Monday, April 04, 2016

शर्वरीच्या कविता

गेले दोन-तीन दिवस ’शर्वरीच्या कविता’ आसपास आहेत. 'ऋतूरंग’च्या अरुण शेवतेंनी त्यांच्या मुलीवर, शर्वरीवर लिहिलेल्या कविता. बापाने मुलीवर, मुलीकरता लिहिलेल्या. फ़ार गोड, साध्यासुध्या, मनात खोलवर उतरणा-या लहान लहान ओळी. 
या आधी गुलझारांच्या ’बोस्कीच्या कविता’ वाचल्या होत्या. त्यातला लोभस कोवळेपणा कधीही जून न होणारच नाही असा. ’शर्वरीच्या कविता’ पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी गेले होते. गुलझार आले होते. त्यांनी त्यावेळी ’शर्वरीच्या कविता’ ऑन द स्पॉट त्यांच्या खास शैलीत हिंदीमधे अनुवादित केलेल्या ऐकतानाच जाणवलं जातकुळी किती सारखी आहे दोन्ही बापांच्या मनातल्या मुलीवरच्या प्रेमाची.
’फ़ादर्स डे’ च्या दिवशी लेकीला काय भेट द्यावी या विचारात असताना अचानक सुचलेली यातली पहिली कविता. “खरंच सांगतो तू जन्माला येणार म्हणून माझा जन्म झाला”.. आणि मग हा प्रवास “या जगात मी नसताना तुझी दुपार कशी असेल, तुझी संध्याकाळ कशी असेल या विचारानेच उन्मळून जातो..” इथवर येऊन पोचतो तेव्हा माझ्यातल्या मुलीचं मन गलबलून जातं. 

नुकत्याच हात सोडून एकट्यानेच निघून गेलेल्या माझ्या वडिलांच्या मनात कधीतरी असंच काहीसं आलेलं असणार..
जगातल्या सगळ्या मुलींच्या मनातली बापावरच्या प्रेमाची जातकुळीही एकच तर असणार.
     

No comments: