Thursday, October 28, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!

चित्रकला आवडते,गाणी ऐकायला आवडतात,अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात,कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे..
आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय..रंग,सूर,शब्द,चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या'कुहू'या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला..किंवा असं म्हणूयात'अनुभवला'तेव्हा विश्वास बसला.

दाट,गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल,खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा,पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर,मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र..त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप..खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी'कुहू'
कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते,गाणं मनात रुंजी घालतं,कुहूच सुरेल शीळ मनात घुमते,नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही..मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.


कुहूमधे कविताने स्वतःकाढलेली ४०-४५ऑईल पेंटिंग्ज आहेत,आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत,पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत,नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ,विलोभनीय व्हिडिओ आहे..अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत,दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे,समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत..या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला'पुस्तक'कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे.पुस्तक म्हणायचे कारण यात'शब्द'सर्वाधिक महत्वाचे,पायाभूत आहेत.शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात.शब्द येताना आपले रुप,रंग,नाद,लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच.अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत,आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.
कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली?कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही..पण हे अ‍ॅनिमेशन,संगीत,व्हिडिओज,कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड?शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत.कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे.कुहू हा गाणारा पक्षी.जंगलात रहाणारा.आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे.एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात.जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली.कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो.आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो..माणसाची भाषा त्याला शिकायची आहे,माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय..या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते..गोष्ट पुढे सरकत रहाते..विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात..त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं.हे कुहूचं जग आहे.ते अनुभवयालच हवं.
कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच,पण भारतीय साहित्यात एक नवी,आधुनिक वाट निर्माण होते आहे.कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे.मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते,बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो,जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे.कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.
ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे.तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र,भिन्न,ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही.सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले.आणि त्यासाठी तारण आहे'बौद्धिक मालमत्ता'.मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत'कल्पना'वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत,क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात!
कुहूचे महत्व यासाठीही.



कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल.त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे.तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.

शर्मिला फडके
'चिन्ह' ब्लॉगवरही प्रकाशित.

Wednesday, October 20, 2010

दिवाळी अंक आणि...

दिवाळी अंक आणि चित्रकला यांचं नातं मोठं मजेशीर.
म्हणजे असं की दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासून आतल्या पानापानांवर 'चित्रकला'दिसत तर असते पण'चित्रकलेवर'काय आहे हे शोधायचं झालं तर अंकांची पानच्या पानं उलटावी लागतात.तेव्हा कुठे एखाद दोन मोजके दिवाळी अंक हाताशी लागतात ज्यात चित्रकलेवर,चित्रकारांवर कोणी काही गंभीरपणे लिहिलेलं वाचायला सापडतं.एका अर्थाने चित्रकलेची ही दिवाळखोरीच होत असते दरवर्षी.
यावर्षीच्या म्हणजे २०१०सालातल्या दिवाळीत कोणकोणत्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय लिहून येतय याचा शोध घेताना जबरदस्त इंटरेस्टींग गोष्टी हाताशी लागल्या. .
त्याबद्दल सविस्तर इथे वाचा..

Saturday, October 09, 2010

'चिन्ह' ब्लॉग

पिकासो म्हणाला होता- पेंटींग म्हणजे चित्रकाराची डायरी.
'चिन्ह' म्हणजे त्या चित्रकारांची 'जीवनकहाणी'

'चिन्ह' ब्लॉग सुरु झाला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट.
कलेला वाहून घेतलेलं मराठीमधलं एकमेव आर्ट मॅगेझिन म्हणजे 'चिन्ह'.
जरुर भेट द्या. प्रतिक्रिया कळवा.

Friday, October 08, 2010

चिन्ह

'चिन्ह'साठी मी २००५ साली पहिल्यांदा लिहिलं.चित्रकार अतुल दोडियावर काहीतरी होतं ते.त्याच्या स्टुडिओत जाऊन गप्पा-मुलाखत वगैरे.त्यानंतरची चार वर्षे खूप वेगवेगळ्या चित्रकारांवर चिन्हसाठी लिहिलं.कला आणि जाणीवांच्या संदर्भात प्रत्येकवेळी जास्त जास्त समृद्ध होत गेले.गेल्या वर्षी लिहिलेल्या'राजा रविवर्मा आणि त्याने चितारलेल्या त्या सगळ्या देखण्या,दैवी चेहर्‍यांमागचा चेहरा शोधण्याच्या अनुभवांवरचा,रविवर्माच्या मळवलीच्या आता तर पूर्ण जमिनदोस्त झालेल्या पण शतकभरापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणार्‍या रविवर्मा प्रेसच्या दुर्दशेवरचा लेख मात्र खर्‍या अर्थाने अंतर्मुख करुन गेला.खूप काही देऊन गेला आणि घेउनही गेला.त्या अनुभवांवरही बरंच काही लिहिण्यासारखे आहे..'चिन्ह'वरच खरं तर इतकं काही लिहिण्यासारखं आहे!
'राजा रविवर्मा-एक शोधयात्रा'साठी दोन वर्षे जीवापाड मेहनत केली होती.विनायक परबने'चिन्ह'वार्षिकातल्या माझ्या या लेखावर भरभरुन लेख लिहिला तेव्हा केलेल्या मेहनतीची दखल आणि कलाक्षेत्रातल्या अचूक डॉक्युमेन्टेशनचे महत्व अजून कुणालातरी पटतय याची जाणीव मनाला खूप उमेद देऊन गेली.

राजा रविवर्मा - एक शोधयात्रा
"एक महत्त्वाची दंतकथा महाराष्ट्राने वर्षांनुवर्षे जपली, ती म्हणजे रविवर्माच्या चित्रातील महाराष्ट्रीय तरुणीच्या चेहऱ्याचे रहस्य. महाराष्ट्रातील अनेक पिढय़ांनी वर्षांनुवर्षे ही दंतकथा पुढल्या पिढीला सांगितली, जपली आणि पुढे नेली. त्याला यशस्वी व महत्त्वपूर्ण छेद देण्याचे काम यंदाच्या चिन्ह वार्षिकाने केले आहे. यातील ‘वह कौन थी?’ हा शर्मिला फडके यांचा लेख म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नुमनाच ठरवा. महाराष्ट्रामध्ये शोध पत्रकारिता होत असते. पण बव्हंशी ती राजकारणाशीच संबंधित असते. त्यातही ‘भांडाफोड’ हाच त्याचा उद्देश असतो. कधीकधी समाजकारणाशी संबंधित कुपोषणादी विषयही हाताळले जातात. पण अशाप्रकारे दृश्यकलेच्या संदर्भात केलेली शोधपत्रकारिता ही मात्र विरळाच. दृश्यकलेशी संबंधित सर्वांनी तर हा लेख वाचायलाच हवा. पण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही तो अवश्य वाचावा, म्हणजे एखाद्या शोधयात्रेमध्ये किती प्रकारे मेहनत घ्यावी लागते, किती व कशाप्रकारचा संयम ठेवावा लागतो याची त्यांनी नेमकी कल्पना येईल."... पुढे वाचा...

Sunday, September 19, 2010

आप अगर आप ना होते तो क्या होते?

यहाँ दिल खर्च हो जाते हैं अक्सर.... कुछ नहीं बचता - मुम्बई का मंज़र

Only He can write like this!!

Monday, August 23, 2010

भेट.

झिमझिमत्या पावसात मी आणि मिथिला काल संध्याकाळी एनसिपिएला गेलो.
भन्नाट वारा.
मागे मुंबईचं क्षितिज काळसर पावसाळी ढगांमधे मावळत गेलं.रस्त्यावरची माणसांची गर्दी मागे मागे जात रस्ता शांत होत गेला.
एनसिपिएच्या टोकाला वेडावाकडा वारा आणि पावसाच्या सरी.पावसाच्या एका जोरदार झोतात आम्ही क्षणात चिंब भिजूनच गेलो. काही हरकत नाही.एकमेकींकडे समजुतदारपणे पहात आम्ही हसलो.निसर्गाचा मुक्त आविष्कार अंगावर झेलूनच त्याला भेटण्यात मजा.
फॉयरमधे टेबलावरची त्याची पुस्तकं चाळत असताना मागे किंचित लोकांची गडबड.मिथिलाने अधिरपणे खांद्यावर हात टेकवत मागे पहायला खुणावलं.
रस्किन बॉन्ड.वाटोळा,गोल गोरा चेहरा,ओठांवरचं मिश्किल हसू,चष्म्याआडचे उत्साही,लुकलुकते निळे डोळे.
रस्टी तोच होता.अजूनही तसाच.'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय..इट इज यू अँड आय..!'त्यानेच एके ठिकाणी लिहिलं होतं ते आठवलं.
ओळख पटताच मी त्याच्याजवळ गेले.माझीही ओळख दिली.हातात हात मिळवला.
त्याच्या हातांचा गार स्पर्श हिमालयाच्या शिवालीक पर्वतराजींमधून वहात येणार्‍या झर्‍यासारखा नितळशांत.
"तुमची पहिली भेट लॅन्डोरमधे व्हावी असं मनापासून वाटत होतं.पण आत्ता इथे मुंबईमधे होतेय आणि इतक्या सहज ह्याचही अप्रुप वाटतय खूप."माझा आवाज किंचित कापत होता."पण मी लॅन्डोरला येणार आहे हे नक्की.कदाचित ह्याच मार्चमधे."
त्याने कुतूहलाने माझं बोलणं ऐकून घेतलं."नक्की या.भेटायला आवडेल तिथे.सीझनही फार छान असतो त्यावेळी"तो मी पुढे केलेल्या त्याच्या'द बुक ऑफ नेचर'वर ऑटोग्राफ देत म्हणाला.
मी आनंदाने मान डोलावली.मनात हसूनही घेतलं.ऋतूंच्या चांगल्या असण्या नसण्याशी मला काय देणं घेणं?हिमालयातला प्रत्येक ऋतू रस्किनचा हात धरुनच तर पाहून झाले आहेत.
त्याने ईमेलमधे सुचवल्याप्रमाणे मी त्याच्या अनुवादित केलेल्या कथांच्या प्रती आणल्या होत्या त्या सोपवल्या.त्याने आभार मानले.काही इतर बोलणंही झालं.त्याच्या भोवती आता हळूहळू इतर चाहत्यांची,क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवार्डच्या शॉर्टलिस्टेड लेखकांची,मेंबर्सची गर्दी वाढायला लागली.माणसांनी त्याला घेरून टाकलं.मी काढता पाय घेतला.मला तसाही आता आतल्या ऑडिटोरियममधे होणार्‍या कार्यक्रमामधे काही इंटरेस्ट राहिलेला नव्हता.रस्किन बॉन्डला भेटण्यासाठीच फक्त मी आले होते.
जिना उतरुन खाली आल्यावर आम्ही परत मागे वळून वर पाहिलं.
माणसांच्या जंगलात रस्टी बावरुन गेला होता.

Sunday, August 15, 2010

पीपली लाईव्ह

पीपली लाईव्ह पाहून ६३वा स्वातंत्र्यदिन'साजरा'केला.त्यातल्या ज्या प्रत्येक विनोदावर थिएटर हसत होतं त्या प्रत्येक विनोदानंतर मन जास्त जास्त खिन्न होत गेलं.खूप वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर सत्यजित रेंचा सद्गतीमधे तो पोट आणि पाठ एकत्र झालेला ओम पुरीचा शेतकरी..त्याचं ते मुकाट मरुन जाणे पाहिलं होतं.हादरुन जायला झालं होतं मनातून.
आज पीपली लाईव्ह बघताना त्या मरण्याचा तमाशा झालेला आपण पाहत आहोत इतकाच फरक जाणवून गेला.आणि हे होतच रहाणार अशा मनाच्या निर्लज्ज स्वीकारामुळे आपली हादरुन जाण्याची संवेदनशिलता सुद्धा संपली आहे हाही एक फरक!
बाकी शेतकरी अजूनही तसाच आहे.

Saturday, July 31, 2010

बातमी?

काल दुसरं काहीच महत्वाचं घडत नव्हतं देशात ज्याची बातमी व्हावी.दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सगळ्या चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज/विशेष बातमी/हेडलाईन काय तर डिम्पीने राहूलचं घर सोडलं.नक्की काय लायकीचे आहेत हे दोघे की त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सतत ऐकलच पाहिजे?All news channels are pathetic.

Sunday, July 25, 2010

वाचायच्या आधीच..

हिंदू हातात आलं आणि अगदी गार गार वाटलं. येताना टॅक्सीत पुरेसा प्रकाश मिळेना बाहेर काळे ढग दाटून आलेले म्हणून, तर मी अगदी खिडकीच्या बाहेर तिरकं काढून वाचायचा प्रयत्न करत होते आणि तशी जेमतेम दोन पाने वाचली मग मिटवून टाकलं. अशा पुस्तकांना रात्रच हवी वाचायला. निरव रात्र. बाहेर पावसाचा आवाज आणि गच्च काळोख. आपल्यापुरत्या प्रकाशाच्या चौकोनात आपल्या आवडणारच याची खात्री असणारं पुस्तक. फार कमी वेळा अशी पुस्तकं हातात येतात.
हिंदू प्रकाशित वगैरे झाली पण खरं तर का कोणास ठाऊक पण मला अजिबात घाई गडबडीने ती वाचायची उत्सुकता वाटत नव्हती. म्हणजे आहे मी नेमाडे किंवा कोसला म्हणूयात तर कोसलाप्रेमी गटातलीच तेव्हा कादंबरीबद्दल उत्सुकता जरुर होती. पण एक तर ती काही मी प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आगाऊ नोंदणी वगैरे केलेली नव्हती. त्याबद्दल रोज बातम्या वाचल्या जात होत्या की अमुक जणांनी नोंदवली वगैरे पण मी पडले अशा बाबतीत आळशी. मग ती प्रकाशित झाली तेव्हाही काही मी त्या समारंभाला गेले नाही. मग पार्ल्याच्या मॅजेस्टिकमधे डोकावले तर तिथल्या हिंदूच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती फक्त आगाऊ नोंदणीदारांसाठी आहेत वगैरे कळल्यावर मला वैताग. म्हटलं जाऊचदे. तरी वाटलं पुढे जवाहरमधे विचारावं. निघाले आणि पाऊस सुरु झाला जोरदार. कशाला हिंदूला भिजवा आता. बघू उद्या म्हणत मी तशीच घरी. बरं अजून कोणी काही झाली बुवा आमची वाचून. आवडलीय नाही आवडली काहीच बोलेना. अर्थात मला त्याने फरक पडणाराच नव्हता. मला ती आवडणारच हे मला माहित होत. एक तर मला पुस्तकं, सिनेमे वगैरेबाबत अगदी सिक्स्थ सेन असल्यासारखं आधी कळतच की आपल्याला हे आवडणार. हे नाही आवडणार. आणि हा अंदाज एरीली ९०% वेळा बरोबर ठरतो. मिथिला म्हणते की आता आवडणार म्हटलय ना म्हणून आवडतच. तर त्यात काही अर्थ नाही. १०% वेळा नाही आवडत त्याचं काय? एक तर आधीच वाचलेलं की या पुस्तकात पुरातन मोहन्जोदडो संस्कृतीतल्या उत्खननाची वगैरे थ्रिलिंग पार्श्वभूमी आणि नेमाडे लिहिणार म्हणजे पुरेसा विस्तृत पट घेऊन याची खात्रीच.
तर हिंदू काही त्यादिवशी हातात आली नाही. दुसर्‍या दिवसापासून मुंबईत धुआंधार पाऊस. काल म्हणजे शनिवारी दादरला आयडियल, मॅजेस्टिकवर धाड घालायचं ठरवलं पण पाऊस काही थांबला नाही. पण आज सकाळी प्रहार मधे प्रभा गणोरकरांनी हिंदूबद्दल लिहिलेलं वाचलं आणि ताडकन उठलेच. सही दिसतय आणि हे लगेच अगदी लगेच वाचण मस्ट आहे आणि आपण काय पाऊस, सवलत करतोय मूर्खासारखं असं म्हणत गेले रविवारची दुपार विसरुन दादरच्या शिवाजी मंदिर मॅजेस्टिकमधे. तिथे पुन्हा तेच. प्रती फक्त आगाऊ नोंदणीधारकांकरता. बुक केलय कां? म्हटलं नाही पण हवय आत्ताच. त्या काऊंटरमागच्याला काय वाटलं काय माहीत. तो तिथल्या मुलाला म्हणाला त्या काल सही करुन आलेल्या पंधरा प्रती आहेत त्यातली एक आण. आणि माझ्या हातात प्रत. अगदी नेमाडेंच्या सहीची वगैरे. मग मी असं एखादंच पुस्तक घेणं बरं नसतं म्हणत अजून तीन घेतली. त्यातलं एक अजित हरिसिंघानींचं बाईकवरचं बिर्‍हाड.सानियाचं अशी वेळ, मिलिंद बोकिलचं समुद्रापारचे समाज. सॉरी चार घेतली. तारा वनारसेंचं तिळा तिळा दार उघड. मग वाढलेल्या टॅरिफची वगैरे किरकोळ चिंता न करता टॅक्सी. पुस्तकांना असं बसमधून वगैरे नेणंही बरोबर नाही. मग टॅक्सीत बसल्या बसल्या पहिलं पान उघडलं.
प्रस्तावना-

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरुन जगण्याची समृद्ध अडगळ

सुरुवात-
कोण आहे?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तु कोण?
मी तु आहे, खंडेराव.
अंमळ चुळबुळात्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वतःलाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
ही तर मोठीच आफत आली आपल्यासारख्या माणसावर. हल्ली सांगायला गोष्टच तेव्हढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं. असं म्हणून मी वरच्या तंबूच्या कापडावरचे काळेपांढरे ठिपके पाहत पुन्हा झोपी जातो. पुन्हा दिसायला लागतो मी मोठ्या मेहनतीने तयार केलेला सप्तसिंधू भुप्रदेशाचा नकाशा. आकाशातून खूप उंचीवरुन अफगाणीस्तानातल्या शरयू नदीपासून राजस्थानातल्या सरस्वती नदीपर्यंतच्या या नव्या नकाशामुळेच माझं संशोधन सर्वचर्चित झालं.


आवडलं. आवडलं हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ. मला कळतं वाचायच्या आधीच बरोबर.

Wednesday, July 21, 2010

चीनमधून बेचैन

नाही.ही काही चीनचं राजकीय वगैरे विश्लेषण मनात ठेऊन केलेल्या प्रवासवर्णनाची सुरुवात नाही.
गेले जवळपास दोन महिने चीनमधे होते आणि तरीही असलं काहीही मी करणार नाहीये.इतक्यात :P
यावेळी तिकडे जाताना साईटसिईंग फारसं मनात नव्हतं.
एकतर माझ्यासोबत भटकत बसायला मोशायला वेळ असेलच असं सांगता येतं नव्हतं कारण ही माझी प्लेझर टूर असली तरी त्याची स्ट्रिक्टली बिझिनेस टूर होती.आणि भाषा येत नसताना एकटीने चीनमधे फिरणं,तेही तुम्ही ओन्ली व्हेज कॅटगरीमधे असताना तर निव्वळ अशक्यप्राय गोष्ट.तरीही चीनमधे एकंदरच चिक्कार भटकणं झालं.Unplanned.तिथे झालेली माझी मैत्रिण श्यू तिच्या पीचफार्मर आईवडिलांकडेही रहायला घेऊन गेली.अगदी छोट्याश्या त्या गावात रहाताना इतकं सुंदर वाटलं.पर्ल बकच्या कादंबरीतल्या साध्यासुध्या चिनी शेतकर्‍यांनाच अवतीभवती बघतेय असं अनेकदा वाटलं.शांघाय, बेजिंगने त्यांच्या आलिशान नखर्‍याने जितकं मला प्रभावित केलं नाही तितकं श्यूच्या त्या लिनहाय गावाने केलं.
यावेळी चीनमधे वेळ आहे तेव्हा मी माझी गेले 4-5 वर्षं अर्धवट लिहिली गेलेली कादंबरी नक्कीच पूर्ण करणार असं जाताना मारे मोशायला दहादा सांगितलं.अगदी वागवायला आणि वापरायला सुटसुटीत लेनोव्हो नेटबुकही त्यासाठी घेतलं.पण त्या कादंबरीची अगदी एकही ओळ लिहून झाली नाही.एकंदरीतच माझ्याबाबतीत प्लॅनिंग हा प्रकार काम करत नाही.म्हणजे टुडू लिस्ट्स वगैरे अगदी भारंभार रोज बनवणार.पण त्यापैकी प्रत्यक्षात दहा टक्केही उतरणार नाही.रोज उठून मोशायच्या अपार्टमेन्टबाहेरच्या त्या सुंदर गार्डनमधे मी अगदी नेटबुक घेऊन जाणार आणि मग गार्डनला लगटून वहाणार्‍या नदीकडे नाहीतर आजूबाजूला पळणार्‍या सफरचंदी गालांच्या चिनी बच्चेकंपनीकडे,तिथल्या जॉगिंगला आलेल्या पेन्सिल-स्लिम देहयष्टीच्या चिनी सुंदर्‍यांकडे आणि त्यांच्या त्यामानाने जरा यडचापच दिसणार्‍या चिनी जोडिदारांकडे पहात नुसतंच नेटबुकचा चार्ज संपवण्यात बराच काळ घालवणार.नाहीतर युबिसी कॅफेमधे बेजिंग हुटांग्स न्याहाळत नुसतीच तंद्री लावणार.असं अनेकदा झाल्यावर मी तो प्रकारच बंद केला.इथे असताना मोशायचे कान अक्षरशः किटवून टाकले होते अनेकदा की मला निवांत, निसर्गरम्य ठिकाणी, झिमझिमत्या पावसाला काचेतून पहात,हातात कॉफीचा कप घेत दिवसचे दिवस घालवण्याची संधी मिळू देत.बघ मग माझी कादंबरी कशी लग्गेच पूर्ण होईल.कप्पाळ.एक प्रकरणही पूर्ण केलं नाही.हा चायना नोट्स मात्र रेग्युलर काढल्या.आणि हजारांनी फोटो काढले.तिथून ब्लॉगसाईट अ‍ॅक्सेस होत नव्हती नाहीतर अगदी रोज एक चायना पोस्टकार्ड टाकलं असतं इथे इतकं सारं निरर्थक सुंदर जमा होत होतं जवळ.
इथे आलेय परत तर डोक्यावर पुन्हा धबाधबा लिहिण्याच्या प्रोफेशनल असाईन्मेन्ट्स कोसळायला लागल्यात.ज्यांच्या डेडलाईन नेहमीप्रमाणे गेल्याच आठवड्यात संपल्यात.मोशाय पुन्हा परदेशात गेला.आता नेहमीच रुटीन धावपळीचं चक्र चीड्चीड होण्याइतक्या सुरळीतपणे सुरु होईल.आता हातातला शिल्लक वेळही बघता बघता संपून जाईल.चिन्हं वार्षिकाचं काम सुरु होईल.रविवर्मा स्टोरीचा पुढचा भाग करायचा आहे.थोडक्यात काय तर ऑफिस, फ्री- लान्सिंगच्या चक्रात बाहेरचा सुंदर झिमझिमता पाऊसही बघण्याइतकी चैन परवडणारी नाहीये सध्या काही दिवस.
भटकून पोट मात्र कधीच भरत नाही उलट खिसे नको इतके रिकामे होतात हे नेहमीप्रमाणेच लगेच कळलं.इतका खर्च झालाय की खड्डा भरुन काढायला पुन्हा नको त्या असाईन्मेन्ट्स स्विकारल्या जाणार.पुन्हा भटकंतीचे प्लॅन्स करायचे तर त्यासाठी पुरेसे पैसे जमवणं भागच आहे हे क्रेडीट कार्डाचे चेक्स भरताना नेहमीसारंखच डोळ्यापुढे चमकून गेलं.नैराश्याच्या झटक्यात ठरवूनही टाकलं आता कुठेही जाणार नाही पण अमृताचा फोन आल्यावर ऑगस्टमधे लेहलदाख करायचे प्लॅन्स सुरु झालेही.बिच्चारी कादंबरी पुन्हा एकदा नेटबुकमधेच बंदिस्त.पुन्हा आता जेव्हा मी अगदी निवांतपणे,एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तासंतास हातात कॉफीचा कप घेऊन लिहिण्याची चैन करायला जाईन तेव्हा होईलच म्हणा ती पूर्ण.नाहीच तर मार्गारेट मिशेल किंवा गेला बाजार नेमाडेंनंतर कादंबरी लिहायला घेतल्या गेलेल्या सर्वाधिक वेळेची नोंद माझ्या नावावर होईल हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------P.S.
जावेद अख्तर खूप वगैरे काही आवडत नाही.पण ट्विटरवर त्याने लिहिलेलं बरेचदा आवडतं:-
वापस जो चाहो जाना तो जा सकते हो
मगर
अब इतनी दूर आ गयें हम;देखो,अब नही

Thursday, May 06, 2010

Kasab got his verdict!

अजमल कसाबला मरेपर्यंत फाशी.
भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो! तुकाराम ओबळेंच्या आत्म्याला आता थोडी स्वस्थता लाभेल.
पण अजमल ही फक्त सापाची शेपटी आहे. दहशतवादाचा आख्खा विषारी अजगर पाकिस्तानात सुस्तावून पडलेला आहे त्याला कधी ठेचणार? मास्टरमाईन्ड मिळेपर्यंत कसाबाच्या फाशीचा पूर्ण आनंद लुटता येणार नाही.
अर्थात तसंही याच भारतीय न्यायसंस्थेने फाशीची शिक्षा सुनावलेले ३८ जण अजून रांगेत आहेत त्यानंतर कसाबचा नंबर लागणार. म्हणजे कधी अजून पंचवीस वर्षांनी कसाबला फासाच्या दोराला लटकलेलं बघता येणार? तोपर्यंत सीएसटी स्टेशनात मारले गेलेल्या त्या सार्‍या निरपराध आत्म्यांनी काय करायचं? नुसतंच तळमळायच?

तरीही पुन्हा भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो!
उज्वल निकम आणि जज टहलियानींचे आभार.

Saturday, May 01, 2010

'A Pack Of Lies'- गौरीच्या मुलीचं पुस्तक

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.

उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.

उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.

गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले.
मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.

या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.

आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.

स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.

आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!

उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?

Thursday, March 25, 2010

..

अभिजीत देसाई गेला याबातमीवर विश्वास ठेऊ म्हणता ठेवताच येत नाहीये. नुकतंच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा कॉल आहे बघीतलं की मुद्दाम तो मिस करायचे आणि उलटा त्याला कॉल लावायचे.कारण एकच त्याची ’पुकारता चला हुं मैं..’ ची कॉलर ट्यून. त्याला ते माहित होतं त्यामुळे तो ती पूर्ण वाजू दिल्याशिवाय कॉल उचलायचा नाही. ते गाणं त्याच्या सेलवर एकलं की अभिजीत देसाईचं सगळं व्यक्तिमत्व समोर उभं रहायचं. त्याच्या फ़िल्म्सच्या, गाण्यांच्या आवडींसकट.तसाच होता तो अगदी. अभिजीतच्या बाबतीत ’होता..’ हे शब्द लिहिताना इतकं अस्वस्थ वाटतय.

अभिजीतच्या लोकप्रभामधल्या लिखाणाची मी प्रचंड चाहती होते. मला सिक्सटिजचं व्यसन लागायला तुझे लेख कारणीभुत असं सांगितलं की तो खुश व्हायचा.आणि ते खरंच होतं. जुन्या फ़िल्म्स त्याचं ऑब्सेशन होतं. रेग्युलर लिही गं रिलॅक्ससाठी म्हणून तो खूप कळकळीने सारखा सांगायचा. पण मला नियमित लिहायला जमायचं नाही. पण अमुक एक विषयावर लिहायचं डोक्यात आहे असं म्हटलं की त्याचा आवर्जून आठवण करुन द्यायला, लवकर लिही म्हणायला, काही संदर्भ हवे आहेत का तुला ते विचारायला फोन येणारच येणार.
त्याच्याकडचा संदर्भ अचाट होता. सिक्स्टीजच्या काळाचं त्याचं फ़ोटोकलेक्शन अफ़लातून होतं. ते त्याचं स्वत:च वैयक्तिक कलेक्शन होतं. कॉलेजात असल्यापासून मी हे फोटो जमवतोय सांगायचा. आणि अगदी अभिमानाने तो ते फोटो दाखवायचा. त्याच्याकडच्या फोटोंमुळे लेखाला शोभा यायची. कमालीची माहिती होती त्याच्याकडे त्या एकेक फोटोंसंदर्भात. एकदा निट बसून ऐकायच सगळं असं कितीदा म्हणाले त्याला.

भानूजींच्या लेखाबद्दल नेहमीप्रमाणेच मी देते रे, नक्की उद्या असा एक हवेत वायदा केल्यावर बघ हं पुन्हा फोन नाही करणार यासाठी तुला असं धमकावून त्याने फोन डिसकनेक्ट केला होता.आता पुन्हा त्याचा कॉल मिस करायची संधीच हा माणूस मला देणार नाहीये. इतकं हॉरिबल वाटतय अशा विचारांनी. इतकं भरभराटीला आलेलं करिअर, तो लिहिणार असलेली पुस्तकं.. सगळच अर्धवट. आणि त्याची गोड बायको आणि मुलगी.. बाप रे. त्यांचा तर विचारच करवत नाहीये. असं कोणी इतक्या सहज निघून जावू शकतं कायमचं?
अभिजीत.. इतक्या गप्पा अर्धवट राहिल्यात आपल्याही. आमच्यासारख्या तुझ्या इतक्या चाहत्यांना सांगण्यासारखं तुझ्याकडे इतकं सारं होतं ते न सांगताच असा अर्ध्यात निघून गेलास..
वी विल मिस यू ट्रिमेन्डसली!

Wednesday, March 10, 2010

मुंबई मोमेन्ट्स..

शामियानाच्या फ़िल्मस्क्रीनिंगला खूप महिन्यांनंतर गेले.तेही यावेळी स्क्रीनिंग इरॉस प्रीव्ह्यू थिएटरला आहे असं सायरस म्हणाला म्हणूनच केवळ.दरवेळी त्यांचा व्हेन्यू असतो जाझ बाय द बे.ते जायला खूप ऑड पडतं.शिवाय तिथून रात्री ९ वाजता चर्चगेटला जाणं म्हणजे एक दिव्य असतं.एक तर टॅक्सी मिळता मिळत नाही.एरवी एनसिपिएला किंवा यशवंतरावला काही असलं की कितीही उशीर झाला तरी सोबत कोणी न कोणी असतं तरी.पण जाझला मुद्दाम उठून नवोदितांच्या डॉक्युमेन्टरीज पाह्यला यायला कोणाला फ़ारसा उत्साह नसतो.इतक्या उशिरापर्यन्त थांबून तर नाहीच नाही.मग एकटीने चालत येणंही इतक्या रात्रीचं त्या एरियातून शक्य होत नाही.सायरस किंवा त्याचे कोणी मित्र सोडायला येतातही पण म्हणजे त्यांच्या गप्पा आणि इतर आवरुन निघेपर्यन्त आणखी तासभर उशिर.
व्हेन्यू सोयीचा नाही या एका कारणासाठी मी बरीचशी स्क्रीनिंग्ज बुडवते यावरुन सायरस आणि इतर कट्टर शामियानावाले वैतागतात पण तरी निष्ठेने माहिती कळवत रहातातच.काही महिन्यांपूर्वी बान्द्र्याला झेन्जीमधे त्यांना स्क्रीनिंगला जागा मिळाली होती पण यांची जेमतेम दोन स्क्रीनिंग्ज झाली आणि ते रेस्टॉरन्टच बंद पडलं.सबर्ब्जवाल्यांना कलेची काही चाड नाही वगैरे टिपिकल साऊथबॉम्बे रिमार्क्स मारायला सायरस मोकळा.पण त्याचा वैताग जायझ होता.बिचारा इतका उत्साहाने,कळकळीने शॉर्टफ़िल्म्स दाखवायला धडपडतो आणि आमच्यासारखे आळशी टॅक्सी मिळत नाही उशिरा असल्या कारणांनी जायचं टाळतो.
अर्थात आम्हा सबर्ब्जवाल्यांसाठी आता पृथ्वीहाऊस किंवा सेन्ट ऍन्ड्र्य़ूज,भवन्स वगैरे अनेक जवळच्या ठिकाणीही मधून मधून इतर कोणी शॉर्टफ़िल्म्स दाखवत असतात.पण सायरसला हे कोण सांगणार?
सायरस माझा जुना मित्र.शामियाना शॉर्टफ़िल्म क्लब त्याचाच आहे आणि शामियानाशॉर्टस या जगभरातल्या डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सची खबरबात सांगणा-या न्यूजजर्नलचा तो एडिटरही आहे.शॉर्टफ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीजचं आमचं दोघांचं वेड सारखंच.पण मला त्या इतरांनी बनवलेल्या पाह्यलाच फक्त आवडतात(तेही जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या जागीच जाऊन) आणि त्याला मात्र आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स इतरांना आवर्जून दाखवण्याचा पहिल्यापासून शौकच आहे.दोन वर्षांपूर्वी त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर त्याने अशाच हौसेने जमा करुन ठेवलेल्या देशविदेशांमधील डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सच्या डिव्हिडिजचं एक स्क्रीनिंग असं सहज आपल्या सगळ्या दोस्तमंडळींसाठी अगदी भाड्याने प्रोजेक्टर वगैरे आणून केलं होतं.मस्त पार्टी झाली होती ती.ते स्क्रीनिंग प्रचंड पॉप्युलर झालं.इतकं की त्यातून शामियाना फ़िल्म क्लब उभा राहिला.
एक्स्क्लुजिवली शॉर्टफ़िल्म्स दाखवणारा हा मुंबईतला एकमेव क्लब.आता शामियाना पुणे,दिल्ली,अहमदाबाद,बंगलोर वगैरे शहरांतही पसरला आहे.शॉर्ट फ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीज बनवण्याचं प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने घेणा-या यंगस्टर्सना स्क्रीनिंगसाठी प्लॅटफ़ॉर्म मिळण्याची खूप मारामार असते.फ़िल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेन्टरीजही जिथे आजकाल कोणी दाखवायला उत्सुक नसतात तिथे या बिचा-यांना कोण विचारणार!बर सगळ्यांनाच काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधे,फ़ेस्टीवल्सना आपल्या फ़िल्म्स पाठवणं जमतं किंवा परवडतं असं नाही.सायरस आवर्जुन या फ़िल्म्स दाखवतो,सेशन इन्टरऍक्टिव करण्याकरता फ़िल्ममेकर्सनाही स्क्रीनिंगच्या वेळी बोलावतो,त्यांना त्यांच्या फ़िल्म्सविषयी बोलायला लावतो,प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सांगतो.यंग शॉर्टफ़िल्म मेकर्सना खूप छान एक्स्पोजर मिळतं शामियाना मुळे.
यावेळी इरॉसला गेले तर धक्काच बसला.दुस-या मजल्यावरचं प्रीव्ह्यू थिएटर खचाखच भरलं होतं.अगदी दोन वर्षांपूर्वी जेमतेम पंधरा डोकी असायची.त्यातली दहा केसी,सोफ़ाया किंवा झेवियर्सच्या फ़िल्ममेकिंग किंवा मासमिडिया शिकणा-या मुलांचीच असायची.कधी कधी आजूबाजूला रहाणा-या काही श्रीमंत म्हाता-या पारशी बायका त्यांचा लवाजमा घेऊन यायच्या,मोठ्या आवाजात बडबड करत अर्धा तास बसायच्या मग हे काही इन्टरेस्टींग दिसत नाही असं म्हणत निघून जायच्या.
यावेळी इतक्या महिन्यांनी गेले त्याचं अक्षरश: चीज झालं.ज्या पाच फ़िल्म्स पाहिल्या त्या केवळ आणि केवळ अप्रतिम होत्या.विशेष म्हणजे या सगळ्या फ़िल्म्स मुलींनी बनवलेल्या होत्या.
पहिली शॉर्ट फ़िल्म’लाल जुतो’श्वेता मर्चंट या कोलकात्याच्या सत्यजित रे फ़िल्म इन्स्टीट्युटमधून फ़िल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीने बनवली होती.कमलकुमार मजुमदार या बंगाली कथालेखकाच्या अतिशय साध्या,सुंदर कथेवर आधारीत ही फ़िल्म होती.अ‍ॅडोलसन्ट प्रेमाचे फ़ार सुरेख चित्रण बंगाली मध्यमवर्गीय घराच्या वातावरणात या फ़िल्ममधून दिसले.२००७ सालासाठीचे राष्ट्रीय पारितोषिक या फ़िल्मला मिळाले आहे.
बाकी दोन फ़िल्म्स खूप छोट्या पण तितक्याच परिणामकारक होत्या.एल.व्ही.प्रसाद फ़िल्म मेकिंग इन्स्टीट्युट्मधल्या एका मुलीने बनवलेली’ओरे ओरु नाल’ओन्ली वन डे)नावाची नऊ मिनिटांची फ़िल्म आणि प्राग मधल्या फ़िल्म इन्स्टीट्युटमधून शिकलेल्या किम जोगतियानी या मुंबईकर मुलीची एक साडेचार मिनिटांची फ़िल्म’बॅक टु स्क्वेअर वन’.
चौथी शॉर्ट फ़िल्म इटालियन होती.’रिट्रीटींग’ नावाची.या फ़िल्मलाही खूप आंतराष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत.दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर एक इटालियन मुलगी आणि त्यांच्या घरात लपून राहिलेला एक अमेरिकन सैनिक यांच्यात निर्माण झालेले कोवळे भावबंध खूप सुरेख दाखवले होते.ही फ़िल्मही बारा मिनिटांचीच होती.
इतक्या छोट्या कालावधीत एक कथा इतक्या परिणामकारकरित्या फ़ुलवणे किती कौशल्याचे काम असते!
डॉक्युमेन्टरी एकच होती.तिचा विषय होता वॉर विडोज.केसी कॉलेजमधे शिकणार्‍या सहा मुलींनी सातार्‍याला जाऊन ह्या डॉक्युमेन्टरीचे चित्रीकरण केले होते.साताराच का तर संपूर्ण महाराष्ट्रात सैन्यात भरती होणार्‍यांचे प्रमाण सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि तिथे सैनिक प्रशिक्षण संस्थाही आहे.सरकारने जाहीर केलेली मदत देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांपर्यंत न पोचणे,त्यांचे शिक्षण,नोकरी याबाबतीतली जबाबदारी घेण्याची शासनाची उदासिनता हे सर्व या डॉक्युमेन्टरीमधून नीट सामोरे आले आणि मन विषण्ण झाले.या पाचही फ़िल्म्स बनवणा-या मुलीही स्क्रीनिंगच्या वेळी आल्या होत्या.त्यांच्यासोबतचे इंटरऍक्शन सेशनही इन्टरेस्टींग होते.यानिमित्ताने जगात बनणा-या शॉर्ट फ़िल्म्सपैकी ६०% फ़िल्म्स स्त्रिया बनवतात ही माहितीही मिळाली.
यानिमित्ताने पुन्हा एकदा शामियानाशी नातं जुळलं याचा मनापासून आनंद वाटला.वे टु गो सायरस!

Monday, March 08, 2010

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या, किंवा त्याकाळात पडावे लागलेल्या काही महिलांनी मतदानाचा हक्क, समान पगाराच्या, कामाच्या ठिकाणी किमान सोयीच्या मुळ मागणीपासून सुरु केलेला एक लढा बघता बघता स्त्रीमुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे चालवला गेला.
चळवळ सुरु झाली ती वेळ, तो काळच असा होता की स्त्रीमुक्तीचा शारिरीक आणि मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची नितांत गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगनला भरलेल्या एका आंतराराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात क्लारा झेटकिन्स या जर्मनीतल्या स्त्रीवादी कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करु शकतील अशी कल्पना पहिल्यांदा मांडली. एकत्रित जागतिक महिला दिनाच्या या कल्पनेला सतरा देशांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शंभर महिलांनी त्यादिवशी जोरदार पाठिंबा देत उचलून धरले. त्या शंभर महिलांमधे जगात पहिल्यांदाच संसदेमधे निवडून येण्याचा मान मिळालेल्या तीन फिनिश संसद सदस्य महिला होत्या आणि इतर महिला कामगारांच्या प्रतिनिधी होत्या.
१९१० सालच्या महिलामेळाव्यात 'आंतराष्ट्रीय महिलादिनाची' कल्पना पहिल्यांदा मांडली गेली याअर्थाने आजचा २०१० सालातला महिला दिन शंभरावा होऊ शकतो. अर्थात याचे बीज याआधी दोन वर्षे म्हणजे १९०८ साली न्यूयॉर्क शहरामधे १५०० कामगार महिलांनी जो संतप्त मोर्चा काढला होता त्याचवेळी पडले होते तेव्हा शंभरावा महिला दिन २००८सालीच होऊन गेला असेही काही जण म्हणतात. तर काहीजण म्हणतात जरी कोपनहेगनला महिला दिनाचा संकल्प सोडला असला तरी तो अधिकृतरित्या साजरा झाला पुढच्या वर्षी म्हणजे १९११ साली ऑस्ट्रिया, जर्मनी येथे तब्बल दोन लाख महिलांच्या उपस्थितीत. तेव्हा शंभरावा वाढदिवस २०११ साली.
शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला दिन नक्की कधी या वादाला अजिबात महत्त्व नाही कारण मानवमुक्तीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात अशी एक दोन इकडची तिकडची वर्षे खरोखरच क्षुल्लक ठरतात. खरे महत्त्व आहे ते स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल नक्की कशी होत गेली ते जाणून घेण्याला.
स्त्रीवादी चळवळींची सुरुवात मूलतः झाली 'लैंगिक समानते'च्या विचारांमधून आणि ती व्यापक होत 'स्त्रीहक्का'च्या मागणीपर्यंत येऊन स्थिरावली. या चळवळींच्या वाटचालीत असंख्य वळणं, खाचखळगे, उंचवटे येत राहिले. त्यांना विरोध तर कायमच होत राहिला. 'फेमिनिझम' हा मुळचा फ्रेन्च शब्द १८९५ साली यूकेच्या 'डेली न्यूज' मधून पहिल्यांदा इंग्लिश भाषिकांच्या नजरेस पडला तेव्हापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. आणि ती सुद्धा क्वीन व्हिक्टोरियाकडून " mad, wicked folly of 'Woman's Rights" अशा शब्दांमधे!
मात्र या आधी बरीच वर्षे, अगदी अठराव्या शतकातच एका नव्या स्त्रीवादी विचारसरणीचा उदय झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट नावाच्या एका तत्वज्ञ विचारसरणीच्या लेखिकेने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकाद्वारे. फेमिनिस्ट विचारधारा रुजवणारी ही पहिली लेखिका. मेरीने आपल्या पुस्तकातून स्त्रियांची जडणघडण आणि शिक्षण लहानपणापासूनच पुरुषी दृष्टीकोनातून, त्यांना काय आवडेल या विचारांतूनच केले जात असल्याने स्त्रियांची स्वतःबद्दलची अपेक्षाच मर्यादित रहाते हा विचार मांडला तो त्याकाळाच्या मानाने धाडसाचा होता आणि त्याबद्दल तिला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. मेरीच्या मते समाजातल्या भेदभावाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच जबाबदार असतात, पुरुषावर वर्चस्व गाजवण्याची प्रचंड ताकद स्त्रीमधे असूनही ती आपल्या शक्तीचा वापर करत नाही असे तिचे मत होते. अपुर्‍या आणि चुकीच्या शिक्षणामुळे बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात हा विचारही तिच्या पुस्तकात होता. तिने मांडलेल्या काही प्रश्नांना आजही समाधानकारक उत्तरे मिळू शकत नाहीत.
एकोणिसाव्या शतकात जेन ऑस्टिन, एलिझाबेथ गॅस्केल, ब्रॉन्टे भगिनी, लुइझा मे अल्कॉट सारख्या लेखिका स्त्रियांचे प्रश्न, त्यांची दु:ख, निराशा याबरोबरच सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखाही आपल्या कादंबर्‍यांमधून मांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आदर्श स्त्रीच्या 'व्हिक्टोरियन इमेज'मधे स्त्रियांना गुदमरवायला कारणीभूत ठरलेल्या 'द एंजल इन द हाऊस' सारख्या पुस्तकांच्या आकर्षणातून स्त्रियांना बाहेर काढणे फार कठीण होते. १८४३ साली मरियन रीड नावाच्या स्कॉटिश लेखिकेने A plea for women मधून पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्याच्या अन्यायाबद्दल लिहिले आणि आपल्याला काही सुप्त अधिकार आहेत ज्यांचा वापरच आपण अजून केला नाही हा विचार जोमाने काही जागरुक स्त्रियांच्या मनात पसरला. याच सुमारास आपल्या वैवाहिक जीवनातल्या अत्याचारांना बळी जायचे नाकारत घराबाहेर पडलेल्या कॅरोलिन नॉर्टन या ब्रिटिश महिलेला स्त्रियांना कायद्याचे पाठबळच नसल्याची जाणीव विदारकपणे झाली होती. पण तिने आवाज उठवला होता आणि अगदी राणी व्हिक्टोरियापर्यंत जाउन दाद मागितली होती. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना किमान कायद्याचे संरक्षण तरी असावे हा विचार ब्रिटनमधे सुशिक्षितांमधे चर्चेला आला.
अर्थातच स्त्रियांचे हे प्रश्न सुटे सुटे चर्चेला येत होते आणि स्त्रियांचा परस्परांना पाठिंबा तर अजिबातच नव्हता. उलट अशा घरफोड्या आणि विद्रोही विचारधारेच्या स्त्रियांपासून आपण किती वेगळ्या आहोत हे दाखविण्याची चढाओढच समाजातल्या प्रतिष्ठित महिलांमधे होती. एखादीच फ्लोरेन्स नाईटिंगेल त्या काळात होती जिला आपल्यातल्या क्षमतेची जाणीव होती आणि त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत तिने आपल्याला हवी तीच करिअर निवडण्याचे धाडस तेव्हा दाखवले.
मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव हळूहळू होत होता आणि स्त्रियांचे वैवाहिक अधिकार, मालमत्तेवरचा अधिकार, कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवज उठवण्याचे धाडस अशा विषयांना तोड फुटत होते. बार्बारा लिग स्मिथने ब्रिटनमधे स्त्रियांना एकत्र बोलावून, चर्चा करण्याचे, सभा घेण्याचे काम सुरु केले. त्यांच्या सभा लॅन्गहॅम पॅलेसमधे व्हायच्या आणि म्हणून या 'लेडिज ऑफ द लॅन्गहॅम पॅलेस'. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८५५ मधे विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकारांसाठी कमिटी नेमली गेली. स्त्रिया निदान स्वतःचे प्रश्न मांडायला एकत्र जमायला लागल्या होत्या. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल होते.
स्त्रीवादी चळवळींचा हा सुरुवातीचा इतिहास जेव्हा स्त्रियांचे प्रयत्न एकाकी, अपुरे होते. पण त्यातूनच पुढे शैक्षणिक क्षेत्रात, राजकिय, सामाजिक क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढला. वाढतच गेला.
स्त्रीवादी चळवळींना नंतरच्या काळातही काही अतिरेकी, हटवादी स्त्रीकार्यकर्त्यांमुळे असेल किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या पक्क्या पारंपरिक पुरस्कर्त्यांच्या कडव्या भुमिकेतून आलेल्या विरोधामुळे असेल.. पण एक उपहासात्मक स्वरुप लाभत गेले. आजही त्यांची चेष्टा उडवणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. परंतु स्त्रियांनी शिकावे, त्यांचे राहणीमान उंचावावे, स्वत्व-सन्मानाची ओळख त्यांना व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्या सबल व्हाव्यात, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, मतदानाचा अधिकार मिळावा, समाजात एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून तळमळीने ज्यांनी ज्यांनी काम केले होते त्यांचे जर स्मरण आज प्रत्येक स्त्रीने (आणि स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा) केले नाही तर तो मानवी कृतघ्नपणा ठरेल.
'संयुक्ता' तर्फे जागतिक महिला दिनाचे स्मरण याच कृतज्ञ भावनेतून ठेवले जात आहे. स्त्रीवादी चळवळींचा इतिहास, त्यातले महत्वाचे टप्पे,स्त्रीवादी चळवळींचे कार्यकर्ते या सार्‍यांबद्दल 'संयुक्ताच्या' व्यासपीठावरुन आपण जाणून घेऊया.
'फेमिनिस्ट' चळवळीला ज्यांचा हातभार लागला त्या सार्‍याच कार्यकर्त्यांची नोंद इतिहासही ठेवू शकला नाही. काही महत्वाची नावे मात्र कधीही विस्मृतीत जाऊ नयेत-कारण काल 'त्या' होत्या म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत.

एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन (१८१५ ते १९०२)- पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना हिने केली.
ग्रेस ग्रीनवूड (१८२३ ते १९०४)- पहिली महिला वार्ताहार.
मरियन हाईनिश( १८३९-१९३६)- स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला.
केट शेफर्ड (१८४७-१९३४)- स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून या न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला गेला. १८९३ साली तिथे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले.
एमिलिन पॅन्खर्स्ट (१८५८-१९२८)- ब्रिटनमधे हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली.
बिबी खानुम अस्तराबादी ( १८५९-१९२१)- इराणियन लेखिका. स्त्रीवादी चळवळीची बीजे इराणमधे रुजवण्याचे कार्य हिच्या हातून सुरु झाले.
इडा बी. वेल्स (१८६२-१९३१)- अमेरिकेत स्त्रियांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून लढा देणार्‍या महिलांमधे पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला म्हणून हिचे नाव महत्वाचे ठरते.
शिरीन इबादी(१९४७)- स्त्रिया आणि मुले यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हिने उभारलेली चळवळ फार महत्वाची ठरते. स्त्रीवादी चळवलींमधे नोबेल शांती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला.
कॅरोलिन एगान- मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची पहिली पुरस्कर्ती.
एमिली हॉवर्ड स्टोवे - व्यावसायिक वैद्यकिय संघटनांमधे स्त्रियांना सहभागी करुन घेतले जावे यासाठी प्रयत्न. कॅनडामधे स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ.
अन्सार बर्नी (१९५६)- पाकिस्तानमधे स्त्रीवादी चळवळीचे विचार पसरवण्यासाठीचे प्रयत्न जाहिररित्या सुरु करण्याचे धाडस हिने प्रथम दाखवले.

इराणियन-कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई, इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान, केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत. याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका, कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले. स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते.

काही भारतीय नावे ज्यांनी काही ना काही प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व माजी आणि भावी कार्यकर्त्यांना समर्पित करुया.

Monday, March 01, 2010

रेल अफ़ेअर

खूप वर्षांनी सलग आणि मोठा प्रवास ट्रेनने करण्याची संधी आली.नाहीतर'वेळ वाचतो'या एका अपरिहार्य कारणामुळे दरवेळी फ्लाईटचाच पर्याय माझ्याकडून स्विकारला जातो.तरी ट्रेनने जाणार म्हटल्यावर-२०/२२ तासांचा प्रवास..अगं किती बोर होशील?आणि किती वेळ फुकट जाणार प्रवासात.शिवाय ट्रेन पोचणारही अवेळी पहाटे.खूप त्रासाचं आहे टॅक्सीने शहरात जाणं..मिळालेले एक नाही सतरा सल्ले आणि टीका चक्क कानाआड केल्या.
मला हे सगळं माहित होत आणि कबूलही होत.पण मला ट्रेननेच जायच होतं.एकतर यावेळी खरच मला एरवी असते तशी कमी वेळेची कटकट डोक्याशी नव्हती,वाचायच्या पुस्तकांचा बॅकलॉग खूप राहिला होता,काही कामाच्या नोट्स काढायच्या होत्या,काही महत्वाच्या इश्यूजवर शांतपणे विचार करण्याइतका निवांत वेळ हवासा वाटत होता आणि हे सगळं फक्त ट्रेनमधेच एकट्याने प्रवास करत असतानाच शक्य झाल असतं याची खात्री होती.
आणि मग खरंच ट्रेन अंगात अगदी भिनून गेली.प्रवास दोन रात्रींचा होता.सेकंड एसीचा डबा स्वच्छ,शांत होता.समोर एक जमशेदपूरला उतरणार असलेलं छोटं कुटूंब काही'नॉर्मल'चौकशा सोडल्या तर फारसं नाकखुपसं नव्हतं.त्यांची आपापसातली मैथिली भाषा कानाला खूप गोड वाटत होती.दोन लहान मुलं पत्ते,उनो खेळायची,चित्र काढायची,थोडं भांडायची आणि उरलेला वेळ त्यांच्या बाबाच्या लॅपटॉपवर सिनेमा बघायची.त्यांची आई त्यांना सारखी मधून्मधून खायला द्यायची.इतर वेळी झोपायची.राहिलेली सांसरिक झोप पूर्ण करायला तिलाही ट्रेनइतकी निवांत जागा मिळाली नसावी.नवरा रिडर्स डायजेस्ट वाचायचा आणि सारखा बाजूच्या एका मोठ्ठ्या प्लास्टिकच्या पिशवीतल्या छोट्या,चकचकीत पाकिटांमधला पानमसाला खात तंद्री लावून बसायचा.
मी अगदी सुखाने पुस्तकं वाचली,गाणी ऐकली,थोडं लिहिलं आणि बाकी अख्खा वेळ नुसतंच खिडकीबाहेर बघत,प्रत्येक थांबणार्‍या स्टेशनवरची खास संस्कृती बघत निवांत मग्न राहिले.धावणार्‍या रुळांकडे बघत राहिलं की मनातले सगळे इकडे तिकडे विस्कटून राहिलेले विचार कसे छान ओळीत मनात आपोआप लय धरतात.
-------------------------------------------------------------------------------
ट्रेन पहाटे पाचच्या सुमारास पोचणार होती.समोरचं कुटूंब अडीच वाजता उतरुन गेल्यावर मला झोपच आली नव्हती.खिडकीतून बाहेरचा मिट्ट अंधार आणि त्यात मिसळून गेलेलं काचेतलं माझच प्रतिबिंब पहात मी कधीपासूनच आवरुन बसले होते.डोळ्यांवर अर्धवट झोप होती आणि अंगात गेल्या दोन दिवसांच्या ट्रेनच्या प्रवासाची गुंगी शीण धरुन होती.मधेच कधीतरी डुलकी लागली असणार बहुतेक.एकदम दचकून जाग आली तेव्हा मंद हिसका देत ट्रेन मंद गतीने पुन्हा लय पकडत होती.आता डुलकी लागली तर तिचे गाढ झोपेत रुपांतर होणार या भितीने थोड्यावेळाने मी उठून दरवाजात जाऊन उभी राहिले.
मधे कुठेही उंचवट्याचा अडथळा नसलेला पश्चिम बंगालचा दाट,काळसर हिरव्या रंगातला सलग मोकळा माळरानासारखा प्रदेश,छोटीशी घरे,मधे चौकोनी,लंबगोल तलावांचे चमकते आरसे आणि बाकी क्षितिजापर्यंत फक्त उंच,लवलवत्या पाणगवताच्या टोकावरच्या शुभ्रसफेद काशफुलांच्या झुबक्यांचा समुद्र.पहाटेच्या अस्प्ष्ट अंधार-उजेडात वाहत्या वार्‍याच्या झुळकांवर लाटालाटांनी लहरत असणारा..
कुठे पाहिलं आहे मी हे या आधी?मनातली काही रिळं उलगडली.
[माझ्या मनात सिनेमाच्या पडद्यावरच्या काही दृष्यांची रिळं अगदी खोलवर रुतून बसलेली असतात.वेळी अवेळी ही रिळं नजरेसमोर प्रोजेक्ट होत रहातात.कोणतही निमित्त, कोणताही ऋतू त्यासाठी पुरेसा असतो.मला त्यात काही नवल वाटत नाही.आपल्या फिल्मी फॅसिनेशनचा हा एक अपरिहार्य भाग हे मी गृहित धरलेलं आहे.या रिळांतली बहुसंख्य दृष्य ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट सिनेमांमधलीच आहेत,काही इस्टमन कलर्ड आहेत,काही नुसतेच आवाज आहेत,काही ओझरते क्लोज अप्स आहेत,काही ठळक लॅन्डस्केप्स आहेत..]
वार्‍याच्या झोतावर डुलणार्‍या या पांढर्‍याशुभ्र काशफुलांचा पसारा..त्यातून दोन मुलं धावत येत आहेत.खांबाला कान लावून क्षितिजापलीकडून येणार्‍या आगगाडीचा कानोसा घेणारी त्यातली ती सावळी,कृश, टपोर्‍या डोळ्यांची मुलगी आणि तिच्याकडे कुतुहलाने पहाणारा,कपाळावर कागदी चांदीचा मुकुट बांधलेला तो तिचा मस्तीखोर धाकटा भाऊ!मग कधीतरी निळ्या आकाशात काळ्या धुराचा लांबलचक पट्टा उमटवत एक ट्रेन धडधडत येते.वाफेच्या इंजिनाची शिट्टी मोकळ्या आसमंतात घुमते.ती दोघे त्या काशफुलांच्या समुद्रातून वाट काढत जीव खाऊन धावत जेमतेम रेल्वेट्रॅकजवळ पोचतात तोपर्यंत क्षितिजाच्या पार पुन्हा दिसेनाशीही होते.धुराचा पट्टा आणि एक लांबलचक शिट्टी मागे सोडत.
नजरेसमोरुन ते दृष्य इतकं स्पष्ट सरकत गेलं..वाटलं आत्ता त्याच ट्रेनच्या दरवाजात मी उभी आहे कां?स्टेशन जवळ आलं आणि काशफुले दिसेनाशी झाली.माझ्या डोळ्यांसमोरुन उलगडत गेलेल्या त्या दृष्याची रिळंही संपली.
उंच लवलवत्या गवताच्या टोकावरच्या काशफुलांच्या पसार्‍यामधून मान वर करुन ट्रेनकडे अचंबित नजरेने पहाणारा तो मुलगा.. अप्पू त्याचं नाव.त्याच्यामागून धावत आलेल्या त्याच्या दिदीला,तिचं नाव दुर्गा;मात्र ती ट्रेन दिसलीच नव्हती.तिच्या आयुष्याचा पुढचा खंडित प्रवास सूचित करणारे रेंच्या पाथेर पांचालीतले हे अविस्मरणीय दृष्य.अनेकांनी अनेक प्रकारे पुढच्या काळात इंटरप्रिट केलेलं.जिथे ते चित्रित झालं त्या पश्चिम बंगालमधल्याच एका काशफुलांच्या माळरानावरुन माझी ट्रेन जात असताना या अंधार-उजेडाच्या ट्वायलाईटमधे मला ट्रेनमधून जाताना समोर काशफुले होती म्हणून पाथेर पांचालीतलं ते दृष्य आठवलं.पण समजा धुआंधार पाऊस असता तर ट्रेनमधल्या मला इजाजत आठवला असता.
एका अंधारुन आलेल्या दिवशी पावसाचा दाट पडदा बाजूला सारत ट्रेनमधून उतरणारा आणि मग वेटिंगरुममधे दिवसभर बसून एकेकाळच्या पत्नीसोबत आयुष्यातल्या चुकलेल्या आणि निघून गेलेल्या वेळांचा जमाखर्च मांडत बसलेला त्यातला नासिरचा महेन आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या नव्या जीवनसाथीसोबत त्याच स्टेशनात येणार्‍या ट्रेनमधे बसून एका नव्या प्रवासाचे प्रस्थान ठेवताना आधीचं सार आयुष्य त्यातल्या आठवणींसकट कायमचं तिथल्या वेटिंगरुममधेच सोडून निघून जाणारी सुधा आठवली असती.
मध्यरात्रीचा गडद अंधार असता तर कदाचित लांबून दिसणार्‍या एखाद्या दुसर्‍या ट्रेनच्या आवाजात मला..'यूंही कोई मिल गया था..सरे राह चलते चलते...'असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या पाकिझातल्या साहेबजानच्या नजरेत उमटलेली,रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी,न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी त्यातली ती ट्रेनची शिट्टी ऐकू आली असती.त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्ट्मधे ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकातीची सारी दास्तान उमटत असते.आपली नाजूक,गोरी पावले जर्दलाल पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान..त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला..न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीतून तसे बजावलेले असते म्हणून केवळ!
नुसत्या एका ट्रेनशी निगडित अशी सिनेमांची रिळं नक्की आहेत तरी किती आपल्या मनात?मला कुतुहल वाटलं!
सत्यजित रेंप्रमाणेच धावत्या ट्रेनचा मेटाफर वापरुन त्याला समांतर असा आयुष्याच्या सुखदु:खांचा,बदलत्या ऋतूंचा,दुरावत गेलेल्या आणि पुन्हा जवळ आलेल्या नातेसंबंधांचा लेखाजोखा सिनेमाच्या पडद्यावर कलात्मकरित्या मांडणारे कितीतरी दिग्दर्शक देशी विदेशी चित्रपटांच्या दुनियेत आहेत.
अगदी ब्रीफ एन्काउन्टर,ब्रीज ऑन द रिव्हर क्वाय आणि डॉ.झिवागो सारख्या एकाहून एक भव्य चित्रपटांमधे ट्रेनला महत्वाची भुमिका देणार्‍या डेव्हिड लिनपासून ते सुटलेली ट्रेन पकडू शकण्याच्या किंवा न शकण्याच्या शक्यतेद्वारे मनातला प्रेमाचा गोंधळ-गुंता सोडवू पहाणार्‍या इम्तियाझ अलीपर्यंत अनेकजण. डेव्हिड लिनच्या ब्रीफ एन्काउन्टरमधलं द मिलफोर्ड जन्क्शन स्टेशन जिथे अ‍ॅलेक आणि लॉरा चोरुन भेटत असतात किंवा जब वी मेटमधली गीत चुकून उतरते ते स्टेशन.. रेल आणि रिलचं एक अजब अफेअरच या स्टेशनांवरुन सुटणार्‍या,तिथे थांबणार्‍या ट्रेनमधे जन्माला येत असतं.
चित्तथरारक साहसे,स्फोट,दरोडे,खून याबरोबरच हळुवार प्रेमप्रसंग,भेटी,ताटातुटींचीही दृष्यं,दोस्तीच्या कहाण्या,आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारं तत्वज्ञान किंवा स्टेशनं एकदा मागे पडली की त्याकडे वळून पाहण्याचा काहीच उपयोग नाही,आयुष्यात पुन्हा ते मुक्काम परतून येत नाहीत,त्यावेळी भेटलेली माणसं पुन्हा भेटत नाहीत अशा अर्थांची..आयुष्यातली प्रत्येक भावना जिला दृष्यात्मक परिमाण आहे ती प्रत्येक या पडद्यावरच्या रेलदुनियेमधे मौजुद आहे.
१९०३ मधे एडविन पोर्टरचा'द ग्रेट ट्रेन रॉबरी'आला आणि पडद्यावरचं हे रेल-रिल अफेअर खर्‍या अर्थाने सुरु झालं.त्यानंतर मग आगगाडीवर पडलेल्या दरोड्यांना सिनेमामधे दाखवायची लाटच आली.बुच कॅसिडी आणि द सन डान्स किड -१९६९),मायकेल क्रिश्टनने १९७९ मधे पुन्हा त्याच नावाचा सिनेमा काढून पोर्टरच्या कामगिरीला जणू सलाम केला.मात्र हे कोणतेच मी पाहिलेले नाहीत.७४ला आलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारीत'मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस'ची डिव्हिडी मात्र मिळाली.हा सिनेमा मस्त होता.त्यातली रात्री कंपार्टमेन्ट्स बाहेरच्या पॅसेजमधून जाणारी ती स्कार्लेट किमोनो घातलेली पाठमोरी बाई! एखाद्या कोसळत्या पावसाच्या किंवा हुडहुडी भरवणारी थंडी पडलेल्या रात्री मस्त उबदार ब्लॅन्केट पांघरुन,गरम कॉफीचे कप संपवत बघावा हा मुव्ही!१९३२ साली झालेल्या एका खर्‍याखुर्‍या किडनॅपिंग केसवरुन अ‍ॅगाथाने ही कादंबरी लिहिली होती. इस्तंबूलची ती ओरिएन्ट एक्स्प्रेसही खरीखुरी.स्वतः अ‍ॅगाथाने कादंबरी लिहिण्याच्या काही वर्षं आधी त्यातून प्रवास केला होता. तेव्हा एका बर्फाच्या वादळामुळे तुर्कस्थानातल्या शेर्केस्को स्टेशनच्या आधी तब्बल सहा दिवस ती ट्रेन आणि त्यातले प्रवासी,ज्यात अ‍ॅगाथाही होती अडकून पडले.हे झालं १९२८ साली.त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ३१ साली आपल्या आर्किऑलॉजिस्ट नवर्‍याला भेटून निन्वे गावातून परतताना पुन्हा एकदा अ‍ॅगाथाने ओरिएन्ट एक्स्प्रेसमधून प्रवास केला आणि यावेळी ती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात रेल्वेलाईनच वाहून गेल्यामुळे पुन्हा २४ तास त्या ट्रेनमधे अडकून पडली. अ‍ॅगाथाच्या कादंबरीत आलेले प्रत्येक पात्र म्हणजे तिला या दोन प्रसंगी ओरिएन्ट एक्स्प्रेसमधे भेटलेले खरेखुरे सहप्रवासी.अ‍ॅगाथाने १९३४ साली ही कादंबरी लिहिली आणि अर्थातच ती प्रचंड गाजली.१९७४ साली त्यावर हा सिनेमा काढला गेला तो मुळ साहित्य कलाकृतीशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहूनही उत्कृष्ट सिनेमा कसा बनू शकतो हे सिद्ध करणार्‍या अगदी काही मोजक्या सिनेमांपैकी एक ठरतो.याचे श्रेय दिग्दर्शक सिडनी ल्युमेटचं.१९२०-३० या काळातलं वातावरण इतकं हुबेहुब नैसर्गिक वाटतं यात.यातली मर्डर मिस्टरी जबरदस्त आहेच शिवाय ग्लॅमरस कॉस्च्युम्स,कॅरेक्टर्सचा एलेगन्स,स्टाईल,देखणी सिनेमॅटोग्राफी,त्यातले ते एक से एक स्टार्स-शॉन कॉनेरी,अ‍ॅन्थनी पर्किन्स,लॉरेन बॅकाल,जॉन गिलगुड,व्हॅनेसा रेडग्रेव्ह आणि इन्ग्रिड बर्गमन!अशा कितीतरी कारणांनी हा सिनेमा माझ्या आवडत्या ट्रेन मुव्हीजपैकी सर्वात बेस्ट ठरतो.
रहस्यपटांचा अजून एक सम्राट आल्फ्रेड हिचकॉक सुद्धा या रेलदुनियेच्या इतक्या प्रेमात होता की असं म्हणतात त्याला रेल्वे टाइमटेबलही तोंडपाठ असायचं.'कंपार्टमेन्ट्स सीन्स'हे त्याच्या अनेक सस्पेन्स फिल्म्सचं महत्वाचं अंग.आठवून पहा-३९ स्टेप्स,स्ट्रेन्जर्स ऑन अ ट्रेन,नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट.त्याचा द लेडी व्हॅनिशेस हा सिनेमा तर संपूर्णपणे ट्रान्स-युरोपियन ट्रेनमधे सेट केला होता.ट्रेन कंपार्टमेन्टमधल्या मर्यादित,बंदिस्त जागेचा,गतीचा वापर करुन दृष्यांमधली रहस्यमयता,उत्कंठा,थरार विलक्षण उंचीपर्यंत नेऊन पोचवण्याचे हिचकॉकचे कौशल्य अचाट होते.
हॉलिवुडमधे बनलेल्या टिपिकल रोमॅन्टिक ट्रेन मुव्हीजची तर जंत्रीच डोळ्यापुढे येते.त्यातला द फ्रेन्च कनेक्शन लक्षात ठेवण्यासारखा.मात्र ट्रेनमधे भेटून नंतर नातं फुलत गेलेल्यांपैकी मला सर्वात आवडलेला सिनेमा म्हणजे ९५ला आलेला रिचर्ड लिन्कलेटरचा'बिफोर सनराईझ'..एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे,आयुष्याला नुकते सुरुवात करणारे तरुण जेसी आणि सेलिन. तो अमेरिकन,पुढे जाऊन नक्की काय करायचय याचा काहीच विचार मनात पक्का नाही,असाच भटकायला बाहेर पडलेला.ती फ्रेन्च आर्टिस्ट..शिक्षण संपवून करिअर सुरु करायच्या आधी प्रवासाला बाहेर पडलेली.आजीला भेटायला जाणार असते.दोघांची ओळख होते,गप्पा जमतात.इतक्या जमतात की दोघे ट्रेनमधून मधेच एका स्टेशनवर,व्हिएन्नाला उतरतात.परतायची ट्रेन ठरलेली असते.पहाटेची.त्या वेळेपर्यंत,ती पूर्ण रात्र दोघे शहरातल्या रस्त्यांवरुन निरुद्देश गप्पा मारत भटकतात...अखंड गप्पा. आवडीची पुस्तकं,सिनेमे,संस्कृती,सेक्स,भाषा,न सुटणारे प्रश्न,क्रायसिसवर शोधलेली उत्तरं असं काहीही.त्यातून एकमेकांची अंतर्बाह्य ओळख होते.आयुष्यातल्या संकल्पना स्पष्ट होत जातात...खूप अजब मैत्री जमते दोघांची आणि मग पहाटे सूर्य उगवत असताना दोघे एकमेकांचा फोन नंबरही न घेता आपापल्या ठरलेल्या ट्रेनने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात.एक बेफिकिरी मनात असते कदाचित.आयुष्य इतकं मोठं आहे,गोलही आहे असं म्हणतात.भेटू नक्की असंच स्टेशनवर पुन्हा कधीतरी. कदाचित दोनेक वर्षांतच?त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लोटतात.नऊ वर्षांनी दिग्दर्शकाने याचा सिक्वेल काढला.तो'बिफोर सनसेट'.ज्यात जेसी आणि सेलिन पुन्हा भेटतात.नऊ वर्षांनीच.असंच अचानक.यावेळी दोघे जास्त मॅच्युअर्ड,अनेक अनुभव दोघांच्या गाठीशी.आपल्या तेव्हाच्या गप्पांचा,त्यावेळी व्यक्त केलेया मतांचा,तेव्हाच्या मनातल्या स्वप्नांचा लेखाजोखा आता ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकमेकांशी ते मांडतात तेव्हा मजा येते.ट्रेनमधे सुरु झालेल्या मैत्रीचा असा पुढचा अनोखा प्रवास फार उत्कटतेने यात साकार केला आहे.कोणत्याही हिंदी सिनेमामधे अशी म्हटलं तर औपचारिक पण तरी प्रवासात काही काळाकरता का होईना जमलेल्या नात्यांमधली उत्कटता दाखवली गेली नाही.
भारतीय रेल्वे संपूर्ण जगात सर्वात जास्त लांबीचं जाळ असणारी म्हणून सुप्रसिद्धच आहे.इथली समाजसंस्कृती रेल्वेशी इतकी एकरुप झालेली त्यामुळेच कदाचित पण अगदी नियम केल्यासारखा रेल्वेशी संबंधित निदान एक तरी सीन हिंदी सिनेमांमधे असतोच असतो.हिंदी सिनेमाच्या इतिहासात अगदी सुरुवातीच्या काळात तर अशा रेल-सिनेमांची रांगच होती.१९३०मधे तुफान मेल,डेक्कन क्वीन,फ्रॉन्टियर मेल.ह्यातले ट्रेनच्या टपावरचे फियरलेस नादियाचे स्टंटसीन्स खूप गाजलेले होते म्हणे)सिनेमाच्या शेवटी सुटणार्‍या ट्रेनमधून निघून जाणार्‍या,डब्याच्या दारात उभ्या असणार्‍या हिरो किंवा हिरॉईनला भेटायला आख्खा प्लॅटफॉर्म संपेपर्यंत धावून मग शेवटी बाहेर आलेल्या हाताला पकडून वर ट्रेनमधे अलगद उडी मारणार्‍यांचे क्लायमॅक्स तर शेकड्यांनी सापडतील.अगदी जब जब फुल खिले पासून डिडिएलजे पर्यंत.(धावणार्‍या बहुतेकवेळा हिरॉइनीच आणि हात देऊन वर खेचून घेणारे मात्र हिरो-ही एक टिपिकल हिंदी फिल्मीगिरी).
मात्र एखाद्या डोर सारख्या सिनेमामधे अशाच तर्‍हेच्या क्लायमॅक्सला चालत्या ट्रेनच्या डब्यातून एका स्त्रीचा हात आधार द्यायला बाहेर येतो आणि तो पकडून आपल्या आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात करायला ट्रेनमधे चढणारीही दुसरी एक स्त्रीच असते तेव्हा असा वेगळा शेवट नक्कीच लक्षात रहातो.
मात्र हॉलिवुडच्या तुलनेत रेल्वेवर आधारीत भव्य,थरारक दृष्ये साकारण्यातही हिंदी सिनेमा फारच कमी पडला.रवी चोप्राचा महत्वाकांक्षी द बर्निंग ट्रेन हॉलिवुडच्या द कॅसान्ड्रा क्रॉसिंग आणि द टॉवरिंग इन्फर्नोचं कडबोळं करुन बनवला गेला.त्यात ८०च्या दशकातला प्रत्येक मोठा स्टार होता,बर्‍यापैकी कुशलतेने केलेले स्टंटसीन्स होते पण पडद्यावर बात कुछ जमीं नही.माझ्या दृष्टीने अपवाद एकच-शोलेतला तो घोड्यांवरच्या दरोडेखोरांचा आणि संजिव कुमार,जय-विरूचा मुकाबला,त्यात कोळशांच ते धगधगते निखारे असलेलं इंजिन,तो गोळॉ लागलेला मोटरमन आणि फावड्याने इंजिनात कोळसे लोटत असणारा धरम,टपावरुन उलटी कोलांटी मारत गोळ्या उदवणारा अमिताभ..सॉल्लिड मजा येते अजून प्रत्येक वेळी तो सीन बघताना.धूम २ मधेही ट्र्नमधली हाय प्रोफाईल रॉबरी दाखवली गेली पण सिनेमाच्या शेवटी लक्षात राहिला तो फक्त हॅन्डसम ऋतिकच.
पण हिंदी सिनेमांमधल्या ट्रेन्सच्या डब्यांमधून,खिडक्यांमधून रोमान्स मात्र असंख्य फुलले.त्यांची सुरेल गाणी बनली.ट्रेनमधे चित्रित झालेली ही सर्वच्या सर्व गाणी अगदी बिनचूकपणे मेलोडियसच आहेत.यातल्या अनेक गाण्यांमधे दार्जिलिंगची वळणदार रस्त्यांच्या कडेवरुन हळूवारपणे धावणारी छोटीशी ट्रेन फार महत्वाची रोमॅन्टिक वाहकाची भुमिका बजावते.बतासिया लुपला त्यामुळे अगदी ऐतिहासिकच महत्व प्राप्त झालय.या दार्जिलिंग ट्रेनच्या मोहातून अमेरिकन दिग्दर्शक वेस अ‍ॅन्डरसनही सुटला नाही.त्याने तर'द दार्जिलिंग लिमिटेड'नावाचाच सिनेमा काढला.यातून प्रवास करताना आपल्यातले गैरसमज,भांडणं सोडवू पहाणार्‍या तीन भावांची कहाणी कुछ खास जमी नही.
मात्र हिंदी सिनेमाचा खरा प्रेक्षक खुश होतो तो या दार्जिलिंग ट्रेनच्या टपावर बसून त्यांचा लाडका देव आनंद जेव्हा जिया हो.. जिया हो जिया कुछ बोल दो..'अशी प्रेयसीला मनवणारी गाणी म्हणतो तेव्हा.कधी तो ट्रेनच्या डब्यात बसून बेफिकिरपणे'है अपना दिल तो आवारा..न जाने किसपे आयेगा..'गातो,किंवा वरच्या बर्थवर झोपलेल्या वहिदाला उद्देशून'अपनी तो हर आह इक तुफान है..उपरवाला जानकर अंजान हैं..'असं खट्याळपणे छेडतो,'फुलोंकी रंग से दिलकी कलमसे तुझको लिखी रोज पाती..'अशा काव्यमय प्रेमाची बेहतरीन गाणी गातो तेव्हा हिंदी सिनेमातल्या ट्रेन्स खर्‍या अर्थने लयबद्ध धावायला लागतात.
हिंदी सिनेमांच्या पडद्यांवर असे अनेक अविस्मरणिय रेल-रोमान्स आले आहेत.ट्रेनच्या खिडकीत पुस्तक वाचण्याचा बहाणा करणार्‍या पण सारं लक्ष रस्त्यावरुन जाणार्‍या जीपमधे बसून'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तु..'हे किशोरचं सर्वात प्रसन्न गाणं गाणार्‍या रुबाबदार राजेश खन्नाकडे असलेली,प्रत्येक वेळावलेल्या मानेच्या लाडिक झटक्यातून आणि गालावरची खळी दाखवणार्‍या खट्याळ हसण्यातून फुलटू फ्लर्टींग करणारी आराधनातली शर्मिला टागोर(आणि त्याच ट्रेनमधून ३६ वर्षांनंतर आलेल्या परिणितामधे'कस्तो मजा..'गाणारा तिचा मुलगा सैफ),टपावर बसून रडणार्‍या उदास पद्मिनीला'होगा तुमसे प्यारा कौन..हमको तो तुमसे है प्यार..ओ कांची'गात समजावणारा गोड ऋषी,'झोंका हवाका आजभी जुल्फें उडाता होगा नां..'असं हळुवारपणे आठवणारा हम दिल दे चुके मधला सलमान,टपावर बेभानपणे 'छैंया छैंया..'नाचणारा आणि डिडिएलजेच्या सुरुवातीला आणि शेवटी क्लायमॅक्सलाही ट्रेन पकडण्यासाठी जीव तोडत धावत येणार्‍या काजोलला आश्वासकतेने हात देऊन वर खेचून घेणारा,किंवा'और मै चाहता हूं ये ट्रेन बार बार छुटे'म्हणणारा शाहरुख..तिसरी मंझिलच्या ओपनिंग सीनमधेच ट्रेनच्या डब्यात आशा पारेखला सतावणारा शम्मी आणि त्याच्यासोबतचा तो गोलमटोल शेटजी,अशा कितीकांना सोबत घेत,प्रत्येक पिढीतल्या सिनेमाप्रेमींसाठी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर ही रोमॅन्टिक रेल्वे अखंड धावत राहिली आहे.
प्रेम,मैत्री,वियोग,पुनर्भेटीची हळुवार स्टेशन्स घेत पुढे जाणारी हीच रेल्वे इतिहासातल्या काही काळ्या मानवी कृत्यांनाही पोटात घेऊन धावली आहे.विसाव्या शतकातल्या मानवी क्रौर्याची आणि सहनशिलतेची परिसीमा गाठणार्‍या,मानवी संस्कृतीचा सारा नक्षाच उतरवून टाकणार्‍या दोन घटना-एक ज्यूंचे सामुहिकरित्या केले गेलेले भयानक शिरकाण आणि दुसरी भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत दोन्ही देशांतल्या निरपराध नागरिकांची झालेली कत्तल.फक्त मानवच जबाबदार असलेल्या या दोन भयंकर क्रूर घटनांवर आधारीत सिनेमे जखमेवरची खपली मुद्दाम उचकटून काढण्याचा शापच मिळाल्यासारखे पुन्हा पुन्हा येत रहातात.स्टिव्हन स्पीलबर्गच्या द शिन्डलर्स लिस्टमधला हृदय पिळवटून टाकणारा,ज्यूंचा तो ट्रेनमधला शेवटचा प्रवास,पामेला रुक्सचा'ट्रेन टु पाकिस्तान',दीपा मेहताचा १९४७-अर्थ,अनिल शर्मांचा गदर-यातल्या प्रत्येक सिनेमातली ती निरपराध नागरिकांच्या रक्तबंबाळ देहांनी भरुन ओसंडणार्‍या ट्रेन्सची दृष्ये काळीज थिजवून टाकतात.
२८ डिसेबर १८९५ हा जागतिक सिनेमाचा जन्मदिवस.ल्युमिएर बंधूंनी पॅरिसमधल्या ग्रॅन्ड कॅफेमधे'सिनेमातोग्राफ'चं प्रथम प्रात्यक्षिक करताना जो'चित्रपट'दाखवला त्यात स्टेशनात शिरणारी एक ट्रेन होती.स्टेशनवर ट्रेनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले प्रवासी होते.दूर जाणारे रुळ होते.कोळशाच्या इंजिनाचा धूर सोडणारी आगगाडी स्टेशनवर येताच प्रवाशांची लगबग उडते असं त्यात दाखवलं होतं.सिनेमा पहिल्यांदाच बघणारे प्रेक्षक ती स्टेशनात शिरणारी ट्रेन बघून आधी प्रचंड घाबरले,मग विस्मयचकित झाले आणि त्यानंतर ते जे त्या स्टेशनावरच्या ट्रेनच्या विलक्षण मोहात पडले,ते आजपर्यंत..एक शतक उलटून गेल्यानंतरही त्या झुकझुक आवाज करत,निळ्या आकाशात काळ्या धुराची रेघ सोडत जाणार्‍या पडद्यावरच्या आगगाडीचे आकर्षण यत्किंचितही उणावलेले नाही.
सिनेमाच्या पडद्यावरचा हा प्रवास अविरत चालूच रहाणार आहे.;कारण Like diamonds.. Trains are Forever!
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)



Saturday, January 23, 2010

रस्किन बाँड : माउंटन्स इन माय ब्लड..

देहराडूनच्या सुप्रसिद्ध 'ग्रीन बुकशॉप'ने खास आयोजित केलेल्या रस्किन बाँडच्या सर्व साहित्याच्या प्रदर्शनाचे आणि त्याच्या 'नोट्स फ्रॉम अ स्मॉल रूम' या नव्या पुस्तकाच्या अनौपचारिक प्रकाशनाचे आमंत्रण रस्किनच्या आवडत्या जिरॅनियमच्या सुकवलेल्या फुलांना चिकटवून तयार केलेल्या एका सुंदरशा बुकमार्कसहित पोस्टाने माझ्याकडे आले. सोबतच्या माहितीपत्रकात पुस्तकातले त्याचे काही लेख छापले होते. एका लेखाचं नाव होतं 'थॉट्स ऑन रिचिंग सेव्हंटी फाईव्''. प्रदर्शनाचे निमित्तच होते रस्किनचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचे.

रस्किन ७५ वर्षांचा झाला?
मला इतकं आश्चर्य वाटलं! इतकी वर्षं हातात हात घालून माझ्यासोबत निळ्या पाईन्सच्या आणि देवदारांच्या जंगलात निरुद्देश भटकंती करणारा, मला निसर्ग पाहायला शिकवणारा 'रस्टी' वयातीत आहे असाच माझा समज होता.
बुकमार्क घालून ठेवण्यासाठी मी त्याचं 'बुक ऑफ नेचर' उघडलं.
रस्किनचं कोणतंही पुस्तक उघडलं, की हिमालयातील निळ्या शिवालिक पर्वतराजींचे देवदार, पाईन आणि चीडच्या रांगांचे उतार, मोत्यांचा चुरा उधळत जाणारे स्फटिकशुभ्र खळाळते झरे, जंगली गुलाब, पेट्युनिया, पॅन्सी, बेगोनिया यांसारख्या असंख्य चिमुकल्या रानफुलांनी भरून गेलेल्या हिरवळी; चेरी, अक्रोड, मेपलच्या दाट छायेतलं ते टुमदार आयव्ही कॉटेज आणि त्या कॉटेजच्या पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतल्या खिडकीजवळच्या डेस्कवर बसून 'लँडोर डेज'सारखी नितांतसुंदर पुस्तके एकामागून एक लिहीत राहणारा रस्किन बाँड हे असं सगळं नजरेसमोर शब्दशः दिसायला लागतं. कारण रस्किन पुस्तकं लिहीत नाही, निसर्गचित्र रंगवतो; शब्दांतून! स्वतः रस्किन त्या निसर्गचित्राचाच एक अविभाज्य भाग. तेव्हा तो तर दिसणारच त्याच्या प्रत्येक पानातून.
रस्किन खिडकीजवळच्या डेस्कवर लिहितो आहे. त्याच्या खिडकीखालून एक वळणदार लहानसा रस्ता लँडोरच्या बाजाराकडे जात असतो. खिडकीलगतच एक खूप जुनं चेरीचं आणि वडाचं झाड आहे. झाडाखाली प्रेम आणि राकी वगैरे मुलं खेळत आहेत. पिवळे वॉर्ब्लर्स झाडांचे कोवळे कोंब कुरतडत आहेत. चेरीचा बहर आणि सरत्या हिवाळ्यात अधिकच लालभडक होत जाणारी स्नेकलिलीची फळे न्याहाळत रस्किन लिहितो आहे.गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ देहराडूनपासून काही अंतरावरच्या 'लँडोर' या निसर्गरम्य, शांत गावात रस्किन राहत आहे. त्याच्या सोबतीला आहे फक्त हिमालयातला निसर्ग आणि त्या निसर्गाइतकीच निरभ्र, निष्पाप पहाडी माणसं!
'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय.. इट इज यू अँड आय..!' ..या पुस्तकातल्या एका पानामध्ये बुकमार्क घालून ठेवताना त्याने लिहिलेल्या वाक्यावर नजर जाते. लॅंडोरच्या बाजारातील रस्त्यावर वर्षानुवर्षे शेंगदाणे विकत बसणार्‍याचे अप्रतिम शब्दचित्र केवळ काही ओळींतच उभे करताना रस्किनने लिहिलेले असते.. "त्याचे नाव काय, वय किती विचारण्याच्या भानगडीत कधी कुणी पडले असतील असे वाटत नाही. बाजारातल्या जुन्या मनोर्‍यावरच्या घड्याळासारखे किंवा तिथल्या त्याहून पुरातन चेरीच्या झाडासारखे त्याचे अस्तित्व सर्वांनी गृहितच धरले होते जणू. पण तो त्या झाडापेक्षाही जास्त टिकाऊ आणि घड्याळापेक्षा जास्त विश्वासार्ह वाटे. त्याला स्वतःचे कुटुंब नव्हते, पण त्याच्या आजूबाजूला माणसांचा सदैव गराडा असे. त्यांच्यात असूनही तो वेगळा, कधीतरी दूरस्थही भासे. त्याचा सगळ्यांशी परिचय होता, पण कुणाशीही जास्त घसट नसावी, एकटा नसूनही एकाकी असणारा तो.." रस्किनच्या बोटांतून झरणार्‍या या शब्दचित्रात त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब उमटले होते का? कदाचित!

आपल्या वडिलांसोबत हिमालयातल्या निसर्गराजींत घालवलेल्या आपल्या बालपणातील आठवणींवर आधारित 'द रूम ऑन द रूफ' हे पहिले पुस्तक लिहिले, तेव्हा रस्किन १७ वर्षांचा होता. या पुस्तकात दिसणारा 'रस्टी' उत्साही, काहीसा अबोल, लाजरा, बिबळ्या दिसावा म्हणून रोज पहाटे उठून झर्‍यावर धाव घेणारा, धुक्यात हरवून जाणारा, झाडांवरच्या पक्ष्यांवर आणि आपल्या सोमी, किशन, रणबीर या दोस्तांवर सारखंच प्रेम करणारा होता.
तो रस्टी ताज्या, टवटवीत मनोवृत्तीचा होता. त्यावेळी रस्किन जिथे राहत होता, ते देहराडून जेमतेम १०-२०,००० लोकवस्तीचं, दाट वृक्षराजीने वेढलेलं, छोटंसं देहरा गाव होतं. रस्किनने त्याच्या आसपासच राहून पूर्णवेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता सहा दशके उलटली. देहराडूनची लोकसंख्या १० लाखांवर पोचली. माथ्यावरच्या विरळ होत गेलेल्या केसांच्या पट्टीसारखे, देहर्‍यातले दाट जंगलही मागे मागे हटत गेले.
रस्किन तिथेच आसपास या सार्‍या बदलांचा साक्षी होऊन राहिला. त्याच्यातला रस्टी हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये, तिथल्या माणसांमध्ये तितकाच मनमुराद रमत राहिला. दरम्यानच्या काळात ६ कादंबर्‍या, ७५ लघुकथा, १२ दीर्घ ललितलेखांचा संग्रह, ६ प्रवास व निसर्ग लेखसंग्रह, असंख्य कविता व गाणी, लहान मुलांसाठी गोष्टी असं शब्दभांडार रस्किनने आपल्या पुढ्यात ओतलं आणि त्यातल्या प्रत्येक शब्दामधून रस्टीची तीच ताजी, टवटवीत, उत्साही मनोवृत्ती आपण अनुभवली.रस्किन खरोखरच किती वर्षांचा झाला आहे, ह्या गोष्टीला आपल्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. रस्टी वयातीतच आहे.

सागरी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अनेकांनी प्रदीर्घ लेखन केले आहे. कॉनराड, मेल्व्हिल, स्टीव्हन्सन, मोसफिल्ड, हेमिंग्वे इत्यादी. पण असं लेखन प्रत्यक्ष पर्वतराजींमध्ये राहून सातत्याने करणारे फार मोजके. पूर्णवेळ लेखनाचाच व्यवसाय करणारे तर अशा भानगडींत पडणेच शक्य नाही. पहाडी जीवनाला काही ग्लॅमर नाही. शहरं प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही पुरवतात. तेव्हा शहरात राहून आणि चार दिवस हिमालयात काढून मग त्यावर वर्णनात्मक लेख लिहिणारे शेकड्यांनी मिळतील. पण रस्किनने असं केलं नाही. त्याचा एक 'निसर्गलेखक' म्हणून असणारा वेगळेपणा ह्यातच आहे. प्रसारमाध्यमांपासून, पर्यायाने प्रसिद्धीपासूनच दूर राहत, लॅंडोरसारख्या, हिमालयातील इतर ग्लॅमरस हिल-स्टेशन्सच्या नखर्‍यांपासून अलिप्त असणार्‍या शांत गावात राहून पूर्णवेळ फक्त लेखनच करण्याचा रस्किनचा तरुण वयात घेतलेला निर्णय नुसता वेगळा नव्हे, तर धाडसीच म्हणायला हवा. पण त्याने त्याची लिखाणावरची आणि निसर्गावरची निष्ठा हिमालयाइतकीच अविचल राखली.
ही निष्ठाच तर त्याच्या लंडनला नव्याने नशीब आजमावायला गेलेल्या तरूण पावलांना देहराडूनमध्ये परत खेचून घेऊन आली होती.

कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किनचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडं लावत. 'अवर ट्रीज स्टिल ग्रो इन देहरा' लेखामध्ये या वडिलांसोबत घालवलेल्या काळाचे आणि त्यावेळी जोपासल्या गेलेल्या निसर्गप्रेमाचे खूप बहारदार वर्णन रस्किनने केले आहे. रस्किन लहानपणी पुस्तकंही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्‍या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षं जात राहिली. पण या सर्व काळात तो रमला फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेलं वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.

सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अ‍ॅंग्लोइंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणार्‍या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झर्‍याकाठी पाणी प्यायला येणार्‍या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला.लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकर्‍या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी झुरत राहिला हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी. त्याला तिथल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले. त्यातल्या शब्दाशब्दांत त्याच्या मनातली हिमालयातल्या दिवसांची उसळती ओढ ठिबकत राहिली.

या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरूण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन र्‍हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बाँडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली.

रस्किन स्वतःच्या घरी परतला.
देहराडूनला परतलेला रस्किन स्वतंत्र व एकटा होता. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा महत्त्वाचा निर्णय त्याने घेतलेला होता. हातात पुन्हा एकदा डायरी होती, भोवती पाचूंसारख्या उलगडणार्‍या हिरव्यागार, चिरपरिचित वाटा होत्या. त्यांवरून तो मनाला येईल, तेव्हा हिंडू शकणार होता आणि पाय थकल्यावर ताज्या मनाने आज काय पाहिलं त्याच्या नोंदी डायरीत करणार होता.

देहराडूनमध्ये रस्किनला राहायला घर हवे होते, ते दिले बिबीजीने. त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. रस्किनला तिचे विलक्षण कौतुक वाटे. देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई, जिचे वाणसामानाचे दुकान होते. रस्किन सकाळच्या वेळात तिच्यासोबत धान्य खरेदी करायला मोठ्या बाजारात जाई. तूर, उडीद, चणे, राजमा वगैरेंची पोती उचलायला त्याची मदत होई. रस्किन लिहितो, "धान्य, डाळींची मला आता चांगली ओळख झाली, पण धान्याचा सौदा करणं मात्र मला जमायचं नाही. कदाचित म्हणूनच बिबीजीने ते दुकान माझ्या नावावर करून देण्याचा विचार रद्द केला असावा." आपण अगदी एकाकी, कष्ट करून लिहिणारे लेखक म्हणून ओळखले जावे, ही रस्किनच्या मनातली हौस काही बिबीजीने पुरी होऊ दिली नाही. तो म्हणतो, " दुपारी ती मला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचं आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घालायची" मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. तिथे वीज नव्हती. "पण माझी काहीच तक्रार नव्हती." आपल्या तिथल्या दिवसांचं खूप सुंदर, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्किल शैलीत वर्णन करताना 'देहरा आय नो' या पुस्तकात रस्किन पुढे लिहितो, "विजेचं बिल भरायला पैसेच नसण्याच्या त्या काळात, कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात लिहिलेल्या माझ्या लिखाणाला उलट एक 'सॉफ्ट आणि रोमॅंटिक ग्लो' आला. मी 'तरुण, आयुष्याशी झगडणारा लेखक' होऊ शकत नसल्याची माझी खंत थोडीफार शमली गेली."

रस्किन बाँडने त्या काळात लिहिलेली एकाहून एक सुंदर अशी 'रेन इन द माउंटन्स, द टाईम स्टॉप्स अ‍ॅट शामली, ऑल रोड्स लीड टू गंगा, व्हाईट क्लाऊड्स्-ग्रीन माउंटन्स, लॅंडोर डेज, अलाँग मंदाकिनी, टेल्स ऑफ ओल्ड मसूरी, ग्रेट ट्रीज ऑफ गढवाल, ग्रोइंग अप विथ ट्रीज, वन्स अपॉन अ माउंटन्स टाईम' वगैरे कित्येक पुस्तकं आणि ललित लेख वाचले, की त्याच्या त्या 'सॉफ्ट-रोमॅंटिक ग्लोइंग' शैलीचा प्रत्यय हमखास आपल्यालाही येतो. फक्त ती त्याच्या लिखाणातली जादू केरोसीनच्या कंदिलाच्या उजेडामुळे नसून त्याच्या मनातल्या हिमालयातल्या झर्‍यांसारख्याच निवळशंख, विशुद्ध निसर्गप्रेमामुळे आलेली आहे, इतपत जाणही आपल्याला आलेली असते.
रस्किन झाडांवर, फुलांवर, पर्वतांतल्या धबधब्यांवर लिहिताना जितका रमतो, तितकाच किंवा जरा अधिकच रमतो त्याच्या आजूबाजूच्या माणसांवर लिहिताना. व्यक्तिमत्त्वे अचूक आणि मोजक्याच शब्दांत उतरविण्याचे त्याचे कसब केवळ अपूर्व आहे. ' द ब्लू अंब्रेला'मधली ती चटपटीत बिनया, 'प्लॅटफॉर्म नंबर एट'वरची अनामिक स्त्री, रुद्रप्रयागवरून लहानपणीच त्याच्या जवळ राहायला आलेला प्रेम, रस्किनसाठी जुनाट, राजेशाही खुर्ची राखून ठेवणारा टेहरी रोडवरचा चहाटपरीवाला, विसरभोळा आणि गप्पिष्ट शेजारी कर्नल बिग्ज, रस्किनला अजिबात न आवडणारी केसांना जस्मिनचं तेल लावणारी मिस् बन आणि जिचं नाव रस्किनने कधीच त्याच्या विश्वासातल्या वाचकांनाही सांगितलं नाही, पण जिच्यावर मनोमन प्रेम केलं, ती तिबेटन दुकानातली विक्रेती आणि शामलीत अचानक भेटलेली त्याची जुनी प्रेयसी सुशीला - रस्किनच्या आयुष्यातली ही सारी लोभस माणसं आपल्या कायम लक्षात राहतात, त्याच्या पुस्तकांतून ती वारंवार डोकावत राहतात.
रस्किन बाँडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट), 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्रीही मिळाला. पण अशा कुठल्याच प्रसिद्धीच्या झगमगाटात तो कधीच रमला नाही.
दिल्ली-मुंबईसारख्या शहरांत आल्यावर तो अस्वस्थ होतो. वाहनांच्या गजबजाटापासून कधी एकदा दूर जाऊन आपण आपल्या खिडकीखालच्या चेरीच्या झाडाखाली बसून, दगडावर विसावलेले निळे फुलपाखरू पाहत लिहायला लागतो असे त्याला होऊन जाते. "हिमालयाची झगमगती शिखरे सर करायचा, त्यांच्यावर चढाई करायचा उत्साह माझ्यात नाही. लहानशा, ओळखीच्या पायवाटा मला खुणावतात. त्यावरून चालत जवळच्या जंगलात, एखाद्या खेड्यात, छोट्या तळ्याकाठी किंवा भणाणता वारा असलेल्या टेकडीच्या माथ्यावर चालत जाण्यात मला अमाप आनंद मिळतो." रस्किन लिहितो. आणि मग आता इतकी वर्षं त्या वाटांवरून चालत राहिल्यावर आपणही त्या पहाडांचाच एक भाग बनलो आहोत, तिथल्या झाडांशी, खडकांशी, जंगली फुलांशी आपले रक्ताचे नाते जुळले आहे, उतरत्या संध्याकाळच्या उन्हात ओकवृक्षाच्या डवरलेल्या फांदीखालून चालत जाताना ते झाड प्रेमाने आपल्या डोक्याला स्पर्श करते, ते या जडलेल्या नात्यापोटीच याची रस्किनला खात्री पटते. आणि आपल्यालाही.

रस्किनची पुस्तकं वाचली नसती, तर आपल्याकरता हिमालय नुसत्याच एखाद्या रम्य निसर्गचित्रासारखा होऊन राहिला असता, असं मला नेहमीच वाटतं. फक्त बघावे आणि सुंदर आहे असे म्हणावे. पण हिमालय वाचायला शिकवला तो रस्किनने. हिमालय म्हणजे केवळ भव्य, चमचमती बर्फाची शिखरे नाहीत, तर तो त्यातल्या माणसांसकट, छोट्यांतल्या छोट्या रानफुलांसकट, पाईन-देवदारांच्या दमदार रांगांसकट, फुलपाखरे आणि झर्‍यांसकट एक जिवंत, स्पंदन करणारे व्यक्तिमत्त्व आहे, हे शिकवले रस्किनने.पुन्हा पुन्हा हिमालयाकडे पावले वळत राहिली, ती त्याने पुस्तकातून दाखवलेला निसर्ग आपल्या डोळ्यांनी पाहून पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी. बद्रिनाथच्या वाटेवरून जाताना किंवा जोशीमठचा प्राचीन तुतीचा वृक्ष पाहताना, मंदाकिनी अलकनंदेच्या तीरावरून चालताना, गढवालच्या खेड्यांतून प्रवास करताना, दरीतून उडत जाणार्‍या पक्ष्यांची आनंदी गाणी ऐकताना प्रत्येक वेळी हा आनंद मिळाला.

आयुष्यभर ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्यांना 'द गार्डियन्स ऑफ कॉन्शस' मानलं, त्या झाडांना, पाईन देवदारांच्या समृद्ध रांगांना, सालाच्या देखण्या जंगलांना आता विरळ होत जाताना, मोठमोठ्या धरणांमुळे एकेक करत उजाड होत जाणार्‍या गावांना, रस्त्यांमुळे, वेड्यावाकड्या बांधकामांमुळे ठिसूळ होत गेलेल्या पर्वतकड्यांना, प्रदूषणामुळे माना टाकणार्‍या फुलांना, पुराने गिळंकृत केलेल्या वस्त्यांना पाहून व्यथित होत जाणारं रस्किनचं मन गेल्या काही वर्षांतल्या लिखाणातून सातत्याने जाणवत राहतं. सरकारी अनास्था, बेपर्वाई, माणसांचं जंगलांपासून तुटत गेलेलं नातं, नव्याने जन्म घेणारा स्वार्थी लोभीपणा यांवर फक्त हताश होणंच आपल्या हातात आहे, असं मानणारी उथळ निसर्गप्रेमी वृत्ती रस्किनकडे सुदैवाने नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वैयक्तिक पातळीवर तो विविध मार्गांनी सतत प्रयत्न करतो. व्याख्याने देतो, लेख लिहीत राहतो. निसर्गाचा वारसा जपण्याचं काम नव्या पिढीकडूनच होऊ शकेल हा दुर्दम्य आशावाद त्याच्याकडे अजूनही आहे.

आपल्या एका लेखात तो लिहितो, "दिल्लीमधलं आधुनिक स्थापत्यशास्त्र हिमालयातल्या नाजूक वाटा-वळणांवर आणून उभं केल्यावर आता हा परिसर टेकडीवरून पाहताना शेकडो थडगी असलेल्या कबरस्तानासारखा दिसायला लागला आहे, यात नवल काय?"हिमालयातल्या या मौल्यवान निसर्गसंपदेची लूट आणि तिचे हे नुकसान होण्याची सुरुवात जेव्हा ब्रिटिशांनी आपल्या चैन आणि सुखसोयींसाठी सिमला, मसूरी, दार्जिलिंग, डलहौसी, नैनिताल सारखी हिल स्टेशन्सची उभारणी केली, तेव्हापासूनच झाली, असं रस्किन बिनदिक्कत परखडपणे नॅशनल जिओग्राफिकवर सांगतो. 'एकेकाळी दर्‍यांमध्ये स्फटिकशुभ्र दंव शिंपडणारे धुके असायचे आणि आता तिथे प्रदूषणाचे मळकट ढग असतात, ही कळ चोवीस तास माझ्या ह्रदयातून जात नाही' असं तो कळवळून म्हणत राहतो.

मात्र अजूनही निसर्गाच्या विजिगीषु वृत्तीवरचा, वसंत ऋतूच्या आगमनानंतर खडकांमागून पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढणार्‍या रानफुलांवरचा, निसर्गसाखळीच्या शाश्वत आणि चिवट सातत्यावरचा त्याचा विश्वास उणावलेला नाही. तो म्हणतो- " Despite everything, each morning I look at the birds and the warm sun shining behind the clouds, and I realize that I still have another song to sing- another tale to tell. May be tomorrow, when winds aren't cold and sun's bit warmer, I'll tell you another story.."
हिमालयातली निसर्गराजी टिकेल, बहरत राहील, माणसं सुजाण बनतील, हा आशावाद मग पुन्हा एकदा आपल्याही मनात जन्म घेतो, रस्किनचं पुस्तक हातांत घेताना.

मुंबईतल्या उकाड्याने आणि प्रदूषणाने जीव हैराण झाला, की मला रस्किनची आठवण येते. शिवालिक टेकड्यांच्या, चीड-देवदार-पाईनच्या रांगांनी झाकून गेलेल्या एका शांत गावात, आपल्या आयव्ही कॉटेजमध्ये, चेरीचं झाड दिसणार्‍या वळणदार रस्त्याकडे पाहत एका थंड निळ्या दुपारी रस्किन अजूनही लिहीत बसलेला आहे, गेली सहा दशके तो तिथेच बसून लिहितो आहे, वयाच्या ७५ व्या वर्षीही जंगलांत भटकणार्‍या तरूण रस्टीच्या हातांनी आपल्या डायरीत नोंदी करून ठेवत आहे, ही भावना मला आश्वस्त करते. उन्हाच्या तडाख्यात माझ्याही खिडकीबाहेर भरभरून फुलत राहणार्‍या पेल्टोफोरमकडे समाधानाने पाहत मी बुकमार्क घालून ठेवलेलं रस्किनचं वाक्य मोठ्यांदा वाचते," .. and when all the wars are done, a butterfly will still be beautiful!"

Friday, December 04, 2009

पुन्हा एकदा राही!

प्रश्न फक्त दरम्यानचा आहे..

राही अनिल बर्वे सध्या काय करत आहे? 'मांजा' बनवून झालेला आहे, 'तुंबाड' बनायचा आहे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं, तर काहीच नाही.. आणि तरीही खूप काही. गुलजारच्या भाषेत सांगायचं, तर कदाचित तो 'कलेक्टिंग मोमेंट्स..'च्या प्रक्रियेत असू शकतो.एक कलाकृती हातून घडून गेलेली असते. दुसरं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि जास्त अचूक बनवायचं असतं. आता काय निर्माण होणार आहे, याची स्वतःलाच उत्सुकता असते. मनात आत्मविश्वासाची मस्ती असते, उरात लाल धगही असते; पण नवनिर्मितीची प्रक्रिया काही बाह्य कारणांमुळे, मग ती आर्थिक असोत किंवा आणखी काही, पण जागच्या जागी अचानक थांबते. वाट पाहण्याचा कालावधी लांबत जातो. हात दुसरं काही बनवायला नकार देतात. कलाकार ह्या काळामध्ये काय करतो? आताच्या अस्वस्थ, आत बरंच काही खदखदत असताना वरकरणी शांत राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या राही अनिल बर्वेला पाहताना मनात पुन्हा पुन्हा हाच विचार येत होता.

----------------------------------------------------------------------------






















सिनेमॅटोग्राफ़र पंकज, रांका, आणि दिग्दर्शक राही

तू 'मांजा' बनवलास. ज्यांनी ज्यांनी ही फिल्म पाहिली त्यांना ती आवडली. काहींच्या अंगावर आली. ही खूप डार्क शॉर्ट फिल्म आहे. त्याच्यात खूप एक्स्ट्रीम्स आहेत. अर्थात 'राशोमान'वर बोलताना कुरोसावा म्हणाले होते - "I like extremes, because I find them most Alive." तुझ्याबाबतीत काय? ही फिल्म अशीच बनवायची हे तुझ्या डोक्यात पक्कं असणारच अर्थात. तरीही त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांग. खूप वेगळी निर्मिती आहे ही, त्यामुळे तुझ्याकडून हे सर्व ऐकायची उत्सुकता वाटतेय.

राही: ती प्रक्रिया आता खूप मागे राहिली आहे आणि 'मांजा'ही खूप मागे पडलाय. 'मांजा'ने मला फिल्म कशी बनवावी याविषयी जास्त काही शिकवलं नाही, पण कशी बनवू नये याबाबत मात्र भरपूर शिकवलं. मी त्यावेळी ते शिकायला बर्‍याच ठिकाणी, बर्‍याचदा कुठे, कसा कमी पडलो, तेदेखील 'मांजा'च तुम्हाला सांगेल.मी 'मांजा' बनवला, तेव्हा माझे फिल्मविषयक ज्ञान अतिशय जुजबी होतं. लिंच, कोप्पोला, तारकोव्स्की, वाँग के वई.. त्यांची नावेदेखील माझ्या कानांवरून कधी गेली नव्हती. त्यांच्या कामांपासून शिकायचा प्रयत्न 'मांजा'नंतर सुरू झाला. त्यातून आता 'तुंबाड' घडतोय.
मला 'मांजा' बनवल्यावर आता काही वेडी मुले विचारतात, 'How to make a film? At least a short film? Please help us.' मी म्हणतो, तुमचं स्क्रिप्ट जर तयार असेल आणि ते चांगलंच आहे हा तुमचा विश्वास असेल, तर तुमच्यापेक्षा वेडी आणि तुमच्याइतकीच टॅलेंटेड माणसं शोधून काढा. अभिनेते, तंत्रज्ञ.. खूप कठीण जाणार नाही. कारण तेदेखील तुमच्यासारखा माणूस शोधत फिरत असतील. पॅशनेट, अतिशय टॅलेंटेड. पण रिकाम्या खिशांची, बेकार, अशीच माणसे गाठा. Don't go for known names. त्यांनादेखील त्या फिल्मविषयी तुम्ही पेटलाय, तसे पेटवा. Be their leader. तुमची लहानशी टीम बनवा. ती जमेल तितक्या वेगात एकसंध करा. मग खोटं बोला, मॅनिप्युलेट करा, न लाजता बेधडक भीक मागत फिरा. जवळ असलेलं, नसलेलं सारं पणाला लावा आणि हरायलादेखील तयार राहा. हे सारं करताना कुठलीही मर्यादा मनाशी ठरवून ठेवू नका. तशी मर्यादा जर तुम्ही तुमच्यावर घालून घेतलीत, तर मग ती फिल्म करताना असो किंवा इतर काहीही, ती मर्यादाच तुमच्या आयुष्याचा एक हिस्सा बनून जाईल. तुमचं काम, तुमची नीतिमत्ता, तुमच्या सार्‍या अस्तित्वालाच ही मर्यादा वेटोळं घालून बसेल. तुम्हांला ती ओलांडून जाणं भागच आहे. If it kills you, it kills you. भक्कम, छोटी टीम आणि लहानसे, पण प्रॅक्टिकल बजेट उभे करा. खिसे पूर्ण रिकामे असताना, कुठलाही अनुभव पाठीशी नसताना, इतक्या बेसिक स्टेजला जर हे उभे करू शकलात, तर पुढला प्रवास कठीण नाही. फिल्म मेकिंगच्या तांत्रिक बाजू माहीत नाहीत, म्हणून कधीही हातपाय गाळून बसू नका. असा डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी शोधा, ज्याला त्या माहीत आहेत आणि तुम्हांला त्या तो हळूहळू समजावू शकेल. पण वेळ आल्यावर शूट करताना त्याच्या विचारांपेक्षा स्वतःच्या अननुभवी दृष्टिकोनाशी जास्त प्रामाणिक राहा, कारण ती दृष्टी तुमची स्वतःची असेल आणि पुढे चुकली, तर उलट जास्त शिकवेल.
'मांजा'चे ओरिजिनल बजेट चोवीस लाख होते, क्रू रिक्वायरमेंट किमान पंचेचाळीस जणांची होती. आणि शेड्यूल बत्तीस दिवसांचे होते. दोन वर्षे फंड्ससाठी अथक परिश्रम करून हरल्यावर, आम्ही फक्त चारजणांनी (तीन काम करणारे अ‍ॅक्टर्स वगळून) तो अखेरीस साठ हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. नाईट शॉट्ससाठी कित्येकदा पंकजने कार-बाईक्सचे लाईट्स वापरले. पण महत्त्वाचे म्हणजे, जर हाती पुढे जायला दुसरा उपाय नसेल, तर ... this method works.


मांजा'चं लोकांकडून झालेलं कौतुक, त्याला मिळालेले 'मिफ'चा सुवर्णशंख आणि इतरही अनेक पुरस्कार, डॅनी बॉयलने ही फिल्म एसएमडीच्या 'ब्ल्यू रे डीव्हीडी'सोबत दाखवण्यास निवडणे, पदार्पणातच असं कौतुक आणि यश मिळणं, या सगळ्यांवर तुझी नक्की प्रतिक्रिया काय?

राही: काही नाही. It's just beginner's luck. That's it. पुढच्या प्रवासात ते माझ्यासोबत राहील की नाही याचा विचार मी केला नाही. सुरुवात ठीक झाली, याहून जास्त या सर्वांना फारसा काही अर्थ नाही.

तुझी 'आदिमायेचे' ही कादंबरी पॉप्युलर प्रकाशनातर्फे नुकतीच प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल सांग. तिच्या लिहिण्यामागच्या प्रेरणेबद्दल सांग. 'पूर्णविरामानंतर..' या तुझ्या कथासंग्रहानंतर जवळ जवळ दहा-बारा वर्षांनी तू ही लिहिलीस. मधल्या काळात लिहावेसे वाटले नाही काही?

राही: बारा ते सोळा ह्या वयात मी - बरं-वाईट जे काही असेल ते, पण - झपाटून लिहिले होते. 'पूर्णविरामानंतर..'मधील सर्व कथा त्यावेळच्या आहेत. त्यातल्या बहुतांशी आता मला स्वतःला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे बोलणे टाळतो. नंतर लिखाण पूर्ण थांबले. पुढील अकरा वर्षे एक ओळही लिहिली नाही. पुढे कधी लिहीन असं वाटलं नव्हतं. पण २००४ साली अचानक 'आदिमायेचे' लिहिली. त्याच वेळी 'मांजा'चं फायनल स्क्रिप्ट आणि 'तुंबाड'चा कच्चा ड्राफ्टही लिहिला. त्याचवेळी चित्रे काढायलाही शिकलो. 'आदिमायेचे' लिहायला जितकी कठीण होती, त्याहीपेक्षा ती चारशे पाने एडिट करायला खूप जास्त कठीण होती. आणि मला माझं पुस्तक कुठल्याही परिस्थितीत शंभर-सव्वाशे पानांच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. तिची सारी ताकद थोडक्यातच सामावलेली आहे. पूर्ण झाल्यावर, मला ती मी सोडून दुसर्‍या कुणाला समजेल, आवडेल, अशी खात्री वाटेना. तेव्हा ती आणखी दोन वर्षे तशीच पडून राहिली. त्या अवधीत मी 'मांजा' बनवला. 'तुंबाड'वर पुढे गेलो. भरपूर फिरलो. खूप धमाल उद्योग केले. सारी सुरुवात त्या पुस्तकापासून झाली. एका अर्थी त्या पुस्तकाने मलाच लिहिलं. गेल्या वर्षी ती पॉप्युलरला दिली. त्यांना ती आवडली.
मी एक सतत पाहिलंय, कादंबरीतला हा जो कुणी 'मी' असतो, सतत स्वतःकडे द्रष्ट्याची भूमिका वगैरे घेऊन पानापानाला फार वैतागवाणी ऑनेस्टी झाडत असतो. घडून गेलेल्या घटना आणि व्यक्तिरेखा तो आपल्यासमोर फार प्रांजळपणे, काहीही लपवाछपवी न करता मांडतो. हा आदिमायेतला 'तरंग' फार काळ माझ्या मनात घर करून होता. तो द्रष्टा नाही, दांभिक आहे. भोंदू, चलाख, हलकट, पण खोल आत कुठेतरी माणुसकीचा झरा असलेला. त्याच्याकडे सांगण्यापेक्षा लपवण्यासारखे खूप जास्त आहे. घडून गेलेल्या घटनांविषयी, आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांविषयी फार प्रांजळपणा राखून बोलणे त्याला अजिबात परवडणारे नाही आणि स्वत:च्या फायद्या-तोट्यानुसार घडलेल्या घटना, माणसे मॅनिप्युलेट करून आपल्यासमोर वेगळ्या स्वरूपांत मांडण्याची हातोटी त्याला उपजत आहे.. (आणि ती कमीअधिक प्रमाणात आपल्या प्रत्येकात असते.) फक्त त्याचे चित्त थार्‍यावर नसल्याने सांगताना होणार्‍या विसंगतींतून क्षणासाठी सत्य आपल्यासमोर अवचित झळाळून नाहीसे होत राहते. 'तरंग'च्या शब्दांवर पूर्ण विसंबून 'आदिमायेचे' सरळसोट वाचली, तर ती समजायला थोडी कठीण जाईल इतकं नक्की. आणि तिचा शेवट आवडलेला, किमान 'ठीक' वाटलेला माणूस मला अद्याप भेटायचाय. :D

'मांजा'नंतर तू 'तुंबाड' बनवायला घेतलास. त्याबद्दल सांग.


राही: 'तुंबाड' २०१० च्या ऑक्टोबरमध्ये किंवा २०११ च्या सुरुवातीला रिलीज होईल. 'तुंबाड' अतिशय प्राचीन भयकथांवर आधारित आहे. आम्ही २००५ पासून 'तुंबाड'च्या फायनान्ससाठी प्रचंड प्रयत्न केले, पण बिग बजेट - नो स्टारकास्ट - अतिशय वेगळा, ह्यापूर्वी कधीही न हाताळलेला - बिझनेसच्या परिभाषेत 'अतिशय रिस्की' विषय, आणि कुठलीही तडजोड करायला तयार नसलेल्या डायरेक्टर-सिनेमॅटोग्राफरची जोडगोळी. अशावेळी ज्या चिपळ्या वाजायच्या त्या सार्‍या वाजल्या. दोन मोठे हॉलिवूड स्टुडिओज अखेरच्या स्टेजला शूटिंगच्या फक्त महिना-दीड महिना आधी एकामागोमाग एक 'तुंबाड'मधून बॅक आऊट झाले. त्याही आधी दोन वर्षांपूर्वी - आम्ही 'तुंबाड' खूप लहान स्केलवर करत असताना आमचे फायनान्सर्स शूटिंगच्या फक्त चोवीस तास आधी बॅक आऊट झाले होते. पुढे ते पूर्ण प्रॉडक्शन हाऊसदेखील कोलॅप्स झालं.. आता चौथ्यांदा पुन्हा 'तुंबाड' उभा राहतोय तोदेखील इंटरनॅशनल फंडिंग्ज आणि फॉरेन स्टुडिओजमुळे उभा राहतोय. कारण टिपिकल मेनस्ट्रीम हिंदी फिल्म्सचे प्रोड्यूसर्स 'तुंबाड'वर नजर टाकायलासुद्धा तयार नव्हते.आमचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता, दीड-दोनशे माणसांची टीम पुन्हा पुन्हा अथक परिश्रमांनी उभी करणे आणि ती अगदी अखेरच्या क्षणी पुन्हा कोलॅप्स होणे, दोन वर्षांत तीन वेळा ..Its hard to handle. बरेच अ‍ॅक्टर्स, जिवाभावाचे क्रू मेंबर्स ह्या दोन वर्षांत रिप्लेस झाले. पण चांगलं इतकंच, की मुरून मुरून ह्या सर्व कालावधीत आमच्या नकळत ही फिल्म वाढत गेली. पहिल्या खेपेस शूटिंगच्या चोवीस तास आधी कोलॅप्स झालेला 'तुंबाड', आणि आज पुन्हा चौथ्यांदा उभा राहतोय तो 'तुंबाड', दोन्ही पूर्णपणे भिन्न फिल्म्स वाटाव्यात इतका प्रचंड फरक दोघांत आहे.

डोक्यात आपल्याला आता काय करायचे आहे हे पक्के तयार असते, बाहेर उसळी मारत असते आणि सर्जनाची ही प्रक्रिया कोणत्याही कारणाने - मग ते आर्थिक कारण असो किंवा काही इतर अडथळे - जेव्हा अचानक थांबवली जाते, तेव्हा त्याला तू कसा रिअ‍ॅक्ट होतोस?

राही: ती आत्तापर्यंत इतक्यांदा आणि इतक्या वाइटात वाईट प्रकारे थांबवली गेली आहे, की खूपच पूर्वी माझ्या पोतडीतल्या सार्‍या रिअ‍ॅक्शन्स देऊन देऊन संपल्या. आजकाल मी फक्त शांतपणे फार गाजावाजा न करता उठून पुन्हा उभा राहतो.

संघर्षाच्या काळात आतली धग टिकवून ठेवणे, त्यावर राख जमा होऊ न देणे हे कसं जमवू शकलास?

राही: ते कुणालाही विचारपूर्वक प्रयत्न वगैरे करून जमवता येत नाही. ती खरी असेल, तर आपोआप टिकते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही. नसेल, तर सोबत तुमच्या स्वप्नांची राख घेऊन आपसूक विझते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही.

चित्रपट जितका बिग बजेट तितकी फायनान्सरची चित्रपटावरची सत्ता वाढत जाते. मग यातून मनासारखा चित्रपट बनवणे कितपत शक्य होणार?

राही: मुळात ती सत्ता मर्यादेबाहेर वाढू न देणे, हे सर्वस्वी माणसा-माणसांवर अवलंबून असते. तुम्ही नावाजलेले दिग्दर्शक नसाल - जो, जे हवे ते मिळत नसल्यास विरोध करून ते मिळवण्याच्या फर्म कॉन्फिडंट लेव्हलला आहे - तर तुम्ही आधी तिथवर पोचू शकत नाही, कारण कुणी तेवढा मोठा जुगार तुमच्यावर खेळणार नाही - हे एक. आणि विरोध करायला जी धमक लागते, त्या धमकेचा पाया त्या स्टेजला त्या फायनान्सर्स/प्रोड्यूसर्स/स्टुडिओंच्या लेखी सर्वस्वी तुमच्या तोवर मिळवलेल्या बॉक्स-ऑफिसच्या यशात दडला असतो. तुमच्या सर्जनशील मनाशी त्यांना फारसे देणे-घेणे नसते. तुम्ही फर्म असाल, तर त्या स्टेजला मनासारखा चित्रपट बनवणे तितकेसे कठीण जात नाही. १९७२ साली फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाने गॉडफादर बनवताना स्टुडिओ एक्झिक्युटिव्हजशी सतत अखेरपर्यंत लढून कुणा एका अल पचिनो नावाच्या नवख्या अनोळखी अभिनेत्याला प्रमुख भूमिकेमध्ये शूट संपेपर्यंत टिकवण्याची आणि अशीच असंख्य इतर उदाहरणे आहेतच की. He actually threatened to quit the production. इथलंच उदाहरण द्यायचं, तर अनुरागने 'ब्लॅक फ्रायडे' पासून 'देव-डी' ज्या हलाखीत आणि तरीही ज्या त्वेषाने बनवले त्याला तोड नाही. पण आता तो स्वतःशी एकही काँप्रोमाईज न करता तितक्याच त्वेषाने शंभर-दीडशे कोटींचा 'बाँबे वेलव्हेट' बनवतोच आहे की.. म्हटलं ना.. माणसा-माणसांवर असतं. आणि शर्मिला, प्रामाणिकपणे सांगायचं, तर समोरच्याला विरोध करणे खूप सोप्पे असते, पण त्यामागची कारणे आपण ज्यांना विरोध करतोय त्यांना 'समजतील' अशा पद्धतीने समजावणे आणि मुख्य म्हणजे अखेरीस पटवून देणे, ह्याला खरी चलाखी आणि हातोटी लागते. तो फिल्म मेकिंगचा एक अविभाज्य भाग आहे, असे समज हवं तर. ती हातोटी नसली, की दोन-तीन चांगल्या, पण अपयशी प्रयत्नांनंतर आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये जाऊन बसलेले आणि सार्‍या जगावर 'कळत नाही .. कळत नाही..' च्या खिन्न ओल्या पिचकार्‍या सोडणारे तांब्याचे सेमिनार-संन्यासी निर्माण होतात. पण चांगला चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रचंड बजेटची गरज नसते, हाच इथे सार्‍या फकिरांसाठी एकमेव उ:शाप आहे.

तू लिहितोस, चित्रं काढतोस आणि चित्रपट बनवतोस - अभिव्यक्तीची ही तीनही सारख्याच ताकदीची माध्यमं तू सहज हाताळू शकतोस. तुझं आवडतं माध्यम कोणतं आणि का? या तिन्ही माध्यमांची नक्की ताकद, मर्यादा व त्यांतला फरक काय?

राही: चित्रं केव्हाही मूड आला, की काढता येतात, कल्पना चमकून गेली, की कुठेही बसून केव्हाही लिहिता येते आणि लिहिल्यावर तातडीने ते वाचता येते. पण मध्यरात्री तीन वाजता लाल डोळ्यांनी आणि शांत समाधानाने फायनल एडिट पूर्ण झालेला स्वतःचा प्रोजेक्ट पहिली काही वर्षे रक्त, घाम ओकल्याखेरीज कुणालाही नाही पाहता येत. तीच त्यांची ताकद. त्याच मर्यादा. आणि आवडतं माध्यम? त्या-त्या वेळी जे करत असू, ते त्या-त्या वेळी सर्वांत जास्त आवडत असतं. सिंपल.

ही माध्यमं एकात एक गुंतलेली आहेत आणि एकातून पुढे असा सहज प्रवास होणं नैसर्गिक आहे, असं तुला वाटत नाही?

राही: मी अशा सार्‍यांचा फार विचार नाही करत. झाला, तर कळेल. नाही कळला आणि तरी होत असला, तर बरंच आहे.

लिहिणे आणि चित्रपट बनवणे याबाबतीतले तुझे प्रेरणास्रोत कोणते? त्यांच्यापेक्षा तू कोणत्या पातळ्यांवर वेगळा आहेस असं तुला वाटतं?

राही: प्रेरणास्रोत, पातळ्या, वेगळेपण वगैरे फार गहन खोल्या वगैरे लाभलेली प्रकरणे आहेत. मी नुकता नुकता गुडघाभर पाण्यात पाय मारायला शिकतोय. असा खोलात गेलो, तर बुडेन.

अनिल बर्व्यांचा मुलगा म्हणून ओळखलं जाताना काही दडपणं जाणवतात का? विशेषत: तूही लिहितोस म्हणून.

राही: मला स्वतःला बर्व्यांचं लिखाण फारसं आवडत नाही. बर्‍याचदा फार मेलोड्रॅमॅटिक आणि बहुतांशी 'लाल' नक्सलाईट विचारांनी बजबजून भरलेलं वगैरे असायचं. त्या सार्‍या 'ब्लाइंडली लेफ्टिस्ट' ठोंब्यांचा आणि व्यक्तिरेखांच्या तोंडून स्वतःच्या, लाल केशरी जी काय असेल ती, राजकीय बोंबाबोंब करणार्‍या लेखकांचा, एकूणच मला स्वतःला तिटकारा आणि कंटाळा आहे. थोडक्यात खूप लिहिण्याची त्या माणसाची हातोटी मात्र जबरदस्त होती.
माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचे मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं. पण त्यात कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. कुठल्याही भाषेत असा एखादा लेखक शतकांतून एकदा केव्हातरी चुकून अपघाताने येऊन जातो.. त्यामुळे ठीक आहे.
आणि दडपण? विनोदी प्रश्न. मी लेखक-साहित्यिक वगैरे आहे, असे भयंकर भास माझ्या अतिशय वाईट दिवसांतदेखील मला कधी झाले नाहीत आणि डोकं शुद्धीवर असेपर्यंत होणारही नाहीत. कधीतरी मूड आला, तर थोडेसे लिहून जातो, ते वर्षा-दहा वर्षांतून केव्हातरी टीचभर. बास. त्यामुळे कुठलं दडपण? कसलं दडपण? आणि कशासाठी?

--------------------------------------------------------------------------------

राही एकटाच काही या 'दरम्यानच्या काळात' अडकून पडलेला नाहीये. त्याच्यासारखे अनेक कलाकारांचे अस्वस्थ आत्मे आजूबाजूला असतात. स्वतःशी, बाहेरच्या जगाशी त्यांचा सतत झगडा चालूच असतो. 'ईटर्नल स्ट्रगलर' असतात ते त्या अर्थाने. कदाचित ते आपल्याही आत असतात. या झगड्याला सामोरे जायची वेळ येतेच कधी ना कधी.. काय करायचं असतं तेव्हा आपण? राहीसारख्या मनस्वी कलावंताकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो बहुधा.

Tuesday, August 04, 2009

असंच!

( खरं तर या पोस्टला काही अर्थ नाही तसा. पण अर्थाचंच लिहायला हवय असं कोणी सांगीतलं? अर्थात मुद्दाम ठरवून निरर्थक लिहायचं असंही काही नाही. मेल थ्रू पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करायचं बरेच दिवस मनात होतं ते आज करायचं ठरवलं पण विषयच डोक्यात नव्हता. मग समोर एचटी च्या संडे सप्लीमेन्टमधून दोन चिरतरुण सुंदर चेहरे डोकावताना दिसले. )

महाराणी गायत्री देवी आणि अभिनेत्री लीला नायडू.
दोन्ही सर्वात सुंदर स्त्रिया लागोपाठ जाव्यात हा काय विचित्र योगायोग? केवळ व्होगच्या यादीत प्रसिद्ध झाली त्यांची नावे म्हणून त्या जगातल्या सर्वात सुंदर स्त्रिया असं नाही मला म्हणायचं. खरोखरच अतिशय क्लासिक चेहरे होते दोघींचे.

सिक्किम ट्रेकला आम्ही गेलो होतो तेव्हा येताना कुचबिहार संस्थान ला दोन दिवस राहिलो होतो. जवळच लतागुरी अभयारण्य होतं ते पहाणं हा मुख्य हेतू होता. सिक्किम-भुतानचा नितांत सुंदर निसर्ग पाहिल्यावर कोणत्या कधी नावही न ऐकलेल्या कुचबिहार संस्थानातले कोणे एका काळातले राजवाडे आणि गतवैभव पहाण्यात निदान मला तरी बिल्कूल इंटरेस्ट नव्हता. शिवाय त्या राजवाड्याचं रुपांतर म्युझियममधे केलं आहे हे ऐकल्यावर तर ते स्कीपच करायचं ठरवलं. पण मग लतागुरी दुस-या दिवशी बघायचं ठरलं आणि कुचबिहारच्या हॉटेलात संध्याकाळ घालवणं जिवावर आलं. राजवाडा सरप्राइजींगली अतिशय उत्त्तम अवस्थेत होता. उतरत्या संध्याकाळी तिथे रोषणाईसुद्धा केली होती.
राजवाड्यात शिरल्यावर पहिल्याच दालनात एका डिव्हाईनली सुंदर टीनएज मुलीचा घोड्याशेजारी उभा असलेला एक ब्लॅक ऍन्ड व्हाईट आता सेपिया टोन आलेला फोटोग्राफ पाहिला आणि पाय हलेचनात. रोमन हॉलिडेमधली ऑड्रे हेपबर्न माझ्यामते आत्तापर्यंतची सर्वात सुंदर रॉयल ब्युटी. पण हा फोटो तर तिच्यापेक्षाही निदान शंभर पटींनी सुंदर होता. सारं दालनच या सुंदर मुलीच्या फोटोंनी भरुन गेलेलं. अगदी तान्हेपणापासून पुढच्या सर्व टप्प्यांमधे ते सौंदर्य उमलत जाताना प्रत्येक फोटोत दिसत होते.
कुचबिहार म्हणजे गायत्रीदेवींचे जन्मस्थान हे मला माहितच नव्हते. काहीशा अंधा-या त्या दालनात प्रत्येक छायाचित्रातून गायत्री देवींचे अलौकिक सौंदर्य उजळून निघत होते. कमळासारखे डोळे असणे म्हणजे काय हे त्यादिवशी कळलं.
इतर राजघराण्यातील स्त्रियांनी कितीही तलम शिफॉन नेसून गळ्यात टपो-या मोत्यांचा दुपदरी सर घालून महाराणी गायत्री देवींची नक्कल केली तरी त्यांच्या त्या अस्सल क्लासिक फ़ेस कटची बरोबरी करता येणे कुणाला कधीच शक्य नव्हते.

आणि लीला नायडू!!

मला खूप पूर्वी टीव्हीवर पाहिलेला ब्लॅक ऍन्ड व्हाईट ’अनुराधा’ अनेक कारणांसाठी कधीही विसरता आलेला नाही. त्यातली ती नाजूक, क्लासिक युरोपियन चेहरे शैलीतली अभिनेत्री, बलराज सहानीची संयत एक्स्प्रेशन्स, रवीशंकरांची त्यातली सतार आणि ते गाणं.. जाने कैसे सपनोंमे खो गयी आखियां... ’

नंतर कधीतरी बेनेगलच्या त्रिकाल मधे सुद्धा लीला नायडू दिसल्या होत्या. तेव्हां प्रौढ वय असणार त्यांचं. पण तरीही तितक्याच आवडल्या.

मात्र या कितीही सुंदर स्त्रिया असल्या तरी वयानुसार काळाला सुद्धा आपल्या खुणा त्यांच्या चेह-यावर उमटवण्याचा मोह आवरणे शक्य झाले नसावे. त्या तशा उमटल्याही. पण सौंदर्य किंचितही न उणावता.

गायत्री देवी आणि लीला नायडू या दोघींच्या वृद्धत्वातल्या चेह-यावरचं सुरकुत्यांचं अस्पष्ट जाळं पाहिलं की मला जीएंची ती अप्रतिम उपमा आठवते. " एखाद्या तेजस्वी महावस्त्राला अंगभुत पडलेल्या चुण्या असाव्यात तशा त्या खानदानी चेह-यावरच्या सुरकुत्या .." वृद्धत्वातल्या सौंदर्याचं इतकं अचूक वर्णन दुसरं नाही आणि ह्या शब्दांना सार्थ ठरवणारे इतके सुंदर चेहरेही दुसरे नाहीतच.

Saturday, March 14, 2009

पेल्टोफ़ोरम डायरी


फ़ेब्रुवारी महिना संपला.
उन्हाळा चांगलाच सुरु झालेला आहे. मुंबईत तो तसा कधी नसतो म्हणा! पण या दिवसांत घाम कमी त्यामुळे उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवतो. आजूबाजूचा शिल्लक निसर्गही धूळभरला, रुक्ष आणि कोमेजलेला.
भर दुपारी माझ्या खिडकीबाहेरच्या त्या कृश, काटकिट्या, तपकिरी फांद्यांचा पसारा कसाबसा सावरत उभ्या असणा-या उदास पेल्टोफ़ोरमला (दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा असाच दिसतोय) पहात मी हातातलं रस्किनचं पुस्तक हताशपणे मिटते. मला त्याचा (पुन्हा एकदा) हेवा वाटत असतो. या दिवसांत त्याच्या खिडकीबाहेरच्या चेरीच्या झाडांवर गुलाबी कळ्या उमलायच्या घाईला आलेल्या आहेत. वसंत त्याच्या दाराशी आहे अगदी आता. हिमालयातल्या देवदारांनी भरलेल्या उतारांवरच्या गावातल्या त्याच्या घराच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याच्या हाताच्या अंतरावर असतो. आणि तो लवकरच फ़ुलणार असतो.

------------------

मार्चचा पहिला आठवडा संपत आला. उन आता अजूनच वाढलय. अगदी सकाळी आठलाही डोळ्यांवर गॉगल्स चढवावे असं वाटायला लागतं. अकरानंतर तर घामाच्या धाराच सुरु होतात. आंब्यांना आणि ब-याचशा झाडांना छान कोवळी पालवी फ़ुटतेय तांबुस.
माझ्या खिडकीबाहेरचा पेल्टोफ़ोरम अजूनही तसाच आहे. मळकट, तपकिरी सुकलेल्या आपल्य काटकिळ्या फांद्यांचा ढिगारा कसाबसा सांभाळत. काही घरी येणारे तर अगदिच मेलय हे झाड असंही खुशाल म्हणतात. मी लक्ष देत नाही.

-------------------

यावर्षी मुंबईत थंडीही अजिबात पडली नव्हती. फ़ेब्रुवारी महिना संपत आला की खिडकीच्या काचांआडून सोनसळी, उबदार उन्हाच्या लडी अंगावर खेळायला सुरुवात व्हायची आणि कदाचित म्हणूनही असेल पण पेल्टोफ़ोरमचे ते कृश विरुप नजरेला एरवी इतकं खुपायचं नाही.
पण आता त्याकडे बघवेना. संक्रांतीच्या आसपास उडवलेल्या पतंगांपैकी एक पांढरा पतंग एका काडीसारख्या सुकलेल्या फांदीच्या टोकावर अडकून निर्जिवपणे हलत होता. तेव्हढीच काय ती त्या झाडावर जिवंत हालचाल.
शिशिर ऋतुंत तसंही पेल्टोफ़ोरमवर मागे राहिलेलं अस्तित्व असतं फक्त तांब्याच्या लांबट चपट्या शिक्क्यांसारख्या दिसणा-या शेंगांचं. त्या काटकिळ्या फांद्यांना झाकून टाकून आपलं रस्टी कॉपरशिल्ड बेअरर नाव सा-या हिवाळाभर सार्थ करत रहातं हे झाड.
पेल्टोफ़ोरमवर अजून ताम्रयुगच चालू आहे एकंदरीत. हवेत मार्च महिन्यातला ताजा, सोनेरी गंध पसरला असला तरी या झाडावर त्याच्या सुवर्णयुगाची वैभवी झळाळी पसरायला अजून वेळ आहे. वसंत फार दूर आहे...!

------------------------

मार्चचा दुसरा आठवडा सुरु झाला आणि एका पहाटे खिडकीच्या काचेबाहेरचे केशरी पडदे दूर केल्या केल्या समोरच्या उगवतीच्या फिकट कोवळ्या प्रकाशातून एक तेजस्वी, पोपटी, तजेलदार हिरव्या नव्हाळीचा झोतच सामोरा आला. गेले दोनेक दिवस छोट्या, हिरव्या चिंचेच्या पानांहून खूपच सतेज आणि थोड्या मोठ्या आकाराच्या पानांचे झुबके फांद्यांच्या कृश हातांच्या ह्या त्या कोप-यांवर झालरींसारखे झुलत होते खरे पण त्याचा हा एवढा मोठा हिरवा मंडप असा एका रात्रीतून बनेल असं वाटलच नव्हतं.

मी अतीव आनंदाने काचा उघडते. पानांचा हिरवा पिसारा नजरेसमोर फ़ुलून आला होता. पोपटी पानांच्या गर्दीतून मधूनच माना वर काढून आता सोबत मिळाल्याच्या आनंदात डुलणारे ताम्रवर्णी शेंगांचे तुरे अचानक देखणे, सतेज दिसायला लागले.
सूर्य पूर्ण उगवला आणि त्याच्या सोनेरी प्रकाशाचे झोत आज नेहमीसारखे डायरेक्ट खिडक्यांमधून घरात अधिरपणे नाही घुसले. हिरव्या पानांशी लडिवाळपणे बिलगून पूर्ण एका पानगळीच्या मोसमात राहून गेलेल्या गप्पांची देवाणघेवाण करुन झाल्यावर मग सावकाश ते माझ्यापर्यंत पोचले.
मला घाई नव्हती.
नजरेसमोरची सोनेरी हिरव्या कवडशांची नक्षी आता हा एक आख्खा वसंत ऋतूभर माझ्या खिडकीबाहेर माझ्यासाठी ओठंगून राहणार होती. शिवाय आता लगेचच येणा-या एका रात्रीत कधीतरी ह्या हिरव्या नकाबामागून ते लख्ख सुवर्णमुद्रांचं सौंदर्य अशाच पहाटे माझ्यापर्यंत ह्याच खिडकीतून येऊन पोचणार होतं. विस्तृत वैभव अचानकच डोळ्यांपुढे ओतण्याचं या झाडाचं कसब आता माझ्या परिचयाचं झालं होतं.

मी आनंदाने वाट पहायला तयार होते.


-------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या घरातून थेट समोर दिसणारा पेल्टोफ़ोरम गेली ६/७ वर्षं तरी तिथे आहे. आता त्याचा विस्तार चांगलाच पसरलाय. रस्त्यावर अजूनही इतर बरीच पेल्टोफ़ोरम, गुलमोहोर, करंज आणि अर्थातच आंब्याची, नारळीची झाडे आहेत. पण आमच्या खिडकीसमोरचा पेल्टोफ़ोरम स्वत:च्याच मस्तीत असल्यासारखा. इतर झाडांवर जेव्हा पालवी तेव्हा हा उघडाबोडका आणि बाकीच्या झाडांवर पावसाच्या झडीत एकही फ़ुल शिल्लक रहात नाही तेव्हा याच्या छतावर पिवळ्याजर्द फ़ुलांचे बुंदके भरभरुन.
पूर्वी फक्त हॉलच्याच खिडक्यांमधून याच्या फांद्या दिसायच्या आणि दुस-या मजल्यावरच्या आमच्या घराच्या लेव्हलला जेमतेम पोचायच्या. आता पूर्ण बहरात असला की नजरेत मावत नाही. स्वयंपाकघर, बेडरुमच्या खिडक्यांमधूनही याच्या फांद्या नजरेसमोर दिसतात. चार वर्षांपूर्वी हॉलच्या पूर्वाभिमुख अर्ध्या भिंतींवरच्या खिडक्या काढून आम्ही फ़्रेन्च विन्डोज बसवल्या. ती भिंत पूर्ण काचेचीच झाली.
आणि त्याच वर्षी पेल्टोफ़ोरमला पहिला भरगच्च बहर आला.

बरेच दिवस आधी हिरव्या पालवीने आणि ताम्रशेंगांनी भरलेल्या त्याच्या फांद्यांवर बुंदीसारख्या कळ्यांचे उभट तुरे डोकावत होते. बघता बघता सा-या झाडाची कॅनोपी या तु-यांनी भरुन गेली. मग त्यावर एकटं दुकटं चुकार पिवळं फ़ुलही दिसायला लागलं होतं. पण पानांची हिरवी गर्दी इतकी दाट की त्यांच्याकडे लक्षही जात नव्हतं. त्यात ह्या फ़ुलांचा रंग अमलताशाच्या फ़ुलांसारखा तकतकित पिवळा नाही. थोडी गडद झाक आणि मधोमध चॉकलेटी पुंकेसरांचा वर्तुळाकार झुबका.
तपकिरी शेंगांची गर्दी आणि हिरवी पाने अजूनही झाडावर ऐन बहरात असताना ही तुरळक फ़ुले फारशी आकर्षक दिसत नव्हती. मात्र एक दिवस पहाटे झाडावरच्या सगळ्याच कळ्यांनी ठरवून ठेवल्यासारखे डोळे उघडले आणि सोनेरी जरतारी बुंदक्यांसरख्या फुलांनी झाडावरचं प्रत्येक हिरवं पान झाकून टाकलं.
भिंतीच्या काचा पूर्ण पिवळ्या रंगांनी रंगल्या.
ते सोनेरी वैभव अवर्णनीय होतं.
घरात येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या सोनेरी झगमगत्या अक्षरश: डोंगरासारख्या आकारात रचलेल्या फ़ुलांच्या राशीकडे पहात रहात. उतरत्या दुपारी त्यावर सातभाईंचा गजबजाट, फ़ुलपाखरांची येजा सुरु होई. सकाळी मधमाशा गर्दी करत. काही उघड्या काचांमधून घरातही शिरत.
पण आमची तक्रार नसे.
अगदी मध्यरात्री सुद्धा उठून ते फ़ुलांच वैभव पहात बसावं असं होतं. आकाशात चंद्राच्या प्रकाशात ते पिवळे जरतारी बुंदके अजूनच सतेज होत. पायातळीचा रस्त्यावरही याच फ़ुलांचे यलोकार्पेट. सारा आसमंतातच सोनेरी आभा पसरुन रहाते.

पेल्टोफ़ोरम त्यावर्षीपासून आमच्या खिडकीसमोर असाच भरभरुन फ़ुलतोय.
वाट पहायला लावतो आणि बहरतो तेव्हां हातचं राखून न ठेवता. मनसोक्त.

त्या फ़ुलांच्या कडांनी कातरल्यासारख्या दिसणा-या नाजूक नक्षीदार पातळ सोनेरी पाकळ्य़ांमधून असंख्य पिवळी त्या फ़ुलांपेक्षा थोड्या फ़िक्या रंगांची फ़ुलपाखरं बागडतात. एखाद्या संध्याकाळी दुर्मिळ ब्लू मॉर्मोनही फ़ुलांवर पंख पसरुन जातं. पहाटेला भारद्वाज त्या सुवर्णराशीवर बसून जातो आणि पिवळे चिमुकले टिट्स, केशरी फ़ुलचुखे, सनबर्ड्स तर झाडावरुन मुक्काम हलवयालाच तयार नसतात.

मुंबईत एप्रिल-मे चा उन्हाळा तेव्हा ऐन भरात असतो. भर दुपारी घामाच्या धारा वहात असताना खिडकीत बसून त्या पिवळ्याजर्द सोनमोहोरांच्या राशीवर आपले निळे पंख पसरुन निवांत पहुडलेलं एखादं फ़ुलपाखरु मला दिसतं.
मला आता रस्किनचा हेवा वाटत नसतो. माझ्याही खिडकीबाहेर वसंत फ़ुललेला असतो. पेल्टोफ़ोरम ऐन बहरात असतो.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पेल्टोफ़ोरम इंडिजिनस नाही. दक्षिण अमेरीकेतून तो आपल्या इथे आलेला आणि आता मुंबईच्या मातीने, पक्षांनी, फ़ुलपाखरांनी आपलाच मानून टाकलेला. उप-यांना आपलं म्हणायच्या त्यांच्या सवयीनेही असेल बहुतेक.
मुळ या मातीतलं नाही म्हणूनच बकुळ, अमलताश (बहावा)चा असतो तसा याचा कुठलाच उल्लेख संस्कृत काव्यांत, चालिरीतींत, अगदी गुलमोहोराचा असतो तसा आधुनिक साहित्यामधेही नाही. त्यादृष्टीने इतक्या देखण्या फ़ुलांचं वैभव अंगावर वागवूनही हा उपेक्षितच. शिवाय अतिरेक करुन मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर याची लागवड करुन सर्वसामान्य करुन टाकलेला. मुंबईत एकेकाळी गुलमोहोर आणि बहाव्याच्या रोडऍव्हेन्य़ूसाठी असणा-या पॉप्युलॅरिटीवरही पेल्टोफ़ोरमच्या संख्येने मात केली. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा पण त्या बळकट नसतात, केबलच्या जाळ्यांना याचा अडथळाच होतो आणि तरी अगदी छोट्या गल्ल्यांमधूनही काही सेन्स न दाखवता मुन्सिपाल्टीने हा लावून टाकलेला. त्यामुळे अनेकांच्या रोषालाही हा पात्र.

माझ्या दृष्टीने मात्र माझ्या खिडकीबाहेर निसर्गाचं एक संपूर्ण चक्र फ़ुलत ठेवणारा हा पेल्टोफ़ोरम अगदी खास. माझ्या घरासाठीच फ़ुलणारा. फ़ुलेल आता. मग मी फोटो टाकीन :)


-------------------------------------------------------------------------------------------------