा नजरबंदी करणारा अनुभव या आधी आपण अनेकदा घेतलेला आहे. कागज के फूल, चारुलता मधे तो एक तरल सौंदर्यानुभव असतो आणि त्यातूनच मानवी भाव-भावनांची आंदोलने नाजूकपणे आपल्यापर्यंत पोचवली जातात, तर तारकोस्कीच्या स्टॉकर मधल्या 'झोन'पर्यंतच्या प्रवासात हाच चिआरास्क्युरो आपल्याला 'भय इथले संपत नाही...' चा विलक्षण वेगळ्या पातळीवरचा अनुभव देतो. 'मांजा' मधे केलेला चिआरास्क्युरोचा वापर ह्यां दोन्हीं अनुभवांचा एकत्रित प्रत्यय आपल्याला देतो. आधी शहरातली कठोर वास्तवता अधिक दाहकपणे आपल्यापर्यंत पोचते तर शेवटच्या दृश्यामधून 'जखम जिवाची हलके हलके भरुन यावी..' असं वाटायला लावणारी कोवळीकही जाणवून जाते. राही इतकंच ते श्रेय सिनेमॅटोग्राफर पंकजकुमारचं.

'मांजा' सुरु होताना जेव्हां समोर पडद्यावर कथा,पटकथा,दिग्दर्शन्,संकलन अशा 'सबकुछ' भूमिकेत 'राही अनिल बर्वे' ही अक्षरे दिसतांत आणि नंतर मांजा उलगडत जाताना ज्या वेगळ्याच पद्धतीने जातो ते पहातांना काही वर्षांपूर्वी वाचलेला राहीचा 'पूर्णविरामानंतर...' हा कथासंग्रह आठवणे अपरिहार्य असते. त्यांतल्या सगळ्याच कथा अशाच छोट्या आणि परिणामकारक, वाचकांना वेगळ्याच दृश्यप्रतिमांच्या जगात नेऊन पोचविणार्‍या, बर्‍याचशा ऍबस्ट्रॅक्ट आणि मानवी संवेदनांची टोकदार जाणीव करुन देणार्‍या, खूपशा जीएंच्या जातकुळीतल्या. मांजाची हाताळणी 'पूर्णविरामानंतरच्या' मधल्या जगाशी नातं जोडणारी नक्कीच वाटते.
कथांच्या वेगळेपणाचं भरपूर कौतुक होऊनही राहीने नंतर काहीच लिहीलेलं वाचण्यात आलेलं नाही. एकदम हा 'मांजा'. मधल्या मौनाच्या दीर्घप्रवासानंतरचा हा पहिलाच टप्पा.
टप्पा घेतलाय तोही कसल्या अफलातून उंचीवरचा!
अनिल बर्वेंच्या डोंगराएवढ्या उंचीपर्यंत एका उडीतच पोचलाय त्यांचा पोरगा हे नक्की.
त्याच्या आगामी 'तुंबाड' ह्या पूर्ण लांबीच्या हिंदी फिल्मबद्दल आणि 'आदिपश्य' ह्यां पॉप्युलर तर्फे प्रसिद्ध होणार असणार्‍या कांदबरीबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झालीय हे वेगळं सांगायलाच नको.

Wednesday, March 26, 2008

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः एक शोध

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते. त्यातला काळ खूप जुना म्हणजे निदान शंभर वर्षांपूर्वीचा तरी वाटत होता. पुस्तकातले काही काही अनुवादित शब्दही निटसे समजत नव्हते. पण तरी त्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. पुस्तकाची नायिका लॉरा माझ्याच त्यावेळच्या वयाच्या आसपासची होती म्हणूनही असेल कदाचित पण ती मला इतक्या वेगळ्या काळातली, वातावरणातली असूनही विलक्षण जवळची वाटली.
'वसंत फार..' मधून मला भेटलेली ती लॉरा साधी, सरळ, निष्पाप आणि आनंदी, खोडकर होती. पुस्तक संपता संपता ती प्रगल्भ, समजुतदार होत गेली. तिच्या स्वभावातला हा बदल तिच्या पुस्तकातल्या प्रवासादरम्यान घडत गेलेल्या घटनांशी सुसंगत असाच होता. लॉराची त्या पुस्तकातली दुनिया, अमेरिकेच्या इतक्या जुन्या काळातले त्यांचे तिथले राहणीमान, लॉरा, तिच्या बहिणी आणि त्यांचा कुत्रा तिच्या मा आणि पा सोबत एका बंद घोडागाडीमधून करतात तो प्रवास हे सारच माझ्या दृष्टीने खूप जितकं अनोळखी तितकच अद्भूत होतं. मात्र अंबादास अग्निहोत्रींनी अनुवादित केलेले हे पुस्तक कोणतेतरी मधलेच असल्याने लॉराचे याआधीचे आयुष्य आणि नंतर तिच्या आयुष्यात काय काय होते याबद्दल तेव्हा काहीच कळू शकले नाही. तिच्या दीर्घ प्रवासादरम्यानचा एक कोणतातरी मधलाच तुकडा माझ्या हाती लागलेला होता आणि बाकी कथानकाबद्दल मनात विलक्षण उत्सुकता दाटून राहिली. मिनेसोटा प्रांतातली ती गवताळ कुरणे, बर्फाची वादळे, तिथली लाकडी ओंडक्यांची घरे, साजरे केले जाणारे नाताळ आणि त्यावेळी माने घरी बनवलेली 'गुडदाणी', चर्चमधला पहाटेचा घंटानाद, टोळधाडीमुळे उध्वस्त झालेलं पांच गव्हाच शेत, लॉराच्या मैत्रिणी, स्वार्थी नेली, मदत करणारे ओल्सन, पायांना चिकटलेल्या जळवा, अलुबुखारच्या जाळ्यांमधून वाहणारे झरे, पांनी मध्यरात्री वाजवलेलं फिडल, लॉराच्या मेरी, कॅरी या बहिणी, त्यांची भांडणं, प्रेम हे सारच त्या पुस्तकातून माझ्या खूप ओळखीच झालं कारण मी अनेकदा, वारंवार ते पुस्तक वाचल होत. मी वाचलं आणि मग माझ्या त्यावेळच्या मित्र-मैत्रिणींनाही वाचायला दिलं. माझ्या आईला आणि बहिणीला सुद्धा पुस्तक विलक्षण आवडलं. म्हणायला किशोरवयीन मुलांसाठी असणार्‍या त्या पुस्तकाची अशी सर्वांना पडलेली मोहिनी चकित करुन जाते आजही विचार केला की.
त्यानंतर बरीच वर्षं ते पुस्तक माझ्या आसपासच होतं. पुस्तकाची प्रत आधीच जुनी होती. सतत वाचून, कुणाला न कुणाला वाचायला देऊन ती आणखीनच जीर्ण झाली. बाईंडिंग करुनही पाने एकत्र राहीनात. पुढे वर्ष उलटली. शाळकरी वय मागे पडले. दरम्यानच्या काळात 'लिटिल विमेन' अर्थातच 'चौघीजणी' मधली ज्यो जास्त जवळची झाली. 'लिटल हाऊस' कुठेतरी हरवूनच गेले. लॉरा कुठेतरी मागेच राहिल्यासारखी झाली. एकदा अचानक आठवण झाली तेव्हा बरीच शोधाशोध केली पण पुस्तक कुठेतरी निट जपून असे ठेवले होते तेच मिळेना. लॉरा हरवल्याची चुटपुट बरेच दिवस मनात राहिली. त्या इतक्या जुन्या अनुवादित पुस्तकाची प्रत कुठल्याच दुकानात तेव्हा उपलब्ध नव्हती. 'लॉरा' हा समान आवडीचा दुवा असलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे याच 'लिटल हाऊस'च्या अजून एका पुस्तकाचा 'एका तळ्याकाठी.. नावाने केलेला अनुवाद मात्र मधल्या काळात वाचायला मिळाला ही खूप खुशीची गोष्ट होती. पण बाकी लॉराची साथ सुटली ती सुटलीच.पुढे अनेक वर्षांनी रविन्द्र पिंगेंशी बोलताना मी या पुस्तकाची आठवण काढली. त्यांनी अंबादास अग्निहोत्रींच्या काही ओझरत्या आठवणी काढल्या पण या दोन पुस्तकाबद्दल बाकी काहीच त्यांनाही आठवत नव्हते. बर्‍याच वर्षांपूर्वी युसिसने अनेक अमेरिकन पुस्तके मराठी लेखकांकडून अनुवादित करुन घेतली होती त्यापैकी ही पुस्तके असावी असे त्यांनी सांगितले.
मग एक खूप मोठा काळ उलटून गेला. माझ्या स्वतःचा प्रवास शिक्षण पूर्ण केल्यावर मग नोकरी-लग्न-मुल हे टप्पे घेत घेत या काळादरम्यान सुरुच होता. आणि मग एकदा युसिसमधे कपाट धुंडाळताना अचानक समोर 'लॉरा' भेटली. अनुवादित नाही तर तिच्या मुळ इंग्रजी स्वरुपातच. आणि एक दोन नाही तर चक्क आठ पुस्तके. लॉरा इन्गाल्स वाईल्डर या अमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या 'लिटल हाऊस' पुस्तकाचे आठ सुबक आणि अत्यंत देखणे भाग कपाटात ओळीने लावून ठेवलेले होते. हिरव्यागार गवताळ कुरणावर, डोक्यावर उन्हाळी टोपी, अंगात झालरीचा लांब पोशाख, पायात कातडी बूट घातलेली कव्हरवरची लॉरा माझ्याकडे पाहून तिचं ते मिश्किल, खोडकर हसू हसत होती. तिच्या मागे लाकडी ओंडक्यांचे घर होते, बाजूला बंद वॅगन होती.
मी अधाशासारखे ते आठही भाग वाचून काढले. यावेळी जास्तच आवडले. लॉराची मूळ इंग्रजी भाषा अत्यंत सोपी, साधीसुधी आहे. शिवाय आता बरेचसे संदर्भ सुसंगत लागत होते. अग्निहोत्रींच्या अनुवादात लॉरा आणि मेरी गुडदाणी खात म्हणजे काय नक्की कळत नसे. आता गुडदाणी म्हणजे कॅन्डी समजल्यावर खूप गंमतही वाटली.
आता पुन्हा लॉराच्या आयुष्यात डोकावून पाहताना मला पुस्तकाच्या पलिकडच्या लॉरा इन्गाल्स वाईल्डरबद्दल अमाप कुतुहल वाटायला लागलं. लॉराची ही कहाणी तिची आत्मकहाणीच आहे हे माहित होतं. लॉराची, तिच्या कुटुंबियांची, ती रहात होती त्या ठिकाणांची, प्रदेशाची खरी ओळख व्हावी म्हणून मग मी नेट धुंडाळलं, अमेरिकन लायब्ररीमधे लॉरा इन्गाल्सवर इतरांनी लिहिलेली असंख्य पुस्तक होती. तिचं आख्ख वास्तव आयुष्य पुस्तकांमधे होतं त्यापेक्षा यत्किंचितही कमी रंजक नव्हतं.
विस्कॉनसिनच्या घनदाट जंगलांमधे लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या एका छोट्याशा घरात लॉरा एलिझाबेथ इन्गाल्स जन्माला आली ७ फेब्रुवारी १८६७ साली. त्यानंतर १९३० साली म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी तिने मॅन्सफिल्ड मिसुरीमधील शेतातल्या रॉकी रिज या घरात बसून लिटल हाऊस या नंतरच्या काळात 'क्लासिक' गणल्या गेलेल्या आठ पुस्तकांच्या मालिकेतले आपले पहिले पुस्तक 'लिटिल हाऊस इन दी बिग वुड्स' लिहिले तेव्हा आपण अमेरिकेच्या इतिहासातील 'पायोनियर पिरियड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मिडवेस्टर्न फ्रॉन्टियरचा १८७० ते १८८० दरम्यानचा सामाजिक आणि सांस्कृतिक कालखंडच शब्दबद्ध करुन ठेवत आहोत याची यत्किंचितही कल्पना तिला नव्हती. ती फक्त आपण ज्या प्रदेशात लहानाच्या मोठ्या झालो त्या विस्कॉन्सिन, मिनेसोटा, कॅन्सास आणि साऊथ डाकोटा येथील आठवणी आपली मुलगी रोझाच्या आग्रहावरुन लिहून काढत होती.
लॉराच्या वडिलांना- चार्ल्स फिलिपना साहसाचे, वेगळे काही करण्याचे विलक्षण आकर्षण. त्यांच्या अंगात सतत सळसळणारे पायोनियर स्पिरिट त्यांना पश्चिम दिशेकडे 'लॅन्ड ऑफ प्रॉमिस अ‍ॅन्ड होप ' कडे जायला आयुष्यभर खुणावत राहिले. लॉराच्या वयाच्या चौथ्या वर्षी इन्गाल्स कुटुंबाने म्हणजे पा चार्ल्स, मा कॅरोलिन, मोठी बहिण मेरी, धाकटी बहिण कॅरी आणि त्यांचा कुत्रा जॅक या सर्वांनी बंद घोडागाडीमधे बसून दूध व मधाचे प्रवाह जिथे वाहतात त्या पश्चिम दिशेकडे कूच केले. मिसुरी-कॅन्सास-विस्कॉनसिन-मिनेसोटा-आयोवा या प्रांतामधला तो प्रवास मग पुढे लॉराचे बालपण, किशोरवय संपून तिने तारुण्यात प्रवेश केल्यानंतरही सुरुच राहिला. याच प्रवासात डाकोटामधे तिला आल्मांझो वाईल्डर भेटला, ज्याच्याशी तिने प्रेमविवाह केला आणि तोही इन्गाल्स कुटुंबाचा एक भाग बनून गेला.
इन्गाल्स कुटुंबाने केलेले हे प्रवास सोपे नव्हते. ते खडतर, रोमांचकारी आणि असंख्य साहसांनी भरलेले होते. रेडइंडियन्सच्या प्रदेशातील त्यांचे मुक्काम, मिनेसोटात असताना सामोरे जावे लागलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी, बलाढ्य मिसिसिपी नदीचे ओलांडावे लागलेले पूर, घनघोर बर्फाची वादळे, संकटांवर त्यांनी एकत्रितपणे, जिद्दीने आणि चातुर्याने केलेली मात, प्रवासात भेटलेली माणसे आणि सर्वात मनोरम असे इन्गाल्स कुटुंबियांचे आपापसातील चिवट, जिव्हाळ्याचे बंध असे सारे एकत्र गुंफलेल्या लॉराच्या मनातील आठवणी गोष्टींच्या स्वरुपात एकतच लॉराची मुलगी रोझा मोठी झाली. आपल्या मनावर लोभस ठसा उमटवणार्‍या आईच्या या विलक्षण गोष्टी जगभरातील सर्वांनाच वाचायला मिळाव्यात म्हणून रोझा सतत लॉराच्या मागे लकडा लावून असे की त्या लिहून काढ. लॉराला सुरुवातीला लिहिण्याचा सराव नसल्याने कंटाळा यायचा तेव्हा तिने लेखनिकाची भुमिकाही बजावली. आणि मग १९३० ते १९४० या कालावधीत 'लिटल हाऊस सिरिज'ची आठ पुस्तके प्रकाशित झाली. अल्पावधीतच या पुस्तकांनी जगाला वेड लावलं. इन्गाल्स फॅमिलीसोबतच्या घनदाट जंगलांमधल्या, लांबलचक सोनेरी गवताळ कुरणांमधल्या, अजस्त्र मिसिसिपी नदीच्या पुरामधल्या. गोठलेल्या हिमनद्यांवरच्या त्या बंद वॅगनमधल्या प्रवासात हे वाचकही सहप्रवासी बनले. त्यांच्यासोबत तेही लॉगकेबिन्समधे राहिले. ४० देशांमधे वेगवेगळ्या २८ भाषांत ही पुस्तके वाचली गेली. या पुस्तकांवर अनेकांनी पुस्तके लिहिली. ती सुद्धा गाजली. इन्गाल्स आणि वाईल्डर कुटुंबे आता फक्त लॉराची राहिली नाहीत. तिच्या वाचकांनी, वाचकांच्या पुढल्या पिढ्यांनीही ती आपली मानली.
लॉराचे आणि तिच्या बहिणींच्या शालेय शिक्षणात या सततच्या प्रवासामुळे आणि कायमच असलेल्या आर्थिक विवंचनेमुळे खंड पडत होता. कुटुंबासोबतचा प्रवास पुढच्या प्रांतात गेल्यावर लॉराला आपल्या आधीच्या इयत्तेमधे पुन्हा एकदा बसून तोच अभ्यास करावा लागे. कधी कधी तर त्या प्रांतांमधे जवळपास शाळाही नसे. लॉराच्या आईने तिच्या वडिलांकडून वचन घेतले की मुलींचे शिक्षण पूर्ण करीन. लॉरा तेरा वर्षांची असताना पांना ते वचन पूर्ण करण्याची संधी मिळाली. लॉरा सोळा वर्षांची होईपर्यंत तिला सलग शालेय शिक्षण घेता आले. घरच्या आर्थिक जबाबदार्‍या उचलून वडिलांचा भार हलका करण्यासाठी लॉरा स्वतः शिकत असतानाच मुलांना शिकवायचेही काम करी. त्यासाठी तिला २० मैलांचा प्रवास करुन जावे लागे. तो तिचा प्रवासही मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पुढे आल्मांझोच्या लाभलेल्या कणखर हातभारामुळे इन्गाल्स कुटुंबाला थोडेफार आर्थिक स्थैर्य लाभू शकले.
अमेरिकेच्या पायोनियर पिरियडमधली जीवनपद्धती, राहणीमान, वृत्ती, तेव्हाची संकटे, आव्हाने सारेच लॉराच्या या साध्यासुध्या अत्मकथनामधून जिवंत झाले. चिरंतन जतन करुन ठेवले गेले. लोकांनीही पुस्तकाला अजरामर केले. लॉराला पुढे असंख्य मानसन्मान मिळाले. तिच्या पुस्तकांमधील ठिकाणांवर, व्यक्तिरेखांवर, त्या कालातल्या तिने वर्णन केलेल्या वस्तूंवर, इन्गाल्स कुटुंब जिथे जिथे राहिली त्या घरांवर कायमस्वरुपी म्युझियम्स उभारली गेली. लिटल हाउस पुस्तकांवर अनेक सिझन्स चाललेली, अत्यंत लोकप्रिय टिव्ही मालिका निघालेली आहे.
पुस्तकांमधे तिने वर्णन केलेल्या ठिकाणांचा, घरांचा वेध तिच्याच प्रवासाच्या मार्गाने घेतला जावा या वाचकांच्या इच्छेपोटी एक ट्रेक आखला जातो. जगभरातले असंख्य पर्यटक उन्हाळी सुट्ट्यांमधे हा ट्रेक करतात आणि लॉराच्या बालपणाच्या प्रवासात आपणही प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा आनंद लुटतात. 'द वाईल्डर ट्रेक' असे या रोमांचकारी प्रवासाचे नाव आहे. तो सुरु होतो पेपिन-विस्कॉन्सिन पासून (लॉराचे पहिले पुस्तक: लिटल हाउस इन द बिग वुड्स), मग तो इंडिपेन्डन्स, कॅन्सासच्या दिशेने (लिटल हाऊस ऑन द प्रेअरी) पुढे उत्तरेला मिनेसोटातील वॉलनट ग्रोव्हपर्यन्त जातो (ऑन द बॅन्क्स ऑफ प्लम क्रीकः लिटल हाऊसचे चौथे पुस्तक) तिथून मग पश्चिमेला द स्मेल्ट, द. डाकोटा प्रांतात पुढे जातो. लॉरा आणि आल्मांझो वाईल्डरच्या ओझार्क माउंटन्समधील घराकडे तिच्या चाहत्यांच्या भेटीचा ओघ तर सतत वाहता असतो. लॉरा इन्गाल्स वाईल्डर मेमोरियल सोसायटीही स्थापन झाली. 'आजपर्यन्तचे सर्वाधिक वाचले गेलेले पुस्तक' अशी मानाची नोंद तिच्या नावे अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने केली आहे. तिच्या सन्मानार्थ उत्कृष्ट साहित्यिक कारकीर्द असणार्‍या लेखिकेला पुरस्कार दिला जातो.

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः द फ्रॉन्टियर गर्ल-
किशोरवयीन वाड्मय म्हणून लिहिल्या गेलेल्या लॉराच्या वैयक्तिक आठवणींचा धांडोळा घेणार्‍या या 'लिटल हाऊस' सीरिजमधील आठही पुस्तकांचे ऐतिहासिक महत्व विल्यम अ‍ॅन्डरसनसारख्या इतिहासकाराच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. खरं तर ते सर्वात आधी लक्षात आले ते त्याच्याच. बिल अ‍ॅन्डरसनची इतिहासकार म्हणून कारकीर्द सुरुच झाली मुळात त्याला लॉराच्या या पुस्तकांच्या बालपणापासून वाटणार्‍या अनिवार आकर्षणामुळे. प्राथमिक शाळेत तिसरीत असताना त्याच्या शिक्षकाने 'लिटल हाऊस ऑन द प्रेअरी' पुस्तकातला काही भाग वर्गात वाचून दाखवला. त्याच्या मोहात तो इतका पडला की त्याने झपाटल्यासारखे सर्व भाग वाचून काढले. त्याला जेव्हा कळलं की ही कुठली ऐतिहासिक कादंबरी नाही, तर लॉरा इन्गाल्सने खरेखुरे जगलेले आयुष्य आहे तेव्हापासून त्याच्या मनात कायम एकच प्रश्न घोळत राहिल,' पुढे काय झाले असेल?'
बिल अ‍ॅन्डरसनचे आई वडिल मग त्याला उन्हाळी सुट्ट्यांमधे लिटल हाऊसमधल्या लॉराच्या कुटुंबांच्या मुक्कामांच्या ठिकाणी घेऊन गेले. त्याने उत्सुकतेपोटी लॉराच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, परिचितांना अनेक भेटी दिल्या आणि त्यातूनच पुढे त्याने अमेरिकन इतिहासाच्या त्या पायोनियर पिरियडचे डॉक्युमेन्टेशन करणारी अनेक इतिहासाची पुस्तके लिहिली. बिल अ‍ॅन्डरसन आज लॉरा इन्गाल्स वाईल्डर होम असोसिएशनच्या संचालक पदावर मोठ्या अभिमानाने विराजमान आहे.
पुस्तकांच्या सहाय्याने इतिहासाचा मागोवा कसा घेता येतो हे बिल अ‍ॅन्डरसने दाखवून दिले आणि वैयक्तिक आठवणींच्या नोंदी ही इतिहासाकडे घेऊन जाणारी पावले ठरु शकतात, हे दाखवण्याचे श्रेय लॉराचे.आठ पुस्तकांमधे वाचकांच्या समोर ठेवलेले आपले सततच्या प्रवासातील आयुष्य जगून झाल्यावर लॉरा आणि आल्मांझो त्यांच्या आयुष्यातील संध्याकाळी विसावले ते मॅन्सफिल्ड मिसोरी येथील रॉकी रिज फार्महाऊसमधे. आल्मांझोने ते आपल्या हाताने लॉरासाठी बांधले. इथेच बसून लॉराने आपली पुस्तके लिहिली. तिच्या पुस्तकांमधे उल्लेख नसलेले हे एकमेव घर. तरीही लॉराच्या चाहत्यांची रीघ सतत वर्षभर या घराकडे असते. लॉराच्या मृत्यूसमयी होते तसेच ते अजूनही आहे.
लॉराची कहाणी वाचत असताना, इतक्या वर्षांनंतर लॉराला खर्‍या अर्थाने जाणून घेत असताना आता मनाला भिडली ती लॉराची आणि तिच्या सार्‍याच कुटुंबियांची चिवट, आनंदी, जीवनाला सामोरी जाणारी आवेगी, विजिगीषु वृत्ती, जी तिने शेवटपर्यंत जपली. आपल्या प्रवासातल्या स्थळांचा उल्लेख लॉराने नंतर' The Land Of Used-to-be' असा केला होता. गतकाळातली ठिकाणे! वर्षे लोटली. शतक संपले, पिढ्या बदलल्या, पण प्रत्येक पिढीच्या शैशवातल्या, कुमार वयातल्या भावभावना त्याच राहिल्या. लॉरा त्या सर्वांसाठी कायमच A girl not only someone we like but someone who is like us अशीच राहणार.
१० फेब्रुवारी १९५८ साली वयाची ९० वर्षे पूर्ण झाल्यावर ओझार्क्स मिसुरी येथून लॉरा अंतिम प्रवासासाठी निघून गेली. त्याला २०१०च्या फेब्रुवारी महिन्यात ५२ वर्षे झाली.लॉराचा हा एकमेव प्रवास, जो तिच्या कोणत्याच वाचकाचे मन रिझवू शकला नाही.

Friday, November 02, 2007

नस्तं प्रदर्शन.

काल शिवाजी पार्क वर भव्य वगैरे ग्रंथ प्रदर्शन आणि गड किल्ले दर्शन होतं ते बघायला गेले होते. खरं तर आदल्या दिवशीच्या पेपर मधे ते सगळ्या खंडीभर सेलेब्रिटीजनी नामवंत कवींच्या कविता वाचून प्रदर्शनाचं उद्घाटन केल्याचं वाचलं होतं तेव्हाच जायचा उत्साह कमी झाला होता. हल्ली सेलेब्रिटीज म्हणजे सर्कशीतले विदुषक झालेले असतात. आपलं क्षेत्र काय आहे? आपण कशात कशासाठी प्रसिद्ध आहोत ते बाजूला. जिथे जिथे मिडीया एक्स्पोजर तिथे तिथे सगळेच नाचायला तयार. कविता वाचल्या तरी ठिक आहे. पण वाचायच्याच तर त्या नामवंतांच्या कशाला? इतके उच्च दर्जाचे अत्यंत गुणवान नवोदीत कवी उपेक्षेच्या अंधारात पडून आहेत. त्यांना तरी आपल्या प्रसिद्धीचा फ़ायदा देवून उजेडात आणण्याचे पुण्यकर्म ह्या सेलेब्रिटीजनी करावं नां? पण नाही. घ्या एक संदीप खरे नाहीतर ग्रेस नाहीतर प्रद्न्या लोखंडे नाहीतर नीरजा नाहीतर गेला बाजार सौमित्र आहेच. आणि पाडा त्यांच्याच कविता. मग त्यांचा अर्थ कुणाला उलगडलेला असो वा नसो. ग्रेस च्या किंवा सौमित्रच्या कविता असे अर्ध्या हळकुंडांनी पिवळे पडलेले सेलेब्रिटीज म्हणत असतात तेव्हां त्या कवींची कीव येते.

तर ते प्रदर्शन. शिवाजी पार्क चं.

आख्ख्या हायवेवर, फ़्लाय ओव्हर वर पोस्टर्स लागलेली. सर्व नामवंत प्रकाशक सहभागी असल्याचे दिसत होते. तेव्हां ती एक उत्सुकता होती पण तितकी नाही कारण आता दिवाळीच्या सुमारास अजीर्ण होईल इतकी पुस्तक प्रदर्शन दादर-पार्ले-डोंबिवली ह्या मराठी सांस्कृतिक त्रिकोणातल्या सर्व शक्य अशक्य जागांवर भरतच असतात. पण सोबत महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचही प्रदर्शन होतं. तेव्हा ते एक added attraction.

गड किल्ले प्रदर्शन अत्यंत badly oraganised. सगळीकडे फक्त फोटो लावलेले. काही ठराविक किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकृती होत्या पण त्यांवर माहीती निट नाही. सिंधुदुर्गाला जल दुर्ग म्हणायचं की गिरीदुर्ग? मग एका बघण्याच्या मर्यादे नंतर माणिक गड कोणता आणि प्रबळ गड कोणता हे फोटोत सारखच दिसायला लागलं. शेकडो किल्ले महाराष्ट्रात आणि सगळे मोस्टली उध्वस्त अवस्थेत. तेव्हा ह्या तुटलेल्या कड्याचा एक फोटो. त्या बुरुजाचा एक वगैरे. तेव्हा ते प्रदर्शन भराभर मागे टाकून एकदाचे पुस्तकांच्या स्टॉलवर पोचलो. क्रेडीट कार्डची सोय केली आहे हे अनाउन्स करत होते तेव्हां जरा हुरुप आला. चक्कं जाताना टॆक्सी करुनच जावं. अनायासे डिस्काउन्ट पण मिळेल आणि वर क्रेडीट कार्डाची सोय तेव्हां मला अगदी आपण दोन्हीं हातांत भरभरुन पुस्तकं वहातोय असं सुखद दृष्य पहिल्या स्टॉलवर पाय ठेवतानाच दिसायला लागलं. इतर वेळी पाहिलेली पण घ्यायची राहून गेलेली सगळी पुस्तकं भराभर नजरेसमोरून जायला लागली.
पहीला स्टॉल. असंच एक प्रकाशन. एक सोनेरी काडीचा चष्मा लावलेले गृहस्थ काउंटरवर. मी चारपाच पुस्तकं उचलली. गृहस्थांनी बिल बनवलं.
क्रेडीट कार्ड साठी एकच मेन काऊंटर असेल नां? :मी .
माहीत नाही. आठशे त्र्याण्ण्व द्या: गृहस्थ निर्विकारपणे.
अहो पण. क्रेडीट कार्ड?
माहीत नाही.
डिस्काउन्ट लिहिलाय तो चाळीस टक्के?
तो फ़क्त ठराविक पुस्तकांवर?
मग ह्यां पुस्तकांवर?
दहा टक्के देवू. - आवाज मेहेरबानी टाईप.

मी पुस्तकं खाली ठेवली. आमचा जवाहरवाला तसाही वीस टक्के देतोच. मॆजेस्टीक मधे बुक क्लब ची मेम्बर तेव्हां तिथे पंचवीस टक्के. इथे दहा टक्क्यांची भीक कशाला? ती सुद्धा रोख पैसे मोजून? हा अनुभव मग पुढचे दोन तीन स्टॉल.

साहीत्य अकादमीचा आणि नॆशनल बुक ट्रस्टचा स्टॊल पाहून खुशी वाटली. ही पुस्तकं सहजासहजी बघायलाही मिळत नाहीत. इतके सुंदर अनुवाद किंवा विविध विषयांवर असूनही योग्य मार्केटींग अभावी फ़ुकट पडून रहातात वाचकांच्या नजरेलाही पडण्या ऐवजी. तिथून मात्र तिथल्या निरुत्साही सरकारी मुद्रेच्या लोकांना न जुमानता पाच सहा पुस्तकं घेतलीच.

व्यक्तीमत्व विकास, पाकक्रीया, ऐतिहासिक पुस्तकं, व.पु. ह्यांना मिळत रहाणारा वाचक प्रतिसाद मन खंतावून टाकतो बरेचदा. वाचक कधी बाहेर पडणार त्यांतून? पुढच्या इयत्तेकडे इतकी कमी जण कां जातात? ग्रंथालीची सुरेख छोटेखानी ज्ञानयज्ञ मालीकेतली पुस्तके धुळ खात पडून. पॉप्युलर प्रकाशनाच्या तेंडूलकरांच्या कम्पाईल्ड पुस्तकांना ओलांडून सगळे पुढे. पानवलकर सासणे कोणाच्या खिजगणततीतही नाहीत. ते तरीही ठिक आहे. प्रत्येकाची आवड असते. पण एक मौज आणि ग्रंथाली आणि डिंपल प्रकाशनाची लोकं सोडली तर कोणालाही आपली पुस्तकं आकर्षकपणे नुसती मांडूनच चालत नाहीत तर विक्रेत्याच्या मुखावर सुद्धा आपुलकी, उत्साह अशा भावभावनांची गरज असते हे लक्षातच नाही असं वाटणारी परिस्थिती. राज ठाकरेंनी स्टॉल्सची भाडी अवास्तव लावून जबरदस्ती तिथे बसवल्यासारखे सगळे. स्वत:च चहा पिण्यात, वडे खाण्यात मग्न विक्रेते. उरलेली नुसती माश्या हाकत बसलेली नाहीतर पुस्तकं हाताळणार्या सर्वांनाच संशयास्पद नजरेनी न्याहाळत. आयमिन अशा मोठ्या प्रदर्शनात असते भिती लोकांनी पुस्तकं उचलून पिशव्यां मधे वगैरे घालण्याची पण त्यासाठी नजर ठेवायला थोडी डिस्क्रीट पद्धती वापरा की. हे काय आपलं सगळ्यांनाच तशा नजरेनी बघणं?
खरंतर हल्ली किती उत्साहात प्रदर्शनं भरवतात पुस्तकांची. नव्या नव्या स्कीम्स आणतात. पण स्टॉलवरचे विक्रेते जर पुस्तकप्रेमी नसतील तर प्रदर्शन कशी निरस होऊ शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण. मैत्रेय प्रकाशनाच्या स्टॊललवर मात्र अगदी उलट अनुभव. या या. हे गणिताच्या कोड्यांचं पुस्तक बघा. अगदी बुद्धीला चालन देतं बरं का. आणि हे विणकामाच्या नव्या टाक्यांच पुस्तंक. अगदी लेटेस्ट. not bad. मी कोणत्याही angle ने विणकाम मुद्रेची दिसत नसूनही विक्रेत्याचा उत्साह कमी होईना. मग अचानक शिरिष कणेकरच्या पुस्तकांच्या रांगेसमोरुन त्याने माझी परेड केली. आता आधी कॉलम वाचा. त्यातल्या त्याच त्या शिळ्या कढीला उत विनोदांना हसा आणि मग परत त्यांची पुस्तकं पण तिनशे रुपये देऊन विकत घ्या? वेल. मला काही इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा मी निला सत्यनारायण चं एक पूर्ण-अपूर्ण उचललं.
आता दिवस दिवाळी अंकांचे. हे एक प्रकरण मात्र असं आहे की घेतल्या वाचून रहावत नाही आणि घेतल्यावर गेले ते दिन गेले म्हणून रडल्यावाचून वाचवत नाही. मौज चे अंक गौरी वाचून सूने आणि दीपावलीचे अंक दळवींवाचून रिकामे. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

Wednesday, October 24, 2007

तरीही शब्दातच..

सगळेच अनुभव शब्दांत व्यक्त करता आलेच पाहिजेत असा हट्ट कां असतो आपला? एकतर बोलून तरी दाखवायचं किंवा लिहून तरी! आपण सारे सतत हेच करत असतो. दुसर्‍यांपर्यंत अनुभव पोचलेच पाहिजेत आपले असा तरी अट्टाहास कां असावा आपला? अनुभव घ्यावा. आत आत खोलवर झिरपू द्यावा. आपल्यातच. पण नाही.
आपण सगळेच किती शब्दांच्या व्यापात हरवून जायला आसुललेले असतो!

कधी कधी शब्द म्हणजे नुसता गोंगाट असतो. प्रत्यक्ष अनुभवापासून ते विचलित करतात. जसं एखादा फोटोग्राफर आठवणी साठवून ठेवण्याच्या अतिउत्साहापायी वर्तमानात जगण्याचे हरवून बसतो.

त्या संदर्भात एक झेन कथा वाचली होती ती आठवली...


एके दिवशी एक तरुण भिक्षू आणि त्याचे गुरु फुजियामा पर्यंत लांब फेरफटका मारायला जात होते. त्या भिक्षूने तो बर्फाळ डोंगर बर्‍याच वेळा पाहिला होता. तरी त्याला प्रथमच तो खर्‍या अर्थाने जाणवला. जाता जाता तो रानफ़ुलांचे रंग, त्यातली एकतानता, पक्ष्यांच्या भरार्‍या, पहाटेचं तेज आणि हिरवा ताजेपणा, पवित्र पांढर्‍या पाईन वृक्षांचे अंकुर याबद्दल उत्साहाने सांगत होता:" कसं सगळं घडवलय! हा दगड कित्ती दगडी आहे! किती सुंदर आहे ना सगळं? बुलबुलचा आवाज किती गोड... ऐकतो आहेस न? किती अद्वितीय आहे!"

काही तरी पुटपुटत, लंगडत वृद्ध गुरु पुढं जात राहिले. सरते शेवटी शिष्याच्या लक्षात गुरुंच दीर्घ मौन आलं. आणि तो तळमळीनं थोड्या मोठ्यांदाच म्हणाला," हे असं नाही कां? हे पर्वत, ह्या नद्या आणि ही भव्य पृथ्वी, हे सर्व अलौकिक नाही कां? हे सुंदर नाही कां?"

गुरु त्याच्याकडे वळून ठामपणे म्हणाले," हो रे!! पण हे असं सारखं म्हणत राहाण्यात काय हाशिल आहे?"

...............



टी.एस.इलियट काय वेगळं म्हणाला होता?

शब्द... ताणतात
तडकतात ओझ्याखाली
आणि कधीतरी तुटतात.
तणावाखाली निसटतात,
घसरतात, नष्ट होतात.
अचूकते अभावी कुजतात
एका जागी टिकत नाहीत.
स्थिर राहत नाहीत.

शब्द जर इतकेच पोकळ आणि उथळ असतील तर कशाला हा अट्टहास आपला तरी की सगळे अनुभव शब्दांत मांडताच आले पाहिजेत?

Sunday, October 21, 2007

पुन्हा एक ब्लॉगारंभ.

सर्वप्रथम क्षिप्रा चे आणि नंदन चे आभार.

आभार दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे ह्या खेळात सहभागी केल्याबद्दल. दुसरं म्हणजे त्यानिमित्ताने माझाही एक ब्लॉग आहे ह्याची आठवण करुन दिल्याबद्दल.
खरंतर लिहिण्यासारखे इतके विषय असताना आणि लिहिण्याची इच्छा ही असताना न लिहिणे हा एक फार मोठा अपराध मानायला हवा. वेळ नसणे वगैरे सबबींना काही अर्थ नसतो कारण दिवसचे दिवस आपण असंख्य निरुपयोगी गोष्टींमधे बिनदिक्कत वेळ वाया घालवत असतो.
आता दसर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एक ब्लॉगारंभ.
लिहिण्याची गोष्ट मनात आल्यावर वाचण्याची येणार नाही असं होणार नाही. तेव्हा 'जे जे उत्तम' उपक्रमात द्यायचा परिच्छेद ह्या वाचनाच्याच संदर्भात द्यायचं मनात आलं.
अरुण टिकेकरांच एक छोटेखानी पण अत्यंत वाचनीय पुस्तक अक्षरनिष्ठांची मांदियाळी नुकतच मॅजेस्टिकमधे गवसलं. टिकेकर उत्तम व्यासंगी. त्यांनी लोकमुद्रा ह्या पुरवणीत त्यांच्या ग्रंथ-संग्रह आणि इतर वाचन-सफ़रीबद्दल लिहिलेले मनोज्ञ लेखन आपल्या कुणाच्याच स्मरणातून जाणारे नाही. त्या लेखांचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक.


------------------------------------------------------------------------------------------------


काव्य, कथा, कादंबर्‍या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पयर्‍या आहेत, असं मला वाटतं. यौवनात काव्याची मोहिनी पडावी यात काही नवल नाही. जीवनानुभवाचे चटके जेव्हा बसू लागतात तेव्हा कथा-कादंबर्‍या आपल्याला जवळच्या वाटू लागतात. आणि त्या चटक्यांनी जेव्हा आपल्याला समाधान मिळत नसेल, तेव्हा अमुक अमुक मोठी व्यक्ती अमुक क्षणी कशी वागली असेल यासंबंधी आपल्याला उत्सुकता वाटायला लागते. तेव्हा प्रत्येक वाचक चरित्र-आत्मचरित्र या वाड्ग्मयप्रकापर्यन्त येतो. चरित्र-आत्मचरित्राची गोडी लागली की आपण प्रगत वाचनाची एक तरी पायरी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. आज मराठीमधे जे थोडेफार वाचक आहेत, त्यातल्या बहुतेकांची अवस्था इथपर्यंत आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मराठीमधे चरित्र-आत्मचरित्रं आज बर्‍यापैकी खपतात. यापुढची पायरी म्हणजे तत्वचर्चेची आणि ती वाचनाची प्रगतावस्था म्हणायला पाहिजे. ही प्रगतावस्था किती लोकांनी गाठलेली आहे हे आपणच ठरवावं. फारशा लोकांनी ती गाठली असेल असं वाटत नाही. कारण तसं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. इतिहास हा जर माझा विषय असेल तर वाचक म्हणून मला कधीतरी असे प्रश्न पडलेच पाहिजेत की, इतिहास कशासाठी लिहायचा? कसा लिहायचा? जे राष्ट्र पुरुष आहेत त्यांच स्तुतीपठण करणारं लेखन करणं किंवा सनावळ्या देणं ही इथल्या इतिहास लेखनाची संकल्पना आहे. पण तळागाळातल्या लोकांना त्या काळी समजात काय स्थान होतं याचा कोणी इतिहासात उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज या गडावरुन त्या गडावर चढाई करत होते, तेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी काय पेरत होता, कुठली पिकं घेत होता, त्यावेळी कामगार वर्ग होता की नाही, उत्पादनं कोणती होती, त्यावेळचं खाद्यजीवन कशा प्रकारचं होतं. संतसाहित्य जर मी वाचत असेन तर जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून मला मिळतं की नाही? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, असं मला वाटतं. माझं वाचन धडपडत झालं. आपल्यापैकी बहुतेकांचही तसंच झालं असेल. आपल्या सर्वांना बर्‍यापैकी मर्गदर्शन मिळत गेले तर आपला बराचसा वेळ वाचेल आणि तो जर वाचला तर आपल्या सर्वांच्या दष्टिकोनातून ते बरं होईल असं मला वाटतं.

----------------------------- ------------------------------------------------------------------


मी कुणाला टॅग करत नाही कारण मी बर्‍याच उशिरा उतारा लिहिला आहे. त्यामुळे कल्पना नाही कोणाकोणचे आधीच खेळून झालेले आहे.

सर्वांना दसर्‍याच्या निमित्ताने 'मनोल्लंघनाच्या' शुभेच्छा.

परत भेटूच.

Wednesday, April 18, 2007

सायलेंट ट्रीटमेन्ट

खूप दिवसांत नवं काही टाकलं नाही. खरंतर इथे आल्यावर इतरांनीच इतकं सुंदर काहीकाही लिहिलेलं असतं की तेच वाचण्यात सारा वेळ निघून जातो. माझ्या एका लेखाची लिंक इथे टाकत आहे. लेख वाचून जरुर प्रतिक्रीया कळवा. कॉर्पोरेट जगतात घडत असतात अशा कितीतरी गोष्टी ज्यांवर लवकरच एक लेखमाला करणार आहे. म्हणूनच फ़ीडबॅकची गरज आहे.

http://www.loksatta.com/daily/20070415/chatura08.htm

Saturday, August 19, 2006

Land of thunder dragons : Bhutan


थिम्फूच्या त्या आयताकृती, दगडी फरसबंदी घातलेल्या, रस्त्याच्या एका अंगाला बर्‍याच खालच्या पातळीवर असणार्‍या चौकात एका थंडगार, काळ्या, दगडी बाकावर मावळत्या संध्याकाळी भुतानचं ते आत्तापर्यंत फक्त national geographicच्या अंकांमध्ये किंवा discovery chanel वर पाहिलेले गूढ, अध्यात्मिक आणि अलौकिक सौंदर्य आम्हाला वेढून टाकत होते. दगडी चौकाच्या मागच्या अंगाला लागून असलेली छोटी दुकाने कागदी आकाशदिव्यांच्या सौम्य प्रकाशात आणि विशिष्ट वासाच्या उदबत्त्यांच्या आणि धुपाच्या वलयांमधे गुरफटून शांत उभी होती. लाल, सोनेरी नक्षीकाम केलेले कापडी फलक, ज्यांवर खर्‍या सोन्याने त्या गुढ भुतानी लिपीमधे काही प्रार्थना चितारलेल्या असतात, अगम्य चेहर्‍याचे मुखवटे रंगवलेले असतात ते आणि आपल्या मनातल्या इच्छा मृतात्म्यांपर्यंत पोचवण्यासाठी वार्‍यावर लहरत लावलेल्या त्या फिक्या आकाशी, गुलाबी रंगांच्या कापडी त्रिकोणी पताका, पितळी नक्षीकाम केलेली अजस्त्र लंबगोलाकार प्रार्थना चक्रे चौकाच्या मधोमध होती. लाल, तपकिरी किंवा निळ्या जांभळ्या चौकटींची पारंपरिक वस्त्रे परिधान केलेली भुतानी माणसे मधुनच ती चक्रे तोंडाने काहीतरी पुटपुटत हलक्या हाताने फिरवून जायची. चौकातली गुढ शांतता तेव्हा जास्तचं गडद व्ह्यायची. वरच्या अंगाला वाहता रस्ता होता पण त्यांवरची वर्दळ, पारंपरिक वस्त्रेच परिधान केलेल्या भुतानी तरुण तरुणींचे घोळके ह्यांचा कोणताच आवाज खाली झिरपत नव्हता.

रस्त्याच्या किनारीला लागूनच बर्च, फर वृक्षांच्या रांगा थेट हिमालयाच्या अजस्त्र उतारांपर्यंत जाऊन भिडल्याचे इथून फक्त भास होत होते कारण मधोमध संध्याकाळच्या अंधारात मिसळून गेलेले धुके वातावरण अस्पष्ट आणि धूसर बनवत होते.

जायगाव ह्या भारताच्या हद्दीतील शेवटच्या गावापासून भुतानच्या ह्या राजधानीच्या शहरात येण्यासाठी आज पहाटेच बसने सुरु केलेला, सलग ७ ते ८ तासांचा प्रवास फारसा काही सुखावह झालेला नव्हता. भीषण पर्वतराजींना उभं कापत आमची बस जेव्हा वरवर जात होती तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त लाल मातीचा धुरळा, दगडमातीचे ढीग, क्रेन, गर्डर्सचा आवाज, डीझेलचा वास आणि हातात कुदळ, फावडी घेतलेले नेपाळी तोंडावळ्याचे मजूर, त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले भारतीय सैन्याच्या अखत्यारीतले जवान, त्यांच्या गाड्या हेच दृष्य सतत दिसत होते. भुतान सरकारचे रस्ते बांधणीचे काम भारतीय सरकारच्या मदतीने जोरात सुरु होते बहुधा पण त्याचा आम्हाला त्रासच झाला. बस अगदी हळू वेगाने तरीही गचके खात चालली होती, वाटेत थांबून कुठे पाय मोकळे करण्याइतकी किंवा चहा पिण्याचीही सोय नव्हती. दूर नजर लावली तर रस्त्याला लागून असणार्‍या, थेट पाताळापर्यंत जाऊन भिडल्या आहेत अस वाटणार्‍या खोल दर्‍या एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला आकाशात टोकं घुसवलेल्या पर्वतरांगांचे कातीव कडे. ह्या सार्‍याच प्रवासाने आम्हाला भुतानच्या आत्ता नजरेसमोर दिसणार्‍या गुढ, शांतगंभीर सौंदर्याला सामोरे जाण्याची काहीच मानसिक तयारी करुन घेतलेली नव्हती. अचानक सामोरे आलेल्या भुतानने आत्ता आम्हाला ज्याप्रकारे चकीत करुन सोडले होते, काहीशी तशीच स्थिती ऐंशीच्या दशकात जेव्हा भुतानच्या देवभुमीवर पाय ठेवायची संधी बाहेरच्या जगातील लोकांना मिळाली तेव्हा तेही भारावून गेले. इथले सौंदर्य खर्‍या अर्थाने अनाघ्रात होते. १७व्या शतकात इथे आलेला बौद्ध धर्म खोलवर इथल्या मातीत रुजलेला होता. प्राचीन परंपरा, रितीरिवाजांचे पालन इथले लोकं श्रद्धेने करत होते. भुतानमधे राजघराण्याची सत्ता अजून सक्रीय आहे. इथे अजुनही वैयक्तिक प्रवासाला परवानगी नाही. इथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर भुतानी सरकारचे कडक नियंत्रण असते. भुतानचा ठराविक भागच लोकांना पहाता येतो. सारे जग पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आकर्षक क्लुप्त्यांचा वापर करण्यात मग्न झालेले असताना अजूनही भुतान सरकारचे पर्यटकांच्या संख्येवरचे हे नियंत्रण चकीत करुन सोडते. पण फक्त ह्याच बाबीत भुतानचे वेगळेपण नाही. ते अनेक गोष्टींत दिसून येते. तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या वापरावर अथवा त्याच्या विक्रीवर कायदेशीर मनाई आणणारे जगातले हे एकमेव राष्ट्र. पर्वतशिखरांवर चढायला मनाई असणारेही हे एकच राष्ट्र. अर्थात ह्या सार्‍या मनाईमागे इथल्या विलक्षण देखण्या आणि आगळ्या निसर्गाचे संरक्षण हा एकमेव हेतू आहे. त्याला धर्माचे अधिष्ठान दिलेले आहे. इथला निसर्ग हा त्यांच्या दृष्टीने केवळ बर्फाची शिखरे, रंगित फुले पाने, झाडे, प्राणी नाही, तर देव आणि पवित्र आत्मे ज्यांत वास करतात ते ठिकाण असते. त्यामुळे त्यांच्या शांतीला कोणत्याही प्रकारे धक्का बसू न देणे ह्याला भुतानी लोकं श्वास घेण्याइतके महत्व देतात आणि जपतात.

भुतानमधे फिरताना इथल्या निसर्गसौंदर्यातला अपार्थिवपणा, इथल्या वातावरणातला दैवी भारलेपणा म्हणूनच जाणवत रहातो. निसर्गातल्या त्या अज्ञात शक्तीपुढे आपण आपल्याही नकळत नतमस्तक होत जातो.

इतकी वर्षे फक्त म्हणूनच तत्वज्ञ, चिंतक, यात्रेकरुंचाच स्पर्श झालेल हे ठिकाण. मन:शांती, एकांत, गूढ अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात असलेल्यांना कायम खुणावत राहिलेलं. पण सहज प्रवेश मिळू न शकणार हे स्थान. आजही इथे येणारे एकतर इथल्या सरकारचे पाहुणे म्हणून नाहीतर राजघराण्याचे आमंत्रीत म्हणूनच इथे येऊ शकतात. भारतीय प्रवाशांना व्हिसा लागत नसला तरी लेखी कायदेशीर परवाना आणि समुहातच प्रवास करण्याची अट पाळावी लागते.
थिम्फू मधे खरेदी करण्याचा अनुभव मात्र केवळ अजब होता. कुठल्याही पौर्वात्य देशात पर्यटकांसाठीच असलेल्या खास दुकानांमधे असतात ते सगळे exotic आणि अर्थातच प्रचंड महाग आणि खरेदी केल्या केल्या आपल्या निरुपयोगीपणाची खात्री पटवणारे त्यांमधे खच्चून भरलेले होतेच. पण खास भुतानचे वैशिष्ट्य असे रेशमी भरतकाम केलेली हातमागाचे स्कार्फ्स, स्टोल्स, कुर्ते, किंवा त्यांच्या त्या लाल, निळ्या, सोनेरी कॉम्बिनेशनमधे हाताने विशिष्ट धार्मिक पुराणांतील चेहरे, प्राणी, dragonच्या आकृत्या काढलेले कापडी फलक, नाहीतर एकातएक घट्ट बसणारे दोन अर्धगोल. जे बंद करुन हलवले की त्यांतून छान मंजुळ नाद यायचा अशा काही वस्तु खरेदी करायला आपण त्या दुकानांमधे पाऊल ठेवले की ग्राहकांबाबतच्या उदासिनतेची एक मोठीशी लाटच आपल्या अंगावर चालून यायची. विक्रेती (९९ % स्त्रियाच) जागची ढीम्म हलायचीही नाही. भाषेचा अडसर असायचा पण चेहर्‍यावर आमच्याकडे तुम्ही खरेदी करायला आला आहात ह्याचा उत्साह कणभरही नाही. उलट नाही घेतलेत काही तर बरेच असाच भाव वागणुकीत. डॉलरच्या मोहात असल्याने भारतीय ग्राहकांकडे दुर्लक्ष करतात म्हणावे तर परदेशीही बरेचदा दरवाजांतूनच वस्तूंची चौकशी करुन पुढे जाताना दिसायचे. भुतानच्या एका प्रसिद्धी पत्रकात लिहिले होते की आम्ही GNP कडे नाही तर GNH वाढवण्याकडे लक्ष देतो. Gross National Happiness. ह्या स्वमग्न, निरिच्छ मुद्रेने जागेवर बसून दुकानातून परस्पर बाहेर निघून जाणार्‍या गिर्‍हाईकांकडे बघूनही काही हालचाल न करणार्‍या विक्रेत्या स्त्रियांकडे पाहून त्यांचा happiness Index बहुधा असाच भरभर वर चढत असणार. बुद्ध धर्म इथे इतका खोलवर झिरपला आहे की भुतानी स्त्री पुरुषांच्या चेहर्‍यावरही बुद्धाचेच ते निरिच्छ, मंद स्मीत सतत विलसतच असते हे मात्र खरे.


भुतान ह्या शब्दाचा संस्कृतमधे अर्थ भू-उत्तन अर्थात वरची जमीन. अजून एक अर्थ म्हणजे तिबेटचा शेवट किंवा दक्षिण तिबेट. भुतानी भाषेत मात्र भुतान ला ड्रक-यूल म्हणजेच land of thunder dragons म्हणतात. जेमतेम साडेपाच लाख लोकंसंख्येच्या भुतान मधे पन्नास हजारावर लोकंसंख्या एकट्या थिम्फू ह्या राजधानीच्या शहरातच सामावली आहे. थिम्फू शहर आम्ही बहुतेककरुन पायी चालतच पाहीलं. झाडांच्या रांगांनी सजलेले रस्ते, दोनमजल्यांपेक्षा जास्त उंची कोणत्याच घराची अथवा हॉटेलची नव्हती. सर्व इमारतींच्या खिडक्या आणि दारांच्या लाकडी चौकटी वैशिष्ट्यपुर्ण लाल, निळ्या, पिवळ्या नक्षीने नटलेल्या. रस्त्यांवर कुठेही वाहतुकीचे सिग्नल असलेले खांब नाहीत. आणि प्लास्टिक, थुंकणे ह्याची कुठेही नामोनिशाणीही नसलेले सुंदर रस्ते आणि मोकळी मैदाने. थिम्फूच्या मुख्य रस्त्यावरच 15th Park avenue चित्रपटाच शूटींग झालेल आमच्या हॉटेल मालकाने कौतुकाने सांगितल. नव्या आलेल्या हिंदी पिक्चर्सच्या स्टोर्‍या त्याला सविस्तर माहीत होत्या आणि शाहरुख खानचे कौतुक करताना तो थकत नव्हता. लाल मिर्च्या, चीज, बटाटा, सुक्या भाज्या ह्यांचा सढळ वापर असलेले भुतानी जेवण आम्ही आवडीने खात होतो ह्याचही त्याला अगदी कौतुक वाटलं होत.

थिम्फू नंतर बघण्यासारख भुतानमधल दुसर शहर म्हणजे पारो. रस्त्यावरुन जाताना इथला दरीच्या पोटात असलेला चिमुकला एअरपोर्ट आणि त्यावरुन धावत वर आकाशात झेपावणारे ड्रक-एअर ह्या भुतानी हवाईकंपनीचे वरुन छोट्या खेळण्यासारखे दिसणारे विमान हे एक प्रेक्षणीय दृश्य होते. भुतानचे राजे जिग्मे सु वांगचू ह्यांचा राजवाडा अगदी लांब अंतरावरुनच फक्त बघता येतो. त्यानंतर एक म्युझियम, काही बुद्ध मोनास्ट्रीज. बास. टिपिकल पर्यटकांना पाहाण्या सारख्या भुतानमधे इतक्याच गोष्टी. पण गंमत म्हणजे ह्या पाहिलेल्या गोष्टी आपल्या लक्षातही रहात नाहीत. लक्षात रहातो तो फक्त इथला विलक्षण निसर्ग. पुन्हा पुन्हा आपली नजर जात रहाते ती हिमालयाच्या दमदार उतारांवर, त्यावरच्या दगडांवर फ़ुललेल्या जंगली जास्मिनवर. नाजुक लाल जांभळ्या जंगली गुलाबांच्या झुबक्यांवर, गडद रंगांची उधळण झालेली इथली फुले पापणी मिटू देत नाहीत पहाताना. लार्कस्पर्स, एस्टर्स, डेन्डेलिऑन्स, जिरानियम्स, जेन्शिअन्स, असंख्य प्रकारच्या लिली, र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि कहीशी बुटकी ज्युनिपर्सची, अतीभव्य देवदाराची झाडे, त्यावर झेपावलेल्या शुभ्र magnoliya, प्रदुषणमुक्त हवेची ग्वाही देणार्‍या लायकेन्स आणि हिरव्या शैवालाचे पांघरुण घेतलेली ओकची झाडे हे सारेच भुतानला 'ढगांमधले जंगल' असे का म्हणतात ते संगत रहातात. इथले पर्वत, नद्या, तलाव, झरे, खडक सारेच गुढरम्य आणि अलौकिक वाटते. इथली लोकं समजतात त्यात पवित्र आत्मे रहातात. त्यांना त्रास दिला तर इथे रोगराई फैलावेल, संकट ओढवतील. आपण निदान तिथे असेपर्यंततरी सहज त्यांच्या ह्या समजुतीवर विश्वास ठेवतो. आणि कदाचित म्हणूनच सार्‍या जगातून नामशेष झालेला काळ्या मानेचा हंस पक्षी फक्त इथेच, ह्या देवभुमीत सुरक्षितता वाटल्यामुळेच असेल कदाचित पण इथे मोठ्या संख्येने आढळून येतो. ह्या हंसराजांचे भुतान मधले वसतीस्थान फोबिजिका ज्याचा अर्थ जादूचे घर असा होतो तिथे आहे आणि जेव्हा हे पक्षी त्यांचे हिवाळ्यातले घर इथे वसवायला येतात तेव्हा इथल्या बुद्धाच्या देवळाला तीनवेळा उडत प्रदक्षिणा घालतात आणि मगच घरटी बांधायला लागतात असं इथले स्थानिक समजतात. जगातल्या ज्या मोजक्या दहा जैविक विविधता त्यांच्या मुळच्या नैसर्गिक अवस्थेत अजुनही जपल्या गेलेल्या जागा आहेत त्यांतले भुतानचे स्थान बरेच वर आहे. पक्ष्यांच्या दुर्मिळ 770 जाती, 50हून अधिक ऑर्किड्स आणी र्‍होडेडेन्ड्रॉन्स, थक्क करुन सोडतील इतक्या औषधी वनस्पती, तेकिन, स्नो लिओपार्ड्स, सोनेरी तोंडाची लंगुर जातीची माकडे, निळ्या मेंढ्या, वाघ, पाणम्हशी, हत्ती, लाल तोंडाचे कोल्हे, एक ना अनेक समृद्धजंगल प्राण्यांच्या संपत्तीने नटलेला हा प्रदेश पहाताना मन थकत नाही, शरीर दमत नाही.

अधिकृतपणे बाहेरच्या जगातली लोकं भुतान मधे येऊन फार नाही जेमतेम 26/27 वर्षेच लोटली आहेत. इथल्या रस्त्यांवरुन तोपर्यंत फक्त घोड्यावरुन वाहतुक चालयची आणि साठीचे दशक उलटून जाईपर्यंत इथे आधुनिक जगात तोपर्यंत कमालीचे विकसीत झालेले telecommunications चे अस्तित्वही भुतानमधे नव्हते ह्यावर आता विश्वासही बसणार नाही इतक्या झपाट्याने निदान थिम्फू, पारो सारख्या शहरी विभागांमधले भुतानचे जिवन बदलत आहे ह्यात शंका नाही. टेलेफोन्स, इंटरनेटचे बुथ्स जागोजागी दिसतात. टेलेव्हिजनचे आगमन सर्वात उशिरा झालेला जगातला भुतान हा एकमेव देश. केबल टिव्हीचे जाळे पसरुन इथे मोजकीच वर्षे लोटलीत पण ह्या चारपाच वर्षांच्या काळातही भुतानमधले गुन्हेगारीचे आत्तापर्यंत शून्यावर असणारे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. राजघराणे अधिकृअतरीत्या 2008 साली पाय उतार होऊन तिथे संसदेचे आगमन होईल. भुतान झपाट्याने बदलतेय आणि बदलत रहाणारच. आपला निसर्ग, पर्यावरण, चालिरीती, परंपरा ह्यांचे जतन करण्याची इथल्या लोकांची धडपड अजून किती काळ यशस्वीपणे चालू राहू शकेल हे येणारा काळच ठरवेल. पण आजही जेव्हा भुतानी 'किरा' नेसलेली एखादी षोडश वर्षिय तरुणी थिम्फूच्या रस्त्यावरुन चालते तेव्हा तिच्या पायातले जवळच्याच पाश्चिमात्य वस्तूंनी भरलेल्या दुकानातून घेतलेले उंच टाचांचे शूज आपल्याला भावी बदल कुठल्या दिशेने भुतानला अपरीहार्यपणे घेऊन जाणार आहे आणि किती वेगाने ते सांगत रहातात तेव्हा मन चुटपुटते जरुर.
जेमतेम चार वर्षांपूर्वी आलेल्या मोबाईलने आणि इंटरनेटने हा बदल जरा जास्तच झपाट्याने इथल्या नव्या तरुण पिढीच्या आयुष्यात आणलेला आहे हे मात्र खरे. इथल्या The Bhutan Times मधे आलेली ही आकडेवारी हॉटेलच्या लाउंजमधे वाचताना मन जरा उदासले हे खरेच. थिम्फूच्या केवळ पन्नासहजार लोकसंख्येमधे 15,000 इंटरनेट युजर्स आणि 25000 landline users आणि 23000 मोबाईल फोन सबस्क्राइबर्स आहेत. नव्या जमान्याचे नवे पडसाद भुतानमधे जरा जास्तच वेगाने पडघम वाजवत येणार आहेत का?

National Geographic चे जे आर्टिकल मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेले होते त्यात भुतानचे वर्णन " kingdom in the clouds.. scarsly touched by the modern age" असे केलेले होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीच एका फिल्म फेस्टीवलमधे Travellers and the magisianहा सिनेमा पाहीला होता. भुतानचे आजपर्यंत कधीच जगासमोर न आलेले अवगुंठीत सौंदर्य ह्या सिनेमाने सर्वात प्रथम लोकांना दाखवले. त्यात कामेही कुठल्या व्यावसायीक नट नट्यांनी नाही तर भुतानी स्थानिक लोकांनीच केली होती. त्या सिनेमातला तो अद्भुत भुतान पाहून मन केवळ थक्क झाले होते. प्रत्यक्ष भुतान फिरुन पहातानाही ही जादू यत्किंचितही उणावलेली कधी जाणवली नाही. तिथून परत येताना सोबत हाताने विणलेल्या रंगित वस्त्रांची, मंजुळ आवाज करणार्‍या लाकडी बाउल्सची सुवेनियर्स जवळच्या सामानात होती खरी, पण खरी सोबत होती ती तिथल्या अनाघ्रात निसर्गाची, दैवी, गूढ, अलैकिक सौंदर्याची आणि अजूनही निष्पापणा जपणार्‍या तिथल्या माणसांची.

Wednesday, June 14, 2006

भुतान पासून नंदुरबार पर्यंत

एप्रिल अखेरीस माझं जे भटकणं सुरु झालं ते जून च्या चार तारखेला शेवटी संपल. ह्या काळात मी सिक्किम, दार्जिलिंग, भुतान असा एक पंधरा दिवसांचा, नंदुरबार चा तीन दिवसांचा आणि पुणे, कोल्हापुर चा सहा दिवसांचा असा प्रवासदौरा केला. भुतान सिक्किम चा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता. ह्या प्रवासाची डायरी मला खरेतर लगेचच इथे टाकायची होती पण आल्या आल्या लगेचच पुणे कोल्हापुर झालं. मग मुलीची शाळा खरेदी, आवराआवरी, प्रवासाचा शीण त्यातच असाईनमेंट्स च्या डेडलाईन्स ह्यात सिक्किम भुतान बरच लांब राहिलं खरं.

नंदुरबार ला ऐन उन्हाळ्यात जाणं म्हणजे स्वत:हून आगीच्या भट्टीत उडी टाकण्यासारखेच. आम्हा मुंबईकरांना ही खानदेशातली रसरसती उन्हाची काहिली सहन होत नाही हेच खरं. अपेक्षेप्रमाणेच तिकडे गेल्यावर उन्हाचा प्रचंड त्रास झाला खरा पण ज्या कारणासाठी रादर जे पहायला आम्ही तिकडे गेलो होतो ते पाहिल्यावर उन्हाचा त्रास विसरायलाच झाला. डॉ. उर्जिता जैन आणि त्यांचे पती डॉ. चेतनकुमार जैन या दोघांनी मिळून नंदुरबार, धुळे दरम्यानच्या रखरखीत उजाड पट्ट्यात नक्षत्रवनाच अक्षरश: नंदनवन फुलवलय. वनौषधींच्या क्षेत्रातल उर्जिता जैनांचं चं कर्तृत्व वादातीतच आहे. आता त्यांनी तिथेच Herbal Science and Techology' च कॉलेज सुरु केलय. ते पहायला जैन दांपत्यानी आग्रहानी निमंत्रीत केलं होत. मी नक्षत्रवना बद्दल बरेच दिवस ऐकून होते. पहायची उत्सुकता तर होतीच. आता कॉलेजच निमित्त होत तर जावच म्हणून अगदी ऐन मे मधे जायच होत तरी पाय मागे घेतला नाही. आणि खरच गेल्याच चीज झाल. तिथला तो दहाहजार sq. ft. इतक्या प्रशस्त जागेतला वनौषधी महाविद्यालयाचा पसारा, अत्याधुनीक प्रयोगशाळा, A.C. क्लास रुम्स, चैतन्य वनातली झाडे, रक्तचंदनाचे ओळीने लावलेले वृक्ष, जैन पतीपत्नींचा पाहुणचार सारचं मन प्रसन्न करणारं होत. नक्षत्रवनातल्या रुद्राक्षाच्या झाडाखाली पडलेला रुद्राक्षाच्या सडा आणि भुर्ज वृक्षा च्या सावलीतला थंडावा ह्या दोन गोष्टी तर मी मला नाही वाटत कधी विसरेन.

भुतान सिक्किम ट्रेक तर अफलातून होता. त्याचं वर्णन असं जाता जाता करणं केवळ अन्यायकारक ठरेल.

दरम्यान वाचन बरच झालय पण विस्कळीतपणे. सलग जे वाचून झालय त्याबद्दल बुकशेल्फ़ मधे टाकतेच एकदोन दिवसांत.

नंदन ने पुस्तकनिष्ठांची मांदियाळी सुरु केलीय ती ज्या कौतुकास्पदरीत्या मराठी ब्लॉगर्स पुढे चालवत नेत आहेत ते पाहून इतका आनंद झाला! कोणं म्हणतं नवी पिढी पुस्तके वाचत नाही म्हणून?? सर्वांचेच वाचन, साहित्याची जाण प्रगल्भ आहे. अभिमान वाटण्यासरखीच आहे. आणि ह्यासाठी पहिले अभिनंदन नंदनचे करायला हवे!!

Sunday, April 16, 2006

वाचत असलेली पुस्तके

माझ्या पुस्तक वाचनात शिस्त नाही. म्हणजे एका वेळी एक पुस्तक वाचून पूर्ण करणे किंवा एका लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपविणे, पुस्तका मधून आपल्याला काय मिळालं, पुस्तकाचा सारांश, टिपणं वगैरे काढून ठेवणं मला कधी जमलच नाही. खरतर अशी ही शिस्त वाचनाला लावून घेणे अत्यंत चांगली व आवश्यक गोष्ट आहे. त्यासंदर्भात काही लेखन करने, परीक्षण करणे, आपल्या इतर लेखांसाठी संदर्भ म्हणून टिपणांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यामुळे शक्य तर होतातच पण वाचन सुरळीत चालू असल्याचा एक फ़ील पण येतो.

मला एकतर एकावेळी अनेक पुस्तके वाचायची खोड. म्हणजे समजा मी दुकानातून, प्रदर्शनातून चार पुस्तके आणली तर मी घरी आल्यावर ती एकामागून एक सगळी वाचायला सुरुवात करते. लायब्ररीची पुस्तके सोबतीला असतातच. वाचन वेळ मिळेल तस कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी चालू असतं त्यामुळे मग त्या त्या वेळी हाताला येईल ते, पर्स मधे असेल ते पुस्तक आधीच्या पानावरुन पुढे वाचायला सुरुवात होते. अपवाद असतोही एखाद्या खूपच मनाची पकड घेणार्‍या पुस्तकाचा. पण तसे पुस्तक अपवादानेच हातात पडते हल्ली. रात्रभर जागून हातातले पुस्तकं संपवल्याशिवाय झोपच न येणे असा प्रसंगच खूप कमी येतो.

मॅजेस्टीकच्या ग्रंथयोजनेची मी सभासद आहे. परवा त्या योजनेची वार्षिक मुदत संपली. मग एकदम एकावेळी खूप पुस्तके विकत घ्यायचा सुवर्णयोग आला. अधाशासारखी पुस्तके विकत घेतलीत. आणि आणल्यापासून ह्या पुस्तकाची दोन पाने, त्याची काही प्रकरणे असं चालू केलय. न वाचलेलं पुस्तकं घरात अवतीभवती असणं मनाला त्रासदायक असतं. चैनच पडत नाही. पण ह्यावेळी मात्र मी मनाशी ठरवलय की जमेल तितकं शिस्तीने पुस्तकं वाचायची. त्यांची जमतील तशी परीक्षणं पण लिहायची. त्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग उघडायचा मनात आहे.

सध्या माझ्या अवतीभवती पसरून असलेली पुस्तकं ही आहेत्:

१ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२ ब्र - कविता महाजन
३ मौनराग -महेश एलकुंचवार
४ स्टुडिओ - सुभाष अवचट
५ जगण्यातील काही - अनिल अवचट
६ फुलवा -डॉ. श्रीश क्षिरसागर
७ सिनेमाचे दिवस - विजय पाडळकर
८ कोबाल्ट ब्लू -सचिन कुंडलकर
९ चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
१० रानातल्या वाटा -मारुती चितमपल्ली
११ केशराचा पाऊस -मारुती चितमपल्ली
१२ भूमी -आशा बगे
१३ राजा रविवर्मा - रणजित देसाई
१४ भूप -मोनिका गजेन्द्रगडकर ( ह्या विद्याधर पुंडलिकांच्या कन्या )

तर मित्रांनो .... शक्य तितक्या लवकर संपवते ही पुस्तके आणि लिहीते त्यावर जमेल तस परीक्षण

Friday, April 14, 2006

नथ - एक असंस्कृत परंपरा


पारंपरिक महाराष्ट्रीयन स्त्रीचे दर्शन नथ ह्या दागिन्याशिवाय पुरेच होवू शकत नाही असे मानले जाते. पेशवाई संस्कृतीचा हा अगदी पिढ्यानपिढ्या घरांमधून जपला गेलेला, सणासमारंभात अभिमानाने मिरवण्याचा दागिना. पण नथ हा दागिना महाराष्ट्रात कसा व कुठून आला ते वाचल तर हा अभिमान शिल्लक राहील का?

नथ हा संपूर्ण अभारतीय असणार्‍या परकी संस्कृतीमधला आणि भारतीयांनी त्याज्य मानावा असा अलंकार. भारतात नाक टोचण्याची परंपरा नाही. रामायण, महाभारत, प्राचीन लेख, वेरुळ अजिंठा येथील चित्रे व शिल्पे यांत कोठेही नाकातील अलंकारांचा निर्देश नाही. ही चाल येथे मुस्लिम धर्मियांनी आणली. त्यांच्या संस्कृतीत स्त्रीची किंमत गुराढोरांएवढीच. उंटाच्या नाकात मध्ये भोक पाडून जी वेसण अडकवली जाते तिला 'बुलाक' असे नाव आहे. तीच बुलाकची संकल्पना दागिन्याच्या रुपात त्यांनी स्त्रीच्या नाकात अडकवली.हळूहळू येथे आलेले मुसलमान राज्यकर्ते झाले. त्यांची साम्राज्ये वाढली आणि येथील हिंदू सरदार सुभेदार त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले. त्यांच्या पोषाखाचे अनुकरण करु लागले. त्या वेळी हा बुलाक दागिना येथील हिंदू स्त्रियांच्या नाकातही प्रवेशला.
आज गुजराती, मारवाडी महिला नाकात मध्यभागी लोंबणारे सोन्याचे कडे व त्याला डाव्या आणि उजव्या बाजूंना अडकवून कानापर्यंत नेलेली सोन्याची साखळी असा जो अलंकार धारण करतात, तो म्हणजे दुसरे काहीही नसून ही सोन्याची किंमतवान वेसणच आहे.
महाराष्ट्रात हा दागिना थोडा उशिराच आला ( बहामनी राजवट ) पण येथेही त्याला तीच प्रतिष्ठा लाभली. त्याला प्राकृत भाषेतील 'नथ' हा शब्द वापरला गेला. नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार रईस लोकांनी या मूळच्या नथीचे रुप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून जे नथीचे नवे स्वरुप तयार केले तेच आता महाराष्ट्रात चालू आहे.
नथ या अलंकाराला कोणतीही भारतीय आणि सन्मान्य परंपरा नही हे सत्य आपणास कधी नाकारता येणार नाही. संस्कृती परंपरा जपण्याच्या नादात आपण कसे कधी कधी चुकीच्या चालीरितींचे जतन करतो इतकेच नव्हे तर पुढल्या पिढ्यांनीही त्या जपाव्यात हा आग्रह अजाणतेपणातून धरतो त्याचे हे रत्नजडीत उदाहरणच म्हणायचे

Wednesday, March 22, 2006

मुंबई युनिव्हर्सिटीच्या आवारात फ़िल्म शूटींग

मुंबई युनिव्हर्सिटीच्या आवारात फ़िल्म शूटींगला परवानगी दिली ही बातमी ऐकून फ़ारसं बरं वाटल नाही. मुंबईमधल्या म्हणजे फ़ोर्ट, चर्चगेट परिसरातल्या काही देखण्या इमारतींमधे युनिव्हर्सिटीच्या इमारतीचा नंबर खूप वरचा. राजाबाई टॉवर वरच्या घड्याळाचे घनगंभीर टोले ऐकत, प्रशस्त, हिरवाईने नटलेल्या युनिवर्सिटीच्या प्रांगणातून फ़ेरफ़टका मारताना मनाला कस शांत वाटतं. क्रॉस मैदान आणि राजाबाई टॉवरच्या मधोमध वाहता रस्ता आहे ह्याची जाणीवही आत आवारात होत नाही. युनिवर्सिटीच्या सर्वच इमारती दगडी, चिरेबंद, थंडगार आणि भव्य. दीक्षांत समारंभ जिथे होतो तो हॉल तर अत्यन्त देखणा. युनिवर्सिटीच्या आवारात कित्येक दुर्मिळ झाडे, वनस्पती उत्तम जोपासल्या आहेत. पत्रकारीतेचे आमचे वर्ग ज्या इमारतीत भरायचे ती अगदी आतली टोकाची इमारत होती. तिथे आत जाताना प्रवेशाशीच केशरी, गोल मंदपणे लकाकणार्‍या दिव्यांप्रमाणे दिसणारी गोल चेंडूसारखी फ़ुले असलेला अतिशय देखणा कदम्ब वृक्ष होता. त्याच्या फ़ांद्या थेट खिडकीतून आत घुसायच्या. दुर्दैवाने गेल्या वर्षीच्या धुआंधार पावसात तो कोसळला. युनिवर्सिटीच्या आवारात कैलासपती, मोह, नीरफ़णस, आसूपालव, सीतेचा अशोक, अर्जून, साग, पुत्रंजीवा, बदाम, उर्वशी असे कितीतरी सुरेख, दुर्मिळ वृक्ष आहेतं. त्यांच्या सावलीखाली असलेल्या दगडी बाकांवर बसून काही लिहायला वाचायला किती छान नीरव शांतता मिळते.
शूटींगला परवानगी दिल्यावर युनिवर्सिटीचे हे शांत पावित्र्य, गंभिरपणा जपला जाईल का? शंका आहे.

Wednesday, March 15, 2006

गृहिणी दीपशिखा

शरू रांगणेकरांनी आपल्या बहारदार आणी खुसखुशीत शैलीत भारतीय व्यवस्थापकांच केलेलं सुरस आणि चमत्कृतीपूर्ण वर्णन ( Ref. In the Wonderland Of Indian Managers ) वाचताना माझ्या डोळ्यांपुढे राहून राहून ज्यांना कौतुकानं (!!) आद्य व्यवस्थापक म्हणून संबोधल जातं, त्या घरोघरीच्या गृहव्यवस्थापिका उर्फ़ सामान्य भाषेत गृहिणी उभ्या राहत होत्या.

स्वत : शरू रांगणेकर तर नेहमीच कधी मिश्किलपणे तर कधी उपरोधिकपणे गृहिणींची उदाहरणं देत आले आहेत. त्यामुळंसुद्धा असेल कदाचित, पण भारतीय व्यवस्थापकांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त आणि मस्त अशा मनोवृत्तीचं त्यांनी केलेलं वर्णन मला गृहिणींसाठीच जास्त चपखल वाटलं.

सगळ्याच भारतीय बायका, मग त्या नोकरी करणार्‍या असोत वा नसोत, स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या असोत वा राजकारणात, कलावंत असोत वा खेळाडू, त्यांना स्वत : ला आपण कशा आधी छानशा गृहिणी आहोत आणि बाकी सगळं नंतर, म्हणजे गृहिणीपण सांभाळून मग, असं दाखवायला भारी आवडतं. दाखवायला शब्द महत्वाचा आहे. कारण खरं ते निभवायला किती कठीण असतं ते समजेपर्यंत आणि त्यांनी ते मान्य करेपर्यंत त्या ना धड गृहिणी राहिल्या असतात, ना इतर काही. पण आदर्श गृहिणीपणाचा देखावा करण्यात त्या मनापासून रमतात.

फ़ारसं काही वेगळ करुन दाखवावं, अशी त्यांची स्वत : कडून किंवा इतरांची त्यांच्याकडून अपेक्षाच नसल्यानं हा देखावा बहुतेक वेळा पुरेसा ठरतो.

मूळ मुद्दा असा की, सुस्त, व्यस्त, त्रस्त, मस्त हे भारतीय व्यवस्थापकांच्या स्वभावाचं चित्रण गृहव्यवस्थापिकांना चपखल का आणि कस बसतं? आपण जरा आजुबाजुला नजर टाकूया का?

सुस्त गृहव्यवस्थापिका

' बघू ' , नंतर, काय घाई आहे?, मला बाई कंटाळा .... ' हे यांचे परवलीचे शब्द. कामाची चालढकल, दिरंगाई करण्यात यांचा हातखंडा. नोकरी करणार्‍या गृहिणींना या विभागात बसवता येणार नाही असं कुणाला वाटत असेल, तर तो मोठाच गैरसमज आहे. सुस्तपणाला कामाच्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तर भरपूर वाव. टेबलावरच्या बराच काळ न हललेल्या फ़ायली, लेडीज रुममध्ये जास्तीत जास्त घालवलेला वेळ, त्यांच्यावर महत्वाची कामं कधीच न सोपवण्याची त्यांच्या बॉसनं घेतलेली खबरदारी त्यांच्या 'सुस्त'पणाच द्योतक असतं. मुलांच्या शाळांची तयारी करताना यांना ऑफ़िसचं हजेरीपत्रक काठायला उशीर होतो म्हणून सहानुभूती दाखवावी, तर त्यांच्या मुलांचीही शाळेची पहिली घंटा कायम चुकलेलीच दिसते. गंमत म्हणजे घरात असताना बहुतेक वेळा त्यांचा सुस्तपणा छुपाच असतो. किंबहुना तो छुपा राखण्याइतकी चतुरता त्यांच्यात उपजतच असते. त्यांच्या मागं कुणी ऑफ़िसमधल्या सहकार्‍यांनी किंवा शेजारणींनी तगादा लावलाच तर उद्या, पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी असे वायदे करताना त्या जराही कचरत नाहीत.

यांचा दुसरा गुण म्हणजे दुसर्‍यांकडून कामं वेळेत करवू घेणं यांना व्यवस्थित जमतं. त्यात त्या जराही सुस्तपणा दाखवत नाहीत. यांचे नवरे आणि मुलं साहजिकच स्वावलंबी असतात. याच कारण त्यांचा सुस्तपणा असं चुकूनही मनात आणू नका. कारण आपण नोकरी करुन घर सांभाळतो आणी घराला कशी योग्य शिस्त लावली आहे, याबद्दल आपली पाठ वरचेवर थोपटून घेण्यात त्या सर्वात पुढे असतात. यांची मोलकरीण शक्यतो दांडीच मारत नाही. कारण जितक्या दिवसांची दांडी, तितक्या दिवसांच साठलेलं कामं हे समीकरण त्यांना महागातच पडतं. छे, छे, पगार कापण्याच चुकीच धोरण त्या कधीच अवलंबत नाहीत. तुम्ही दुर्दैवाने कामसू आहात आणि त्यांची शेजारीण आहात, तुम्ही तुमच्या मोलकरणीला इतकं सारंकाही देता, पण तुमच्या घरी दांडी मारून तुमची मोलकरीण सुस्त शेजारणीचं कामं हळूच संध्याकाळी येऊन करूण टाकते. याचं कारणं तुमचा मूर्ख कामसूपणा. सिंकमधे चमचा सुद्धा राहिलेला चालत नाही तुम्हाला. मग भांड्यांचा ढिगारा न घासता तुम्ही राहूच देणार नाही, हे तुमच्या मोलकरणीला बरोबर माहीत असतं.

गृहिणीच्या भूमिकेत घरात वावरताना या जशा आपल्या घरातल्या पसार्‍याबद्दल संकोच बाळगत नाहीत, तसच ऑफ़िसात टेबलभर पसरलेल्या कागदांचाही बाऊ करत नाहीत. पसारे आवरत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घेणं महत्वाचं, असं त्या ठणकावून सांगतात. पण ऑफ़िसातही उगाच घाईगर्दी करुन चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा वेळ लागला तरी चालेल अस बजावतात.

सुस्त गृहव्यवस्थापिका बहुतेकदा वजनदार असतात, त्यामुळं उगाचच त्या आनंदी असल्याचा आभासही उत्पन्न होतो. ऑफ़िसचा, कामाचा ताण पदतो म्हणून वरचेवर हॉटेलातून पार्सलं मागवावी लागतात, फ़ास्ट फ़ूड खाल्लं जातं, असं त्या अगदी दु : खी चेहर्‍यानं सांगतात, तेव्हा तुमचा लगेचच विश्वास बसतो. स्वयंपाकचा व्याप उगाचच वाढवत बसण्यापेक्षा इतर चार 'क्रिएटिव्ह' कामं करावीत असं त्या वारंवार सांगत असल्या, तरी ती इतर चार कामं कायम गुलदस्त्यातच राहतात.

एकंदरीत काय, तर 'संथ वाहते कृष्णामाई' च्या धर्तीवर त्यांच कार्य चालतं. फ़क्त एक लक्षात ठेवा, कधी काळी एखाद्या बॅंकेत कर्जमंजुरीसाठीचा तुमचा अर्ज या व्यक्तिमत्वाच्या स्त्री अधिकार्‍यांच्या हातात गेला, तर पुढची तीन चार आर्थिक वर्षं तुमचं कर्ज मंजूर व्हायला लागणारं हे नक्की.

व्यस्त गृहव्यस्थापिका

सुस्त गृहिणींच्या अगदी उलटा यांचा स्वभाव. सदैव घाईत. कामत अतिव्यग्र. हातात तीन पिशव्या, शिवाय खांद्यावर एक लटकवलेली, अशा त्या या दुकानातून त्या दुकानात, घरातून शाळेत, शाळेतून बॅंकेत अशा धावत असतात. एका फ़ेरीत अनेक कामे होऊ शकतात, यावर मुळी त्यांचा विश्वासच नसतो. मी आहे म्हणून ... हे त्यांचे पालुपद. भरपूर कामात असल्याचा देखावा करण्यात यांचा हातखंडा. कुणाकडच्या लग्नकर्यात वा समारंभात यांचा 'नारायणी' अवतार पाहून भलेभले भुलतात. ऑफ़िसात कधी या चुकून खुर्चीवर आढळल्याच, तर त्या फ़ोनवर बोलण्यात गुंग असतात. कुठल्या चर्चेकरता किंवा कामाकरता त्यांना अजिबात वेळ नसतो. भरपूर काम आधीच शिल्लक आहे आणि आख्ख्या ऑफ़िसात त्या एकट्याच काम करणार्‍या आहेत, असं त्यांच्या वरिष्ठांना पटवण्यात त्या यशस्वी असल्यानं त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर अधिक काम सोपवायला नेहमीच कचरतात.



त्रस्त गृहव्यवस्थापिका



यांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या कामात या व्यस्त असतात, त्याविषयी त्यांची सतत तक्रार असते. यांची मोलकरीण भांडी कधीच स्वछ घासत नाही, यांच विजेच बील इतरांपेक्षा नेहमीच जास्त येतं, असं त्यांना खात्रीपूर्वक वाटतं. 'माझी घरात कुणाला कदर नाही' असं त्यांच वाक्य वारंवार कानावर पडल्यानं बर्‍याचदा खरोखरच तशी परिस्थिती निर्माण होते. ऑफ़िसात काम यांना करावं लागतं, पण सवलती इतर नटमोगर्‍यांना असं त्या कायम तणतणत राहतात. ऑफ़िसात सहकार्‍यांशी आणि घरी सासूशी, नणंदेशी यांचे कायम खटके उडतात. यांची कटकट ऐकण्यापेक्षा फ़ायली स्वत : च बघणं योग्य असा निर्णय वरिष्ठ स्वत : हूनच घेतात. शिवाय यांचा त्रस्तपणा आजुबाजुला एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा सहजी पसरतो. त्यांच्या सहवासात राहिल्यावर तुमच्याही कपाळावर आठ्यांच जाळं पसरलं, तर नवल नाही.



मस्त गृहव्यवस्थापिका



इथं मस्तं शब्द गुणवत्तादर्शक आहे. या जिथं जातील, तिथलं जग जणू त्या उजळून टाकतात. आदर्शपणाचा आव आणण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. वेळच्या वेळी कामं आटोपून इतर चार छंद जोपसण्याइतका उत्साह त्यांच्यात नेहमीच असतो. ऑफ़िसात सुद्धा तक्रारीला त्या वावच ठेवत नाहीत. हे सगळं त्यांना सहजी जमतं, उपजतच असतं असं जरी आजुबाजूचे समजत असले, तरी त्या मागं त्यांची मेहनत, नियोजन, जीवनाकडं पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याची जाणीव कुणालाच नसते. यांची मुलं गुणी निघतात, यशस्वी होतात, यांना बढती चटकन मिळते, याबद्दल हेवात्मक चर्चा त्यांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त मैत्रीणी नेहमीच करतात. पण शंभरात एखादीच अशी मस्तं हे त्याही मान्य करतातच.
शरु रांगणेकर 'मस्त' व्यक्तिमत्वाच्या व्यवस्थापकाला 'दीपशिखा' म्हणून संबोधतात. दीपशिखेची ही उपमा अशा एखाद्याच गृहव्यवस्थापिकेला देता येईल, जिच्यामुळं सारं घरदार उजळून निघतं.

Wednesday, March 08, 2006

Respect Yourself!!

....... "मी स्त्री असल्यामुळे मला यशस्वी होण्यासाठी जरा जास्तच कष्ट करावे लागतात, कारण जर अयशस्वी झाले तर कुणी असं म्हणणार नाही, ' तिला ते शक्य झालं नाही कारण तेवढी तिची क्षमता नव्हती.' ते म्हणतील,' बाईला हे करता येणं शक्यच नाही. कारण तेवढी तिची क्षमताच नसते.'
.... Clare Boothe Luce
मतदानाचा अधिकार ही नसलेल्या स्त्रियांचा काळ आणि आज राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकारवाणीने निर्णय घेऊन तो कार्यान्वित करणार्‍या स्त्रिया. खुप मोठी वाटचाल स्त्रिया करुन आलेल्या आहेत आणि स्त्री पुरुष मिळून एक समानतेच्या, परस्पर सन्मानतेच्या, आदराच्या पातळीवरील एक निरोगी समाज उभारण्याच्या दिशेने स्त्रियांना पुरुषांच्या सोबतीने अजून एक फ़ार मोठी वाटचाल करायची आहे. थोड थबकून जरा स्मरण करुयात त्या सार्‍याच स्त्री पुरुषांचे ज्यांनी स्त्रियांना आत्मसन्मान शिकवला. स्वाभिमान शिकवला. महात्मा ज्योतिबा फ़ुले, महर्षी धोंडो केशव कर्वे ह्या पितामहांनी कधी स्त्रीमुक्ती वगैरे शब्द वापरले नाहीत पण त्यांनी जे केले त्याचे मोल केवळ अनमोल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशविदेशांमधे ज्या ज्या स्त्रियांनी पुरुषांनी स्त्रियांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला त्या सर्वांबद्दल आज बरच काही लिहून येईल, पण निदान महाराष्ट्रात प्रत्येक स्त्रीने ह्या दोन थोर पुरुषांपुढे आदराने नतमस्तक व्हायलाच हवे. आज आणि नेहमीच.

Tuesday, February 28, 2006

मित्र मैत्रिणींनो .....

हाय!! .... ब्लॉग चे नाव उर्दूमध्ये असले तरी मी मराठीच आहे आणि मराठीतच लिहिणार आहे. खरतर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच ब्लॉग चा शुभारंभ करण्याच मनात होत. थोडा उशिर झाला. पूर्वी इंग्रजीमधून blogging केल्याने ब्लॉगविश्व तस ओळखीच आहे पण मराठीमधून हा ब्लॉग सुरु करण्या आधी थोडा मराठी ब्लॉगविश्वाचा फेरफटका मारला तेव्हा अगदी आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. किती छान नोंदी केल्यात मराठीमधे मुलामुलींनी. साहित्य, वैयक्तिक, प्रवास अनुभव, चालू घडामोडी अशा कितीतरी विषयांवर देशविदेशातील पब्लिक लिहितं आहे. संख्या त्यामानाने फार नाही. पण मला वाटत युनिकोड सुविधा नुकतीच लोकांपर्यंत पोचली आहे. हळूहळू वाढेल मराठी ब्लॉगर्स ची संख्या.

माझी ओळख पण ह्या निमित्ताने करुन देते. मी मुंबईची मराठी पत्रकार. तसं व्यवसायाने मराठी इंग्रजी भाषेत कॉपिरायटींग करते पण पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे आणि आवड असल्याने, आणि मनमोकळ लिहिता याव, बंधन नसाव म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करते. अर्थात Free Lancing . व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे माझ्या आवडीचे लेख विषय. ब्लॉग मध्येही त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करीन. प्रवास आणि संगित हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय. पण खुप कमी वेळ त्यासाठी काढता येतो ही खंत कायम मनात असते. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा पण माझा छंद.

भेटत राहूच. तुम्हा सर्वांची ओळख होऊन ती खुप खुप वाढेल ही खात्री आहे.
इथे नियमीत येण्याइतका सलग वेळ मिळो ही सदिcछा मी माझी मलाच देऊन घेते.